स्त्रीसत्ताक राज्यपद्धतीच्या अस्तित्वाबाबत शंकाच!

संजय सोनवणी

जगाने आजवर असंख्य व्यवस्था पाहिलेल्या आहेत. एके काळी पृथ्वीतलावर, अगदी भारतातही स्त्रीसत्ताक पद्धती होती, असेही काही मते आहेत. कॉम्रेड शरद पाटील या सत्ताकतेची ऐतिहासिकतेबद्दल, प्रसंगी पुराकथांतून व शब्दांतून हवा तसा अन्वयार्थ काढत मांडणी करत आले होते. स्त्री सत्ताकता म्हणजे स्त्रियांचे राज्य. स्त्री महत्ता आणि शासन ते कुटुंबात वारसाहक्कासहित स्त्रियांचे अधिकार अंतिम. ग्रीक मिथककथांतही अशी स्त्रीराज्यांची उदाहरणे येतात. अमेझोन स्त्रियांचे असे एक राज्य होते असे पुराकथेवरुन दिसते. Troy युद्धातही स्त्रियांनी भाग घेतला होता, असे हिसियड म्हणतो. स्त्री सत्ताकतेकडून पुरुषसत्तेकडे मानवाने कृषी संस्कृतीच्या उदयानंतर लगोलग वाटचाल केली असेही दिसते. शरद पाटील ज्या काळाबद्दल बोलतात, म्हणजे मध्य वैदिक आणि उत्तर वैदिक, (यजुर्वेद काळ ते ब्राह्मणकाळ) हा काळ फार फार नंतरचा असल्याने आद्य वैदिक काळ (ऋग्वेदकाळ) हा मुळात भारतातील नसल्याने भारतीय संस्कृतीत ते संदर्भ अनाठायी आहेत. वैदिक काळ हा इस.पू .१५०० च्या पलीकडे जात नाही तर सिंधू संस्कृतीचा काळ हा इसपू ३१०० ते इसपू १७०० एवढा आहे. वैदिक ग्रंथांत गणमाता अथवा स्त्रीसत्ताकता शोधत भारतीय इतिहासाची मांडणी करणे निरर्थक होऊन जाते ते त्यामुळेच. मातृदेवतांची पूजा ऋग्वेदापेक्षाही प्राचीन आहे. ऋग्वेदकालात जगभरच पुरुष देवतांना महत्व यायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे वैदिक साहित्य हे जागतिक संस्कृतीच्या प्रवासात खूप उत्तरकाळात लिहिले गेले आहे हे स्पष्ट होते.

पण खरोखर ज्या अर्थाने स्त्रीसत्ता म्हटली जाते तशी ती अस्तित्वात होती काय, हा कळीचा प्रश्न आहे. स्त्रीसत्ता आणि मातृपुजक समाज यात फरक केला पाहिजे. मातृपूजा ही वैश्विक आहे .ती आजही वेगवेगळ्या समाजात केली जाते. जननी म्हणून निर्माती आणि म्हणून देवतासदृष अशा स्वरुपात योनीपूजेच्या रुपात  सर्वात आधी मातृपुजेला सुरुवात झाली,  हे वास्तव आहे. आद्य मानवी समाज मातृपुजक होते यात वाद नाही. पण ऐहिक सत्ता स्त्रियांचीच  हे काहींचे मत मात्र विवादास्पद आहे. कारण त्याला आधार नाही. ज्या ज्या संस्कृतीत मातृपूजेचे अवशेष सापडले आहेत त्यावरुन त्या समाजात स्त्रीसत्ताकता वा स्त्रीवर्चस्व होते असे म्हणता येणार नाही ,असे आता अनेक पुरातत्वविद म्हणतात. मातृपूजा होणे म्हणजे मात्रुसत्ताकता असणे असा अर्थ होत नाही. या दोन विभिन्न बाबी आहेत .ऐहिकता आणि गुढगर्भमय रहस्यात्मकतेपोटी होणारी पूजा यात फरक करावा लागतो. पूजा ज्याची केली जाते ती प्रतिकात्मक बनते, ऐहिक पातळीवर ज्याची प्रतीक म्हनून पूजा केली जाते त्या प्रतीकांच्या जिवंत अस्तित्वांना तेवढेच महत्वाचे स्थान दिले जातेच, असे नाही. टोळी जीवनात जोवर शिकार आणि अन्नसंकलन हाच उपजिविकेचा मोठा धंदा होता त्या काळात  स्त्रियाअडचणीचे काळ वगळता पुरुषांच्या बरोबरीने कामात सहभाग देत असे. स्त्रियांवरची सामुदायिक मालकी त्यात निहितच होती. टोळीयुद्धे होत त्यात पुरुष शक्यतो मारले जात तर स्त्रियांना गुलाम केले जात असे. गुलाम स्त्रियांपासून झालेली मुले ही टोळीचीच संपत्ती असल्याने त्यांना स्वातंत्र्य मिळत असले तरी स्त्रिया या टोळीवृद्धीसाठी गुलाम केल्या जात, व त्या भोगदासी व दुय्यमच असत, हे वास्तव लपत नाही.

स्त्रीसत्ता ही काही विद्वानांना आदर्श संकल्पना वाटली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. याचा अर्थ असा नव्हे कि स्त्रिया या कधी राज्ञीपदी विराजमान होत सत्ताधारी झाल्या नाहीत. ते अपवाद आहेतच व मात्र अपवादात्मक स्थितीतील. अशा स्थितीतही ज्याला स्त्रीसत्ता असे संबोधले जाते तशी व्यवस्था नसे, हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.

शेतीचा शोध माणसाला इस.पू. १२००० वर्षांपूर्वी लागला असे पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते. इराणमधील झार्गोस पर्वतराजीतील ठिकाण एवढे जुने आहे. प्रत्यक्षात याहीपूवी दोनेक हजार वर्ष शेतीचा शोध लागला असावा. शेतीने मानवी जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवला. पहिला बदल म्हणजे आजवर भूमीवरील व्यक्तिगत मालकीहक्काचा जो विषयच नव्हता तो आला. प्रत्येकाने आपल्याला सोयीची व उपजावू जमीन आपल्या मालकीखाली आणण्याचा प्रयत्न केला. यातूनच सामुदायिक मालकीहक्काची संकल्पना हटत व्यक्तिगत मालकीहक्काची संकल्पना आली. जमिनीवर हक्क…म्हणजे जमिनीत जो बीज पेरतो त्याचा हक्क.  स्त्रियांत बीज पेरणारा पुरुषच आहे, हे भान आल्याने शेतीवरील मालकी जशी  पुरुषांची तशीच स्त्री/स्त्रीयांवरील मालकीही त्यांचीच ही भावना पक्की होत गेल्याने क्रमश: स्त्रियांचे स्थान संकुचित होत गेले. यात वैवाहिक नीतिसंबंधांची संकल्पना तेव्हा नसल्याने स्त्रियांचे बहुविध संबंध जसे टोळी जीवनात होते तसेच चालूही राहिले. मात्र  त्यातून होणारी संतती मात्र ज्याची ती स्त्री आहे त्याचीच मानली जात असे. यातूनच बहुपतीकत्व ही संकल्पनाही समांतरपणे विकसित होत गेली. मुळात एकपत्नीत्व/एकपतीत्व कधी नव्हतेच त्यामुळे बहुपतीकत्वातही कसलाही अडसर नव्हता. फक्त अनेकांशी व कोणाशीही स्वैर संबंध ठेवण्यापेक्षा मर्यादित व भोगता येतील एवढ्याच स्त्री-पुरुषांपुरती ही संकल्पना रुढ होत गेली.

एकपतीत्व अथवा एकपत्नीत्व ही कल्पना क्रमश: मानवी समाजांना नैतिक/भावनिक अथवा धार्मिक भावनांनी नव्हे तर संपत्तीवरील वारसा भावनेने व्यापत गेली , हे येथे लक्षात घ्यायला हवे. शेतीमुळे माणूस स्थिर झाला. मानवी संस्कृतीला अवाढव्य आयाम लाभू लागले. ग्रामसंस्कृतीकडून उद्योग-व्यापार व अन्य कुशल उत्पादनांमुळे भरभराट आली. पण त्याच वेळीस समांतरपणे लोकसंख्येचा विस्फोटही होऊ लागला. सिंधू खो-यातीलच लोकसंख्या इसपु ७००० मध्ये  सुमारे पाच लाख होती ती इस.पू .२२०० पर्यंत जवळपास पन्नास लाख एवढी झाली.  टोळीजीवनात अपंग/निर्बलांना स्थानच नव्हते त्यामुळे ती अपत्ये सरळ मारली जात. शिवाय युद्धे सततची असल्याने त्यात लोक मरत ती वेगळीच. स्थिर संस्कृतीत मात्र ही संख्या फोफावत गेली. अपंग अथवा निर्बल वाटणारेही या संस्कृतीत कला-कौशल्यांच्याही विस्फोटामुळे उपयुक्तच ठरत होते. ओझे बनत नव्हते.

अशा परिस्थितीत एका व्यक्तीच्या सांपत्तिक अधिकारांचे वितरण त्याच्या मरणानंतर कसे हेही प्रश्न निर्माण होऊ लागले व यातूनच औरस व अनौरस अशी विभागणी सुरु झाली. औरस आणि अनौरस ठरवायचे म्हणजे पुन्हा नव्या व्यवस्थेची गरज होती. विधीवत विवाह ही त्यासाठी निर्माण झालेली व्यवस्था आहे . ऐहिक जीवनाची सोय धर्माद्वारे लावण्याचा व राजसत्तेलाही ती गरजेची वाटल्याने राजकीय मान्यतेचा महामार्ग यातून काढला गेला.

आधीच्या विभागणीत अनौरसांची (स्त्रीच्या बाजूने असो कि पुरुषाच्या) संख्याच अधिकची असल्यामुळे संपत्तीचे विभाजन औरसांना अधिक आणि अनौरसांना कमी अथवा वंचित ठेवण्याचे धोरण असणे स्वाभाविक होते. त्यामुळे स्त्रीच्या यारापासूनझालेले, स्वपुरुषापासून झालेले आणि पुरुषाला अन्य स्त्रियांपासून झालेले व त्या स्त्रियांना अन्य पुरुषांपासून झालेले अशा संततीला कोणते ऐहिक वारसा अधिकार द्यायचे हे जे प्रश्न व असे काही गोंधळ होते,  जे ते विवाहसंस्थेच्या नव्या राजस्विकृत नियमांनी शांत करण्याचा  प्रयत्न झाला.

याचाच अर्थ असा कि विवाहसंस्थेचा जन्म दैवी अथवा धार्मिक कारणात नसून व्यावहारिक कारणात आहे. कृषी व संबधित उत्पादन व व्यापार व्यवस्थेची ती अपरिहार्य गरज होती. भावनिकता वगैरे भाव त्याला माणसाने चिकटवले. यातून बहुपती व्यवस्थेचाही नायनाट झाला. बहुपत्नीकत्व मात्र पुरुषाने कायम ठेवले. ही त्याची नव्या व्यवस्थेतून आलेली मानसिकता होती.

हा प्रवास पाहिला तर लक्षात येईल की  बहुपतीकत्व (एकपुरुषत्व) अथवा एकपत्नीत्व (एकस्त्रीत्व) कधीच नैसर्गिक नव्हते तर ती मानवी समाजाची बदलत्या समाजव्यवस्थेतील अपरिहार्यता होती. तिचा अनिर्बंध वापर (व्यवस्थेतील गैरव्यवस्था म्हणून) पुरुषांनी केला तसाच स्त्रियांनी. पुरुषांनी विवाहबाह्य संबंध निर्माण केले कारण तसे संबंध निर्माण करायला तयार स्त्रियांची उपलब्धता होतीच. युद्धात जिंकून आलेल्या स्त्रिया रजवाडे-सरदार अथवा पराक्रमी सैनिकांना मिळत तर सामान्य पण श्रीमंत असलेल्यांना गणिका अथवा रक्षेच्या रुपाने, हा पर्याय उपलभ असे . खरे तर हे अन्याय्य होते कारण तशी सोय युद्धात जिंकलेल्या पुरुषांच्या बाबतीत नव्हती. पण त्यांचीही लैंगिक भूक भागवायची साधने होतीच .त्यामुळे स्त्री-पुरुष-व्यवहार हा तारतम्याने पहावा लागतो. यात पुरुषी सत्ता ही नेहमीच स्त्रियांच्या  बाबतीत आपमतलबी राहिली आहे हेही पाहता येते.

(संजय सोनवणी अभ्यासक व अनेक पुस्तकांचे लेखक आहेत)

9860991205

Previous articleविद्वत्तेविरुद्ध मोदी सरकारने पुकारलेले युद्ध
Next articleअस्तु-समाधानी आणि शांत जगण्याचा मंत्र
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here