पुष्पाताई नसणं म्हणजे…

-प्रवीण बर्दापूरकर

म्हटलं तर हे आत्मपर आहे पण , त्यात पुष्पाताई भावे असल्यानं या कथनाला एक वेगळा संदर्भ   येणार , हे उघडच आहे .

पुष्पाताईंची ओळख ओळख झाली त्याला आता ४०वर वर्ष उलटून गेली असावीत . पुष्पाताईंशी माझी ओळख मृणालताई गोरे यांनी करुन दिली , हे पक्कं आठवतं . ते साल बहुधा १९७९ असावं . त्यानंतरची अनेक वर्ष पुष्पाताईंची भाषण ऐकणं , त्यांच्या सहभागातून उभ्या राहणा-या चळवळी बघणं ; त्याच्या बातम्या करणं या भूमिकेतंच वावरलो . हळूहळू बोलणं होऊ लागलं पण , त्यात माझ्या बाजूनं संकोचाचा भाग जास्त होता . ( संकोच मावळण्यासाठी दहा वर्ष जावी लागली मग माझ्या बाजूनेही संवाद सुरु झाला . तोवर मी नागपूरला पडाव टाकलेला होता . ) कारण पुष्पाताईंचं  बहुपेडी ,  विद्वत , धारदार व्यक्तिमत्त्व . कुठलाही विषय निघावा आणि बाईंना त्याची माहिती नसावी , असं कधी घडलंच नाही . विचारवंत , समीक्षक , प्राध्यापक , कार्यकर्ती अशा विविध रुपात पुप्पाताईंना बघायला मिळालं . त्यांचं बहुतेक सर्व लेखनही वाचत होतो , त्यातलं कांही समजत होतं कांही नाही . त्याही पलीकडे जाऊन विवेकाचा तो कणखर आवाज होता . चळवळीतील शुद्धतेची ती ज्योत होती . प्रसंगी रणरागिणी होती . एक अत्यंत जिगरबाज , लढवय्यी वृत्ती होती . त्यापलीकडे जाऊन  माणूस म्हणून लोभसपणे पुष्पाताई मला कायमच भावल्या .  पुष्पाताई भावे यांचं देहावसान म्हणजे आपल्यातून हे इतकं वजा होणं आहे …

माझं वास्तव्य प्रदीर्घ काळ नागपुरात झालं . दोन टप्प्यात मिळूनचा का कालावधी  साधारण साडेचोवीस वर्षांचा आहे . पुष्पाताई नागपूरला आल्या की , मी त्यांना आवर्जून भेटत असे . गप्पाटप्पा होत . त्यात माझ्या प्रश्नांचाच ओघ जास्त असे . दरम्यान आक्टोबर १९९६ ते मार्च २००३ पत्रकारितेच्या निमित्ताने मी मुंबई आणि औरंगाबादला होतो . मुंबईच्या काळात पुष्पाताईंच्या भेटी काहीशा वाढल्या . नेमक्या याच काळात      ‘किणी ‘ प्रकरण घडलं . एकूणच सत्ताधा-यांच्या आणि त्यातही विशेषत: लोकांच्या भावनेला हात घालून सत्ता प्राप्त केलेल्या एककल्ली राज्यकर्त्यांविरुद्ध उभं राहणं फार कठीण असतं . लोकशाहीवर ज्यांची निष्ठा आहे अशा सत्ताधा-यांना वैध मार्गाने होणारा विरोध थोडाफार तरी सहन होतो पण , अहंकारी , एकारलेले राज्यकर्ते मात्र विरोधकाचा ‘ब्र’ ही सहन करु शकत नाहीत . असे सत्ताधारी आणि त्यांचे समर्थक व कार्यकर्ते कायम उन्मादित असतात आणि स्वाभाविकच तारतम्य व विवेक हरवलेले असतात . किणी प्रकरणात या सत्तांध आणि उन्मादित प्रवृत्तींच्या विरुद्ध ज्या धीरोदात्तपणे पुष्पाताई उभ्या राहिल्या , ते तेज आणि त्यांच्यातल्या नैतिकतेचं ते बळ डोळे दीपवून टाकणारं  होतं . किणी प्रकणानंतर पुष्पाताई  भेटल्या की , त्यांना पदस्पर्श करु लागलो . इतका त्यांच्या त्या धाडसी वर्तनानं मी भारुन गेलेलो होतो . त्यांना पदस्पर्श करण्याची कृतीही नकळत पण अंत:करणाच्या ऊर्मीतून सुरु झाली . पुढे बेगम मंगलाही त्या नमस्कार  करण्यात सहभागी झाली . आमच्या या अशा कृतीमुळे पुष्पाताई संकोचून जात असत .

मार्च २००३ नंतर नागपूरला आल्या की , पुष्पाताईंची एक चक्कर आमच्याकडे होऊ लागली . आमचं वसंत नगरमधलं घर तसं खूपच लहान . त्यातच भरपूर पुस्तकं , सामान आणि कँडी या श्वानाचीही भर पडलेली होती . त्या छोट्याशा घरात आमच्याशिवाय अन्य कुणी आलेलं कँडीला सहन होत नसे . आमच्या छोट्याशा  हॉलमधे दोन पलंग आणि त्यांना जोडून डायनिंग टेबल होता . डायनिंग टेबलची खुर्ची बाजूला सरकवून तेथे घरात असलेली फिरती खूर्ची लावून काम करण्याची माझी सवय होती . पुष्पाताई आल्या की , त्या खुर्चीत बसत . आमच्या घरात अगदी डायनिग चेअरवरही पहुडलेली पुस्तकं बघून त्यांना आनंद होत असे . ‘तुझं घर वाचणाराचं आहे’, असं त्या कौतुकानं म्हणत . त्यांना गोकुळ वृंदावन या उडुपी हॉटेलमधला उपमा खूप आवडत असे . पुष्पाताईंना साधारण मी सकाळीच घेऊन येत असे . त्या उपम्याचा नाश्ता आटोपला की , पुष्पाताई , बेगम आणि माझी गप्पांची मैफिल १२पर्यंत तरी नक्कीच रंगत असे . कँडी त्यांच्या पायाशी बसून मान वेळावत पुष्पाताईंच बोलणं मन लावून ऐकत असे . पुष्पाताई उठल्यावर मात्र  तो भुंकण्यातून तीव्र नाराजी व्यक्त करत असे . पहिल्यांदा असं घडलं तेव्हा कँडीच्या आरडा-ओरड्याचं पुष्पाताईंना खूप आश्चर्य वाटलं आणि त्या काहीशा भांबवल्याही . ‘घरात आलेला आवडता माणूस बाहेर जायला निघाला की , श्वानाला असाच राग येतो’ , असं पुष्पताईंना मी त्यावर सांगितलं . ‘माणूस आवडतं तर हा वैर्‍यासारखा का भुंकतोय ?’ असा प्रश्न त्यांना पडला . नंतरच्या प्रत्येक भेटीत पुष्पाताई निघाल्या की कँडीला ‘निघाले रे वैर्‍या’ असं आवर्जून कँडीला सांगत !

नागपूरला मैत्री नावाची एक संस्था आहे . शुभदा फडणवीस , डॉ. अविनाश रोडे , हेमंत काळीकर वगैरे उत्साही मंडळी काही प्रबोधनाचे तर काही गंभीर उपक्रम राबवणारी ही संस्था चालवितात .  पुरोगामी डाव्या विचारांच्या लोकांचे त्यांना कायमच आकर्षण असायचं . एकदा गप्पा मारताना कोणत्यातरी निमित्तानं पुष्पाताई भावे , कुमार केतकर , भास्कर लक्ष्मण भोळे या तिघांना एकाच व्यासपीठावर आणण्याची कल्पना शुभदानं मांडली . या तिघांना एकत्र आणणं किमान माझ्यासाठी तरी मुळीच कठीण नव्हतं कारण या तिघांशीही असणारे समान विचारी संबंध . हवं होतं ते निमित्त . तेही लवकरच  मिळालं . ‘लोकसत्ता’तील माझा स्तंभ ‘डायरी’ची प्रथम आवृत्ती ग्रंथाली या वाचक चळवळीतर्फे प्रकाशित झाली . ( आता पुढची सुधारित आवृत्ती पुण्याच्या देशमुख आणि कंपनीनं देखण्या रुपात प्रकाशित केली आहे . )  मुंबईत प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम झाला . नागपुरातही प्रकाशन करु आणि या तिघांना एकत्र आणू असं मी सुचवलं . शुभदा – अविनाश – हेमंतनी ते मान्य केलं . त्याच म्हणजे सप्टेंबर महिन्यात एका संपादकीय बैठकीसाठी आमचे संपादक कुमार केतकर नागपूरला येणार होते . संपादकीय बैठकीच्या दुस-या दिवशी नेमका रविवार होता .

प्रकाशनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता ठरवला . पुष्पाताई आणि भोळेंशी बोललो त्यांनीही होकार दर्शवला . भोळे सरांच्या प्रवासाचा प्रश्नच नव्हता कारण ते नागपुरातच होते . पुष्पाताईंनी ‘प्रवासाची सोय मी माझी करुन घेईल’ , असं लगेच सांगून टाकलं . चार/पाच दिवसांनी सोबत अनंत भावेही येणार असल्याचं पुष्पाताईंनी   कळवलं . पुष्पाताई आणि अनंत भावे या दांपत्याच्या निवासाच्या सोयीचा प्रश्नच नव्हता , कारण नागपूरला आलं की प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांच्याकडे उतरण्याची त्यांची रीत होती .

ठरल्याप्रमाणे कार्यक्रम झाला . श्रोत्यांत महेश एलकुंचवार , डॉ. द. भि. कुलकर्णी ,     डॉ . विनय वाईकर , डॉ. श्रीकांत चोरघडे , लीलाताई चितळे तसंच दि. भा. उपाख्य नानासाहेब घुमरे , मा. गो. वैद्य , यशवंत मनोहर आणि भाऊ लोखंडे असे अनेक मान्यवर होते . सभागृह ओसंडून भरलेलं होतं . तो जणू , संवेदनशील आणि विचारी अभिजनांचा कुंभमेळाच होता . त्या अभिजनांच्या प्रास्ताविक करताना मला अवघडल्यासारखंच झालं पण , पुष्पाताई , केतकर आणि भोळे या तिघांनीही धुंवाधार भाषणे केली . उपस्थित नागपूरकर जाम खूष झाले नसते तर नवल होते .

पुष्पाताईंना आमंत्रित करण्याची जबाबदारी मी घेतल्यानं प्रवास खर्च आणि मानधनाचं पाकीट घेऊन त्यांना भेटायला गेलो . माझ्या हातातलं पाकीट बघितल्या बरोब्बर त्यांनी ‘मी तुझ्या  कार्यक्रमासाठी काहीही घेणार नाही’. असं निक्षून सांगितलं . मी पटवण्याचा थोडासा प्रयत्न केला पण , त्यांना ते मान्य होणं शक्यच नव्हतं . शेवटी एलकुंचवारांनी ‘प्रवीण , पुष्पा ऐकणार नाही हे तुला ठाऊक नाही का ? पुरे कर तू आता .’ असं म्हणून तो विषय संपवला . रेल्वे स्टेशनवर जातांना अनंत भावे यांनी कार उपाहार गृहासमोर थांबायला सांगून रात्रीच्या जेवणाची पॅकेटस घेतली आणि पैसेही त्यांनीच दिले . पुष्पाताई आणि अनंत भावे यांचा असा हा एक वेगळा पैलू  अनुभवायला मिळाला .

अशीच एक आठवण पुष्पाताईंच्या एका अप्रतिम भाषणाची आहे . भास्कर लक्ष्मण भोळे यांचं निधन झाल्यावर त्यांच्या स्मृत्यर्थ एक व्याख्यानमाला मैत्री संस्थेनं सुरु केली . पहिल्या व्याख्यानाला पुषपाताईंना बोलवायचं ठरलं . मी फोन केला आणि प्रयोजन सांगितल्यावर त्या अर्थातच हो म्हणाल्या . आमच्यात इकडच्या–तिकडच्या गप्पा झाल्या . त्यात समाजाच्या विविध क्षेत्राचं सुरु असलेलं सुमारीकरण ( Mediocrity) असा विषय निघाला . पुष्पाताई म्हणाल्या , ‘सुमारीकरण’ हाच विषय ठेवू यात . आमची काही हरकत असण्याचा प्रश्नच नव्हता . व्याख्यानासाठी सभागृहात महेश एलकुंचवार आणि शुभदा फडणवीस यांच्यासोबत पुष्पाताई आल्या तेव्हा त्यांच्या हातात केवळ पर्स होती .  व्याख्यानाच्या नोंदीचे कागद त्यांच्या पर्समध्ये असतील असं मला वाटलं . विषय हटके असल्यानं त्यांनी त्या नोंदी काढल्या असणार असा माझा होरा होता . प्रास्ताविक , स्वागत वगैरे झालं . पुष्पाताई रिक्त हस्ते , अगदी कागदाचा चिटोराही न घेता  व्याख्यानाला उभा राहिल्या . पुढचा दीड तास सामाजिक, आर्थिक , राजकीय आणि सांस्कृतिक या चारही क्षेत्रातल्या त्यांनी  सुमारीकरणाविषयी अत्यंत तर्कशुद्ध मांडणी केली . त्यात आकडेवारी होती , उदाहरणं होती , टोमणे होते आणि जबाबदार असणारांना टोलेही होते . त्यांच्या वाणीला विलक्षण धार होती पण , आक्र्स्ताळेपणाचा लावलेश नव्हता , वैयक्तिक निंदा नव्हती . विद्वत्ता  , करारीपणा , ठामपणा , तर्कशुद्धता यांचा तत्पूर्वी कधीही अनुभवायला न मिळालेला . समाजाविषयी वाटणा-या तळमळ आणि लोकशाहीविषयी चिंता व्यक्त करणारा पुष्पाताईंचं व्याख्यान म्हणजे सामाजिक जाणिवेचा सुंदर गोफ होता . विचारी श्रोत्यांच्या संवेदनशील मनाच्या खिडक्या त्या व्याख्यानानं नक्कीच किमान तरी किलकिल्या झाल्या असणार .

-पुष्पाताईंशी शेवटची भेट दीड एक वर्षांपूर्वी औरंगाबादला झाली . अनंत भालेराव स्मृती पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या औरंगाबादला आल्या होत्या . कानावर आल्याप्रमाणे करारी पुष्पाताईच्या देहाला अनेक व्याधींनी घेरलेलं होतं , त्या थकल्या होत्या तरी आवाजातला कणखरपणा मात्र शाबूत होता . पुरस्कार स्वीकारल्यावर नेहेमीच्या तर्कशुद्ध शैलीत यांनी मांडणी केली . कार्यक्रम संपल्यावर पुष्पाताईंसोबत निमंत्रितांसाठी भोजन होतं . तिथे भेट झाली . काठी टेकवत हळूहळू चालत पुष्पाताई आल्या . मला एकटाच आल्याचं बघून त्यांनी विचारलं , ‘अरे , तुझी बेगम कुठं आहे ?’ .

मी मंगलच्या तब्येतीबद्दल सांगितलं . माझं ऐकून घेतल्यावर त्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितलं . मंगलाशी फोनवरही बोलता येणं शक्य नव्हतं . एव्हाना बेगमचं बोलणं आम्हा दोघा – तिघांनाच समजू शकत होतं . ते ऐकल्यावर माझा हात हातात घेऊन पुष्पाताईंनी धीराचं थोपटलं . अतिशय हळव्या स्वरात पुष्पाताई म्हणाल्या , ‘मी जिना चढू शकत नाही  आणि तुझी बेगम जिना उतरु शकत नाही . झालेला भास होता की काय तो , हे माहिती नाही पण , पुष्पाताईंचे डोळे ओलावल्यासारखे वाटले . त्यांच्या हातात असलेला माझा हात अलगद सोडवून घेत , मी पाठ फिरवली . पुष्पाताई भावे नावाची रणरागिणी भावनाप्रधान होते , हे अनुभवणं मला तरी शक्यच नव्हतं…

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
   ९८२२० ५५७९९

Previous articleनॉस्टॅल्जिक करणाऱ्या पत्रलेखनाच्या आठवणी…
Next articleअरण्यऋषींचे ‘ स्थलांतर’..!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.