कलामांचं राष्ट्रपतीपद आणि थापाडे चंद्र्कांत पाटील !

-प्रवीण बर्दापूरकर  

कोल्हापूर शहराची ख्याती कलापूर म्हणून आहे . या शहरानं अनेक अभिजात गायक , प्रतिभावंत चित्रकार , अभिनेते देणारं . अखाड्याच्या लाल मातीत चितपट करणारे मल्ल देणारं म्हणून , अंबाबाईच्या देवळाचं गाव म्हणून या शहराची ख्याती आहे . ’कलानगरी’ अशी कोल्हापूरची महाराष्ट्राला ओळख आहे . कोल्हापूरच्या चपला अतिशय प्रसिद्ध आहेत पण , या कोल्हापूर शहराची ‘ही’ ओळख मिटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील करत नाहीत ना , अशी शंका येऊ लागली आहे . कारण असं की , देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले , अशी एक शुद्ध लोणकडी फोडणी दिलेली थाप या चंद्रकांत पाटलांनी मारलेली आहे . चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत मात्र , तिथं त्यांची पाळंमुळं घट्ट रुजलेली नाहीयेत . म्हणून त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायला पुण्याला यावं लागलं  पण , ते असो .

आपल्या देशात राजकारणाच्या क्षेत्रात थापा मारणाऱ्यांची संख्या कमी नाही . त्यात आता चंद्रकांत पाटलांची भर पडलेली आहे . काँग्रेसनं गेल्या ७० वर्षांत या देशासाठी काहीच केलं नाही , ही भारतीय जनता पक्षाची एक ‘राष्ट्रीय’ थाप आहे , तशीच एक थाप आता चंद्रकांत पाटलांनी मारलेली आहे की , थोर शास्त्रज्ञ डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम हे नरेंद्र मोदी यांच्यामुळे राष्ट्रपती झाले . उल्लेखनीय म्हणजे डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम राष्ट्रपति झाले तेव्हा नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात नव्हते तर गुजरात पुरते मर्यादित होते आणि राजकारणाच्या क्षितिजावर चंद्र्कांत पाटीलांचा तर उदयही झालेला नव्हता ! म्हणूनच  या थापेबद्दल महाराष्ट्रातले ‘थाप सम्राट’ असा सन्मान ( ! ) चंद्रकांत पाटील यांना द्यायला हरकत नाही . मुळात इतिहासाचा वेध घेऊन , वर्तमानाचं नीट अवलोकन करुन , भविष्याकडे नजर टाकत राजकारण करावं लागतं . तसं काही भाजपाचे हे प्रदेशाध्यक्ष करतायेत , असं दिसत नाही . ते जर असेच थापेबाजी  करत राहिले तर काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि चंद्रकांत पाटील हे दोन वाचाळवीर महाराष्ट्राला मिळालेले आहेत असं म्हणावं लागेल .

थोर शास्त्रज्ञ डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम हे या देशाचे राष्ट्रपती म्हणून सर्व संमतीनं निवडून आले , त्या मागची वस्तुस्थिती काय आहे , हे आपण लक्षात घेतलं पाहिजे . डॉ . ए .  पी . जे . अब्दुल कलाम याचं नाव राष्ट्रपती पदासाठी सर्वसंमतीचे उमेदवार पुढे येण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली तेव्हा देशाचं पंतप्रधानपद तेव्हाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए कडे होतं आणि एनडीएचं नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे होतं तर संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे युपीएचं अध्यक्षपद काँग्रेसच्या श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे होतं . आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की , कुठल्याही पक्षाच्या सरकारचा कोणताही निर्णय हा देशाच्या हिताचा , जनतेच्या हिताचा जितका असतो तितकाच त्याच्यामागे मतांचा अनुनय करण्याचा त्याचा एक हेतूही दडलेला असतो . जशी आपल्यात जात असते आणि त्याच्या सोबत एक पोटजात येते , तसं कुठल्याही पक्षाच्या सरकारच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये हे घडतं असतं  . भाजपाची प्रतिमा आणि वर्तनही कायमच मुस्लिमांच्या विरोधात राहिलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे . अर्थातच हे विधान सरसकट नाही . शंभर टक्के मुस्लिम भाजपच्या विरुद्ध नाहीत . काही मुस्लिम भाजपाचे निश्चितच समर्थक आहेत . परंतु ,  डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम याचं नाव समोर करत असताना आपला पक्ष हा मुस्लिमांच्या विरुद्ध नाही , हा एक गर्भित हेतू भाजपाच्या मनात असणं यात काही शंका नाही पण , त्याचा जाहीर उच्चार न करण्याचा जो मुत्सद्दीपणा अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी  दाखवला , तो चंद्र्कांत पाटील यांना मात्र दाखवता आलेला नाही .

आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , भाजपमुळे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींमुळे डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले हे जितकं खरं . तितकाच त्यात महत्त्वाचा वाटा काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचाही होता . इथे आणखीन एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी की , जेव्हा ही राष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा ए . पी . जे . अब्दुल कलाम यांच्या नावावर राजकीय राष्ट्रीय एकमत घडवून आणण्याचं ‘धनुष्य’ आपल्या महाराष्ट्राच्या एका राजकारण्यानं उचललं होतं . प्रमोद महाजन हे त्यांचं नाव . ए . पी . जे . अब्दुल कलाम यांच्या निवडीमध्ये महाराष्ट्राचे-मराठी असूनही प्रमोद महाजन यांनी बजावलेली भूमिका जर चंद्रकांत पाटील यांना जर ज्ञात नसेल तर , तो त्यांचा दोष नाही तर तो त्यांचे गुरु अमित शहा यांनी राजकारण करण्याची जी काही शिकवणूक त्यांना दिली त्या शिकवणुकीचा आहे , असं समजायला हवं . म्हणजे त्यांना शिकवणीच चूक मिळाली असा याचा अर्थ आहे . म्हणूनच प्रमोद महाजन यांना विसरण्याचा निगरगट्टपणा चंद्रकांत पाटील यांनी दाखवलेला आहे असंही खेदानी म्हणता येईल .

त्या काळामध्ये , एनडीए आणि युपीए यांच्यामध्ये डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम यांच्या नावाबद्दल एकमत झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांत याबद्दल मतैक्य आणण्यासाठी प्रमोद महाजन यांच्यासोबतच विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली होती मात्र , हे चंद्रकांत पाटलांना माहीत नसल्यामुळे किंवा त्यांना माहीत असून त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या गुरुच्या गुरुला म्हणजे महागुरुला खूष करण्यासाठी थापाच मारण्याच्या ठरवलेल्या असाव्यात . त्यामुळे ए . पी . जे . अब्दुल कलाम हे नरेंद्र मोदी यांच्यामुळे राष्ट्रपती झाले म्हणजे ते ( पक्षी : नरेंद्र मोदी ) मुस्लिमद्वेष्टे नाहीत , अशी थाप चंद्र्कांत पाटील यांनी  ठोकून दिली आहे .

अलीकडच्या काळात मताच्या अनुनयासाठी आपल्या देशाच्या राजकारणाचं फारच  सुमारीकरण झालंय . आश्वासन द्यायची मतं मिळवायची . सत्तेत यायचं आणि मग ते सगळं विसरुन जायचं , ही अलीकडच्या आपल्या देशाच्या तीन-चार दशकाच्या राजकारणाची व्यवछेदक व्याख्या झालेली आहे . मुंबईचं सिंगापूर करु , कोकणचा कॅलिफोर्निया करु , विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष् दूर करु , पश्चिम महाराष्ट्राकडे वळलेलं मराठवाड्याच्या वाट्याच्या हक्काचं पाणी पुन्हा मराठवाड्याकडे आणू , अशी अनेक आश्वासनं अलीकडच्या काळामध्ये राजकारण्यांनी सत्तेत येण्यासाठी या राज्याला दिली . दाऊदला पाकिस्तानातून ओढून आणू , एनरॉन समुद्रात बडवू अशा काही लोकप्रिय घोषणा त्या काळातल्या होत्या . त्यांच्या कडे एक राजकीय आश्वासन म्हणून बघितलं गेलं .

अशात मात्र , पूर्ण न होणाऱ्या आश्वासनासोबत थापा मारणे म्हणा की  पुड्या सोडण्याची एक खूप मोठी लाट आपल्या देशाच्या राजकारणात आलेली आहे आणि या पुड्या सोडण्यात/थापा मारण्यात भाजपचे लोक जास्त आघाडीवर आहेत . चंद्रकांत पाटील महाराष्ट्रामध्ये अशा पुड्या अनेकदा सोडत असतात . कोल्हापुरात अंबाबाई आहे . कोल्हापूरचा  आखाडा प्रसिद्ध आहे . कोल्हापूरची चित्रनगरी प्रसिद्ध आहे , ती सोडून हे चंद्रकांत पाटील कोल्हापूरची ‘थापाड्यांचं शहर’ अशी एक वेगळी प्रतिमा तयार करतायेत का काय ? असा धोका आता दिसू लागला आहे .

■■

जाता जाता आणखी एक- डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपती होण्याच्यावेळेची आणखी एक महत्वाची हकीकत आहे . तेव्हाच्या वृत्तपत्रात ती प्रकाशित झालेली आहे शिवाय अनेक ज्येष्ठ राजकारणी आणि बुजुर्ग पत्रकारांना नक्कीच माहिती आहे .  वेळेच्या मर्यादेमुळे यू ट्यूब चॅनलवर सांगता न आलेली ती हकीकत अशी- डॉ . कलाम  यांच्या आधी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी . सी. अलेक्झांडर यांचं नाव या पदासाठी जवळ-जवळ अंतिम झालेलं होतं . भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा त्या नावाला पाठिंबा होता . त्याबाबत अलेक्झांडर यांना कळवण्यात आलं होतं आणि त्यांची संमतीही मिळवण्यात आलेली होती . त्याप्रमाणे दिल्लीला राष्ट्रपती भवनात जाण्याची पूर्ण तयारी अलेक्झांडर यांनी केलेली होती . महाराष्ट्राच्या राजभवनातील कोणते अधिकारी आणि कर्मचारी सोबत न्यायचे , याची यादी तयार होती . तशी कल्पना त्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देण्यात आलेली होती . आपल्याला आता नवी दिल्लीला राष्ट्रपती भवनात जायचं आहे , यासाठी  त्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचीही तयारी झालेली होती .

मात्र अलेक्झांडर यांचं नाव मागे पडलं कारण तेलगू देसम  , अ.द्र.मु.क. आणि अन्य कांही पक्षांनी अलेक्झांडर यांच्या नावाला विरोध केला आणि राष्ट्रपतीपदाची निवड एकमतांनं होणार नाही हे स्पष्ट झालं . याच दरम्यान ( नक्की आठवत नाही पण , ) बहुदा तेलगू देसमकडूनच  डॉ . कलाम यांचं नाव सुचवलं गेलं . त्या नावाला मुलायमसिंह यांच्या समाजवादी  पक्षांनं पाठिंबा दिला . डॉ . कलाम यांचं नाव भाजपासाठी अतिशय ‘सोयी’चं होतं आणि ते अखेर अंतिम झालं . राष्ट्रपतीपदासाठी डॉ . कलाम यांचं नाव अंतिम झाल्यावर  तत्कालीन केंद्रीय  मंत्री प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजभवनातून येऊन अलेक्झांडर यांची भेट घेतली आणि राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बदलावा लागला म्हणून दिलगिरी व्यक्त केली होती .  या प्रसंगाचे कांही साक्षीदार असणारे अधिकारी/कर्मचारी अजूनही महाराष्ट्राच्या राजभवनात असतील , नक्कीच  आहेत .

डॉ . कलाम यांची राष्ट्रपतीपदी निवड होण्याच्या काळात काय घडलं याबद्दल चंद्र्कांत पाटील यांनी थापेबाजी कशी केलेली आहे , हे कळावं म्हणून ही हकीकत नमूद केली  .

असो !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

Previous articleसमीना पठाण आणि प्रशांत जाधव: विचारी, विज्ञाननिष्ठ जोडपं
Next articleआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.