गाडगेबाबांच्या कीर्तनातील ‘अँटी व्हायरस सॉफ्टवेअर’

संत गाडगेबाबांचा  आज स्मृतिदिन. दिवसा हातात झाडू घेवून गावं स्वच्छ करणारे गाडगेबाबा रात्री कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील कुप्रथा आणि अंधश्रद्धा याची झाडाझडती घ्यायचे . अतिशय प्रखर भाषेतील त्यांचे कीर्तन लोकांना खडबडून जागे करायचे . गाडगेबांबांचं कीर्तन काय ताकतीचं असायचं हे सांगणारा हा लेख –

……………………………………………………………..

-संतोष अरसोड

महाराष्ट्राच्या भूमीला संतांच्या सामाजिक क्रांतीचा स्पर्श झाला आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून पडीत असलेल्या मेंदूची मशागत आपल्या वैचारिक आंदोलनातून संतांनी केली आहे. अगदी नामदेव, ज्ञानेश्वर , तुकाराम यांचेपासून ते संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे .त्या त्या काळात या संतांनी लोकांच्या मानसिक गुलामगिरी विरुद्ध वैचारिक बंडाचा झेंडा उभारला.अभंग, कीर्तन यातून ही संत मंडळी लोकांची मानसिक धुलाई करीत होती. संत गाडगेबाबांनी लोक प्रबोधनासाठी कीर्तनाचा अत्यंत प्रभावी वापर केलेला आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृष्यता, अस्वच्छता यावर कीर्तनातून कोरडे ओढत एक स्वच्छ, निकोप असा समाज निर्माण व्हावा यासाठी धडपड केली. संत गाडगेबाबा यांचे कीर्तन म्हणजे मानसिक गुलामगिरी विरुद्ध उभारलेले आंदोलन होते.एखाद्या विद्यापीठाला इतक्या कमी कालावधीत जे शक्य होवू शकले नसते ते त्यांनी कीर्तन आणि कृतीतून शक्य करून दाखवले. त्यांचे कीर्तन म्हणजे “प्रबोधनाचा माईल स्टोन “आहे.
प्रबोधनातून सामाजिक परिवर्तन हे मुख्य सूत्र पुढे ठेवून संत गाडगेबाबांनी कीर्तनाची कास धरली.दापुरा या मामाच्या गावी गुरे राखत असताना त्या चिंचेच्या बनात आपल्या विविध जाती धर्मातील गुराखी मंडळीच्या साक्षीने महादेवाच्या देवळात या कीर्तनाचा त्यांनी वापर केला असावा. दोन दगडांचे टाळ करून याच महादेवाच्या मंदिरासमोर क्रांतीच्या सुरांना बाबांनी जन्म दिला. पुढे ऋणमोचनच्या यात्रेत १९०५ च्या कालावधीत घर सोडल्यानंतर त्यांनी कीर्तन हेच प्रबोधनाचे प्रमुख अस्त्र वापरले. भोळ्या भाबड्या जनतेच्या मेंदूवर असलेली विविध प्रकारची जळमटं त्यांनी झाडून टाकली.लोकांच्या भाषेतील हे कीर्तन लोकांना आपल्या ‘मुक्तीचे क्रांतिगीत’ वाटू लागले. देव धर्माच्या नावावर चालणाऱ्या शोषणा विरुद्ध अत्यंत कडाडून हल्ला केला तरी लोकांचा धर्मगंड दुखावला नाही. उलट यातच आपली मुक्ती आहे असे लोक समजू लागले. जेव्हा तुम्ही लोकांची भाषा बोलता तेव्हा लोक तुम्हाला स्विकारायला लागतात. गाडगेबाबांच्या कीर्तनाचे यश या लोकभाषेतील संवाद कौशल्यात दडलेले आहे. म्हणूनच आयुष्यभर ते कीर्तनातून समाज जागृती करू शकले. ऋणमोचन ते बांद्रा पोलीस स्टेशन व्हाया पंढरपूर हा जो संत गाडगेबाबा यांचा कीर्तन प्रवास आहे तो एका सामाजिक क्रांतीचा धगधगता अध्याय आहे. कीर्तनातून पेरलेल्या या बिजातूनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीला बळ मिळाले. एकाच वेळी एक जागतिक स्तरावरील बाबासाहेब नावाचा प्रकांडपंडीत आणि गाडगेबाबा नावाचे एक निरक्षर ‘लोक बॅरिस्टर ‘आपल्या वाणीने समाजमन स्वच्छ करीत होते. संत गाडगेबाबा हे प्रबोधनाच्या चळवळीला पडलेले आणि प्रत्यक्षात साकारलेले महाकाय स्वप्न होते. त्यांच्या सबंध सामाजिक आंदोलनात कीर्तनाचा महत्वाचा रोल राहिला आहे.
बाबांचे कीर्तन पांडित्यप्रधान नव्हते. हे कीर्तन पारंपरिक नव्हते. हे कीर्तन एका वेगळ्याच धाटणीचे होते. या कीर्तनाचा केंद्रबिंदू देव आणि धर्म नव्हता तर केवळ आणि केवळ सामान्य माणूस होता. गेली शेकडो वर्ष ज्या रुढी परंपरांनी माणसे करकचून आवळली गेली होती ते रुढी परंपरेचे दोरखंड कापून टाकून मुक्तीचे एक नवे आकाश बहाल करणारे हे कीर्तन होते.या किर्तनात प्रत्येकाच्या मेंदूला झिणझिण्या आणण्याची ताकद होती. एकेका शब्दात वैचारिक ज्वालामुखी दडला होता. म्हणूनच तर बाबांच्या एका शब्दावर लोकं स्वतः ला झोकून देत होते.हे कीर्तन लोकांना अर्थशास्त्र अन् समाजशास्त्र समजावून सांगत होते. तब्बल पन्नास वर्ष हे दगडी टाळांचे स्वर महाराष्ट्राच्या मनोभूमित गुंजत राहिले. आजच्या या महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनाची भूमिका महत्वाची ठरली आहे.संत नामदेवांना अभिप्रेत असलेला समाज, फुले, शाहू यांना अपेक्षित असलेला समाज घडविण्याचे मोलाचे कार्य बाबांच्या कीर्तनाने केले आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही.आज सर्वत्र अध्यात्माचा बाजार मांडलेला दिसतो आहे, बुलेट प्रुफ बुवा ,बापू , साध्वी,महाराजांचे ऑनलाईन स्तोम माजविले जात आहे.लोकांच्या मेंदूत गुलामगिरीचे व्हायरस पेरल्या जात आहे. अशा वेळी हे व्हायरस स्कॅन करण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी दिलेलं कीर्तनाचे ” अँटी व्हायरस सॉफ्टवेअर” खूप महत्वाचे वाटते.
संत गाडगेबाबा निरक्षर होते, त्यांनी विज्ञानाची पुस्तकंही वाचली नव्हती.मात्र त्यांच्या मेंदूत वैज्ञानिक दृष्टिकोन ठासून भरलेला होता. कुठल्याही अतार्किक बाबींना ते थारा देत नसायचे. प्रश्न विचारणे हा त्यांचा खास स्थायीभाव. प्रत्येक गोष्टीची ते प्रामुख्याने चिकित्सा करत असत ,म्हणूनच त्यांनी कीर्तनातून अनेक अतार्किक गोष्टींची चिरफाड केली.मरीमाय, मातामाय असो की सत्यनारायणाची पोथी असो त्यांनी कशाचीही भिडमुर्वत ठेवली नाही.बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये सत्यनारायणाच्या पोथीच्या निमित्ताने आयोजित कीर्तनात त्यांनी सत्यनारायणाच्या पोथी मागील वास्तव उघड करून दाखवले. ज्या ठिकाणी सत्यनारायणाची पोथीचा कार्यक्रम होता त्याच ठिकाणी सत्यनारायणावर कोरडे ओढणे याला प्रचंड मानसिक ताकद लागते. ती ताकद गाडगेबाबांच्या वाणी व कृतीमध्ये होती.देवळात देव नसतो , देवळात पुजाऱ्याचं पोट असते हा धार्मिक शोषण मुक्तीचा विचार त्यांनी आपल्या कीर्तनातून प्रभावीपणे मांडला आहे. ” *देव देव करता शिनले माझे मन , पाणी आणि पाषाण जेथे तेssथे* “ हा संत तुकोबारायांचा विचार त्यांनी कीर्तनातून पुढे नेला.
त्यांचं कीर्तन श्रोत्यांना खाडकन जागं करायचं.लहानपणी मामाच्या गावी आईने जात्यावर म्हटलेल्या ओव्या आणि भजनं बाबांना मुखोद्गत झाली होती. संत तुकाराम आणि महात्मा कबीर यांच्या विचारांचा प्रचंड पगडा गाडगेबाबांवर होता.कीर्तनातून अनेकदा ते संत तुकारामांचे अभंग आणि महात्मा कबीर यांच्या दोह्यांचा प्रभावीपणे वापर करीत.एकीकडे धर्मभोळा समाज, शोषणात अडकलेला समाज आणि त्यांच्यापुढे हा माणूस कीर्तनातून विज्ञानवाद मांडत होता. तुकोबा आणि कबीर तर कायम त्यांच्यासोबत कीर्तनात असायचे.
जत्रा मे फत्रा बिठाया तिरथ बनाया पानी
दुनिया भई दिवानी पैसे की धूलदानी

असे सांगत त्यांनी लोकांच्या मेंदूला झिणझिण्या आणल्या होत्या.” तिर्थाले जाणं अन् देवाचा संबंध नाही. पैशाचा नाश_ खाना खराब आहे .”अशी स्पष्ट वैज्ञानिक मांडणी ते आपल्या कीर्तनातून करत.” कर्ज काढून सण साजरे करू नका , यात्रेत जाऊ नका” असे सांगणारा हा प्रबोधनकार स्वातंत्र्यपूर्व काळातील मानसिक अंधारयात्रेत प्रबोधनाची प्रकाशफुलं वाटत होता.माणसामाणसांमध्ये जातीच्या नावाखाली चालणाऱ्या शिवाशिवी वर तर त्यांनी कठोर शब्दात प्रहार केलेत. स्त्री आणि पुरुष याच केवळ दोन जाती आहेत हे ठासून सांगितले. कीर्तनातून त्यांनी अस्पृश्यतेवर जोरदार हल्ले केलेत.” आपल्या हिंदुस्तान ले शिवाशिवीचा डाग आहे, तो डाग धूवून काढायचा प्रयत्न करा. एवढं सांगून ते थांबले नाहीत तर गावोगाव त्यांनी स्नेहभोजनाचे कार्यक्रम आयोजित करून अस्पृश्यता निर्मूलनास गती दिली. पंढरपूरच्या यात्रेतील अस्पृश्यांचे हाल पाहून त्यांनी चोखामेळा धर्मशाळा बांधली जी नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सुपूर्द केली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या कीर्तनातून त्यांनी अनेकदा जय जयकार केला आहे. बाबासाहेबांच्या सामाजिक समतेच्या लढाईस पूरक असे व्यापक जनमानस तयार करण्याचं काम गाडगे बाबांनी त्यांच्या कीर्तनातून केले आहे.म्हणूनच बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर हा महामानव निःशब्द आणि अस्वस्थ झाला होता. माणुसकीला पारखे झालेल्या,गावकुसाबाहेरील एका समूहावर मायेचे आभाळ पांघरणारा गाडगेबाबा नावाचा माणूस म्हणूनच खर्‍या अर्थाने ‘समतादूत ‘ ठरतो.
एरवी कीर्तन म्हटलं की अध्यात्माचा बाजार मांडला जातो. स्वर्ग नरकाचे कपोलकल्पित दाखले देऊन मानसिक गुलामीचे बीजारोपण केल्या जाते. बहुसंख्य लोकांना मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडांनी करकचून आवळून त्यांचे शोषण करणारी एक यंत्रणा या देशात काम करत आहे. या यंत्रणेच्या कपट किल्ल्यांना गाडगेबाबांच्या कीर्तनाने जबरदस्त हादरे दिले.” *नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी*!”हा संत नामदेवांचा विचार पुढे नेणारं गाडगे महाराजांचं कीर्तन असायचं.हा माणूस शाळेची पायरीही चढला नव्हता मात्र त्यांचे शिक्षण समाजाच्या विद्यापीठात झालेलं होतं. शिक्षण हा माणसाचा पहिला डोळा आहे हे त्यांनी ओळखले होते. आपल्या अवतीभोवतीची माणसं शिक्षणाच्या अभावामुळेच अशी गुलाम झाली आहेत आणि या गुलामीविरुद्ध बंड करण्यासाठी त्यांनी कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.” *विद्येविना मती गेली*” हे शोषणमुक्ती चे सूत्र मांडणारे महात्मा फुले खऱ्या अर्थाने गाडगेबाबांच्या मेंदूत सळसळत असायचे . महात्मा फुले यांनी दिलेला विद्येविना मती गेली हा विचार संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर पुढे नेला.” *ज्याले विद्या नाही त्याले खटार्‍याचा बैल म्हटलं तरी चालेल*” असा उपरोधिक टोला ते कीर्तनातून हाणायचे.शाळेत जा नाहीतर आयुष्यभर बूटपॉलिश करा लागेल असं सांगत ते कीर्तनातून विद्येचे महत्त्व पटवून द्यायचे.
” विद्या मोठं धन आहे,जेवणाचं ताट मोडा, बायकोले लुगडं कमी भावाचे द्या , मोडक्या घरात रहा पण मुलाले शिक्षण दिल्याविने सोडू नका.” हा जो विचार आहे तो एका नव्या लढाईचे संघर्ष गीत आहे.अक्षर ओळख नसलेला पण ज्ञानपिपासू असलेल्या या महामानवाने आयुष्यभर कीर्तनातून ज्ञानज्योती पेटविल्या.आज शैक्षणिक क्षेत्रात गाडगे महाराज मिशनने जे वैभव उभे केले आहे त्या वैभवात या देशातील वंचित विद्यार्थी उजळून निघत आहे.कर्मवीर भाऊराव पाटील , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक क्रांतीत संत गाडगेबाबांच्या कीर्तनाने आणि कृतीने मोलाची भर घातली आहे. कीर्तनातून पेटविलेली परिवर्तनाची ज्योत गाव-खेड्यात जावी म्हणूनच बाबांच्या मार्गदर्शनात संत मीराबाई शिरकर, संत गयाबाई मनमाडकर अशा सिद्धहस्त महिला कीर्तनकार निर्माण झाल्यात.
गाडगेबाबांचे कीर्तन म्हणजे मानवी कल्याणाचे विद्यापीठ होय. बाबांनी कीर्तनातून अर्थशास्त्र सहज सोप्या भाषेत उलगडून दाखवलं. जमाखर्च व्यवस्थित सांभाळा हा कळवळा त्यांच्या कीर्तनात होता. संसारात काटकसर करीत जा तरच तुमचा संसार सुखी होईल हे ते सांगत असत.मारवाडी ,गुजराती, ब्राह्मण , भाटे हे जमाखर्च सांभाळतात म्हणूनच तुपाचा शिरा खातात. मराठे, तेली ,माळी, न्हावी, धोबी यांना जमाखर्च समजत नाही.” *पौनसे रुपये उत्पन्न आणि एंशी रुपये खर्च, जानेवारीत मजा करा आणि फेपरवारीत बोंबलत बसा* ” अशा पद्धतीने अर्थशास्त्र ते कीर्तनातून उलगडत असायचे. पशुहत्या, अस्वच्छता ,अंधश्रद्धा ,अशिक्षितपणा, हुंडा निर्मूलन ,कृषी ,जलसंधारण, प्रबोधन यासह विविध विषय त्यांच्या कीर्तनाचे केंद्रबिंदू असायचे.या साऱ्या समस्यातून ग्रामीण आणि शहरी समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरले.आजच्या बुवा-बापु ,साध्वी यांना म्हणूनच गाडगे बाबांचे नाव उच्चारण्याचा नैतिक हक्क उरत नाही.
स्वातंत्र्यपूर्वकाळात गाडगेबाबांचे कीर्तन एक जनआंदोलनाचे रूप धारण करीत होते. गांधी आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक स्वातंत्र्यलढ्यास पूरक असं वातावरण , जनमानस गाडगेबाबांच्या कीर्तनातून तयार होत होते. ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी वांद्र्याचे राम आले का, दादर चे ईठोबा आले का? असा सवाल करीत त्यांनी गांधीजींचा कीर्तनातून जयजयकार केला आहे. हजारोंचा जनसमुदाय ” *महात्मा गांधी की जय*” एक सुरात म्हणत होता. ही ताकद होती बाबांच्या कीर्तनात. गाडगेबाबांचे कीर्तन म्हणजे एक जन आंदोलन होते. इथल्या कर्मठ परंपरांवर त्यांनी प्रचंड हल्ले केलेत. सूर्यप्रकाश अडवून धरणाऱ्या परंपरावादी ढगांना त्यांनी दूर सारले.समाजाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात मानसिक स्वातंत्र्याची बीज बाबांच्या कीर्तनातून पेरल्या गेली. जातीयतेची धर्मनिष्ठ व्यासपीठे त्यांनी पार उद्ध्वस्त करून टाकलीत. समाज जागृतीच्या या लढ्यात मग सारा महाराष्ट्र सहभागी झाला. आजचा जो निकोप ग्रामीण समाज आपण बघतो आहोत त्याला गाडगेबाबांचे प्रबोधन कारणीभूत आहे. दोन दगडी टाळांच्या कीर्तनाने समाजाचे टाळके जाग्यावर आणणाऱ्या गाडगेबाबांच्या कीर्तनाने मानसिक गुलामीत जगणाऱ्या माणसांना स्वातंत्र्याचे मुक्त आकाश बहाल केलंय. ते कीर्तन नव्हतचं तर ते एक जनआंदोलन होतं.                                                                                                                                                                                                                                                

(लेखक ‘मीडिया वॉच’ चे कार्यकारी संपादक आहेत)

  9623191923

हेही नक्की वाचा-गाडगेबाबा, आम्हाला माफ करा- http://bit.ly/2sMU5X0 

गाडगेबाबांचे अखेरचे कीर्तन ऐकायला विसरू नकाhttps://www.youtube.com/watch?v=9N-5v6eBizw   

Previous article‘मॅरेज स्टोरी’ : वेगळं होण्यातली प्रेम कहाणी…
Next articleगाडगेबाबांचे अखेरचे कीर्तन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.