सिंग विल बी किंग , ऑल्वेज !

-प्रवीण बर्दापूरकर

प्रसंग पहिला- १९९३च्या फेब्रुवारी महिन्यातला . स्थळ नागपूरच्या रवी भवनातील हॉल . केंद्रीय अर्थमंत्र्याची पत्रकार परिषद सुरु असतांना एका पत्रकारानं एका राष्ट्रीयीकृत बँकेचा उल्लेख करून या बँकेच्या सेंट्रल अव्हेन्यू शाखेत नेहेमीच जुन्या व फाटक्या नोटा मिळतात अशी तक्रार केली आणि नवीन करकरीत नोटा देण्याचे आदेश त्या बँकेच्या व्यवस्थापकाला द्यावेत अशी मागणी केली . पत्रकार परिषदेत सन्नाटा पसरला कारण ज्यांची अर्थशास्त्रज्ञ व तज्ज्ञ म्हणून जागतिक पातळीवर ओळख होती ते डॉ . मनमोहनसिंग समोर होते आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना कोणता प्रश्न विचारु नये याचं तारतम्य पूर्ण मातीत मिसळलेलं होतं .  डॉ . मनमोहनसिंग यांनी एक पॉझ घेतला , नंतरच्या काळात सर्व परिचित झालेलं त्यांचं हलकंसं स्मित दिलं आणि ‘वुईच बँक’ असं विचारलं . त्या पत्रकारांनं बँक आणि शाखेचं नाव सांगितलं . ‘आय वुईल लूक इन टू द मॅटर’, असं डॉ . मनमोहनसिंग सांगितलं आणि ‘नेक्स्ट क्वश्चन प्लीज’ असं आमंत्रण पत्रकारांना पुढील प्रश्न विचारण्यासाठी दिलं . हे सगळं अचानक घडलं तरी डॉ . मनमोहनसिंग यांच्या त्या शांतपणानं आम्ही स्तिमीतच झालो .

प्रसंग दुसरा –जगातील कांही प्रमुख देशांची शिखर संस्था असलेल्या जी-२० संघटनेची बैठक रशियातील सेंट पिटसबर्ग इथं २०१३मध्ये झाली . या आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांच्या चमूत एक पत्रकार म्हणून माझा समावेश झाला तो विजय दर्डा यांच्यामुळे ; त्यावेळी मी लोकमत वृत्तपत्र समुहात राजकीय संपादक म्हणून दिल्लीत कार्यरत होतो . बाय द वे , आता पत्रकारांना सोबत सहभागी करुन घेण्याची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केली आहे .

मायदेशी परतीच्या प्रवासात पंतप्रधानांनी उडणार्‍या विमानातच एक पत्रकार परिषद घेण्याचा रिवाज तेव्हा होता . ( ‘विमानात घेतलेल्या पत्रकार परिषदेत’ असा उल्लेख असलेल्या बातम्या अनेकांना आठवत असतील .) त्याप्रमाणे पत्रकार परिषदेसाठी रशियातून भारतात परततांना  पत्रकार बसलेल्या विमांनाच्या मध्यवर्ती भागात डॉ . मनमोहनसिंग आले . सर्व पत्रकारांनी अदबीनं उठून उभं राहून पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांना अभिवादन केलं . हात जोडून सस्मित पत्रकारांनी केलेल्या सामूहिक अभिवादनाचा स्वीकार केल्यावर , स्वत:च्या आसनाकडे जाण्याऐवजी पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांनी प्रत्येक पत्रकाराच्या आसनाजवळ जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन केलं . हे इतकं अनपेक्षित घडलं की उपस्थित २२/२३ पत्रकारांपैकी कुणालाही डॉ . मनमोहनसिंग यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचंही भान राहिलं नाही ; अर्थात याची चुटपुट नंतर सर्वांनाच लागली .

महापालिकेचा तर सोडाच , नगर पंचायत किंवा पंचायत समितीचा सदस्य झाल्यावर माज ओतप्रोत अंगात भिनलेले लोकप्रतिनिधी गल्लीबोळात एका किलोग्रॅमला हजार पाह्यला मिळत असल्याचे दिवस आलेले असतांना पंतप्रधानासारख्या देशाच्या सर्वोच्च्चपदी असणार्‍या शिवाय उच्चविद्याविभूषित असणार्‍या या माणसाचा हा सुसंस्कृतपणा आणि नम्रता ‘वाखाणणे’ या शब्दात मुळीच मावणारी नाही . चार दशकांच्या पत्रकारितेत कांही पंतप्रधान जवळून तर कांही लांबून पाहता आलं मात्र , असा अ-राजकारणी , सच्चा , साधा , नम्र आणि सुसंस्कृत पंतप्रधान केवळ डॉ . मनमोहनसिंग हेच एकमेव .

डॉ . मनमोहनसिंग यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत समाप्त होत असल्याची बातमी वाचल्यावर वर उल्लेख केलेले दोन प्रसंग आठवले . जितक्या अनपेक्षित तरीही शांतपणे ते या सभागृहात आले तितक्याच शांतपणे ते या सभागृहाचा निरोप घेत आहेत ; त्यांचा कार्यकाळ १५ जूनला संपला आहे ; त्यादिवशी सभागृहाचं कामकाज सुरु नसल्यानं सभागृहात अधिकृत निरोप समारंभ होऊ शकला नाही . खरं तर , विशेष अधिवेशन बोलावून डॉ . मनमोहनसिंग यांना निरोप देण्याचा उमदेपणा दाखवण्याची आणि डॉ . मनमोहनसिंग यांच्या अतुलनीय कर्तृत्वाला सलाम करण्याची संधी निर्माण केली जायला हवी होती . भारतीय संसदीय लोकशाहीच्या  उच्च परंपरेला ते साजेसं ठरलं असतं पण , हे कुणाला सांगणार आणि कळणार ? विद्यमान सत्ताधार्‍यात तेवढा उमदेपणा नाही , तेवढे सुसंस्कृत तर ते मुळीच नसल्याचं ते लक्षण आहे  आणि पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेस पक्षाकडे तेवढं शहाणपण उरलेलं नाही , असाच त्याचा अर्थ आहे . राज्यसभेच्या २८ वर्षांच्या सदस्यत्वाच्या या काळात डॉ . मनमोहनसिंग यांनी सलग दहा वर्ष पंतप्रधानपद भूषवलं तरीही त्यांचा स्वत:चा पक्ष किंवा सरकारात कोणताही दबाव गट नव्हता ; होता तो केवळ त्यांच्या विद्वतेचा आणि स्वच्छ प्रशासनाचा सात्विक दबदबा ! आता त्यांना पुन्हा संसदेच्या या सभागृहाचं सदस्यत्व मिळण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही ; पक्ष संघटनेतही फार कांही सक्रिय राहण्याचं त्यांचं वय नाही , त्यामुळे आता संसदीय आणि सक्रिय राजकारणातून डॉ . मनमोहनसिंग निवृत्त झाल्यातच जमा होणार असले तरी , या देशाला आर्थिक खाईतून वर काढणारे , देशात विविधांगी प्रगतीच्या वाटा निर्माण करणारे आधी अर्थमंत्री आणि नंतर सलग दहा वर्ष पंतप्रधान राहणारे दृष्टे नेते म्हणून त्यांचं नाव कायम स्मरणात राहणार आहे .

कोणत्याही वादळ-वार्‍याला न जुमानता एखाद्या विस्तीर्ण माळरानावर एकमेव हिरवा कंच , विस्तीर्ण , डेरेदार महावृक्ष अविचल उभा असावा , तसे भारतीय राजकारणात डॉ . मनमोहनसिंग किमान मला तरी कायम वाटत आले . डॉ . मनमोहनसिंग हे कांही कोणत्याच अंगानं राजकारणी नव्हते , ते होते एक अॅकेडमिशियन , अर्थतज्ज्ञ , अर्थशास्त्रज्ञ . तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना राजकारणात ओढलं आणि थेट देशाचं अर्थमंत्री केलं तर सोनिया गांधी यांच्यामुळे ते पंतप्रधान झाले . माणसांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन अनेकदा दृष्यमान नसलेल्या बाबींवरुन करायचं असतं . पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री म्हणून डॉ . मनमोहनसिंग देशात जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचं धोरण अंमलात आणलं ; त्यांचं सरकार पायउतार झाल्यावर केंद्रात नंतर आलेल्या देवेगौडा , इंदरकुमार गुजराल आणि अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखालील कोणत्याही सरकारांनी त्या धोरणात किंचितही बदल केला नाही , यावरुन त्या धोरणांची आणि ते आखणार्‍या माणसाच्या दूरदृष्टीची महती लक्षात घ्यायला हवी .

पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा देश एकाच वेळी अनेक अरिष्टांच्या खाईत सापडलेला होता . राजीव गांधी यांची नुकतीच हत्या झाल्यानं राजकीय आघाडीवर सैरभैरता होती ; मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर देशभर आगडोंब उसळवण्यात आलेला होता , त्यामुळे देशाच्या अनेक भागात हिंसक वातावरणही होतं ; त्यातच राम मंदिराच्या उभारणीच्या नावाखाली हिंस्र धर्मांधतेची लाट देशभर निर्माण केली जात होती ; देशाचं सोनं गहाण टाकलेलं होतं आणि आर्थिक वाढीचा दर चार टक्क्यांपेक्षा खाली गेलेला होता . नरसिंहराव यांनी देशाला या खाईतून वर काढलं कारण त्यांना समर्थ साथ मिळाली ती डॉ . मनमोहनसिंग यांची . ( नरसिंहराव यांना डॉ . मनमोहनसिंग गुरु मानतात हेही नोंदवून ठेवणं जसं गरजेचं आहे तसंच पक्षश्रेष्ठींकडून गुरुचा अक्षम्य अवमान झाला तरी त्यांच्या या शिष्यानं त्यासंदर्भात आव्ज न उठवता कायम नमतं घेतलं , याचीही नोंद घ्यायला हवीच .) पुढे पंतप्रधान झाल्यावर हीच धोरणे डॉ . मनमोहनसिंग यांनी शांत पण कणखरपणे राबवली . आज आपल्याकडे जी आर्थिक सुबत्ता आलेली आहे ; आधुनिक तंत्र आणि यंत्रज्ञान अभिमानानं मिरवणारा मूलभूत सोयी-सुविधांच्या वाटांवर चालणारा जो देश दिसतो आहे , ती त्या धोरणाला लागलेली मधुर फळं आहेत आणि त्याबद्दल डॉ . मनमोहनसिंग यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना भारतीयांनी कायम बाळगायला हवी .       डॉ . मनमोहनसिंग नावाच्या २८ वर्ष राज्यसभेचं सदस्यत्व भूषवलेल्या सदस्यानं त्या धोरणांची बीजं पेरली होती हे विसरता कामा नये . म्हणूनच डॉ . मनमोहनसिंग यांची राज्यसभेतून निवृत्ती ही एका माणसाची नाही तर एका सुबत्त कर्तृत्वाची आहे . कधीही वायफळ न बोलता , स्वकर्तृत्वाचा कोणताही गाजावजा न करता , टिमकीही न वाजवता ‘सिंग इज किंग’ हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि राजा लोकांच्या मनातून कधीच निवृत्त होत नसतो .

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ . मनमोहनसिंग नावाचा हा वृक्ष अनेक वादळ-वार्‍यांना तोंड देत अविचल होता . त्यांना त्यांच्या तोडीचे सहकारी फारच कमी लाभले ; त्यांचे बहुसंख्य सहकारी विचारानं खुरटे आणि ऊंचीनं खुजे होते ; या खुरट्या आणि खुज्यांनी डॉ . मनमोहनसिंग यांना पूर्ण क्षमतेनी काम करु दिलं नाही उलट सतत अडवणूकच कशी केली याचे असंख्य दाखले चर्चेत आहेत . विरोधकांकडून तर ‘मौनी बाबा’ , ‘कमजोर’ , ‘भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीचा सरदार’ अशी जहरी टीका डॉ . मनमोहनसिंग यांच्यावर झाली ; पक्षातूनही त्यांना कायम प्रखर विरोध झाला , सरकारात अनेक मंत्र्यांनी त्यांची अडवणूक केली ; त्यांच्याच पक्षातील भावी नेतृत्वाकडून जाहीरपणे अवहेलना वाट्याला आली तरी डॉ . मनमोहनसिंग नावाचा विशाल वृक्ष देशाला सुबत्तेची सावली देण्यासाठी अविचल राहिला . डॉ . मनमोहनसिंग नावाच्या या महावृक्षाची सुबत्त सावली या देशाला यापुढेही अशीच मिळत राहो याच शुभेच्छा !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleमनमोहनसिंग यांचेवर इतिहासाची मेहेरनजर !
Next article‘वेलकम होम’…प्रत्येक बाईने पाहायलाच हवा असा चित्रपट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.