मनसेचे इंजिन मोठ्या अपघाताकडे

-विजय चोरमारे

राज ठाकरे यांच्या राजकारणावर लिहून वेळ वाया घालवू नये, अशा मतापर्यंत येऊन पोहोचलो आहे. राज ठाकरे चित्रकलेचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना कंटेम्पररी ही संकल्पना माहीत असावी. चित्रकलेतच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात समकालीनत्व महत्त्वाचे असते. तरीसुद्धा राजकारणात ते समकालीन राहण्याचा का प्रयत्न करत नाहीत, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. त्यांचे यासंदर्भातील आकलन मर्यादित आहे, आजच्या काळाची गुंतागुंत त्यांच्या कळण्यापलीकडची आहे, ती त्यांना समजून घ्यायची नाही की ते सुमार सल्लागारांच्यावर अवलंबून राहिल्यामुळे या गफलती होताहेत? नेमके कशामुळे असे घडते आहे? कालसुसंगत राजकारण करण्याऐवजी दिवसेंदिवस राजकीयदृष्ट्या अदखलपात्र होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. पण या वाटचालीत आपली अँग्री यंग मॅनची इमेज जपण्याची त्यांची धडपड मात्र लपून राहात नाही. काळ बदलला आहे आणि आशयसंपन्न सिनेमाची चलती असताना आपण आऊटडेटेड मारधाड सिनेमा काढतोय हेही त्यांना कळत नसेल तर कठीण आहे.

एखाद्या नेत्याचे राजकीय अंदाज चुकू शकतात. युती-आघाडीची गणिते बिघडू शकतात. एखाद्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी किंवा अगदी नगण्य यश मिळू शकते. किंवा सगळी परिस्थिती पोषक असतानाही एखाद्या घटना-प्रसंगामुळे फासे उलटे पडू शकतात. काहीही होऊ शकते. यशापयशाचे मूल्यमापन करून पुढे वाटचाल करायची असते. परंतु राज ठाकरे असे काही करताना दिसत नाहीत. एखाद्या नटाने भूमिकेचे मर्म समजून घेण्याऐवजी नुसता पेहराव किंवा मेकअपच्या क्लृप्ती करणे म्हणजे अभिनय नव्हे. त्याचप्रमाणे निवडणूक चिन्हाची दिशा बदलणे किंवा झेंडा बदलणे म्हणजे पक्षाने कात टाकणे नव्हे. वृत्तवाहिन्यांना चोवीस तास चालवण्यासाठी काहीतरी हवे असते, मग ते इंजिनाची दिशा बदलली, झेंड्याचा रंग बदलला यांसारख्या क्षुल्लक बातम्या मोठ्याने वाजवत असतात. त्यावरून लोकप्रियतेचा भ्रम करून घेण्यात काही अर्थ नसतो. लोकसभा निवडणुकीत ७८ वर्षांच्या शरद पवारांनी ७८ सभा घेतल्या. मनसेचे उमेदवार उभे नसताना राज ठाकरे यांनीही काही सभा घेतल्या हे मान्य. पण प्रचार संपल्यानंतर दोन दिवस दिल्लीला राजकीय बैठका करून परतल्यावर शरद पवार थेट सातारा जिल्ह्यात दुष्काळी शेतक-यांच्या बांधावर गेले होते. त्यामुळेच अनेक सहकारी सोडून गेल्यानंतरही शरद पवारांनी आपल्या एकट्याच्या ताकदीवर पक्षाचे ५५ आमदार निवडून आणले. राज ठाकरे लोकसभेच्या व्हिडिओ सभा करून गायब झाले ते विधानसभेच्या तोंडावर उगवले आणि बातमी आली ती मनसे निवडणूक लढवणार किंवा नाही, अशा संभ्रमात असल्याची. ऐन लढाईच्यावेळी एवढ्या संभ्रमावस्थेतला पक्ष कसा काय लढू शकणार? आणि लढला तरी यश कसा मिळवणार ? तर मुद्दा आहे एकूण राज ठाकरे यांच्या राजकीय प्रकृतीचा. त्यात सुधारणा झाल्याशिवाय मनसेचे इंजिन रुळावर येणार नाही. परंतु राज ठाकरे यांची ताजी भूमिका पाहता त्यांचे दिशा बदललेले इंजिन मोठ्या अपघाताकडे निघाले आहे, तेही अशा अपघाताकडे की त्यात राज ठाकरे स्वतः कृष्णकुंजवर सुरक्षित राहतील परंतु त्यांच्या पक्षाच्या शेपाचशे तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

मुंबईत २३ जानेवारीला अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मोर्चाला उत्तर मोर्चाने असे म्हणून नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)च्या बाजूने आपण असल्याचे अप्रत्यक्षरित्या जाहीर केले होते. त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन दिवसांनी जाहीर केले की, आमचा मोर्चा बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात आहे. सीएए किंवा एनआरसीच्या समर्थनार्थ नाही. परंतु प्रत्यक्षात मोर्चासमोर बोलताना मात्र राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या विरोधात भूमिका घेतली. नुसती विरोधात भूमिका घेतली नाही, तर त्यांना उद्देशून ते म्हणाले, ज्यांनी हे मोर्चे काढले ना देशभरामध्ये, त्यांना आज सांगून ठेवतो. आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले. नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ.

जे लोक गेले साठ दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करताहेत. तिरंगा ध्वज आणि भारतीय संविधान हातात घेऊन आंदोलन करताहेत. ज्यांच्या आंदोलनापाशी जाऊन हिंदुत्ववाद्यांनी गोळीबार केले, गुंजा कपूर या भाजपच्या कार्यकर्तीने बुरखा घालून देशविरोधी घोषणा दिल्या (गांधीजींचा खून करणा-या नथुराम गोडसेनेही दिशाभूल करण्याचा असाच प्रयत्न केला होता.) आणि आंदोलन देशविरोधी असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा आंदोलकांनी शांततेलाच प्राधान्य दिले. त्यांना राज ठाकरे दगड आणि तलवारींची धमकी देत आहेत, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. खरेतर अल्पसंख्य समाजाला सुरक्षित वाटायला हवे अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी बहुसंख्यांकांची असते. अल्पसंख्यांकांमध्ये सुरक्षिततेची भावना असल्याशिवाय बहुसंख्यांकही सुरक्षित राहू शकत नाहीत. दुर्दैवाने हिंदुराष्ट्राची संकल्पना मांडणारे अल्पसंख्यांकांसंदर्भात उपकाराची भाषा बोलतात, त्यांना नागरिक म्हणून दुय्यम लेखतात तशाच प्रकारची भूमिका राज ठाकरे घेताना दिसत आहेत. परिस्थितीचे नीट आकलन करून घ्यायचेच नाही, असे ठरवल्यावर यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. एखाद्या शहाण्या नेत्याने आंदोलन करणा-या बायांची वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. एनडीटीव्हीसारख्या गंभीर प्रकृतीच्या वाहिनीने तिथल्या महिलांना बोलते केले त्यातून त्यांच्या ज्या भावना व्यक्त झाल्या, त्या ऐकल्या असत्या तरी वस्तुस्थितीचे आकलन सोपे झाले असते. शाहीन बागमधली एक महिला एनडीटीव्हीच्या रिपोर्टरला सांगत होती, बाबरी मशीद पाडली त्याचे आम्हाला काही वाटले नाही, वाटत नाही. ज्या जागेवर आम्ही नमाज पढतो ती आमच्यासाठी मशीद असते आणि कुराण हातात असते ते आमच्यासाठी पवित्र स्थळ असते. परंतु आता आम्हाला आमच्या मातृभूमीपासून तोडण्याचे षड्.यंत्र रचले जातेय, अशावेळी आम्ही आमच्या घरात स्वस्थ बसून राहू शकत नाही. रस्त्यावर उतरून संविधानाच्या साक्षीने सत्याग्रह करण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय नाही.

आणि राज ठाकरे सांगतात, बाबरी मशीद पाडल्याचा आणि राम मंदिराच्या बाजूने निकाल दिल्याचा राग या आंदोलनांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. शाहीन बागसह ठिकठिकाणी ठिय्या मारून बसलेले लोक हे बांगला देशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना संरक्षण कवच म्हणून बसलेले नाहीत. त्यांची वेदना समजून घेण्यासाठी पहिल्यांदा राजकारणापलीकडे जाऊन संवेदनशील व्हावे लागेल. घुसखोरांना संरक्षण द्यावे, असे कुणाचेच म्हणणे नाही. सीएए आणि एनआरसी यासंदर्भातली क्रोनॉलॉजी समजून घेतली तर केंद्रसरकारचा कुटिल हेतू समोर येतो. ते समजूनच घ्यायचे नसले तर मग बाहेरच्या देशातल्या बिगरमुस्लिमांच्या नावाने गळे काढून आपल्या देशात पिढ्यान् पिढ्या राहणा-या मुस्लिमांना संशयाच्या पिंज-यात उभे करण्याशिवाय काहीच घडणार नाही.

राज ठाकरे यांची एकूण भूमिका पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीची चिंता वाटायला लागते. गेली काही वर्षे महाराष्ट्र शांत आहे आणि सीएए, एनआरसीच्या विरोधात आंदोलने सुरू असतानाही कुठे काही अनुचित प्रकार घडलेला नाही. सरकारने आमचे ऐकले नाही तर आम्ही तलवारी हाती घेऊ असे मनसेच्या मोर्चाला येणारे काही कार्यकर्ते सकाळीच टीव्हीच्या कॅमे-यासमोर सांगत होते. राज ठाकरे तोवर मोर्चासाठी घरातून निघाले नव्हते. कदाचित त्यांनी घरातच टीव्हीवर आपल्या कार्यकर्त्याचा जोश पाहिला, ऐकला असावा. त्यापासून प्रेरणा घेऊन कदाचित दगडाला उत्तर दगडाने आणि तलवारीला उत्तर तलवारीने देण्याची भाषा केली असावी. आपण कायद्याच्या राज्यात राहतो आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत आहे, याची त्यांना कल्पना असावी. कालपर्यंत उद्धव ठाकरे १९९३ च्या दंगलीत शिवसैनिकांनी हिंदूंचे रक्षण केल्याचे दाखले देत होते, आज थेट उल्लेख न करता राज ठाकरे त्याच घटनांचा निर्देश करीत आहेत. दंगल घडली तर आता हिंदुत्व सौम्य झालेली शिवसेना रक्षणासाठी येणार नाही, तर कट्टर हिंदुत्ववादाचा अंगिकार केलेली मनसेच तुमच्यासोबत असेल, असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

हिंदुत्वाच्या संकल्पनेची व्यापकता समजून न घेता केवळ मुस्लिमविरोधी संकुचित राजकारण करण्याची भूमिकाच राज ठाकरे यांनी घेतली आहे. बाबासाहेब पुरंदरे आणि संभाजी भिडे यांनी केवळ मुस्लिमविरोधी शिवाजी महाराज उभे करून इतिहासाच्या माध्यमातून विद्वेषाची बीजे पेरण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी सुसंगत अशीच ही भूमिका आहे. खरेतर शिवसेनेनेही आता पुरंदरेंनी मांडणी केलेल्या शिवाजी महाराजांपासून फारकत घेऊन प्रबोधनकार ठाकरे, गोविंदराव पानसरे यांनी सांगितलेल्या शिवाजी महाराजांचा स्वीकार केला पाहिजे. सर्वसमावेशक राजकारणासाठी त्याची आवश्यकता आहे.
शिवसेनेची स्पेस काबीज करण्याचा, मुंबई महापालिकेत भाजपच्या साथीने शिवसेनेला सत्ताच्युत करण्याचा प्रयत्न म्हणून मनसेच्या आताच्या प्रयत्नांकडे पाहिले जाते. त्यांच्या या राजकीय उद्देशांबद्दल काही आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्यांच्या भूमिकेचे परिणाम केवळ राजकीय स्वरुपाचे असते तर त्याची चर्चा करण्याचेही कारण नव्हते. परंतु ते त्याहीपलीकडे भीषण आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये सीएए, एनआरसीच्या निमित्ताने काहीतरी मोठे घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे देशपातळीवरील नेते प्रयत्नशील आहेत. दिल्लीची निवडणूक पार पडली असली तरी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी त्यांना इंधन हवे आहे. त्यांच्या दुर्दैवाने लोक शहाणे झाले आहेत आणि लोकांना शांतता, सलोखा हवा आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून तसे काही घडवण्याचा प्रयत्न करीत आहे की काय, अशी शंका आल्यावाचून राहात नाही. राज ठाकरे यांचे इंजिन मोठ्या अपघाताच्या दिशेन निघाले आहे, असे वर म्हटले आहे, ते त्यामुळेच. तसे असेल तर ते मोठा घातक खेळ करीत आहेत असे म्हणावे लागेल. राज ठाकरे यांच्या राजकारणावर लिहून वेळ वाया घालवू नये, असे वाटत असतानाही त्यांचा घातक खेळ समजून घेण्यासाठी लिहिणे अपरिहार्य ठरते.

राज ठाकरे यांच्या इशा-याच्या निमित्ताने माझ्यासारख्याला साधा प्रश्न पडतो, उद्या खरोखर जर अशा तलवारी बाहेर काढायची वेळ आली तर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे तलवार घेऊन सर्वात पुढे राहणार की बाहेरची तलवारबाजी घरात बसून लाइव्ह पाहणार?

(लेखक महाराष्ट्र टाइम्स चे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

+91 95949 99456

Previous articleएकाकीपणावर मात…
Next articleदिल्लीत विकास जिंकला , धर्मांधता हरली !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.