एवढी होती माया, भूल पडली रामाला

(साभार- दैनिक ‘सामना’- उत्सव पुरवणी)

-डॉ. मुकुंद कुळे

कितीही आधुनिक काळात जगत असलो, तरी शिव-पार्वती, राधा-कृष्ण आणि राम-सीता या दैवत-जोडप्यांची मोहिनी भारतीय मनावरून उतरायला तयार नाही. भारतीय मनावर अद्यापही असलेलं पुराणकथांचं गारूड याला कारणीभूत आहे. ‘पुराणातली वानगी पुराणात’ असं म्हटलं जात असलं तरी, आजची परिस्थिती तशी नाही. उलट आज अधिकाधिक आपण पुराणकाळाशी जखडले जात आहोत आणि एकदा का हे जखडलेपण आलं की आपण परंपरेला प्रश्न विचारणं विसरून जातो. त्यातूनच आपण मग शिव-पार्वती, राधा-कृष्ण आणि राम-सीता या देवतांच्या जोड्यांकडेही आध्यात्मिक-धार्मिक भावनेनेच पाहतो. पण या जोडप्यांवरचं हे धार्मिकतेचं-पुराणाचं अवगुंठन मागे सारलं तर प्रत्यक्षात काय दिसतं, विशेषतः राम-सीतेच्या बाबतीत?

राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं? अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी? इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला? लोकसंस्कृतीतील महिलांच्या मनाचा मागोवा घेतला तर आपल्याला राम-सीतेच्या नात्यातील वेगळ्याच भावबंधांचं दर्शन घडतं. हे भावबंध नेहमीच सुखावह नव्हते, किंबहुना सीतेसाठी तर ते अनेकदा दुःखदायकच होते. परंतु आजवर रामाचंच कौतुक करणाऱ्या परंपरावाद्यांनी सीतेचं हे दुःख कधीच उजागर केलं नाही.

‘सोशिकतेचं मूर्तिमंत प्रतीक’ अशी सीतेची प्रतिमा आजपर्यंत भारतीय जनमानसात कायम होती आणि ती तशीच रहावी यात परंपरावाद्यांचा एक मोठा डाव होता. कारण समाजात असे आदर्श उभे केले की मागून येणाऱ्या स्त्रियांना त्यांचा दाखला देणं सोपं जातं. स्त्रियांचा पतिव्रता म्हणून जो गौरव केला जातो, त्यामागेही हेच कारस्थान आहे. जेणेकरून स्त्रीने आवाज उठवू नये. मुळात स्वतःचं स्वतंत्र असित्वच मानू नये. याच न्यायाने आजवर सीतेचा आवाज दाबला गेला होता. काही वर्षांपूर्वी मामा वरेरकर यांनी लिहिलेल्या आणि मो. ग. रांगणेकरांनी रंगभूमीवर आणलेल्या ‘भूमिकन्या’ नाटकाने सीतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. पण असे प्रयत्न, कालांतराने प्रस्थापितांकडून दडपले जातात.

अपवादात्मक परिस्थितीत का होईना, पण स्त्रिया पुरुषांना प्रश्न विचारू शकतात, हे कोणत्याही परिस्थितीत समाजासमोर येणं, हे समाजपुरुषाला नको असतं, त्यामुळे त्याचा अहं दुखावला जातो. याच कारणाने गौरवीकरणाच्या मखरात बसवून पुरुषी मनोवृत्तीने आताआतापर्यंत एकप्रकारे स्त्रीला बंदिस्तच करून ठेवलं होतं. हे गौरवीकरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मारच!

पण आता स्त्रिया बोलू लागल्यात. अगदी रामायण-महाभारतातल्या, पुराणातल्या स्त्रियाही! आपलं दुःख, आपल्या वेदना सांगायला त्या स्वतः अस्तित्वात नाहीत, पण त्यांच्या दैवतीकरणामागे दडलेल्या दर्दभऱ्या कथा-कहाण्यांना आता वाचा फुटलीय. आताच्या समविचारी स्त्री-पुरुषांच्या माध्यमातून त्या आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल समाजपुरुषाला जाब विचारतायत. सीता त्यापैकीच एक!

खरंतर सीता-द्रौपदी काय, रुक्मिणी-भामा काय, किंवा अंबा-कुंती काय, या सगळ्या अभिजनांची परंपरा सांगणाऱ्या पुराणग्रंथांतल्या आणि महाकाव्यांतल्या चरित्रनायिका. साहजिकच त्यांच्या भोवती ग्रंथकर्त्यांनी स्त्री म्हणून असलेल्या मानमर्यादांचा, त्याग-नीतिमत्तेचा सुरेख कोष विणलेला, त्यामुळे त्यांची दुःख सर्वसामान्यांसमोर कधी पोचलीच नाहीत.

मुळात अभिजनसंस्कृतीतल्या साहित्यनिर्मितीचा हेतूच समाजाला नीतिमत्तेचे-आदर्शवादाचे दाखले देणं हा असल्यामुळे, त्यांनी आपलं न्युनत्वही कायम झाकूनच ठेवलं. किंवा तात्त्विक मांडणी करून त्याला आदर्शांचा मुलामा तरी दिला. विशेषतः स्त्री-नायिकांच्या संदर्भात या ग्रंथकर्त्यांनी कायमच असं केलंय.अभिजन परंपरेला समांतरपणे वाहणाऱ्या बहुजनांची संस्कृती-साहित्य असं करत नाही. ती सुख असो किंवा दुःख सगळंच मोकळेढाकळेपणाने सांगून मोकळी होते. कारण लिखित ऐवजी मौखिक परंपरेने वाहणाऱ्या बहुजनांच्या लोकसंस्कृती किंवा लोकवाङ्मयाला समाजासमोर आदर्श ठेवायचा नसतो, तर समाजातील वंचित घटकांचे दबलेले आवाज मोकळे करायचे असतात.

राम-सीतेच्या नात्याकडेही लोकपरंपरेने याच नजरेने पाहिलेलं आहे. त्यामुळे अभिजन परंपरेतल्या मर्यादापुरुषोत्तम रामाकडे लोकपरंपरेने क्वचित कधी खलपुरुष म्हणूनही पाहिलेलं आहे. कारण त्याने सीतेवर अन्याय केलाय, असं या लोकपरंपरेचं म्हणणं आहे आणि त्याचे अनेक दाखलेही लोकवाङ्मयात सापडतात.

केवळ लोकवाङ्मयच नाही, तर सद्यकालीन वाङ्मयातही सीतेकडे तिच्या पारंपरिक सोशिक प्रतिमेच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. विशेषतः अमिष त्रिपाठी यांची ‘सीता : वॉरियर ऑफ मिथिला’ ही इंग्रजी आणि प्रसिद्ध कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांची ‘उत्तररकांड’ ही कन्नड कादंबरी, या दोन कादंबऱ्यांनी सीतेला काहीशा वेगळ्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

अमिषने सीतेला वीरांगनेच्या रूपात रंगवलंय. आपल्या मिथिला नगरीचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढणाऱ्या सीतेचं क्षात्रतेजच अमिषने उजळून टाकलंय. तर भैरप्पांनीही सीतेच्या वेगळ्या पैलूचं दर्शन घडवलंय. ‘पर्व’ कादंबरीत त्यांनी ज्याप्रमाणे महाभारतातल्या सगळ्या पात्रांना मानवी पातळीवर रेखाटलंय, तेच त्यांनी ‘उत्तरकांड’मधे केलंय. त्यामुळे सीता थेट आजच्या काळातली व्यक्तिरेखा वाटते.

रावणाच्या तावडीतून सुटका केल्यावर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली, हा प्रसंग एकूणच स्त्रीवादाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच सीता जशी रामापासून दूर होती, त्याप्रमाणेच रामही सीतेपासून दूर होता, मग जो न्याय सीतेला तोच रामाला का नाही? असा सवाल अनेकदा केला जातो.

नेमका असाच सवाल भैरप्पांच्या ‘उत्तरकांड’ कादंबरीत रामाला करण्यात आला आहे. रामापासून दूर रावणाच्या बंदिवसात काही काळ राहिल्यामुळे सीतेच्या शीलाबद्दल जर संशय व्यक्त केला जात असेल, तर सीतेपासून तेवढाच काळ दूर असलेल्या रामाच्या शीलाचं काय? हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने आजच्या समाजपुरुषाला दाखवलेला आरसा आहे.

सीतेसंदर्भातल्या कथांना-मिथकांना आता वेगळा आयाम दिला जात आहे. पण खरंच सीता कोण होती? वाल्मीकींच्या रामायणानुसार ती जनकाची कन्या होती, रामाची पत्नी होती, लवकुशाची आई होती, दशरथाची सून होती. जोडायची तर तिची अशी कितीतरी कुणाकुणाशी जिव्हाळ्याची नाती जोडता येतील.

पण जन्मापासून ते थेट जीवनाची अखेर होईपर्यंत तिचं एकच नातं तिला कायम चिकटून राहिलं. ते होतं, मातीचं नातं. मातीचं तिच्याशी आणि तिचं मातीशी असलेलं नातं. ती मातीचीच लेक होती, म्हणून तर जिवंतपणी मातीत गेली. सन्मानाने!

या अंगाने सीतेकडे पाहिलं, तर सीतेइतकी लोकप्रिय आणि जनमानसात रुजलेली पौराणिक व्यक्तिरेखा दुसरी सापडणार नाही. रामायण-महाभारत महाकाव्यं होती की इतिहास हा वादाचा मुद्दा आहे. तो बाजूला ठेवला तरी, वेगवेगळ्या कथा आणि गाण्यांसोबत सीता जेवढी भारतीय मातीत रुजली, तेवढी इतर कुणीच नाही. ते साहजिकही होतं. कारण तिच्या वाट्याला जे दुःख आलं, ते आणि तसंच भारतीय स्त्रीच्याही वाट्याला आलेलं आहे आणि अजूनही येत आहे.

त्यामुळेच अभिजन परंपरेनं ‘रामायण’ सांगितलेलं असलं, तरी लोकपरंपरेनं मात्र ‘सीतायन’च गायलेलं आहे. ‘अंकुशपुराण’, ‘चंद्रावती रामायण’ ते दक्षिणेकडच्या मोठ्या नाटककार स्नेहलता रेड्डी यांचं ‘सीता’ नाटक. सगळ्यांनी किती विविधप्रकारे सीतेचं गुणगान गायलं आहे. ते केवळ गुणगान नाहीय. सीतेची ताकद त्या ‘सीतायनां’त सामावलेली आहे. उगाच नाही लोकपरंपरा म्हणत-

‘राम म्हणू राम, नाही सीतेच्या तोलाचा

हिरकणी सीतामाई, राम हलक्या दिलाचा

सीतेवर झालेल्या अन्यायाची चूड लोकसंस्कृतीतल्या स्त्रियांच्या मनामनात पेटलीय. त्यांना तिचं दुःख पाहवत नाही. रामाने तिचा केलेला त्याग आणि रानात तिच्या वाट्याला आलेलं दुःख, त्या आपलंच दुःख मानून व्यक्त करताना म्हणतात-

‘सीता चालली वनाला, रडू लागली मनाला

एवढी होती माया, भूल पडली रामाला

सीताई सांगी कथा, आपल्या जलमाची परवड

लव-कुश बाळायाच्या, नव्हती न्हाणीला तरवड’

एवढंच कशाला? काही लोकभावना तर एवढ्या पुढे जातात की सीतेवर झालेल्या अन्यायाने क्षोभ पावून म्हणतात-

‘सीतेला वनवास, असे कितीदा येतील

लवू पोटाला येतील, सूड रामाचा घेतील.’

महत्त्वाचं म्हणजे अयोध्येला वारसदार हवा म्हणूनच रामाने सीतेचा लवकुशासह स्वीकार केला, असंही काही गीतं सांगतात. कोकणात म्हटल्या जाणाऱ्या एका लोकगीतात तर सीतेचा उद्वेग सरळसरळ अधोरेखित करण्यात आला आहे. ज्यांच्याशी आपण लढत होतो, ती आपलीच मुलं आहेत म्हटल्यावर राम जेव्हा लव-कुश-सीता सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायला निघतो, तेव्हा त्याचं वर्णन करताना हे लोकगीत म्हणतं-

‘आता कशाला जाऊ वाड्यात गं, कशाला जाऊ वाड्यात गं

बाळ दिले त्यांच्या हाती गं, बाळ दिले त्यांच्या हाती गं

सरलं अर्ध आयुक्ष गं, सरलं अर्ध आयुक्ष गं

आयुक्षाची झाली माती गं, आयुक्षाची झाली माती गं

वसार वसार तू धरतरी माते गं, वसार तू धरतरी माते गं

तिथे धरतरी वसारली, सीता धरतरीत गेली गं’

या गाण्यात सीतेने काढलेले ‘आयुक्षाची झाली माती गं’ हे उद्गार खूप जहाल आहेत. पराकोटीचा छळवाद वाट्याला आल्यानंतरच असे उद्गार काढले जातात.

लोकवाङ्मयाची पानं चाळत गेलं, तर यापेक्षाही किती तरी कठोर प्रहार लोकमानसाने रामावर केलेले दिसतात. अभिजन परंपरेने रामाचा गुणगौरव केला आणि सीतेला सोशिकतेची मूर्ती बनवून लोकांसमोर सादर केलं. पण जे अभिजन परंपरेला दिसलं नाही, ते लोकपरंपरेला दिसलं. म्हणून तर या परंपरेने सीतेचं पुन्हा जमिनीत जाणं, हा तिने केलेला विद्रोह मानला! एकूणच लोकपरंपरेच्या मनात डोकावलं तर तिथे रामायणाऐवजी सीतायनच (सीतायन हा शब्द डॉ. तारा भवाळकर यांनी योजलेला) तर दडलेलं दिसतं.

शेवटी सीतेचं जमिनीत सापडणं काय आणि तिने पुन्हा मातीत जाणं काय, एक मिथकच तर आहे! मात्र हे सीता आणि मातीचं मिथक, थेट स्त्री आणि भूमीचं नातं अधोरेखित करणारं आहे. म्हणून लोकपरंपरेतील महिला एका ओवीत म्हणतात-

‘सीताबाय म्हणिते, मला माय की मावशी

मला न्हाई नातंगोतं, जलम नांगराच्या ताशी’

……………………………………………………….

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous article‘फ्रॅक्चर्ड’ आकलन , शिवाय  मनमानीही !
Next article‘भूमिपुत्र भाऊसाहेब’: डॉ. पंजाबराव देशमुख यांचं यथार्थ जीवनदर्शन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.