त्या डायऱ्यांनुसार असे दिसत होते की, सुरेंद्र जैन याने काही राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांना ६५ कोटी रुपयांची लाच दिली होती; परंतु डायरीतील नोंदी या केवळ नावांची आद्याक्षरे आणि रकमांचे काही आकडे अशाच स्वरूपात होत्या. अशा परिस्थितीत सीबीआय या प्रकरणात उतरली. सीबीआयला असे लक्षात आले की- काही आद्याक्षरे (LK, KN, MS, AN) काही राजकीय नेत्यांच्या नावांची आहेत, तर इतर काहींचा उलगडा होत नाही. तसेच आद्याक्षरांसमोर जे काही आकडे डायरीत होते, त्यानुसार सीबीआय केवळ रकमांचा अंदाज बांधू शकत होती. जर त्या आकड्यांनुसार रकमा देण्यात आल्या असतील, तर हे स्पष्ट नव्हते की, त्या रकमा हजार/लाख/ कोटी अशा कोणत्या स्वरूपात आहेत. मूळ पुराव्याला बळकटी आणणारा इतर कोणताही पुरावा समोर नव्हता.