गांधीजी आणि त्यांच्या साक्षात्काराचा क्षण

महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना ते वर्णाने काळे आहे म्हणून पीटरमारिट्झबर्ग  या रेल्वे स्थानकावर  अतिशय अपमानित करून  त्यांना रेल्वेतून फेकून देण्यात आले होते . हा एक क्षण गांधींच्या आत्मसाक्षात्काराचा क्षण होता . तेथूनच मोहनदास करमचंद गांधी या सर्वसामान्य माणसाचा महात्मा होण्याकडे प्रवास होण्यास सुरुवात झाली . 

 ……………………………….

प्रा . सुरेश द्वादशीवार

माणसाच्या निष्क्रिय बुद्धीला सक्रिय करणारा क्षण हाच त्याच्या साक्षात्काराचा असतो. तो माणसाला त्याच्या संभाव्य जाणिवांमधून प्रगट जाणिवेत नेणारा असतो. त्यातून त्याला आत्मबळ गवसते आणि आजवर ध्यानात न आलेल्या आत्मशक्तीचे अमर्यायदपण लक्षात येते, असे अॅरिस्टॉटलचे म्हणणे आहे. गांधीजींच्या आयुष्यात अशा साक्षात्काराचा क्षण ७ जून १८९३  या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारिट्झबर्ग या छोटय़ाशा रेल्वे स्टेशनवर आला. तेव्हा ते हिवाळ्याच्या थंडीत कुडकुडत होते. द. आफ्रिका हा देश विषुववृत्ताच्या खाली असल्याने इथले हवामान आपल्याहून वेगळे आणि विरोधी असते. 

गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ चा. वरील घटनेवेळी ते अवघे २४ वर्षाचे होते. वयाच्या १३ व्या वर्षी विवाह केलेल्या कस्तुरबांना आपल्या दोन मुलांसह देशात सोडून ते आफ्रिकेत आले होते. त्यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली होती. इंग्लंडमध्ये शिकत असताना ते तेथील अखिल इंग्लंड शाकाहार समितीचे महासचिव व त्या संघटनेच्या मुखपत्राचे संपादक राहिले होते. 

पोरबंदर या त्यांच्याच गावातून येऊन आफ्रिकेत समृद्धी मिळविलेल्या दादा अब्दुल्ला या धनाढय़ व्यापाऱ्याला कायदेशीर सल्ला द्यायला त्यांनी त्याच्याच जहाजातून अरबी समुद्र ओलांडला होता. 

तिथे पाय ठेवताच त्यांची पहिली ओळख आपल्या ‘काळ्या वर्णाशी’ झाली आणि ती त्यांना दरबानच्या न्यायालयानेच करून दिली. पहिल्या दिवशी कोर्टात हजर झाले ते अंगात सूट चढवून व डोक्यावर गुजराती पगडी घालून. न्यायाधीशांनी गांधींना त्यांची पगडी काढायला सांगितली. गांधींनी आपल्या स्वाभिमानी स्वभावानुसार त्याला नकार दिला व ते तसेच कोर्टाबाहेर पडले. त्यांच्या या वागणुकीने दादा अब्दुल्ला मात्र प्रसन्न झाले. गांधीजींच्या देशभक्तीविषयी व स्वाभिमानाविषयी त्यांच्या मनात आदर उत्पन्न झाला.

अब्दुल्ला केवळ धनवंतच नव्हते, ते कीर्तिवंत व सामाजिक क्षेत्रातले वजनदार इसम होते. शिवाय त्यांच्या मनात मायदेशाच्या संस्कृतीविषयीचे प्रेम होते. सोन्याच्या खाणी, जहाजे आणि प्रचंड जमिनी अशी त्यांची मोठी मालमत्ता होती. गांधीजींचे तरुण वय पाहून ‘हा मूलगा आपले कामनीट करू शकेल की नाही’, अशी शंका दादांच्या मनात आली. मात्र तीन दिवसांच्या सहवासातच गांधींनी त्यांच्या मनात आपल्याविषयीचा विश्वास उत्पन्न केला. नेमके तेव्हाच एका वकिलीच्या कामासाठी दादांनी गांधीजींना प्रिटोरियाला जायला सांगितले. त्यासाठी त्यांना रेल्वेचे पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले. शिवाय बेडिंगचेही तिकीटही त्यांच्या हाती सोपविले. पण हा जन्मजात साधा राहिलेला माणूस  बेडिंगचे पाच शिलिंग त्यांना परत करत म्हणाला, ‘‘माझ्याजवळ माझ्या घोंगडय़ा आहेत.’’

गांधीजी दरबानच्या स्टेशनवर पहिल्या वर्गाच्या डब्यात बसले. तो प्रवास साधा नव्हता. दरबान ते चाल्र्सटन रेल्वे, पुढे जोहान्सबर्गर्पयत 73 मैलल घोडागाडी आणि नंतर प्रिटोरियार्पयत पुन्हा रेल्वे असा तो तुटक व जिकिरीचा होता. त्यांची गाडी पीटरमारिट्झबर्ग या स्टेशनवर पोहोचली तेव्हा त्यांच्या डब्यात एक गौरवर्णीय इसम चढला. डब्यात कुणी काळा माणूस बसल्याचे पाहून त्याने रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांना बोलावले. सारेच काळे-सावळे आणि तपकिरी हे द.आफ्रिकेत कुली म्हणून ओळखले जायचे. मग ते ‘कुली डॉक्टर्स’ असोत, ‘कुली वकील’ असोत नाही, तर ‘कुली बॅरिस्टर्स’. त्या गोऱ्या इसमासोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी गांधींकडे तुच्छ नजर टाकून त्यांना आपले सामान घेऊन तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जायला सांगितले. 

‘‘पण माझ्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट आहे!’’ गांधीजी म्हणाले. 

‘‘असेल. पण त्याचा येथे उपयोग नाही.’’ असे म्हणून त्यांनी गांधीजींना अक्षरश: धरून व उचलून डब्याखाली ङ्खेकले. 

गाडी पुढे निघाली, तेव्हा गांधीजी प्लॅटफॉर्मवर तसेच एकटे होते. त्यांचे सामान त्या डब्यात पुढे गेले होते. त्यात असलेले ब्लँकेटही सोबत गेले होते. त्या रिकाम्या फलाटावर काही काळ थांबून थंडीने कुडकुडणारे गांधीजी प्रवाशांसाठी असलेल्या रिकाम्या हॉलमध्ये जाऊन बसले. रात्रीचे ९ वाजले होते. विषुववृत्ताच्या खाली असलेला तो प्रदेश थंडीच्या कडाक्याने गारठला होता. प्रिटोरियाकडे जायला दुसऱ्या दिवशी  रात्री येणा:या याच गाडीखेरीज दुसरी गाडी नव्हती. सामन नाही, सोबत नाही आणि पांघरायला काही नाही. गांधीजी तसेच कुडकुडत सारी रात्र त्या स्टेशनच्या आवारात बसून राहिले. दुसरा दिवस उजाडला. तेव्हा तिथे आलेल्या त्यांच्याच सारख्या ‘कुलींनी’ त्यांची समजूत काढत म्हटले, ‘‘येथे हे असेच चालते. खरे तर तुम्हाला पहिल्या वा दुसऱ्या  वर्गाचे तिकीट मिळायलाच नको होते.’’ रात्रीच्या अपमानाने गांधीजी जेवढे खचले नाहीत तेवढे या समजुतीच्या व अपमान पचविण्याची सवय झालेल्या स्वरांनी जास्तीचे घायाळ झाले. 

इथून परत जायचे काय, त्यांच्या मनात विचार आला. पण तो भ्याडपणा ठरला असता, असेही लगेच त्यांना वाटले. देहाने दुबळ दिसणाऱ्या या माणसात साहसाचा वास होता, धाडसाचे सामर्थ्य  होते आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊन तोंड देण्याची जिद्द होती. ते तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी रात्री आलेल्या गाडीतील गार्डने त्यांना त्यांचे पूर्वीचे तिकीट रद्द झाल्याचे सांगितले. त्यावर ‘‘ते कोणत्या कायद्याने?’’ असे गांधींनी विचारताच तो गप्प झाला व त्याने गांधींना पहिल्या वर्गात जागा दिली. नंतरच्या स्टेशनवर त्यात आणखी गोरे लोक आले, तेव्हा त्या गार्डने पुन्हा तिथे येऊन गांधींना तिसऱ्या वर्गात जायला सांगितले. मात्र डब्यात भरपूर जागा होती आणि ते गोरेही सहिष्णु होते. त्यांनीच मग गार्डला गांधीजींना डब्यात बसू देण्याची विनंती केली. असा प्रवास करीत ते सकाळी जोहान्सबर्गला आले. आता पुढचा प्रवास घोडय़ांच्या बंद गाडय़ांमधून होता. 

मोकळी हवा मिळावी, म्हणून गांधी गाडीवानासोबतच्या जागेवर जाऊन बसले. पण ती जागा त्या कोचच्या मालकाची होती. त्याने येऊन गांधींना तिथून ढकलण्याचा प्रयत्न  केला. पण मग सिगार ओढायचे लक्षात येऊन त्यानेच कोचातली जागा घेतली. काही अंतर चालून गेल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आणि त्याने गांधींना गाडीवानासमोरच्या खालच्या जागेवर बसायला सांगितले. त्याला गांधींनी नकार देताच त्यांच्या बखोटीला धरून त्याने गांधींना कोचाबाहेर फेकले. या वेळी अंगातले सारे बळ एकवटून गांधींनी कोचाचे रेलिंग आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरले आणि काही काळ त्याला लोंबकळत त्यांनी तसाच फरफटत प्रवास केला. पुढे कोचातील इतर प्रवाशांनी त्यांची ती अवस्था लक्षात घेऊन कोच थांबवला व गांधीजींना आत घेतले. जोहान्सबर्गपासूनचा ७३ मैलांचा प्रवासही गांधींना वर्णद्वेषाचा असा दुसरा धडा शिकविणारा ठरला. गांधीजींनी कोचात जागा घेतली आणि गाडीवानाने तो चालू केला. पण साऱ्या प्रवासात त्या गोऱ्यांची गांधींना शिवीगाळ व धमकावणी सुरू होती. रात्र पडेर्पयत त्यांचा कोच स्टँडर्टनला पोहोचला. तिथे दादा अब्दुल्लांच्या सहकाऱ्यांनी त्यांची व्यवस्था एका खासगी जागेत केली. मात्र त्याच वेळी त्यांना प्रिटोरियार्पयतचा प्रवास तिसऱ्या वर्गाने करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

सकाळी गांधीजींनी रेल्वे स्टेशनच्या प्रमुखांना पत्र लिहून आपल्याला पहिल्या वर्गात जागा देण्याची विनंती केली. प्रत्यक्ष भेटीत स्टेशनमास्तरांनी त्यांना ते तिकीट दिले. मात्र ‘‘वाटेत गार्ड तुम्हाला तिसऱ्या वर्गात जायला सांगू शकेल. त्या वेळी मला काहीएक करता येणार नाही’’ असेही वर बजावले. प्रत्यक्षात गाडीत भेटलेल्या गार्डने त्यांना  तिसऱ्या वर्गात जायला सांगितले व त्यासाठी हुज्जतही घातली. मात्र त्याच डब्यात असलेल्या एकमेव गोऱ्या प्रवाशाने गांधींची बाजू घेऊन त्या गार्डची समजूत घातली. त्यावर ‘‘तुम्हाला कुलीसोबतच बसायचे असेल तर बसा-’’ असे म्हणून तो संतापाने डबा सोडून गेला. पुढला जोहान्सबर्गर्पयतचा त्यांचा प्रवास मात्र शांततेत पण मनातल्या अस्वस्थतेसह पार पडला. जोहान्सबर्गच्या स्टेशनवर त्यांना घ्यायला कुणी आले नव्हते. वेळ रात्रीची होती. स्टेशनवरील टॅक्सीवाल्याला गांधींनी नॅशनल हॉटेलवर पोहोचवायला सांगितले. टॅक्सीवाल्याने त्यांना हॉटेलात पोहचविले. मात्र हॉटेलच्या चालकाने ‘जागा नसल्याचे सांगून’ त्यांना ठेवून घ्यायला नकार दिला. पुढे त्याच टॅक्सीने ते कमकशिन यांच्या हॉटेलात गेले. तिथे दादा अब्दुल्लांचा माणूस त्यांची वाट पाहत होता. 

‘‘तुम्हाला ग्रॅन्ड नॅशनल हॉटेलमध्ये जागा मिळेल असे वाटलेच कसे?’’ असे त्याने गांधींना विचारले. 

‘‘का नाही?’’ या गांधींच्या प्रश्नाला ‘‘ते तुम्हाला लवकरच कळेल’’ असे काहीसे तुटक उत्तर त्याने दिले.  ‘‘इथला पहिला आणि दुसरा वर्ग गोऱ्यांसाठीसाठी राखीव आहे’’ तो गांधींना म्हणाला. त्या वर्गाने रेल्वेकडे याविषयी आणखीही अनेक मागण्या केल्या असल्याचेही त्याने सांगितले. तरीही गांधींनी प्रिटोरियासाठी पहिल्या वर्गाचे तिकीट मागितले. शिवाय स्टेशनमास्तरांना या अन्यायाबाबतचे एक पत्रही त्यांनी लिहिले.

स्टेशनमास्तरांनी त्यांना पहिला वर्ग दिला खरा, पण ‘‘पुढील स्टेशनवरचा गार्ड तुम्हाला त्यात बसू देईल की नाही, ते जरा पाहा’’ असेही त्यांना बजावले. झालेही तसेच. तेथील गार्डने त्यांना पुन्हा तिसऱ्या वर्गात जायला सांगितले. या वेळी झालेल्या तणातणीत डब्यातील इतर  गोऱ्यांनीही गांधीजींची बाजू घेतली व प्रकरण मिटले. प्रिटोरियार्पयतचा गांधींचा प्रवास सुखरूप पण भयग्रस्त अवस्थेतच झाला. प्रिटोरियाच्या कृष्णवर्णीय हॉटेलमालकानेही त्यांना त्यांचे जेवण  गोऱ्यांच्या मेसमध्ये न घेता आपल्या खोलीतच घ्यावे लागेल, असे बजावले. पण पुढे तेथील  गोऱ्यांनीच या ‘कुली बॅरिस्टरला’ आपल्यासोबत जेवणाची परवानगी दिली. हा सारा अपमान मुकाटय़ाने गिळत गांधीजी खटल्याचे काम संपेर्पयत प्रिटोरियात राहिले व कामआटोपून ते दरबानला परतले. पुढली तीन वर्षे तिथे राहून त्यांनी त्या साऱ्या क्षेत्रात  वकील म्हणून आपले नाव कायम केले. शिवाय तेथील जनतेचा व विशेषत: गौरेतर जनतेच्या मनातील स्वत:विषयीचा आदरही त्यांनी वाढविला. मात्र त्यांचे खरे आणि याहून मोठे काम पुढेच होते.

गांधीजी १८९६ च्या मध्याला भारतात परतले. त्यांची बोट कलकत्त्याला लागली आणि त्याच दिवशी ते अलाहाबादमार्गे मुंबईला रवाना झाले. अलाहाबादेत गाडी चांगली पाऊण तास थांबत असल्याने त्यांनी तेथील त्रिवेणी संगमाचे दर्शन घ्यायचे ठरविले. मात्र दर्शनाहून परततानाच त्यांना त्यांची गाडी स्टेशन सोडताना दिसली. तिथल्या सावध स्टेशनमास्तरांनी त्यांचे सामान मात्र अगोदरच उतरवून घेतले होते. आपला वेळ वाया न घालविण्याच्या वृत्तीने गांधींनी तडक एक हॉटेल गाठले आणि तिथून ते तेव्हाच्या ‘पायोनियर’ या प्रसिद्ध नियतकालिकाच्या कार्यालयात गेले. तिथे संपादक डॉ.चेस्नी ज्यु. यांना भेटून त्यांच्या कानावर त्यांनी आफ्रिकेतील भारतीयांची सगळी दुरवस्था घातली. संपादकांनी त्यांचे म्हणणो ऐकून घेऊन त्यांना आपल्या नियतकालिकात लिहिण्याचे आमंत्रण दिले. गांधीजींनी ती कैफियत राजकोटला येऊन लिहायला घेतली, तेव्हा तिचे ९० पानी पुस्तक झाले. ते ‘ब्ल्यू बुक’ (निळी पुस्तिका) म्हणून लगेच लोकप्रियही झाले. पुस्तिकेच्या दहा हजार प्रती हातोहात खपल्या. तिच्या जास्तीच्या प्रती गांधीजींनी लहान मुलांकरवी राजकोट व अन्यत्र वाटण्याचीही व्यवस्था केली. (सत्याग्रहात मुलांना सहभागी करून घेण्याचा धडा मला येथेच मिळाला, असे गांधींनी आपल्या आत्मकचरित्रात लिहिलेही आहे.)

‘ब्लू बुक’ या पुस्तिकेचे सार देश व विदेशातून अनेक वृत्तपत्रांनी  प्रकाशित केले. त्याचा वृत्तांत दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच तेथील  गोऱ्यांनी त्याची होळी केली आणि गांधींना देशात पुन्हा पाय न ठेवू देण्याच्या प्रतिज्ञा केल्या. मात्र कोणत्याही विरोधाला न जुमानणारे गांधी पुन्हा आफ्रिकेकडे निघाले. या वेळी कस्तुरबा व त्यांची दोन मुलेही त्यांच्यासोबत होती. गोऱ्या दंगेखोरांनी त्यांची बोट किनाऱ्यावर रोखली आणि गांधींना देशात पाऊल ठेवू न देण्याचा निर्धार घोषित केला. परिणामी, ती बोट किनाऱ्यापासून दूर २१ दिवसांर्पयत समुद्रातच नांगरून उभी राहिली. पुढे गांधी त्यांच्या कुटुंबीयांसोबत किनाऱ्यावर आले, तेव्हाही ते सारे रक्तबंबाळ होईर्पयत गोऱ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी दिलेले संरक्षण गांधींनी नाकारले. पोलीस ठाण्यात काही दिवस राहण्याचा सल्लाही त्यांनी झुगारला. प्रत्यक्ष इंग्लंडचे परराष्ट्र सचिव चेम्बरलेन यांनी दिलेला न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी फेटाळला.. ज्या लोकांसोबत राहायचे त्यांचशी वैर नको, असे त्या साऱ्यांवर त्यांचे म्हणणेहोते.. हळूहळू विरोध मावळला आणि गांधींची वकिली पुन्हा मार्गाला लागली. 

मात्र यापुढचा त्यांचा काळ कोर्टात खटले लढवण्याहून सामाजिक व राजकीय न्यायासाठी लढण्यातच अधिक गेला. सगळ्या अश्वेतांना वास्तव्याचे परमिट घ्यावे लागे. त्यासाठी दर पाच वर्षानी त्यांना पाच पौंडांचा कर भरावा लागे. त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या नसत. कुली, वेटर्स, फळविक्रेते किंवा घरगडी अशी हलकी कामे त्यांना करावी लागत. त्यांना मालमत्ता घेता येत नसे. फुटपाथ वापरता येत नसत. पहिल्या वा दुसऱ्या वर्गाची तिकिटे मिळत नसत. सार्वजनिक वाहनात त्यांना अखेरच्या जागा असत.. ‘आपण सारे एकाच ब्रिटिश साम्राज्याचे नागरिक असताना हा भेदभाव का?’ असा प्रश्न यावर गांधी विचारत- प्रथम लेखी,मग पत्रातून, पुढे व्याख्यानातून आणि अखेर लोकांना सोबत घेऊन केलेल्या सत्याग्रहातून.

मग त्यासाठी तुरुंगवास, सक्तमजुरीची कैद आणि अमानुष मारहाण. पुढे सरकारने सगळ्या अश्वेतांची लग्ने एका कायद्यान्वये बेकायदेशीर ठरविली आणि ती कायदेशीर करून देण्यासाठी करासह सरकारी कागदपत्रे सादर करण्याचा आदेश काढला. त्याविरुद्ध केलेल्या सत्याग्रहात गांधींसोबत कस्तुरबाही तुरुंगात गेल्या. त्यांनीही सक्तमजुरी भोगली. सोबतचे अश्वेत सहकारीही मारहाण सहन करीत व तुरुंगात जात. गांधींनी १९०६ नंतरचा फार  मोठा काळ असा घालविला. 

मात्र हा तुरुंगवास भोगत असतानाच गांधींचे नाव साऱ्याजगात झाले. हा माणूस स्वत:साठी वा आपल्या जाती-धर्मासाठी लढत नसून मूल्यांसाठी प्राण पणाला लावतो, या सत्याने ही किमया केली. टॉलस्टॉय, रोमा रोलाँ आणि तेवढेच जागतिक कीर्तीचे लेखक, कवी, कलावंत व राजकीय नेते याच काळात त्यांचे पत्रमित्र झाले. त्यामुळे त्यांच्याकडे फार दुर्लक्ष करणे तेथील सरकारलाही नंतर जमले नाही. द.आफ्रिकेकेचे गव्हर्नर जनरल स्मट्स हे आरंभी गांधींचा राग करीत; पण गांधीजींचे अहिंसात्मक व सविनय आंदोलन, त्यांची तुरुंगातली सहनशीलता आणि त्यांच्या स्वभावातील मार्दव व शत्रुपक्षाशीही स्नेह जुळविण्याची वृत्ती यांनी तेही भारावले. काही काळानंतर ते गांधीजींचे प्रशंसकही बनले. तथापि, गांधी आपले शत्रू आहेत, हे विसरणे मात्र त्यांना कधी जमले नाही.

याच दरम्यान त्यांनी टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना केली. या आश्रमात श्वेत, अश्वेत, सर्व धर्माचेचे व जाती-पंथांचे लोक एकत्र राहत, एकत्र जेवत व एकाच तऱ्हेचे जीवन जगत. गांधींची सहजीवनाची व मानवी समतेची चळवळ या त्यांच्या आश्रमीय आयुष्यातूनच सुरू झाली.

याच काळात इंग्लंडचे द.आफ्रिकेच्या क्षेत्रात बोअरांशी युद्ध सुरू होते (१८९२ ते १९०२). बोअर हे डच वंशाचे लोक फार पूर्वी या क्षेत्रात आले आणि त्यांनी त्यातला बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. पुढच्या काळात इंग्रजांच्या साम्राज्यशाही आक्रमणानंतर त्यांच्यात प्रथम ताणतणाव व मग युद्धे झाली. त्यांचे पहिले युद्ध १८८० मध्ये, तर दुसरे १८९२ मध्ये झाले. या युद्धात गांधीजींनी ‘ साम्राज्याचे नागरिक’ या नात्याने भाग घेऊन त्यासाठी सुमारे ११०० लोकांचे सेवापथक उभे केले. युद्धभूमीवर जखमी झालेल्या ब्रिटिश सैनिकांना इस्पितळार्पयत किंवा रेल्वेस्टेशनर्पयत स्ट्रेचरवरून पोहोचविण्याची जबाबदारी या पथकाने घेतली. अनेक सैनिकांना त्यांनी २० ते २५ मैलांर्पयत असे वाहून नेले. एका प्रसंगात एकटय़ा गांधींनी एका घायाळ ब्रिटिश सैनिकाला ४० मैलांर्पयत खांद्यावर उचलून नेल्याची नोंद या पथकाच्या इतिहासात आहे. त्यासाठी ब्रिटिश राजसत्तेने त्यांना एक लष्करी सन्मानही प्रदान केला. पुढे जालियनवाला बागेच्या हत्याकांडानंतर गांधींनी तो व त्यांना मिळालेले इतर सारेच शासकीय पुरस्कार सरकारला परत केले. 

याही काळात गांधींचा स्वातंत्र्य व समतेचा लढा आणि त्यांचे सहकुटुंब तुरुंगात जाणे सुरूच होते. मात्र पुढल्या काळात त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात जरा चांगली वागणूक मिळू लागली. तुरुंगात असतानाच गांधीजींनी कातडे कमावण्याचे व चपला शिवण्याचे तंत्र शिकून घेतले. त्यांच्या अखेरच्या तुरुंगवासात त्यांनी गव्हर्नर जनरल स्मट्स यांच्यासाठी चपलांचा असा जोड बनविला. त्यांच्या सुटकेनंतर त्यांना भेटायला स्मट्सने सरळ तुरुंगातूनच त्यांना आपल्या कार्यालयात बोलविले. त्या वेळी गांधींनी त्यांना तो चपलांचा जोड भेट म्हणून दिला. त्या भेटीने ओशाळलेल्या गव्हर्नर जनरलने गांधीजींचे आभार मानले. पुढे ‘येथून घरी कसे जाणार?’ असे त्याने विचारले, तेव्हा ‘पायीच’ असे उत्तर गांधींनी दिले. 

‘‘का, एखादे वाहन का करीत नाही?’’ स्मट्सने विचारले, तेव्हा ‘‘मजजवळ तेवढे पैसे नाहीत’’ असे उत्तर गांधींनी दिले. तेव्हा जास्तीचेच ओशाळलेल्या स्मट्सने स्वत:च्या खिशातून काही रक्कम काढून ती गांधीजींच्या हाती सोपविली. 

..यानंतर गांधीजींनी लगेचच आफ्रिका सोडली व मायदेश गाठला. मात्र १८९३ मध्ये तिथे गेलेले मोहनदास आता महात्मा झाले होते. जाताना त्यांची दखलही न घेतलेला देश आता त्यांची वाट पाहत एकोप्याने उभा होता.. येणारे गांधी आत्मसामर्थ्याचा अनुभव सोबत आणणारे तर होतेच, शिवाय साम्राज्यशाहीशी प्रत्यक्ष दोन हात न करता तिचे हात आपल्याच हातात कसे घ्यायचे याचेही ज्ञान सोबत आणणारे होते. त्याचमुळे १९९५ या जानेवारीमध्ये भारतात आलेल्या गांधींनी अवघ्या पाच वर्षात, १९२० मध्ये देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाची सारी सूत्रेच आपल्या हाती घेतली.

पीटरमारिट्झबर्गच्या साक्षात्कारानंतर

‘‘तुमचे आयुष्य ढवळून काढणारा सर्वात छळवादी आणि ज्ञानदायी क्षण कोणता?’’ या एका अमेरिकन मिशनऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गांधीजी म्हणाले, ‘‘तो क्षण दरबान ते प्रिटोरिया या प्रवासात पीटरमारिट्झबर्ग येथे आलेल्या अनुभवाचा होता.’’

(लेखक नामवंत साहित्यिक व वक्ते आहेत )

Previous articleलेखनातील जात आणि शब्दांचे अर्थ
Next articleमहात्मा गांधी जगातील सर्वात मोठ्या लोकलढ्याचे नेते
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.