– राजेश देशपांडे
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – या कॉमेडी शो ने सध्या अफाट लोकप्रियता मिळवली आहे . आज मराठीच नव्हेत तर अमराठी लोक पण हास्य जत्रा बघून धो धो हसताहेत. मनमोकळं हसलो तर इडीची धाड पडेल अशी भीती असलेल्या राजकीय नेत्यांना पण हास्यजत्रा हसवतेय . सोशल मीडियावरही या मालिकेने धुमाकूळ घातला आहे. भारतातील प्रमुख शहरासह अमेरिका , कॅनडा आदी देशातही मालिकेने झेंडे रोवले आहेत . समीर चौघुले , नम्रता संभेराव, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर , शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदुलकर, वनिता खरात, इषा डे,रसिका वेंगुर्लेकर , पृथ्वीक प्रताप , ओंकार भोजने आदी कलाकारांनी चित्रपट नट- नटयांना हेवा वाटेल अशी लोकप्रियता मिळवली आहे . या मालिकेतील प्रत्येक स्किट हे दहा -बारा मिनिटांचे असते . मात्र त्यासाठी सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चमू जबरदस्त मेहनत घेत असते .
There is no humour in Heaven म्हणजेच स्वर्गात विनोद नाही, असं म्हणतात. कारण, जिथे दुःख नाही तिथे विनोद कसा असणार? कारुण्यातून जन्माला येणारा विनोदच चिरकाल टिकतो. म्हणूनच चार्ली चॅपलिन आजही अमर आहे. Anybody can play the tragedy but comedy is very Serious business हे मात्र अगदी खरं आहे. माझ्या अनुभवातून सांगतो की, लोकांना हसवणे अत्यंत कठीण काम आहे; आणि आजच्या काळात तर अजून अवघड झालं आहे. त्याला अनेक कारणं आहेत. त्याबद्दल पुढे बोलूच.
आपल्या महाराष्ट्राला विनोदाची मोठी परंपरा आहे. ‘टवाळा आवडे विनोद’असे समर्थांनी म्हटले होते, त्याचा संदर्भ कदाचित वेगळा असावा. कारण, मूर्खांची लक्षणे त्यांनी विनोदी अंगांनीच लिहिली आहेत. ज्याला Satire म्हणजेच उपहासात्मक म्हणतात, तसंच आहे ते. एकनाथ महाराजांची भारुडं म्हणजे उत्तम हसवत हसवत डोळ्यात अंजन घालणारीच होती. आपली लोकनाट्यं ही तर विनोदाची खाणच. कोंकणी गजाली पण त्यातलाच प्रकार. पुढे अनेक महान लेखकांनी अवघ्या मराठीजनास हसत ठेवले. कधी कथांमधून, कधी लेखातून, कधी व्यक्तिचित्रणातून, तर कधी नाटक-सिनेमातून विनोदाची ही गंगोत्री अविरत वाहत आहे. आणि पुढेही वाहत राहील.
मराठी नाटकांनी तर विनोदाची पालखी आजवर यशस्वीपणे वाहिली आहे. त्यानंतर आला टेलिव्हिजन. सुरुवातीच्या काळात अनेक सुंदर विनोदी मालिका आल्या. स्किट्स म्हणजेच प्रहसन. लोकनाट्यातली बतावणी हा प्रहसनाचाच एक उत्स्फूर्त आविष्कार. विनोदाचे सगळे प्रकार यात सढळ हस्ते वापरले जातात. रसिकांना हसवणे हाच त्याचा मुख्य हेतू. टीव्हीवर तेव्हा दूरदर्शन ही एकच सरकारी वाहिनी होती. तिच्यावर प्रथम हा प्रकार आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू या जोडगोळीने आणला आणि गाजवला. त्यांचे निर्माते दिग्दर्शक होते याकुब सईद. त्यानंतर गजराच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी मराठी रसिकांना उत्तम विनोदाचा दरवळ दिला. त्याचे अध्वर्यू होते विनय आपटे.
नंतर खाजगी वाहिन्या आल्या आणि विनोदी मालिकांचा आणि कार्यक्रमांचा सुकाळ आला. सुदैवाने मला या वाहिन्यांवर दहाबारा मालिका करण्याची संधी मिळाली. त्यातल्या ‘कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक’ने अर्धे तप मराठी मनाला रिझवलं. ‘मालवणी डेज’आजही यू-ट्यूबवर पुन्हा पुन्हा बघितली जाते. अल्फा मराठी, म्हणजेच आत्ताचे झी मराठीवर माझ्याकडून ‘कोपरखळी’नावाची प्रहसन मालिका लिहिली गेली. झी मराठीवर केदार शिंदेची ‘घडलंय बिघडलंय’ यातूनही अनेक अभिनेते आणि नेत्यांची करियर्स घडली. पण, गाजलेली पहिली स्किटची सीरियल म्हणजे ई टीव्हीवरची ‘कॉमेडी एक्स्प्रेस’. ज्ञानेश भालेकर निर्माते दिग्दर्शक असलेली ही मालिका खऱ्या अर्थाने गाजवली, ती प्रशांत लोके आणि आशिष पाथरे या लेखक जोडीने. प्रशांत लोके हा विनोदाचा एक वेगळाच अतरंगी मेंदू घेऊन आलेला लेखक आहे. आशिष पाथरे माझ्या गंगूबाईपासून लिहायला लागला. अत्यंत अभ्यासू लेखक. या दोघांनी लिहिलेल्या स्किट्सची संख्या मोजली, तर एखाद्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल. यांच्यासोबत सचिन मोटे हा सध्या तमाम मराठी समाजाने डोक्यावर उचलून घेतलेल्या हास्य जत्रा या मालिकेचा मुख्य लेखक आणि एक निर्माता.
![](https://mediawatch.info/wp-content/uploads/2024/02/Mote-and-Goswami.jpg)