एका अँकरचा मृत्यू आणि…..

-विजय चोरमारे

करोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी टीव्ही नाईनचा रिपोर्टर पांडुरंग रायकर याचा मृत्यू झाला, तेव्हा दोन सप्टेंबर २०२० रोजी मी एक पोस्ट लिहिली होती. शीर्षक होतं, `परदुःख शीतल…`

परदुःख शीतल असतं. ते घरात घुसतं तेव्हा त्याचं गांभीर्य जाणवतं. खरं तर दुःख घरात घुसल्यावर तरी त्याचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. पांडुरंग रायकर याचं जाणं अत्यंत दुःखद आहे. एक उमदा पत्रकार व्यवस्थेच्या गलथानपणाचा बळी ठरला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक केंद्रीय मंत्र्यांपर्यंत थेट पोहोच असलेल्या अनेक पत्रकारांनी प्रयत्न करूनही पुण्यासारख्या शहरात त्याच्यासाठी वेळेत व्हेंटिलेटर असलेला बेड आणि अँब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. बूम हातात असल्यानंतरचा किंवा पत्रकारितेचं आयकार्ड गळ्यात घातल्यानंतरचा आपला रुबाब किती क्षूद्र असतो, याची जाणीव यानिमित्तानं अनेकांना झाली असेल. या परिस्थितीत सामान्य माणसाची काय अवस्था असेल याचा विचार केलेला बरा. अशा परिस्थितीत किती वृत्तवाहिन्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारला धारेवर धरलं? नाही धरलं, कारण परदुःख शीतल. म्हणून आपल्यातला माणूस गेल्यावर तरी वृत्तवाहिन्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं…. असा त्या पोस्टचा आशय होता.

`आज तक`चा अँकर रोहित सरदानाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मला या पाठीमागच्या पोस्टची आठवण झाली. अलीकडं टीव्हीच्या अँकर्सना नटनट्यांच्या तोडीचं ग्लॅमर प्राप्त झालंय. त्यांचं सतत टीव्हीवर दिसणं आणि सिनेमापासून क्रिकेटपर्यंत सगळ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटींशी सहज संवाद साधणं, मंत्र्या-संत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत ऊठबस असणं कुणालाही हेवा वाटणारं असतं. रोहित सरदानाचं तसंच होतं. `आज तक` सारख्या सर्वाधिक टीआरपी असलेल्या वाहिनीवर मुख्य डिबेट शो घेणारा अँकर म्हणून त्याला सगळे ओळखत होते. असा नेहमीच्या दिसण्यातला चेहरा अचानक जाणं धक्कादायक असतं. माध्यमात काम करणा-या सहका-यांसाठीही आणि त्याला रोज पाहणा-या दर्शकांसाठीही. त्याचमुळं प्रख्यात कायदेतज्ज्ञ सोली सोराबजी यांच्या जाण्याची बातमी एका ओळीत दिली जात असताना रोहित सरदानाच्या बातमीला तुलनेने मोठी जागा मिळाली. अर्थात तरुण पत्रकाराच्या अचानक जाण्याचं शॉकिंग इलेमेंट त्यात होतं. आपल्याकडच्या प्रसारमाध्यमांचं हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एरव्ही त्यांना आपल्या स्पर्धक माध्यमातल्या पत्रकारांच्या नावाचंही वावडं असतं. पराकोटीची अस्पृश्यता असते. पी. साईनाथ यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाला तेव्हा काही इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांची बातमीही छापली नव्हती. रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही इतर वृत्तवाहिन्यांनी साधी नोंदही घेतलेली आढळलं नव्हतं. म्हणजे आपल्या व्यवसायबंधूचं जे दाखवायला पाहिजे ते टाळलं जातं. आणि पत्रकार मेला की सगळ्यांना त्याच्याबद्दल प्रेमाचं भरतं येतं. हे सगळीकडं पाहायला मिळतं. रोहित सरदानाच्या बातमीचंही तसंच घडलं. तरुण वयात एक उमदा पत्रकार जाणं धक्कादायक आणि वेदनादायक आहे. त्यात पुन्हा त्याच्या दोन लहान मुलींचे फोटो पाहिल्यानंतर, गेलेला माणूस कसाही असला तरी या पोरींचा बाप होता, त्यांची अवस्था काय असेल या कल्पनेनं हृदय पिळवटून निघत होतं.

एखाद्या पत्रकाराच्या मृत्यूनंतर तो काम करीत असलेल्या वृत्तपत्रातही त्याची बातमी कुठल्या पानावर कुठं छापायची याबद्दलची खलबतं अंक छापायला जायच्या शेवटच्या मिनिटापर्यंत चालत असतात. अगदी शेवटच्या मिनिटाला फोन करून ती बातमी हाफ पेजच्या खाली घ्या वगैरे पद्धतींचे निरोप दिले जातात. एखाद्याचा अपघाती मृत्यू असला तर थोडी जास्तीची जागा मिळते. वृत्तपत्रात काम करणा-या फोटोग्राफर्सची तर अनेकदा जबाबदारीच घेतली जात नाही. ती जबाबदारी टाळण्यासाठी मुक्त छायाचित्रकार म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आणि तसा उल्लेख असलेली प्रेसनोट अन्य वृत्तपत्रांकडे पाठवली जाते, जेणेकरून त्यांनीही आपल्या वृत्तपत्राचा उल्लेख करू नये. प्रादेशिक वार्ताहरांची परिस्थिती याहून भीषण असते. अपघातात मेलेल्या पत्रकारांच्या खिशातील आयकार्ड काढून घेण्याची जबाबदारी संस्थेकडून जिल्हा आवृत्तीच्या संपादकावर सोपवली जाते. जेणेकरून पुढे नुकसानभरपाई वगैरे गोष्टी मागे लागू नयेत.

असं सगळं असताना `आज तक ` वाहिनीनं रोहित सरदानाच्या मृत्यूनंतर जे कव्हरेज दिलं ते अचंबित करणारं होतं. त्याच्या सहका-यांना भावना अनावर होणं वगैरे स्वाभाविक आहे. हे कुठंही घडू शकतं. काल-परवापर्यंत आपल्यासोबत असलेला सहकारी अचानक जातो, तेव्हा त्या दुःखाची, धक्क्याची जातकुळी वेगळी असते. त्यामुळं `आज तक`च्या अँकर्सनी ज्या रितीनं भावना व्यक्त केल्या त्या स्वाभाविक होत्या. परंतु यातली दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय म्हटल्या जाणा-या देशातल्या एका प्रमुख वृत्तवाहिनीकडून व्यक्तिगत भावनांचा बाजार मांडून टीआरपीचा खेळ खेळला. करोना, लसीकरण यासंदर्भातील त्याच त्या बातम्या सगळीकडं सुरू असताना आपल्याकडं खपणारा हा वेगळा माल आहे, हे लक्षात घेऊन जाणीवपूर्वक केलेला हा शो होता. त्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव म्हणता येणार नाही, परंतु धंदेवाईकपणा अधिक होता. सवंगपणा होता.

चार वर्षांपूर्वी छत्तीसगढमधल्या `आयबीसी २४` या वृत्तवाहिनीच्या अँकर सुप्रीत कौर यांना बातम्या सांगत असताना रिपोर्टरनं एका अपघाताची बातमी सांगितली. त्या अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. तेव्हा स्वतःच्या पतीच्या मृत्यूची बातमीही धीरोदात्तपणे सांगणा-या छत्तीसगढमधल्या छोट्याशा वाहिनीच्या अँकरची व्यावसायिक नीतीमत्ता कुठे आणि देशातील प्रमुख राष्ट्रीय वाहिनीची धंदेवाईक रडारड कुठे!

रोहित सरदानाच्या जाण्यानंतर दिल्लीतल्या टीव्ही जगतातल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याही आवर्जून वाचण्याजोग्या आहेत. गेले काही आठवडे दिल्लीसह देशात मृत्यूचे तांडव सुरू आहे. देशाचे पंतप्रधान जळणा-या चितांकडे पाठ फिरवून पश्चिम बंगालमद्ये `दीद्दी ओ दीद्दी` करत बोंबलत फिरत होते. देशाचे गृहमंत्री मास्क न लावता हजारोंची गर्दी जमवून रोड शो करीत होते तेव्हा यापैकी एकानेही त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस केले नाही. हजारो माणसं मरत असतानाही यांची मोदीनिष्ठा जराही ढळली नाही. उलट काहीजण या काळात नकारात्मकता पसरवण्याऐवजी सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्याचा शहाजोग सल्ला देत होते. अवतीभवती हजारो चिता जळत असताना मोदी-शहांना सांभाळून घेण्याची कसरत करणारे आपल्यातला एकजण गेल्यावर विलाप करू लागले, तेव्हा त्यांच्या दुःखापेक्षाही दांभिकपणाच जास्त दिसत होता. आज विलाप करणा-या या सगळ्यांनी योग्य वेळी सरकारला प्रश्न विचारले असते तर ही पाळी आली नसती. सत्तेवर राहुल गांधी नव्हे, तर नरेंद्र मोदी आहेत याचे भानही अनेकांना नसल्याचे अलीकडच्या काळात दिसत होते.

रोहित सरदानाचं जाणं दुःखदायक आहे. परंतु त्याची पत्रकारिताही विद्वेषाच्या पायावर उभी असलेली होती. टीव्ही टुडे ग्रूपचं वैशिष्ट्य असं की, एका बाजूला राजदीप सरदेसाई आणि दुसरीकडं रोहित सरदाना अशी परस्परविरोधी मंडळी सामावून घेण्याएवढा विशाल दृष्टिकोन त्यांच्याकडं आहे. दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या कासगंजमध्ये तिरंगा यात्रा काढणा-या मंडळींच्या अतिरेकामुळं दंगल घडली तेव्हा रोहित सरदानानं खोट्या माहितीवर आधारित शो करून मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या शोचं नाव होतं दंगल. कुठंही जातीय, धार्मिक दंगल घडवण्याची क्षमता त्याच्या शो मध्ये होती. पूर्वाश्रमीचा अभाविपचा कार्यकर्ता असल्यामुळं असेल, परंतु मुस्लिमद्वेष त्याच्यात खचाखच भरलेला होता. त्याच्या शो मधून, त्याच्या ट्विट्समधून तसेच विविध विद्यापीठांमधील संघर्षाच्या काळात त्याचं दर्शन घडत होतं. वर्षभरापूर्वी रोहित सरदानाच्या डिबेट शोनंतर काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता आणि त्याचा त्याच्यावर यत्किंचितही परिणाम झाल्याचे कधी दिसले नव्हते. रोहित सरदानाच्या पत्रकारितेचे मूल्यमापन करण्याची ही जागा नव्हे. परंतु काही गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ज्या व्यवस्थेचा हस्तक म्हणून तो वावरत होता, त्या व्यवस्थेला त्याच्यासह दिल्लीतल्या गोदी मीडियाने काही प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवलं असतं तर कदाचित दिल्लीतली आणि देशातली परिस्थिती आज दिसते तेवढी बिकट बनली नसती. हजारो माणसं मरत असताना ज्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही, अशी मंडळी टीव्हीच्या पडद्यावर रडतात तेव्हा ते खरं असलं तरी खोटं वाटतं, ते त्यामुळंच!

रोहित सरदानाचं जाणं वेदनादायक आहेच, परंतु त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्या प्रश्नांना गोदी मीडिया भिडला तरच त्यांचा खरा विलाप खोटा वाटणार नाही.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

9594999456

 

 

Previous articleराही मासूम रझा यांचे ‘टोपी शुक्ला’
Next articleबुद्धीच्या देशा…महाराष्ट्र देशा…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.