गांधी विरोधकांचा पंथ निर्माण करताना

साभार: साप्ताहिक साधना

-रामचंद्र गुहा

आजच्या काळातील उन्मादित हिंदू तरुणांना या व्यक्तिमत्त्वांच्या आपापसातील गुंतागुंतीच्या संबंधाविषयी माहिती नसते, अथवा त्यांना याची कदर देखील नसते. त्यांना या खुलाशाने काहीच फरक पडत नाही की, वैचारिक दृष्ट्या सावरकर हे बोस यांच्या खूप उजवीकडे होते आणि भगतसिंग यांच्या तुलनेत तर सावरकर अतिशय उजवे होते. ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नसते. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते. हिंदूमधील कट्टर उजव्या शक्तींना बोस आणि भगतसिंग यांच्याविषयी आता सुटलेले प्रेमाचे उमाळे हे काही त्यांच्या कार्याची महती उशिरा सुचल्यामुळे आलेले शहाणपण मुळीच नाही. तर हे प्रेम महात्मा गांधींविषयी त्यांना असलेल्या आत्यंतिक द्वेषातून आलेले आहे.
……………………………………………………………

दिल्ली विद्यापीठात मी शिक्षण घेतले आहे, तेथे मागील महिन्यात एक वाद उफाळून आला. वादाचे कारण होते तेथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) त्यांना आदर्श असलेल्या हिंदुत्वाचे प्रणेते विनायक दामोदर सावरकर यांचा अर्ध-पुतळा, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांच्या अर्धपुतळ्यांच्या समवेत स्थापन करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी ज्यांना इतिहासाचे आकलन होते त्यांनी हे दर्शवण्याचा प्रयत्न केला की, सावरकरांच्या समवेत ज्या दोन देशभक्तांचा पुतळा अभाविपने स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, ती दोनही व्यक्तिमत्त्वे वैचारिक दृष्ट्या सावरकरांच्या अगदी विरुद्ध होती. बोस हे डाव्या विचारसरणीचे काँग्रेसी व्यक्तिमत्त्व होते, तर भगतसिंग क्रांतिकारी मार्क्सवादीविचारसरणीचे होते. त्यामुळेच टीका करणाऱ्यांनी या वेळी असा प्रश्न केला की, मग कोणत्या आधारावर या दोघांना सांप्रदायिक विचारसरणी असलेल्या सावरकरांच्या समवेत स्थापित करण्यात येत आहे?

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित त्यांना वैचारिक चर्चेपेक्षा घोषणाबाजी करण्यातच जास्त रस होता. परंतु उजव्या शक्तींकडून डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न फक्त दिल्ली विद्यापीठात झाला असे नाही. मागील काही वर्षांपासून असे प्रकार सर्वत्र घडताना आपण पाहत आहोत. स्वतः पंतप्रधानदेखील फक्त बंगालमधेच नव्हे, तर इतर ठिकाणीसुद्धा सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा सतत उल्लेख करत असतात. त्यांनी आपल्या नेहमीच्या-बडेजाव मिरवण्याच्या पद्धतीने मोठा गाजावाजा करत भारतीय पुराभिलेखागारातील सुभाषचंद्र बोस यांच्यावरील कागदपत्रांचा मोठा संग्रह खुला केला. अर्थात ही गोष्ट वेगळी की, खुल्या केलेल्या या संग्रहामधून कोणतीच नवीन बाब समोर आलेली नाही.

पंतप्रधानांप्रमाणेच इतर भाजप नेतेही ब्रिटिशांच्या विरोधातील स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिल्याबद्दल भगतसिंग यांची प्रशंसा करत असतात. कदाचित याची कारणमीमांसा अशी केली जाऊ शकते की, अभाविपने वि.दा. सावरकरांना आपलेसे करणे यातदेखील ऐतिहासिक दृष्ट्या विसंगती आहे. कारण 1930 च्या दशकात सावरकर हिंदू महासभेशी संलग्न होते. त्यावेळी हिंदू महासभा स्वतःला संघापेक्षा वरचढ मानत असे. परंतु या दोन संघटनांच्या स्पर्धेपलीकडे पाहिल्यास, अभाविपच्या कृतीमध्ये वैचारिक दृष्ट्या बरीच समसमानता आहे. कारण भारत हा मुख्यत्वे हिंदूंचे आणि फक्त हिंदूंनीच चालवावे असे राष्ट्र आहे, या सिद्धांताचे सावरकर एक अतिशय प्रभावशाली पुरस्कर्ते होते. तर दुसरीकडे भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस दोघेही हिंदू बहुसंख्यांकवादाचे अतिशय कट्टर विरोधक होते.

भगतसिंग एक मार्क्सवादी विचारक होते, ज्यांचा यावर विश्वास होता की मानवाची प्रमुख ओळख त्याच्या समाजातील वर्गीय संरचनेमधील स्थानावरून निश्चित होते. हिंदू-मुस्लिम अथवा सवर्ण-दलित या अस्मितांपेक्षा भगतसिंगांना कामगार आणि शेतकरी अधिक जवळचे होते. त्यांची संघटना ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी (एच.एस.आर.ए)’ मध्ये हिंदू, मुस्लिम, पारसी, शीख अशा सर्वच धर्मांतील कार्यकर्ते होते. सुभाषचंद्र बोस यांनी तर आपली उभी हयात अतिशय एकनिष्ठतेने धार्मिक सलोख्याचा पुरस्कार करण्यात व्यतीत केली. काँग्रेसचे अध्यक्ष व आझाद हिंद सेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी अशा स्वतंत्र भारतासाठी लढा दिला ज्यामध्ये हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये कसलाही भेदभाव केला जाणार नव्हता. बोस व भगतसिंग यांच्यामधील आणि हिंदुत्ववाद्यांच्यामधील वैचारिक अंतराचा विचार करता, या दोन स्वातंत्र्यसेनानींना हिंदुत्ववादी लोक आपलेसे कसे करू शकतात?

एक कारण तर असे आहे की, दुर्दैवाने या दोनही देशभक्तांची त्यांच्या वैचारिक सहकाऱ्यांनी उपेक्षा केली आहे. आपल्या राजनैतिक आयुष्याचा बहुतेक भाग बोस हे खंदे काँग्रेस कार्यकर्ते होते; त्यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेनादेखील (त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास) स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहाचाच एक ‘फॉरवर्ड ब्लॉक’ होता. परंतु इंदिरा गांधींच्या काँग्रेसनेच इतर अनेक महान काँग्रेसजनांची जशी उपेक्षा केली, तसेच त्यांनी बोस यांनादेखील दुर्लक्षित करून नाकारले. अगदी याचप्रकारे मार्क्सवादी असलेल्या भगतसिंग यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप), पक्षीय प्रतीकांमध्ये स्थान नाही. कारण भगतसिंग यांची एचएसआरए ही संघटना मूळच्या अविभाजित भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न नव्हती. माकप एकीकडे लेनिन आणि स्टॅलिन यांना वरचे स्थान देईल, मात्र भारताच्या एका अस्सल मार्क्सवाद्याला मात्र दुर्लक्षित करेल. या दोन देशभक्तांना नाकारण्याच्या डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या या अतिशय लाजिरवाण्या कृतीमुळे अभाविपला सोयीस्करपणे या सेक्युलर व समाजवादी विचारांच्या व्यक्तिमत्त्वांना आपलेसे करून त्यांच्याप्रती खोटा आदर करणे सोपे झाले आहे. या दोन व्यक्ती आज असत्या तर त्यांनी हिंदुत्वाचा आणि त्यांच्या कृतींचा धिक्कारच केला असता.

परंतु आणखीन दोन कारणे आहेत, ज्यामुळे अभाविपने बोस आणि भगतसिंग यांच्यासमवेत सावरकरांना स्थापित करण्याचा निर्णय घेतला असणार! पहिले कारण म्हणजे, या तिघांचेही यावर एकमत होते की, वसाहतिक पारतंत्र्यातून भारताला मुक्त करण्यासाठी अहिंसेपेक्षा हिंसेचा मार्ग स्वीकारणे अधिक श्रेयस्कर ठरेल. दुसरे कारण म्हणजे, आपल्या कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या तिघांचेही गांधीसोबत मतभेद झाले होते. हे सर्वश्रुत आहे की, सावरकर हे गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे वैचारिक गुरू होते. तसे पाहता सावरकरांच्या गांधीद्वेष करण्याला एक वैयक्तिक किनारदेखील होती. कस्तुरबा गांधी यांचा तुरुंगात मृत्यू झाल्यावर त्यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या फंडाला आर्थिक मदत न करण्याचा सल्ला सावरकरांनी आपल्या अनुयायांना दिला होता. याच्या उलट भगतसिंग यांचा गांधींना असलेला विरोध सांप्रदायिक कारणांमुळे नसून, मार्क्सवादी विचारधारेच्या म्हणजेच वैचारिक मतभेदांमधून आलेला होता.

बोस यांचे महात्मा गांधी यांच्यासमवेतचे संबंध हे तर अधिक गुंतागुंतीचे होते. काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतरदेखील ते गांधींचा आदरच करत होते. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेनंतर सार्वजनिकपणे गांधींना पहिल्यांदा ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरवणारे देखील सुभाषचंद्र बोसच होते. आजच्या काळातील उन्मादित हिंदू तरुणांना या व्यक्तिमत्त्वांच्या आपापसातील गुंतागुंतीच्या संबंधाविषयी माहिती नसते, अथवा त्यांना याची कदरदेखील नसते. त्यांना या खुलाशाने काहीच फरक पडत नाही की, वैचारिक दृष्ट्या सावरकर हे बोस यांच्या खूप उजवीकडे होते आणि भगतसिंग यांच्या तुलनेत तर सावरकर अतिशय उजवे होते. ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधीविरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नसते. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते.

आजच्या क्रोधीत हिंदू नवयुवकांना वसाहतिक पारतंत्र्याविरोधात वापरण्यात आलेले अहिंसेचे अस्त्र म्हणजे अतिशय सौम्य, कमजोर आणि स्त्री-सुलभ प्रतिक्रिया वाटते. ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाला आपल्या प्रजासत्ताक राष्ट्रात हिंदूंप्रमाणेच समान हक्क असायला हवेत याची कल्पनादेखील त्यांना सहन होत नाही. धार्मिक सलोख्यासाठी गांधींसारखी एक व्यक्ती आपले बलिदान देण्यास तयार होते, ही बाब त्यांच्यासाठी ‘वास्तवापासून गांधी किती दूर होते’ याचे परिमाण असते, त्यामुळेच त्यांचा वारसा पूर्णता नाकारण्याची मानसिकता या तरुणाईमध्ये तयार होते. हिंदूमधील कट्टर उजव्या शक्तींना बोस आणि भगतसिंग यांच्याविषयी आता सुटलेले प्रेमाचे उमाळे हे काही त्यांच्या कार्याची महती उशिरा सुचल्यामुळे आलेले शहाणपण नाही. तर हे प्रेम महात्मा गांधींविषयी त्यांच्या मनात असलेल्या आत्यंतिक द्वेषातून आलेले आहे. राष्ट्रपित्याची नाचक्की करण्यासाठी त्यांना जर शक्य झाले तर ते कुणाचाही, कशाचाही (आणि अगदी स्थळ-काळ याचे भान न ठेवता) वापर करू शकतात आणि करतात देखील!

(लेखक नामवंत विचारवंत व अभ्यासक आहेत)

( अनुवाद: साजिद इनामदार )

Previous articleप्रेमाने विरोध केल्यास बदलाची शक्यता वाढते
Next articleराईज अँड फॉल ऑफ अजित पवार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.