पतंगराव : मुख्यमंत्री ‘इन वेटिंग…’

-प्रवीण बर्दापूरकर

अशक्यप्राय स्वप्नाची पूर्ती करण्याची अफाट क्षमता असणारा , रांगडा स्वभाव , बिनधास्त शैली , मन निर्मळ आणि उमदेपणाचं मनोहारी रसायन पतंगराव कदम यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे . पतंगराव कदम यांच्याशी ओळख होऊन तीन दशकं उलटून गेली .  आमचे सूर जुळले ते भलत्याच एका बातमीनं . तेव्हाच्या अविभक्त मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या वृत्तसंकलनासाठी ‘लोकसत्ता’कडून मला तर ‘महाराष्ट्र टाइम्स’कडून धनंजय गोडबोलेला एकाचवेळी पाठवण्यात आलं . आम्ही दोघं मध्यप्रदेशात सागर या भागात फिरत असतांना कॉंग्रेसच्या ‘मदत’ वाटपात राडा झाल्याची कुणकुण लागली . मदत वाटपाची ही जबाबदारी कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील चमूवर कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी सोपवलेली होती . तेव्हा ‘शेषन नावाचा दणका’ नसल्यानं राजकीय नेते निवडणुकीच्या काळातही शासकीय विश्रामगृहात उतरत . सागर विभागातील मदत घेण्यासाठी आलेल्या कॉंग्रेसच्या इच्छुकांत शासकीय विश्रामगृहात आधी हमरातुमरी , मग मदत साहित्याची ओढाताण , हिसकाहिसकी झाली . हाताला जे लागेल ते ताब्यात घेण्याची घाई प्रत्येकाला झाली . परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून मदत वाटपासाठी आलेल्या पथकातील इतरांनी पळ काढला ; समजवा-समजवीचा किल्ला लढवता लढवता पतंगराव एकटेच उरले . कॉग्रेसी परंपरेतला राडा इतका वाढला की घेणाऱ्या हातांनी देणाऱ्या हातांवर हल्ला चढवला आणि पतंगराव कसेबसे तिथून निसटले…अशी ती घटना होती . पतंगराव कदम या नावामुळे या बातमीत आम्हाला रस होता . नागपूरला परतल्यावर कुठल्या तरी गफलतीतून धनंजय गोडबोलेनं माझ्याआधी या राड्याची बातमी दिली . बातमी गाजली . पतंगराव नाराज झाले . नंतर एकदा भेट झाल्यावर धनंजय गोडबोले समजून पतंगराव कदम यांनी मलाच फैलावर घेतलं . धनंजय नंतर मीही दोन दिवसांनी टोन बदलून तीच बातमी दिलेली होती पण , क्रेडीट स्वाभाविकच धनंजयला गेलेलं होतं . पतंगरावांच्या जीव्हेवर सुरु असलेलं ‘तांडव’ संपल्यावर पतंगरावांना हळूच सांगितलं , ‘मी गोडबोले नव्हे . मी तर…’

मला पुढे न बोलू देता पतंगराव कडाडले, ‘तुम्ही बर्दापूरकर आहात . माहितीये मला . तुम्हीही बातमी दिली होतीच की !…’ आणि पुन्हा त्यांच्या जीभेचा पट्टा सुरु झाला . ऐकून घेण्यातच शहाणपणा होता . थोड्या वेळानं ते शांत झाले . नेहेमीचं हंसू त्यांच्या चेहेऱ्यावर परतलं आणि कृतकोपानं ते म्हणाले , ‘अरे आमच्या इज्जतीचा पार xxx केला !’ तिथून आमच्यात स्नेहपर्व सुरु झालं . कोणावरच कायम खफा न होणं किंवा कोणाशीच कायमचं शत्रुत्व न घेणं हे पतंगराव कदम यांच्या स्वभावाचं हे वैशिष्ट्यच होतं . स्पष्ट बोलून , आला राग तो काढून ते मोकळं होत आणि कटुता विसरून जात . म्हणूनच त्यांच्यासोबत अनेकजण वर्षानुवर्षे टिकले ; त्यांच्याभोवती मोठ्ठ गणगोत निर्माण झालं . पतंगराव आणि माझ्यात स्नेहभाव निर्माण झाला . तो कायम राहिला याचं कारण आमच्यातला संपर्क कायम ठेवण्याची जबाबदारी त्यांचा खाजगी सचिव सुरेश मोगल-पाटील यांच्यावर होती  . आपलं लक्ष नसलं किंवा आपण लांब असलो तर , ‘ओsss बर्दापूरकर’ अशी हाळी ते घालायचे . ( इथे बर्दापूरकर या जागी इतर असंख्यांना त्यांची नावं जोडण्याचा मोह होऊ शकतो , हे मला ठाऊक आहे . ) तेव्हा सेलफोन नव्हते आणि पतंगराव यांच्याकडे सगळा कारभार पाटलाच्या वाड्यावर चालतो तसा , एकदम अघळपघळ ! पाटील वाड्यावर असले की सदरेवरील कचेरीत सगळे माना खाली घालून कामावर आणि पाटील बाहेर गेले की उधळले , असा म्हणून सुरेश मोगलची जबाबदारी महत्वाची . पुण्यात असो की मुंबईत की अन्यत्र कुठेही पतंगराव कदमांचा दरबार कायम लोकांनी भरलेला असायचा . कितीही वेळ लागो प्रत्येकाला भेटण्याचा आणि किमान दोन तरी शब्द बोलण्याचा पतंगरावांचा कटाक्ष असायचा . वसंतदादा पाटील यांच्या कामाशी त्यांची ही शैली जुळत असे ; तसाही वसंतदादा यांचा पतंगराव यांच्यावर प्रभाव होताच म्हणा !

मध्यम उंची , स्थूल बांधा , गव्हाळतेकडे झुकणारा सावळा वर्ण , वेगानं पापण्यांची उघडझाप होणारी कायम शोधक नजर आणि कपडे टिपटाप असणारे पतंगराव कदम हे जिद्द तसंच क्षमता काय अफाट असते , त्याचं मूर्तीमंत प्रतिक होते . पतंगराव कदमांचं वागणं बिनधास्तपणा आणि रांगडेपणा यांचं मिश्रण होतं पण , त्यात धसमुसळेपणा नव्हता ; होती ती आत्मीयता आणि अनेकदा निरागसता ; ही निरागसता त्यांच्या डोळ्यात दिसायची . अधिकाऱ्यांसह अनेकांना ते कायम ‘अरे-तुरे’करत पण , त्यात पतंगराव आपल्याला तुच्छ लेखताहेत असं कोणालाही वाटलं नाही . औरंगाबादचा एक प्रसंग आठवतो- तेव्हा मी नागपूरला होतो . कुमार केतकर आणि मी बुलढाण्याला एक कार्यक्रम आटोपून औरंगाबादला आलो . तापडिया सभागृहात संध्याकाळी केतकरांचं व्याख्यान आणि अध्यक्ष औरंगाबादचे पालकमंत्री असलेले पतंगराव कदम होते . व्याख्यान अगदी बहरात आलेलं असतांना पतंगराव अचानक उठले आणि म्हणाले , ‘कुमार थांब तू दोन मिनिटं’ आणि माईकवर येऊन म्हणाले , ‘माझ्या विमानाची वेळ झालीये . निघतो मी आता . तुम्ही मात्र कुमारचं व्याख्यान पूर्ण ऐका . कुमार मोठा विद्वान संपादक आहे . त्याच्यासाठीच तुम्ही इथं आलेले आहात , माझं अध्यक्षीय भाषण ऐकायला   नाही , हे माहितीये मला . हं…कुमार कर तू पुढे सुरु, मी जातो..’ असं म्हणून लोकांना अभिवादन करुन पतंगराव निघूनही गेले !  ही अशी रांगडी शैली होती पतंगरावांची .

कार्यक्रम संपल्यावर मी केतकरांना विचारलं , ‘तुम्हालाही पतंगराव ‘अरे-तुरे’ करतात ?  तर केतकर म्हणाले , ‘तुला त्यांची स्टाईल माहिती नाही का ?’

भारती विद्यापीठ हे पतंगराव कदम यांच्या दृष्टी , अफाट श्रम आणि कवेत न मावणारी  जिद्द यांचं जीतंजागतं उदाहरण आहे . अनेक पिढ्यांना त्यामुळे शिक्षणाच्या वाटा खुल्या झाल्या . अभावग्रस्त जगणं वाट्याला आलेल्या पतंगराव कदम यांनी वयाच्या विशीत लावलेलं भारती विद्यापीठ नावाचं रोपटं विशाल हा शब्द थिटा पडावा इतकं विस्तारलेलं आहे ; खाजगी शिक्षण क्षेत्रातील आज देशातलं एक आदर्श मॉडेल आहे . ( अगदी सुरुवातीचं या रोपट्याचं छायाचित्र सोबत दिलेलं आहे . ) या विद्यापीठाची कथित अभिजनांनी केलेली टिंगलटवाळी सहन करत पतंगराव कदम यांनी केलेला हा प्रवास ही एका स्वप्नाची आश्चर्यस्तंभित पूर्ती आहे . याच रस्त्यानं चालता-चालता पतंगराव राजकारण , सहकार , प्रशासन अशा विविध क्षेत्रात स्थिरावले , आयकॉन झाले . असंख्यांना त्यांच्यामुळे शिक्षण , हाताला काम आणि पोटाला अन्न मिळालं . शेकडोंचे ते मायबाप झाले . अशी माणसं दुर्मिळ असतात म्हणूनच अनेकांसाठी पतंगराव देवमाणूसही झाले . २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या अधिवेशनात राहुल गांधी यांचा पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून ‘शपथविधी’ झाला तेव्हा मीही दिल्लीतच होतो . महाराष्ट्रात दिग्गज समजले जाणारे आणि हा दिग्गजपणा राज्यात कवतिकानं मिरवणारे अनेक कॉंग्रेस नेते तिथे भिरभिरत्या नजरेनं पण , एकटे-दुकटे फिरत होते . पतंगरावांना मात्र तिथेही लोकांचा गराडा होता ! भारती विद्यापीठ नावाच्या यशाची ती किमया होती .

मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती . मी कायम त्यांना ‘आमचे मुख्यमंत्री तर तुम्हीच’ असं म्हणत असे आणि ते सुखावत . ते मला अनेक बातम्या देत . आता खरं सांगायला हरकत नाही , अगदी मंत्री मंडळाच्या बैठकीतली माहिती , बैठकीसाठी तयार झालेली टिपणं , विषयपत्रिकाही त्यांनी मला अनेकदा दिलेली आहे . पक्षात कुठे कोण काय करतोय यावर त्यांची करडी नजर असे आणि ती टीप ते आवर्जून मला देत . त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार , कोण काय उचापती करतो आहे या आणि अशा अनेक बातम्या मला मिळाल्या आणि माहिती खरी असल्यानं माझ्यावर कधी खुलासे करण्याचे वेळ आली नाही . त्यांनी दिलेल्या अनेक बातम्या पत्रकारितेत नाव कमावण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत , हे कबूल करायला मला आनंदच वाटतो .

पतंगराव कदम यांच्यात मुख्यमंत्रीपदाची क्षमता होती या अनेकांच्या म्हणण्याशी सहमती दर्शवायला मलाही निश्चितच आवडेल पण , त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की , मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी ते पुरेसे आग्रही नव्हते ; अनाग्रहीच होते आणि गंभीर तर नव्हतेच नव्हते . मुख्यमंत्रीपदासाठी डोक्यात २४ तास जुळवाजुळवीचं गणित असावं लागतं , कट कारस्थानं मनात कायम तयार ठेवावी लागतात , समर्थकांचं बळ लक्षणीय लागतं , राज्याच्या काना-कोपऱ्यात नेटवर्क आणि प्रश्नांची माहिती असावी लागते ; हे जुळवून आणून दबावाचं राजकारण खेळावं लागतं . यानंतर पक्षश्रेष्ठींची मर्जी , त्यांचा पाठीवर हात आणि ‘देवाण-घेवाण’ येते . पतंगराव कदम यांच्या मनात कायम सांगली जिल्हा आणि भारती विद्यापीठच असायचं ; हे त्यांचं एकीकडे मोठ्ठ यश असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा विचार करता ती त्यांची मोठी मर्यादा ठरली . शिवाय कट-कारस्थानं , सहकारी किंवा कुणा नेत्याचे पाय ओढणं हा त्यांचा स्वभावच नव्हता . राजकीय गरज म्हणून त्यांनी काही पंगे घेतले , हे सर्व ज्ञात आहे पण , राजकारण संपल्यावर त्या प्रत्येकाला पुन्हा स्नेहभाव कायम ठेवला . मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून त्यांना नैराश्य आलेलं किंवा अगतिक झालेलं कधी पहिलंच नाही ( अपवाद एक- पुत्र अभिजीतचा अपघाती मृत्यू झाल्यावर भेटायला गेलो तर नि:शब्द पतंगरावांच्या , दु:ख अथांग भरलेल्या नजरेला नजर देणं शक्य झालं नाही…)

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रत्येक वेळी नाव मागे पडलं मग मिळेल त्या खात्याची जबाबदारी पतंगरावांनी कोणतीही खळखळ म्हणा की कुरकुर न करता निभावली . मंत्री म्हणून त्यांनी जे खातं मिळालं त्याचं कारभार नेटका केला , यात शंकाच नाही . काम नीट व्हायचं असेल तर प्रशासनाला मोकळीक देतांनाच लगाम कसा ओढायचा हे कसब त्यांना चांगलं आत्मसात होतं . कदाचित मुख्यमंत्री झाले असते तर काय सांगता , सुधाकरराव नाईक यांनी जशी छाप उमटवली तशी कदाचित ; त्यापेक्षा अढळ मुद्रा पतंगराव कदम यांच्या कर्तृत्वाची  उमटली असती पण, या झाल्या ‘जर-तर’च्या गोष्टी !

एक आठवण आवर्जून सांगावी अशी आहे- विलासराव मुख्यमंत्री झाले ; आमच्यातलं मैत्र महाविद्यालयीन जीवनातलं . सगळं स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना मंत्रालयात सहाव्या मजल्यावर  जाऊन भेटलो . त्यांना भेटल्यावर पतंगराव कदम यांनाही भेटावं वाटलं म्हणून फोन केला तर सुरेश मोगलनंच उचलला . पतंगराव घरी म्हणजे मलबार हिलवरच्या ‘अग्रदूत’ या त्यांना मिळालेल्या शासकीय बंगल्यावर होते . ‘साहेब तयार होऊन दोन घास पोटात टाकून पुण्याला निघणार आहेत . गर्दी तर मुळीच नाही’, असं सुरेशनं सांगितलं . मी टाकोटाक गेलो . आमची भेट झाली . ‘आमचे मुख्यमंत्री आमच्यापुरतेच राहिले , बॅडलक’, असं मी हळहळत म्हणालो .

त्यावर पतंगराव टोला लगावताना म्हणाले , ‘तुम्ही मराठवाड्याचे लोक लै भारी बुवा . मानलं तुम्हाला’ .

मी म्हटलं , ‘मी तर आता नागपूरला असतो आणि भारी म्हणाल तर ते विलासराव आहेत. मला कशाला ओढता तुमच्या स्पर्धेत ?’ .

त्यावर पतंगराव म्हणाले , ‘तुमचंही पाणी मराठवाड्याचंच . आम्हाला मनातलंच मुख्यमंत्री ठेवलंय तुम्ही…चला जाऊ द्या . चार घास खाऊ यात…’ असं म्हणत ओढून डायनिंग टेबल घेऊन गेले . कायम ‘सीएम इन वेटिंग’ राहिले तरी एक मान्य करायलाच हवं , मुख्यमंत्रीपद न मिळाल्याच्या वैषम्याचं तुणतुणं वाजवत न बसण्याचा पतंगरावांचा उमदेपणा सलाम करावा असाच आहे .

राजकीय वृत्तसंकलन करण्याच्या काळात शेकड्यांनी नेते भेटले . अनेकांशी स्नेह जुळला . अनेकांशी बैठ्कीतल्या मैत्रीची भट्टी जमली . अनेकजण मनाच्या गाभाऱ्यात कायमचे मुक्कामाला आले ; पतंगराव कदम त्यापैकी एक . ‘लोकसत्ता’ पर्वानंतर आधी मी लेखनात गुंतलो , नंतर दिल्लीत आणि शेवटी औरंगाबादला आलो ; आमच्यातला संपर्क कमी होत गेला . आता तर पतंगरावच संपर्क कक्षेच्या बाहेर गेले आहेत…असे पोशिंदे नेते खरंच दुर्मिळ असतात !

 ( छायाचित्रे सौजन्य- गुगल ) 

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleयुगांतर व्याख्यानमाला- विषय: नीती– सुरेश द्वादशीवार
Next articleयुगांतर व्याख्यानमाला- विषय: न्याय– सुरेश द्वादशीवार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.