विरुबाई : आंदणी ते मातुश्रीसाहेब

मुकुंद कुळे
………………………………….

प्रवास तरी केवढा? तर औरंगजेबाच्या छावणीतल्या, एका तंबूपासून दुसऱ्या तंबूपर्यंतचा… तोही लपून-छपून नाही, तर सरदार-दरकदारांच्या साक्षीने झालेला आणि संभाजीपत्नी येसूबाई व औरंगजेबाची कन्या झिनतुन्निसा यांच्या संमतीनेच घडवून आणलेला… पण या छोट्याशा प्रवासातच मराठा साम्राज्याचा वारसदार शाहू, विरुबाईचा झाला तो कायमचा!
काय घडलं असेल, या छोट्याशा प्रवासात? शाहू-विरुबाईची नजरानजर झाली असेल? दोघं चुटपुटत एकमेकांशी काहीतरी बोलले असतील? …की न बोलता, न स्पर्श करता, त्यांना एकमेकांच्या मनाची भाषा उमगली असेल? बहुदा असंच झालं असेल… काहीही न बोलता, ते खूप बोलले असतील… आणि प्रवासाचं तरी काय, तो छोटा असो वा मोठा, कसा आणि कुणासोबत होतो तेच महत्त्वाचं, नाही का?
…पण जे घडलं, ते मराठ्यांच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण होतं.
तेव्हाही विरुबाई शाहूची लग्नाची बायको नव्हती, अन् नंतरही कधी झाली नाही… आणि तरीही औरंगजेबाच्या छावणीत शाहू कैद असल्यापासून ते सातारच्या गादीवर त्याचा राज्याभिषेक होऊन तो मराठा साम्राज्याचा छत्रपती होईपर्यंत प्रत्येक वेळी विरुबाई त्याच्यासोबत, त्याच्या जोडीने उभी होती. एवढंच कशाला, १७४० साली विरूबाई वारली, तेव्हाही शाहूने कोण शोक व्यक्त केला… भोसल्यांच्या राजघराण्यातील व्यक्तींचं जिथे दहन केलं जातं, त्या संगम माहुली येथेच शाहूने विरुबाईचं दहन केलं आणि तिची सुरेख समाधीही बांधली.
… अशी ही विरुबाई होती तरी कोण? तर विरुबाई होती, एक सामान्य आंदणी. म्हणजे लग्नात आंदण म्हणून आलेली!
***
झुल्फिकारखानाने १६८९मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि रायगडावर मुक्काम असलेल्या येसूबाई व आठ वर्षांचा शाहू यांना कैद केलं. तेव्हापासून येसूबाई व शाहू, मोगलांच्या छावणीत कैदी म्हणून होते. नगर-सोलापूर-औरंगाबाद… जिथे औरंगजेबाची छावणी हलायची-पडायची, त्या छावणीत खुद्द औरंगजेबाच्या नजरेखाली राहील अशा तंबूत येसूबाई-शाहूची सोय केली जायची. अर्थात मराठ्यांचा राजपुत्र आणि मराठ्यांची महाराणी असल्यामुळे येसूबाई किंवा शाहूच्या खिदमतीत कोणतीच कमी नसे. उलट खुद्द औरंगजेबाची कन्या झिनतुन्निसा ही येसूबाई आणि संभाजीराजांची बडदास्त ठेवायची. शाहूवर तर झिनतुन्निसाचं पुत्रवत प्रेम होतं. त्यामुळेच जेव्हा शाहूचं लग्नाचं वय झालं, तेव्हा येसूबाईपेक्षा झिनतुन्निसानेच अधिकारवाणीने आपल्या पित्याकडे, म्हणजे औरंगजेबाकडे शाहूच्या लग्नाचा विषय काढला. तेव्हा औरंगजेब येसूबाई आणि शाहूच्या सोबतीला असलेल्या मराठा सरदारांना ( उद्धव योगदेव, मोरोपंत सबनीस, जोत्याजी केसरकर) म्हणाला, ‘ आमचे पदरी मातबर मराठा उमराव, सरदार आहेत. यांत राजांचे शरीर-संबंधी पूर्वीपासून होत असतील, त्यांच्या कन्या पाहून, उत्तम अशा योजाव्या आणि लग्न करावे.’ एवढंच बोलून औरंगजेब थांबला नाही, तर त्याने या लग्नाच्या खर्चासाठी एक लाख रुपयांची तरतूदही केली.
त्यानुसार १७०३ साली शाहू आपल्या कैदेत असतानाच औरंगजेबाने त्याची दोन लग्नं लावून दिली. पैकी एक मुलगी होती- सरदार रुस्तुमराव जाधवांची राजसबाई (सावित्रीबाई) आणि दुसरी होती- कण्हेरखेडच्या शिंद्यांची अंबिकाबाई. ही दोन्ही लग्नं एकाच वेळी आणि धूमधडाक्यात झाली. मात्र लग्नानंतर एके दिवशी औरंगजेबाने शाहूच्या बायकोला मूँहदिखाईसाठी बोलावलं आणि येसूबाईसमोर मोठाच पेच निर्माण झाला. कारण औरंगजेबाच्या कैदेत असले, तरी येसूबाई मराठा साम्राज्याची विद्यमान महाराणी होती आणि नवीन आलेली सून भावी महाराणी. त्यात मराठा स्त्रिया परपुरुषाला चेहरा दाखवत नाहीत. शेवटी येसूबाईने झिनतुन्निसालाच यातून मार्ग काढायला सांगितला आणि दोघींनी संगनमताने एक निर्णय घेतला. या निर्णयानेच मराठ्यांच्या इतिहासातील एक जगावेगळी प्रेमकहाणी जन्माला घातली. शाहू आणि विरुबाईची!
***
झालं असं की, मराठ्यांच्या सुनेला पादशहाकडे घेऊन जाण्याचा दिवस उगवला. तेव्हा येसूबाई आणि झिनतुन्निसा या दोघींनी ठरल्याप्रमाणे, शिंद्याच्या अंबिकाबाईबरोबर आंदण आणि पाठराखीण म्हणून जी मुलगी आली होती, तिलाच एखाद्या नव्या नवरीसारखी सजवली. तिची वेणी-फणी केली, तिला उंची वस्त्रं नेसवली, तिच्या अंगा-खादंयावर जडजवाहीर घातलं… तिचं असं रूपडं तयार केलं की, पाहणाऱ्याला वाटावं, ही मराठा साम्राज्याची भावी राणीच जणू!
… आणि दिली पाठवून शाहूबरोबर, त्याची लग्नाची बायको म्हणून!

येसूबाई आणि झिनतुन्निसाची तरी कमालच म्हणायला हवी… कुणाला कानोकान खबर लागली नाही. एवढा हिंदुस्थानचा आलमगीर औरंगजेब… पण त्याला साधा संशयही आला नाही. शाहू आणि त्याची पत्नी आपल्या तंबूत येताच त्याने दोघांचंही खूप प्रेमाने स्वागत केलं. शाहूवर तर औरंगजेबाचा तसाही जीव होताच. याच्या आज्याने, बापाने आणि चुलत्यानेही आपल्याशी वैर धरलं, तरी हा आपल्याविषयी लोभ बाळगून असतो, याची त्याला जाणीव होती. शाहू लहानाचा मोठाच मुघलांच्या छावणीत आणि तुलनेने औरंगजेब व झिनतुन्निसाच्या प्रेमळ छायेत झाल्यामुळे, त्याच्याही मनात त्यांच्याविषयी वैरत्वाची भावना नव्हतीच. असलीच तर ती येसूबाईच्या मनात सुप्तपणे होती, परंतु शाहूच्या मनात यत्किंचितही नव्हती… याची जाणीव असल्यामुळेच शाहूचा आपल्या तंबूत प्रवेश होताच, औरंगजेबाने त्याला आणि नव्या सुनेला जवळ बोलावलं. त्यांचा रीतसर मानपान केला. त्यांचं कौतुक केलं आणि दोघांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना मनापासून आशीर्वादही दिला- ‘तुमचे राज्य, तुम्ही उभयतां बहुत दिवस कराल…’ इतकंच करुन औरंगजेब थांबला नाही. त्याने साडी-चोळीच्या खर्चासाठी इंदापूर-सुपे-बारामती हे परगणे नव्या सुनेच्या नावे करुन दिले… आणि दोघांना प्रेमाने निरोप दिला.
बस्स… आणि तिथून शाहू आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी म्हणून आलेली अंबिकाबाईची पाठराखीण पुन्हा माघारी फिरले… नि आपल्या तंबूत आले. हा तंबू ते तंबू प्रवास त्या उभयतांनी चालत केला, पालखीतून केला की मेण्यातून केला, ठाऊक नाही. कळायला काही मार्गही नाही. पण हा प्रवास उभयतांना सुखकर झाला एवढा नक्की… आणि या प्रवासातच शाहूची मर्जी अंबिकाबाईच्या या पाठराखणीवर बसली, ती कायमची. तेव्हापासून तिचा अंतकाळ होईपर्यंत शाहूने तिला किंवा तिने त्याला कधीच अंतर दिलं नाही… अंबिकाबाईची ही पाठराखीण, किंवा आंदणी म्हणजेच विरुबाई!
***
विरुबाईची आणि शाहूची या प्रवासात गाठ पडली, तेव्हा शाहूचं वय होतं वीसेक वर्षांचं, तर विरुबाई होती चौदा-पंधरा वर्षांची.
या घटनेनंतर शाहू किमान पाच-सहा वर्षं तरी औरंगजेबाच्याच कैदेत होता आणि औरंगजेब जगता तर कदाचित आणखी काही काळ शाहूला औरंगजेबाच्याच कैदेत काढावी लागली असती. परंतु वृद्धापकाळामुळे २० फेब्रुवारी १७०७ला अहमदनगर येथे औरंगजेब मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचा दुसरा मुलगा आजमशहा माळव्याच्या सुभेदारीवर होता. औरंगजेबाच्या मृत्यूची वार्ता कळताच तो तातडीने नगरला आला आणि त्याने औरंगजेबावर संस्कार करुन स्वतःला हिदुस्तानचा पादशहा घोषित केलं. परंतु त्याच सुमारास औरंगजेबाचा मोठा मुलगा शहाआलमही नुकताच इराणवरुन हिंदुस्थानात परतला होता. शहाआलम आपल्या मार्गात अडथळा आणू शकतो, हे उमगल्यामुळे आजमशहाने लगेच दिल्लीला परतायची तयारी सुरू केली. औरंगजेबाबरोबर तब्बल सत्तावीस वर्षं दखनी मुलुखात काढलेल्या त्याच्या सैन्यालाही आपल्या मुलुखात परत जायची इच्छा होती आणि सगळ्यांनाच शांतपणे परत माघारी फिरायचं होतं. मात्र यातला मुख्य अडथळा होता, तो शाहू. कारण एवढी वर्षं मुघलांच्या कैदेत असला, तरी शाहू महाराष्ट्रातच होता. त्यामुळे मराठ्यांचे सरदार बाहेरुन का होईना शाहूवर लक्ष ठेवून होते. आता शाहूला पार दिल्लीला नेतायत म्हटल्यावर मराठे पुन्हा एकत्र येऊन मुघलांवर हल्ला करण्याची शक्यता होती. ती शक्यता लक्षात घेऊनच आझमशहाने आपल्या परतीच्या वाटेतूनच शाहूला स्वतंत्र केलं. शाहूपेक्षा त्याला दिल्लीचं तख्त महत्त्वाचं वाटतं होतं. त्याशिवाय शाहूवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या झिनतुन्निसालाही वाटत होतं की, आता शाहूला सोडलं पाहिजे. म्हणून तिच्या प्रयत्नांमुळेच मुघलांनी शाहूला स्वराज्यात सोडलं, असंही म्हटलं जातं.
८ मे १७०७ रोजी शाहूची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली. मुघलांच्या छावणीचा निरोप घेताना शाहू झिनतुन्निसा बेगमला भेटायला गेला. यावेळचं वर्णन करताना शाहूचा चरित्रकार मल्हार रामराव चिटणीस म्हणतो की बेगमेने शक्य तितक्या लवकर शाहूला छावणीतून निघायला सांगितलं, तसंच ती पुढे म्हणाली- ‘तुमचे राज्य तुम्ही साधावे. पातशाहीशी वाकडे चालू नये. सनदावगैरे देतील ते घ्यावे. तुम्ही पातशहाचे नातू आहात.’ एवढं बोलून झिनतुन्निसाने आपल्या पुजेतील पवित्र पंजे शाहूच्या हवाली केले.
त्यानंतर शाहू मुघलांच्या छावणीतून लगेच निघाला. मात्र इथे लक्षात घ्यावयाची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शाहूची सुटका झाली तरी येसूबाईची सुटका झाली नव्हती. तिला आझमशहाने आपल्यासोबतच ठेवली होती. तसंच संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग आणि शाहूची लग्नाची एक बायकोदेखील आझमशहाबरोबर उत्तरेत गेली. तर शाहूची दुसरी बायको सावित्रीबाई मुघलांच्या छावणीतच मृत्यू पावली होती. अशा वेळी मराठा साम्राज्यात परतताना शाहूने विरुबाईला मात्र आपल्या सोबत ठेवली, ही नक्कीच दखल घेण्याजोगी बाब होती.
स्वराज्यात परतल्यावर शाहूने आणखी दोन लग्नं केली. पैकी सरदार कुंवारजी शिर्के यांच्या मुलीशी लग्न करुन तिचं नाव सकवारबाई ठेवलं, तर दुसरी सरदार मोहित्यांची मुलगी करुन तिचं नाव सगुणाबाई ठेवलं. त्याशिवाय, मुघलांच्या छावणीत लहानाचे मोठे झाल्यामुळे, शाहूने त्यांच्या धर्तीवरच आपला जनानखाना तयार केला. पण तरीही त्याच्या बायकांत पहिला मान मात्र कायम विरूबाईचाच राहिला. कारण तो तिने समंजसपणे मिळवलेला होता. शाहू आपला लग्नाचा दादला नाही, हे तिला ठाऊक होतं. पण त्याची एकदा मर्जी बसल्यावर, तिने एखादी धर्मपत्नी काय साथ देईल अशी साथ शाहूला दिली. शाहूच्या जनानखान्यापासून मुदपाकखान्यापर्यंत आणि राजदरबारापासून शाहूच्या खासगी कामापर्यंत सर्वत्र तिने आपल्या समजूतदारपणाची, शहाणपणाची आणि ज्येष्ठतेची मोहोर उमटवली. विरूबाई जात्याच शहाणी आणि स्वतःचा आब राखून असणारी असावी. लग्नाच्या नसलो, तरी आपण शाहूच्या मर्जीतल्या आहोत, याचं भान तिने कधीच सोडलं नाही. तिची आपल्याप्रतिची ही समर्पणाची वृत्तीच शाहूला पहिल्यापासून भावली असावी आणि त्यामुळेच आपल्या लग्नाच्या बायकांपेक्षाही मोठा मान त्याने कायम विरुबाईला दिला. किंबहुना आपल्या बायकांना आणि प्रेमपात्रांना कायम विरूबाईच्या धाकाखाली ठेवलं.
विरुबाई हे शाहूच्या आयुष्यातलं एक असं प्रेमपात्र होतं, जिच्याशिवाय जणूकाही शाहूच्या आयुष्याला शोभाच नव्हती. त्यामुळेच जेजुरी, तुळजापूर, नाशिक कुठेही कामासाठी किंवा मौजेसाठी भटकंती झाली की शाहूबरोबर असायची ती विरुबाईच. विरुबाईने अल्पावधीत आपल्या कर्तृत्वाने दराराच असा निर्माण केला की मराठ्यांच्या राजदरबारापासून ते पेशव्यांपर्यंत सारेच तिला मातुश्रींचाच मान देऊ लागले. याससंदर्भात पेशवे दप्तरातलं एक पत्र पाहण्यासारखं आहे. थोरला बाजीराव पेशवा मोहिमेदरम्यान बाहेर असताना, त्याचा मुलगा नानासाहेब सातारा दरबारात असे. तो रोजच्या रोज सातारा दरबारातील महत्त्वाच्या घडामोडी पत्राद्वारे बाजीरावाला कळवत असे. त्यातल्या एका पत्रात नानासाहेबाने लिहिलं आहे- ‘आम्ही राजश्री स्वामीस नजर पाच मोहरा केल्या. राजश्री स्वामीनी जरी चादर आम्हास दिली. तेथून वाडियात गेलो. सौभाग्यादिसंपन्न वज्रचुडेमंडित मातुश्री विरुबाईसाहेब यांची भेट घेतली. नजर दोन मोहरा केल्या. त्यांनी विडे देऊन आज्ञा दिल्ही.’ यावरुन विरुबाई शाहूची लग्नाची बायको नसली, तरी ती त्याच्या पत्नीपदाला पोचली होती, एवढं नक्की. इतकंच नाही, तर पेशव्यांना जेव्हा शाहूकडून काही काम करुन घ्यायचं असे, तेव्हा ते मातुश्री विरुबाईंना पत्र लिहीत असल्याचेही अनेक उल्लेख सापडतात. किंबहुना क्वचित प्रसंगी विरूबाई पेशव्यांनाही धाकात घेत असे. तिचं असंच एक पत्र उपलब्ध आहे. त्यात पेशव्यांना सातारच्या महालातील मुदपाकखान्याच्या दुरुस्तीविषयी जरबेने लिहिताना ती म्हणते- ‘दिवस गतीवर घालणे. अविलंबे तयार करविले पाहिजे.’ यावरुन विरूबाईचं शाहूच्या आयुष्यातील आणि मराठा राजदरबारातीलही महत्त्वाचं स्थान लक्षात येतं.
विरुबाईचं शाहूच्या आयुष्यातील हे स्थान एवढं महत्त्वाचं होतं की, तिच्याकडे वक्र दृष्टीने पाहण्याचीही अनेकांची हिंमत होत नसे. उलट तिच्याबाबतीत प्रत्येकजण सावध असे. यासंबंधीची एक घटना शेडगावकर बखरीत आलेली आहे. या बखरीनुसार विरुबाईच्या मनात एकदा समुद्रस्नानाची इच्छा निर्माण झाली. तेव्हा शाहूने बसवंतराव नावाच्या एका इसमास आज्ञा केली की – ‘मर्जीबरोबर तुम्हास चाकरीस नेमले आहे. त्यांस समुद्रस्नान करवून आणावे…’ याप्रसंगी आपल्यावरची जोखीम ओळखून या बसवंतरावाने आपले लिंग स्वतःच्या हाताने छाटले आणि मगच तो विरुबाईबरोबर समुद्रस्नानाच्या मोहिमेवर गेला.
***
आयुष्याच्या एका नाजूक वळणावर शाहू आणि विरुबाईची पहिली भेट झाली होती. त्या भेटीच्या वेळी विरुबाई लहान असली, तरी शाहूस जाणता होता. त्याला त्या लहान मुलीच्या मनातली चलबिचल उमजली होती का?… कुणास ठाऊक! आपण औट घटकेच्या शाहूपत्नी आहोत, ते त्या लहानग्या विरुबाईला कळलं असावं आणि त्यातून तिच्या मनात निर्माण झालेली चलबिचल शाहूने हेरली असावी… कदाचित! आणि त्यावेळी विरुबाईला दिलेली साथ शाहूने अखेरपर्यंत निभावली.
शाहूचं बालपण मुघलांच्या छावणीत गेलं. साहजिकच त्याने त्यांचे सगळे ऐषोआरामी तोर तरीके उचलले. अशा छंदांसाठी सातारच्या गादीवर बसल्यावर त्याने खास रंगमहालही बांधून घेतला होता. त्यामुळे तो आपल्या लग्नाच्या बायका किंवा मर्जीतल्या स्त्रियांशी एकनिष्ठ होता, असं नाही. उलट पेशवे दप्तरात आणि इतरही सरदारांच्या दप्तरखान्यांत अशी अनेक पत्रं सापडतात, की ज्यांत शाहूने चांगल्या देखण्या मुलींची मागणी केलेली आहे. इतिहासकाळात या व्यवहारांकडे अनैतिक म्हणून पाह्यलं जात नसे. किंबहुना राजरोस असे संबंध ठेवले जात असत… अन् तरीही शाहू-विरूबाई प्रकरणाचं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण हे आहे की, कितीही जणींशी संबंध आले, तरी शाहूने विरूबाईला कधी अंतर दिलं नाही. ती त्याची जणू पट्टराणीच राह्यली कायम. एखादी स्त्री लग्नाची नसतना, केवळ अंगवस्त्र किंवा मर्जी असताना, तिला इतका बहुमान मिळण्याचं मराठ्यांच्या इतिहासातलं हे एकमेव उदाहरण असावं. अन्यथा स्त्री वापरली आणि फेकून दिली, हीच तेव्हाची आणि आताचीही रीत आहे. पण शाहूने विरुबाईच्या संबंधात तसं केलं नाही. आणखी एक म्हणजे, सुरुवातीच्या काळात शाहू-विरुबाईचे जे शारीरिक संबंध आले असतील, ते नंतरच्या काळात किती आले असतील शंकाच आहे. कारण शाहूसाठी नव्हाळीतल्या अनेकजणी उपलब्ध होत्या. तरीही विरूबाई आणि शाहूच्या नातेसंबंधांत जराही दुरावा आल्याचं दिसत नाही. याचा अर्थ शरीरापेक्षाही ते मनाने एकमेकांच्या अधिक जवळ असावेत… नव्हे, शाहूचं तिच्यावर खरोखरच प्रेम होतं आणि आपल्या वागणुकीतून ते त्याने कायम व्यक्त केलं. जणू काही नव्हाळीत जुळलेलं प्रेम उत्तरोत्तर अधिक पक्व होत गेलं. मुरत गेलं.
शाहू आणि विरुबाईच्या प्रेमाचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची मुलं- राजसबाई आणि फत्तेसिंग भोसले. त्या दोघांना कधीही अनौरस मानण्यात आलं नाही. उलट सातारच्या राजदरबारात त्यांना एखाद्या राजकन्या-राजपुत्राचीच वागणूक आणि सन्मान मिळे. त्यातही राजसबाई थेट शाहू-विरुबाईच्या संबंधांतूनच जन्माला आलेली. त्यामुळे तिच्यासंदर्भात सगळे शाही रीतीरिवाज पाळले जायचे. राजसबाईच्या संदर्भातील एक पत्र उपलब्ध आहे. त्यात लिहिलंय – ‘राजसबाई प्रसूत जाली. कन्यारत्न झाले. २३ मोहरमी इंदुवारी बारसे जाले. अवघ्या सरकारकुळाच्या बाईकांनी जाऊन सिस्टाचार विध संपादिले.’
फत्तेसिंग मात्र ना शाहू-विरुबाईच्या रक्ताचा होता, ना नात्याचा… तरीही तो सातारच्या राजवाड्यात शाहू आणि विरूबाईच्या देखरेखीखालीच मोठा झाला आणि त्याचा मराठ्यांच्या दरबारात उचित मान राखला जाई. कारण तो त्या दोघांचा मानसपुत्र होता. हा फत्तेसिंग म्हणजे शाहू-विरुबाईच्या एकमेकांवरच्या प्रेमाचं लखलखीत उदाहरणच होता…
… शाहू नुकताच मुघलांच्या छावणीतून स्वराज्यात परतला होता. संभाजीराजांचा मुलगा आणि स्वराज्याचा खरा वारसदार म्हणून अनेक मराठा सरदारांनी त्याचं स्वागत केलं. मात्र ताराबाई त्याच्या विरोधात गेली. कारण शिवाजीपुत्र राजारामाच्या पश्चात तिने मराठ्यांचं राज्य सांभाळलं होतं. औरंगजेबाच्या विरोधात लढणाऱ्या मराठ्यांचं नेतृत्व एकहाती तिने केलं होतं. त्यामुळे स्वराज्यावर आता फक्त आपला आणि आपल्या मुलांचाच हक्क आहे, असं तिला वाटत होतं. परिणामी ती शाहूच्या विरोधात गेली, प्रसंगी तिने त्याच्याशी युद्धही केलं.
असंच शाहू मुघलांच्या छावणीतून निघून गोदावरी उतरुन अहमदनगरवरुन पारद, परगणे, शिवणे प्रांतात आला. या प्रांतात एक गढी होती. या गढीचा मालक असलेला सरदार सयाजी लोखंडे पाटील ताराबाईच्या पक्षाचा होता. त्याने शाहूसोबत असलेल्या सैन्यावर अचानक हल्ला चढवला. यामुळे बिथरलेल्या शाहूच्या सैन्याने जोरदार चढाई करुन सयाजी पाटलासह त्याचं सैन्य तर मारलंच, सारं गाव उध्वस्त केलं. एवढा गहजब झाला की सयाजी पाटलाच्या बायकोला आपल्या छोट्या लेकरासह घरातून पळ काढावा लागला. आपल्या जिवाला घाबरलेल्या त्या माऊलीने आपलं मूल कसबसं वाचवलं आणि शाहूला शरण येऊन ते मूल त्याच्याच पदरात घातलं आणि म्हणाली- ‘यास वाचवावे. अन्यायी होते ते मारले गेले.’ तेव्हापासून ते मूल शाहूच्याच ताब्यात होतं. पारदच्या या लढाईत आपली फत्ते झाली म्हणून शाहूने या मुलाचं नाव ठेवलं- फत्तेसिंग.
पण फत्तेसिंगची हकिकत इथेच संपत नाही. शाहूने आपल्या ताब्यात आलेलं हे मूल आपल्या लाडक्या राणीच्या, विरूबाईच्या पदरात घातलं. विरुबाईने त्याला जिवाच्या कराराने सांभाळलं-वाढवलं. एवढंच नाही, तर आपल्या विरूबाईला हा मुलगा एवढा आवडतो, म्हणून शाहूने आपलं भोसले आडवनाही त्याला दिलं. तोच हा शाहु-विरूबाई पुत्र- फत्तेसिंग भोसले. मराठा दरबारच्या अनेक पत्रांत त्याचा उल्लेख केवळ राजपुत्र असाच केला गेला आहे.
फत्तेसिंगदेखील शाहू आणि विरुबाईला माता-पित्याचाच मान देई. तो कधीही त्या दोघांच्या शब्दाबाहेर गेला नाही. शाहूनेही पुढच्या काळात त्याच्यावर अनेक मोहिमा सोपवल्या आणि त्या त्याने जबाबदारीने आणि शौर्याने पार पाडल्या.
विरूबाई तर फत्तेसिंगची आईच होती. तिने त्याला जन्म दिला नसेल एवढंच. अन्यथा अपत्यासाठी ज्या खस्ता खाव्या लागतात, त्या साऱ्या तिने फत्तेसिंगसाठी खाल्ल्या. त्यामुळेच फत्तेसिंगाचंही तिच्यावर विलक्षण प्रेम होतं… इतकं की तिचा दुरावा त्याला जराही सहन होत नसे. तो लगेच व्याकूळ होत असे. त्यामुळेच तो कर्नाटकाच्या स्वारीवर असताना २४ डिसेंबर १७४०मध्ये विरूबाई मृत्यू पावली, तेव्हा तो या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयारच नव्हता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेला रघुजी भोसले शाहूला लिहिलेल्या पत्रात म्हणतो- ‘मातोश्रींच्या मृत्यूची बातमी कळताच फतेसिंगबावांनी अतिशय खेद करुन परम शोक केला. समाधान करता चित्ताचा खेद न टाकीत, तेव्हा स्वामींचे (शाहूमहाराज) हस्ताक्षर दाखविलें. स्वामींच्या चरणारविंदाचा निजध्यास बहुतच करतात. स्वामींवाचून आणिकच्याने शोक दूर होणे नाही.’
हे साहजिकच होतं, विरूबाईच्या मृत्यूनंतर फत्तेसिंगला भावनिक आधार आणि धीर देणारं शाहूशिवाय दुसरं कुणी नव्हतं. त्यामुळे कर्नाटकाच्या मोहिमेतून फत्तेसिंग माघारी आला. तो आल्यावरच विरूबाईचे मृत्यूनंतरचे सगळे विधी केले गेले आणि पुत्र म्हणून ते सारे फत्तेसिंगाने केले.
इथे आणखी एक हकिकत सांगायलाच हवी… कारण मातृवारशाने मुलाला मिळालेल्या जहागिरीची मराठ्यांच्या इतिहासातील तीदेखील एकमेव घटना असावी.
विरूबाईच्या मृत्यूनंतर तिला औरंगजेबाने साडी-चोळीच्या खर्चासाठी दिलेला अक्कलकोट परगणा फत्तेसिंगाला मिळाला. त्यातूनच पुढच्या काळात फत्तेसिंगाने अक्कलकोट संस्थानाची निर्मिती केली. मात्र हे संस्थान म्हणजे, आपल्या आईची विरूबाईची देणगी आहे, ते फत्तेसिंग कधीच विसरला नाही. त्यामुळेच या संस्थानाच्या निर्मितीच्या वेळी राजवाडा बांधला गेला, तेव्हा फत्तेसिंगाने विरूबाईची सोन्याची मूर्ती घडवून घेतली आणि ती आपल्या देवघरात ठेवली.
… एखाद्या राजाची ‘मर्जी’ असलेली स्त्री थेट देवघरात जाऊन बसण्याची ही भारतीय इतिहासातील नव्हे, जागतिक इतिहासातील एकमेव घटना असावी…!
***
विरूबाईच्या मृत्यूनंतर जे दुःख फत्तेसिंगाला झालं, तेवढंच किंबहुना त्याहून अधिक दुःख शाहूला झालं. कारण विरुबाईच्या मृत्यूमुळे, शाहूला समजून-उमजून घेणारं माणूसच त्याच्या आयुष्यातून नाहीसं झालं होतं. त्या अर्थाने विरूबाईच्या पश्चातलं त्याचं जगणं हे एकाकीपणाचं होतं. सकवारबाई आणि सगुणाबाई या त्याच्या दोन बायका हयात होत्या, परंतु त्यांनी त्याला उद्वेगच आणलेला दिसतो. उलट ऐतिहासिक पत्रांनुसार जोवर विरूबाई होती, तोवर या दोघी तिच्या धाकात होत्या. तिच्यासमोर ब्र ही काढण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. मात्र ती मृत्यू पावताच, या दोघी स्वैर सुटल्या आणि त्यांनी शाहूच्या मागे लागून स्वतःसाठी वेगळा सरंजाम व नेमणुका करुन घेतल्या. त्यांना आपल्या नवऱ्यापेक्षा त्याच्या संपत्तीचाच अधिक लोभ होता.
परिणामी नंतरच्या काळात शाहू जिवंत होता एवढंच, अन्यथा त्याचा जगण्यातला रस संपलेला होता. त्यात विरूबाईच्या मृत्यूच्या आगेमागेच, बाजीराव पेशवा आणि त्याचा भाऊ चिमाजी आप्पा यांचंही निधन झालं. ज्यांच्या समवेत आपण स्वराज्य वाढलेलं पाहिलं, ती माणसंच नाहीशी झाल्यामुळे शाहू उदास झाला…
… या उदासकाळात शाहू कधी साताऱ्यापासून जवळच असलेल्या लिंब-शेरी गावातील बारवेला भेट द्यायला गेला असेल का? दगडात बांधून काढलेली ही कलात्मक बारव शाहूने विरूबाईच्या सांगण्यावरुन बांधली होती… या विहिरीत आतील बाजूस एक छोटेखानी सज्जा आहे. कधी विरंगुळ्याच्या क्षणी शाहू आणि विरुबाई येऊन या सज्ज्यात बसून गप्पा मारायचे म्हणे…
खरं-खोटं काळालाच ठाऊक…
रुढार्थाने शाहू, विरुबाईच्या मृत्यूनंतर नऊ वर्षं जगला. १५ डिसेंबर १७४९ ला त्याचा मृत्यू झाला… पण त्याचं प्राणपाखरु तर केव्हाच उडून गेलं होतं, विरुबाईबरोबर!
***
शाहू मराठा साम्राज्याचा स्वामी आणि त्याची खास ‘मर्जी’ असलेल्या विरुबाईची ही जगावेगळी कहाणी. ‘एक सर्वसामान्य आंदणी ते मातुश्री विरुबाई’ हा विरुबाईचा प्रवास थक्क करणाराच आहे… अर्थात तो शाहूशिवाय शक्य नव्हता. किंबहुना दोघांनीही एकमेकांच्या सोबतीनेच केला… मात्र मराठ्यांच्या इतिहासातलं एवढं महत्त्वाचं आणि मानाचं पान असतानाही, आज विरुबाई कुणालाच ठाऊक नाही. शाहूने संगम माहुलीला तिची समाधी उभारली, परंतु तिचा आज मागमूसही तिथे नाही…
पण इतिहास झाकला गेला, तरी पुसला कधीच जात नाही. कालौघात कधी तरी कालपटावरची अक्षरं उघडी पडतातच… कुणी सांगावं, पुन्हा एकदा धूळ झटकली जाईल आणि इतिहास बाजीराव-मस्तानीप्रमाणे शाहू-विरूबाईची कहाणीही उच्च रवाने गाईल!

(लेखक नामवंत पत्रकार आहेत)

(रेखाचित्र : अतुल बेलोकर)

[email protected]

(मागच्या वर्षी ‘वसा’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख)
……………..

Previous articleएका न संपणाऱ्या प्रवासाची 75 वर्षे!
Next articleस्वप्ने त्यांना साद घालतात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.