पत्रकारांचे पंतप्रधानांसोबतचे परदेश दौरे :समज आणि गैरसमज

-प्रवीण बर्दापूरकर

एकुणातच सध्या समाज माध्यमांवर ऐकीव माहितीवर आधारित पण , तज्ज्ञांच्या आविर्भावात ‘पोस्टाय’ची फॅशन काँग्रेस गवत आणि भक्तांपेक्षा जास्तच जोरदार फोफावलेली आहे . आमच्या लहानपणी कुणी , अपुरी माहिती किंवा वायफळ बडबड करायला लागलं की , वडीलधारी मंडळी ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’ असं करत नको जाऊस , या शब्दांत झापून त्याला गप्प करत असतं . समाज माध्यमांवरच्या काही पोस्ट खरंच गंभीर असतात , काही पोस्टमधील मतप्रदर्शन आवर्जून दखल घ्यावी असं असतं , हे खरं असलं तरी , बहुसंख्य पोस्ट एक तर कर्कश एकारला प्रतिवाद करणा-या असतात किंवा सुसंस्कृतपणाची पातळी पूर्ण सोडून केलेली शेरेबाजी असते किंवा त्यापुढे जाऊन आणखी काहीतरी केलेलं सुमार लेखन असतं.

हे आठवण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यासाठी एक विशेष विमान केंद्र सरकारनं नुकतचं खरेदी केलेलं आहे . पंतप्रधान , राष्ट्रपती यांच्या दौर्‍यासाठी एअर इंडियाच्या ताफ्यात असं खास विमान गेल्या चाळीस तरी वर्षापासून आहे ; असंच एक विमान संरक्षण मंत्र्यासाठी राखून ठेवलेलं असतं ! तर ,  ते विमान काही नरेंद्र मोदी यांच्यासाठी नाही तर देशाच्या पंतप्रधान , उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांच्या दौर्‍यासाठी  आहे . त्यावर बरीच शेरेबाजी वाचायला मिळाली . तशीच ( नेहेमीच केली जाणारी ) शेरेबाजी पंतप्रधानंसोबत परदेश दौरे करणार्‍या पत्रकारांबद्दलही वाचायला मिळाली . तशीही माध्यमं आणि माध्यमातील बहुसंख्य पत्रकार सध्या ‘बदनाम नावाच्या जमाती’चे सदस्य झालेले आहेत , ही वस्तुस्थिती असली तरी पत्रकारांच्या संदर्भात पंतप्रधानांच्या  दौ-याच्या निमित्तानं झालेली शेरेबाजी अजिबात वस्तुस्थितीला धरुन नाही , हे नमूद केलं पाहिजे . ही शेरेबाजी आणि वस्तुस्थिती यात महदअंतर आहे .

पंतप्रधानांशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अनेकदा  ( विमानानं ) देशात आणि परदेशातही दौरे करण्याची संधी एक पत्रकार म्हणून मला मिळालेली आहे . ‘पंतप्रधानांच्या विमानातून’ अशी डेटलाईन असणारी बातमी लिहायला मिळावी , असं प्रत्येकचं पत्रकाराचं स्वप्न असतं , मला तो अनुभव दोनदा घेता आला . माझा  शेवटचा असा दौरा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत रशियातील सेंटपीटसबर्ग येथे भरलेल्या जी २० नावानं ओळखल्या जाणार्‍या राष्ट्र समूहाच्या बैठकीच्या निमित्तानं झाला . अमेरिका ,  रशिया , फ्रान्स , भारत यासारख्या जगातील २० राष्ट्रांच्या प्रमुखांचं  विविध विषयांवर विचार आदान-प्रदान करण्याचं व्यासपीठ म्हणजे जी-२० आहे .

या दुस-या दौ-याच्यावेळी जाणवेली बाब म्हणजे १९९० च्या आधी पंतप्रधानांसोबत होणारे पत्रकारांचे परदेश दौरे आणि मनमोहन सिंग यांच्यासोबत झालेला २०१३ मधील रशियाच्या दौ-याच्या स्वरुपात खूप बदल झालेले होते . १९९० पूर्वी संचार आणि संवाद वहनाचं तंत्र भारतात पुरेशा प्रमाणात पोहोचलेलं नव्हतं . इंटरनेट ( म्हणजे माहितीच्या महाजाला )चा स्फोटही भारतात व्हायचा होता . त्या काळात पंतप्रधानांच्या परदेश दौ-याची छायाचित्रे , त्यांच्या कार्यक्रमाचा ‘ऑंखो देखा हाल’ भारतात माध्यमांपर्यंत पोहोचवणं अतिशय कठीण होतं . कारण त्यावेळी आता लुप्त झालेल्या तारे (Telegram) व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध नव्हते . पंतप्रधानांसोबत जाणारे पत्रकार काही वृत्तांत तारेने भारतात पाठवत आणि मायदेशी परतल्यावर त्या दौ-यावर आधारित वृत्त मालिका किंवा सविस्तर लेख लिहित . आता कुणाचा पटकन विश्वास बसणार नाही पण , अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत आपल्या देशातले पंतप्रधान बसलेल्या विमानानं एकदा उड्डाण भरलं की  ते कुणाशीही संपर्क साधू शकत नसत , अशी दयनीय परिस्थिती तेव्हा होती . अमेरिका ,   ब्रिटन , फ्रान्स , रशिया आदी अनेक राष्ट्राच्या प्रमुखांची विमानं सुरक्षा व्यवस्था आणि संदेश वहन या बाबतीत भारताच्या हजार पट पुढे तेव्हा होती आणि आताही आहेत .

आपल्या देशात आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागले ते राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर . मग सॅटेलाईटद्वारे फोटो पाठवणे सुरु झालं , पण त्यावर होणारा  मोठा बडे माध्यम समूह वगळता कुणालाच परवडणारा नव्हता . नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर जागतिकीकरण तसंच खुल्या अर्थव्यवस्थेचं युग आलं आणि राजीव गांधी यांच्या स्वप्नातलं दूरसंचार आणि संवाद वहनाचं स्वरुप प्रत्यक्षात येण्याची स्थिती निर्माण झाली . तोवर पंतप्रधानांच्या परदेश दौ-यात जाणा-या पत्रकारांची संख्या ७० ते ७५  असायची पण ,  तंत्रज्ञानात बदल झाल्यानं त्या दौ-याची छायाचित्रे आणि बातम्याही विविध माध्यमांना वेगाने मिळू लागल्या . तेव्हा म्हणजे २०१३त मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगतो की , नरसिंहराव यांच्या काळातच पंतप्रधानांच्या दौ-यातील पत्रकारांची संख्या निम्म्याने म्हणजे ३५ ते ४० एवढी करण्यात आली . यातील १० जागा केंद्रीय प्रशासनाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या अधिका-यांसाठी राखीव असतात . हे अधिकारी इंग्रजीसह देशातील प्रमुख प्रादेशिक भाषांमधील असतील याची काळजी घेतली जाते . आंतरराष्ट्रीय दैनिके आणि वृत्तसंस्थांसाठी ५ , राष्ट्रीय दैनिकांसाठी ५ , प्रकाश वृत्तवाहिन्यांसाठी ५ आणि उर्वरित जागी  देशाच्या विविध प्रादेशिक भाषांतली दैनिकांच्या पत्रकारांना संधी दिली जाते . ही आकडेवारी जर लक्षात घेतली तर पंतप्रधानांसोबत ‘शेकडो’ पत्रकार दौरे करतात हा सार्वत्रिक पसरलेला गोड गैरसमज कसा आहे हे सहज लक्षात यावं . बहुधा नरसिंहराव किंवा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आलं तेव्हापासून पत्रकारांना तोवर परदेशात उपलब्ध करुन देण्यात येणारी निवास आणि खाण्या-’पिण्या’ची सोयही काढून घेतली गेली . स्वानुभवावरुन सांगतो तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत केलेल्या रशिया दौ-यात माझ्या निवास आणि भोजनावर लोकमत वृत्तपत्र समूहाने सुमारे दोन हजार डॉलर्स खर्च केलेले होते . सहा दिवसांसाठी झालेला हा खर्च तेव्हा प्रतिदिन साधारण १८००० हजार रुपये होता , हे लक्षात घेतलं तर पंतप्रधानांचा दौरा म्हणजे केंद्र सरकारनं पत्रकारांची केलेली ‘खातिरदारी’ आहे असं समजण्याचं मुळीच कारण नाही . मात्र हे जाणून घेण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही.

आणखी एक मुद्दा म्हणजे पत्रकारांसाठी सुरक्षा व्यवस्थेच्या  निकषांवर उतरण्यासाठी राष्ट्रपती , उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधानांसोबतचा दौरा प्रत्येकवेळी केलेली काट्यांवरची कसरत असते . हे तिन्ही नेते खाजगी कामासाठी मौजमजा करण्यासाठी परदेश दौरे करतात , हा समज देखील भ्रमच आहे . ही नेते मंडळी दिवसभर १२-१४ तास विविध बैठका, मसलती , कार्यक्रम यात आकंठ बुडालेले असतात . एखाद्या पर्यटनस्थळाला त्यांनी दिलेल्या भेटीची या सर्व नेत्यांच्या या कार्यक्रमांचा ‘ऑंखो देखा हाल’ वाचकांना देण्यासाठी पत्रकारांचे १५ तर कधी  १७-१८ तास धावपळ सुरू असते . मात्र अशा परदेश दौर्‍यांवर  पत्रकार ‘मौज’ करण्यासाठी किंवा ‘मजा’ मारण्यासाठी केंद्र सरकारच्या खर्चानं जातात असा आता जवळजवळ संपूर्ण भारतीय जनमनाचा ठाम ग्रह झालेला आहे आणि तोही एक ( गोड ) गैरसमज आहे ! .

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असो की पंतप्रधान हे परदेशात भारतीय प्रजासत्ताकाचं प्रतिनिधित्व करत असतात . अशा  दौ-यात शिष्टाचार , संकेत यांचे अनेक पायंडे रुढ झालेले आहेत आणि ते दोन्ही बाजूंनी निगुतीनं पाळले जातात . देशातल्या एखाद्या समस्येची पंतप्रधानांना त्या काळात काळजी नसते , असं काही नसतं पण परदेशात , परदेश दौ-यात हसतमुखानं वावरणं ही त्यांची अपरिहार्य अगतिकताही असते . त्यांच्यासोबत त्या दौ-यात सहभागी झालेल्या अधिकारी आणि पत्रकारांनाही ते शिष्टाचार, ते संकेत आणि त्या कार्यक्रमासोबत सतत धावपळ करावी लागते .

या विमांनाची रचना पत्रकार आणि अधिकार्‍यांसाठी बसण्यासाठी प्रशस्त व्यवस्था तसंच पंतप्रधांनांच्या कार्यालयासाठी एक आणि एक शयन कक्ष अशी असते . शिवाय बाकी नियमित सोयी असतात . कार्यालयाला लागूनच पत्रकारांच्या बसण्याची सोय असते आणि याच जागेवर पत्रकारांना ब्रिफिंग केलं जातं . नियोजित स्थळी जातांना विमानांनं उड्डाण भरलं की एखादा ज्येष्ठ मंत्री किंवा विदेश सेवेतील ज्येष्ठ अधिकारी एक ब्रिफिंग घेतो . विमान लँड होण्याआधी त्यावर आधारित बातमी तयार ठेवावी लागते . आता लॅपटॉपवर टायपिंग करता येत असल्यानं सोय झाली आहे पण , पूर्वी उडणार्‍या विमानात हातानं बातमी लिहिणं ही एक कसरतच होती . उतरल्यावर सर्वात पहिली घाई बातमी पाठवण्याची असते . परतीच्या प्रवासात पंतप्रधानांचं ब्रीफिंग होतं आणि तीही बातमी विमान लँड होण्याच्या आत तयार ठेवावी लागते व लगेच  पाठवावी लागते कारण माध्यमांत असणारी स्पर्धा . आता डिजिटल युगात आता विमानानं भारतीय भूभागात प्रवेश केला आणि ते लँड होण्याच्या तयारीत असतांनाही बातम्या पाठवता येऊ लागल्या आहेत

ब्रीफिंग संपल्यावर पंतप्रधानांना विमानात १४ ते १५ प्रश्न विचारले जाऊ शकतात . यातही पुन्हा शिष्टाचार असतो , झालेल्या इव्हेंटवर म्हणजे फलश्रुती काय , नवीन करार-मदार कोणते झाले वगैरे यावर आधारित तीन किंवा चार , आंतरराष्ट्रीय विषयावर चार ते पाच , देशाच्या स्थितीवर चार ते पांच आणि एकाद-दुसरा प्रश्न प्रादेशिक असे या पत्रकार परिषदेचं स्वरुप असतं . पत्रकार परिषदेचं नियंत्रण परदेश सेवेतील एखाद्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे असल्यानं काटेकोरपणे शिष्टाचार आणि वेळेचं बंधन पाळून सर्व कांही केलं जात असतं . सध्या संयुक्त राष्ट्रसंघात असलेले अकबरुद्दीन यांच्याकडे मनमोहनसिंग यांच्या पत्रकार परिषदेची सूत्र होती . त्यांच्याशी चांगली गट्टी जमल्यानं मलाही पंतप्रधानांना एक प्रश्न विचारण्याची संधी मिळाली होती .

या दौर्‍याची एक हृद्य आठवण सांगायला हवी- मनमोहनसिंग अतिशय ऋजू स्वभावाचे आणि विनयशील असल्याचं जे बोललं जातं , त्याचा प्रत्यय आम्हाला रशियातून परत येत असतांना आला . विमानातली पत्रकार परिषद सुरु होण्याची सूचना मिळाल्यावर काहीच वेळात मनमोहनसिंग त्यांच्या कार्यालयातून बाहेर आले आणि चक्क प्रत्येक पत्रकाराच्या आसनापाशी जाऊन त्यांनी प्रत्येकाशी हस्तांदोलन केलं , प्रत्येकाशी किमान दोन वाक्य ते ते बोलले…इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती विनयानं बहरलेला डेरेदार वृक्ष कसा असतो , याचा तो प्रसन्नदायी अनुभव होता . मायदेशी परतल्यावर कांही ज्येष्ठ सहकार्‍यांशी बोलल्यावर पंतप्रधान असतांpmना अटलबिहारी वाजपेयी हेही असंच विनयानं वागत असत .  असं समजलं .

विषय पंतप्रधांनांसाठी घेतल्या गेलेल्या नवीन विमानाचा नाही तर , कशाच्याही संदर्भात अर्धवट माहितीवर आधारित कोणत्याही पातळीवर जाऊन केलेल्या ‘लूज कमेंट’चा आणि  त्यातून पसरणारे गैरसमज यांचा आहे . वस्तुस्थिती काय आहे माहिती करुन न घेता बहुसंख्य लोक वचावचा व्यक्त होत असतात याची खंत मला नेहमीच वाटत असते . असं करणार्‍यात त्यात डावे-उजवे पुरोगामी-प्रतिगामी , विचारवंत-अविचारवंत , लगोलग व्यक्त होणारे नेटकरी ‘राष्ट्रीय कर्तव्य’ म्हणून हिरीरीनं सहभागी असतात हे काही समाज निरोगी , सुशिक्षित आणि सुसंस्कृत असल्याचं लक्षण मुळीच नव्हे पण , लक्षात कोण घेतं ?

असो , कोळसा कितीही उगाळा , तो काळाच असतो !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

Previous articleप्रिंट माध्यमांचे सामर्थ्य कमी लेखू नये! – एन. राम
Next article‘अर्थाच्या शोधात’-डॉ. हेमंत खडके
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.