नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’

बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या धर्मपत्नी पूर्वाश्रमीच्या सिनेअभिनेत्री नवनीत राणा  यांच्या जात पडताळणीचे प्रकरण कमालीचे interesting आहे. नवनीत राणा सिनेमात होत्या म्हणून की काय एखाद्या चित्रपटासारखं नाट्य , थरार या स्टोरीत आहे . आनंदराव अडसूळसारखा  केंद्रात मंत्री राहिलेला, पाच वेळा खासदार राहिलेला कसलेला पहिलवान या प्रकरणात हतबल झाला आहे . गेल्या पाच वर्षात या विषयातील शोधकाम करण्यासाठी अडसुळानी ५० लाखापेक्षा अधिक खर्च केला . दोन ते तीन माणस केवळ या कामात गुंतले होते. पार पंजाबातील नवनीतच्या वडिलांच्या खेड्यापासून कुठे कुठे ते भटकंती करून आले . मध्यंतरी अडसूळ साहेबांचं घुटने बदलण्याच operation होतं. पण साहेबांचं लक्ष या प्रकरणाकडेच होते. एवढी सगळी मेहनत करून  निकाल काय तर तो राणा यांच्या बाजूने लागला.

      मागील वेळी अजित पवार यांचा राणांवर वरदहस्त असल्याने जात पडताळणी समिती त्यांच्या दबावात होती आता तर अडसूळ यांचा पक्ष सत्तेत आहे . तरीही निकाल राणांच्याच बाजूने जावा? आता कोणाची मेहरनजर आहे? राजकीय वर्तुळातील लोक थेट मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवतात . तसं जर असेल तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा भाजपच्या उमेदवार आहेत , हे आताच लिहून घ्या . मागच्या निवडणुकीतच नवनीत यांनी अडसूळना घाम फोडला होता . मात्र मोदी लाट व संजय खोडकेंची आतून साथ यामुळे ते तरुन गेले .   बाकी रवी राणा ची किमया पुन्हा पाहायला मिळाली . मेलेल्या वाघाच्या पिंजरयावर बसून मिरवणूक काढण्यापासून स्वत:च्या लग्नानिमित्त आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या व मुलं असलेल्या महिलांना नववधूच्या वेषात बसविण्याचा पराक्रम राणांच्या नावावर आहे . राजकारणात सब जायज आहे यावर त्यांचा ठाम विश्वास आहे . तर्काने विचार करणाऱ्याला रवी राणा कळत नाही. वहा लॉजिक के लिये कोई जगह नाही. पार Unconventional पद्धतीने ते राजकारण करतात. त्यामुळे खोडके , रावसाहेब, अडसूळ यांची त्यांनी पार दमछाक केली . अर्थात हा काही कौतुकाचा विषय नाही . पण रवी राणा म्हणजे असा बोक्या आहे ज्याला तुम्ही कुठून, कसंही फेका तो काही क्षणातच चार पायावर उभा राहलेला दिसेल. नवनीत च्या जात प्रमाणपत्रात ‘गडबड’ आहे ये अख्खा अमरावती जाणता है .. पण जात पडताळणी समितीला ती सापडत नाही त्याला काय करणार ? त्यातूनच नवनीत कौर यांचे वडील हरभजनसिंह कुंडलेस यांचे जात प्रमाणपत्र रद्द होते आणि जप्त होते पण पोरीचे वैध ठरते . आहे की नाही गम्मत ? या जात पडताळणी समितीच्या सदस्यांचा अमरावतीकरांनी जाहीर सत्कार करायला हवा . एखाद्या प्रकरणात न्याय ( हा काय असतो?) मिळण्यासाठी पुरावे हवे असतात म्हणतात , इथे तर अडसूळ यांच्याकडे ढीगभर पुरावे आहेत . उपयोग काय ? मागच्या वेळेस त्यांच्याकडे डेप्युटी सीएम नव्हते आता सीएम नाही . देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळात बसणाऱ्या   आणि दोन चार वेळा चेन्नईच्या संस्थेचे ‘संसद रत्न’ ठरलेल्या  अडसूळ यांच्यासाठी ही कायद्याची ऐसीतैशी धक्कादायक आणि निराशाजनक आहे . आता ते हायकोर्टात जाणार म्हणे . जावोत बापडे . तिथेही माणसचं बसतात. आणि जिथे जिथे माणस बसतात तिथे रवी राणा काहीही करू शकतात . कारण कुठला माणूस कोणत्या तापमानात  वितळतो या विषयात अगदी लहान वयातच त्यांनी ‘डॉकटरकी’ मिळवली आहे .  लहान असतानापासूनच बाळाचे पाय पाळण्यात  पाहिलेले अनेक अमरावतीकर आहेत. आणि  याउपरही विश्वास नसत बसेल  तर विचारा.. सक्तीचा एकांतवास भोगत असलेल्या  संजय खोडके यांना….

      बाकी या प्रकरणाने बडनेराची आशा लावून बसलेले तुषार भारतीय यांनी सावध व्हायला हवं. .. सीएम, गडकरी साहेब कितीबी गोड बोलले तर त्यांच्यावर भरोसा ठेवायचा नाय बा ..नाय बा …

Previous articleहिंसेची पाळंमुळं संस्कारातच!
Next articleविचारधारा आणि कार्यकर्ता दोघांनाही एक्सपायरी डेट असते !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.