सम्यक क्रांतीचे धगधगते चांदणे

 -संदीप सारंग

स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या समाजजीवनात अनेक विचारवंत उदयाला आले. त्यापैकी अत्यंत आगळेवेगळे आणि लोभसवाणे व्यक्तिमत्त्व लाभलेले डॉ. आ. ह. साळुंखे यांचा आज वाढदिवस. आज ते  वयाच्या ७८ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. डॉ. साळुंखे यांचे विचारकार्य इतके उत्तुंग आहे की त्यांना “विचारवंतांचे विचारवंत” म्हटले तरी ती अतिशयोेक्ती होणार नाही. त्यांचे विचार जसे उच्च-उदात्त मानवी मूल्यांचा उद्घोष करणारे आहेत तसे नैतिक समाजधारणेसाठी प्रत्यक्षपणे आधारभूत ठरणारेही आहेत! बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरप्रणीत सामाजिक-सांस्कृतिक क्रांतीच्या वाटचालीला खर्‍या अर्थाने दिशा देणारे जे मोजके मार्गदर्शक आज आपल्या समाजात आहेत त्यात डॉ. आ. ह. साळुंखे यांचे स्थान अनन्यसाधारण असून तेज:पुंज दीपस्तंभासारखे ते लखलखत आहे.

सांगली जिल्ह्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले डॉ. साळुंखे बहुजनांना ज्या भाषेपासून हजारो वर्षे दूर ठेवण्यात आले त्या संस्कृत विषयाचे केवळ प्राध्यापकच नव्हे, तर महापंडित बनले! सातार्‍याच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य मनोभावे करत असतानाच ते आपल्या अफाट व्यासंगाने, चौफेर चिंतनाने आणि तर्कशुद्ध-चिकित्सक-निर्भीड अभिव्यक्तीने अल्पावधीतच महाराष्ट्राच्या वैचारिक नभांगणात तळपू लागले. भारतीय संस्कृतीच्या अंधार्‍या भूतकाळात शिरून त्यांनी संस्कृतीचे अनेकानेक कंगोरे त्यांच्या अस्सल स्वरूपात उजेडात आणले आणि बहुजनांना त्यांचा खरा वारसा दाखवून दिला. अशा तर्‍हेचे काम त्यांच्याशिवाय महाराष्ट्रात (आणि देशातही) कॉ. शरद पाटील यांच्यासारखा एखाद् दुसरा अपवाद वगळता फारसे कुणी केलेले नाही. संस्कृतीच्या क्षेत्रात शेकडो वर्षांपासून चालत आलेले संघर्ष आणि त्यातल्या गुंतागुंती आहंनी अतिशय सुलभ पद्धतीने, सहजसोप्या शैलीत आणि वाचनीय भाषेत उलगडून दाखविल्या. त्यांनी इतिहासाच्या सांस्कृतिक पुनर्मांडणीची गरज अधोरेखित तर केलीच, परंतु तेवढ्यावरच न थांबता त्या कार्याची कसदार पायाभरणी-उभारणीही केली. वरवरचा विचार करणार्‍यांना या कार्याचे मोल सहज समजणार नाही. धार्मिक शोषण आणि सांस्कृतिक वर्णवर्चस्व अव्याहतपणे अबाधित राखण्यासाठी संस्कृतीच्या ठेकेदारांनी संस्कृतीच्या सर्व अंगोपांगात करून ठेवलेले तिढे आणि गुंते ज्यांना कळतात त्यांनाच आ. ह. साळुंखे यांचे हे कार्य किती जबरदस्त आणि मूलभूत आहे हे लक्षात येऊ शकेल.

सामान्य माणसाचा कैवार घेऊन त्याच्या सुखदु:खाच्या बाजूने आपली समग्र बुद्धिमत्ता आणि अवघी जीवनशक्ती आहंनी अक्षरश: पणाला लावली. सामाजिक-सांस्कृतिक क्रांतीचे बीजारोपण आणि संचालन करण्याइतके सामर्थ्य त्यांच्या विचारांच्या ठायी एकवटलेले आहे, हे आज नि:संशयपणे मान्य करावे लागते. या देशातल्या सर्वसामान्य माणसाला हजारो वर्षे कर्मविपाकवादी अवस्थेत ठेवणार्‍या अमानवी संस्कृतीचा फुगा कितीही मोठा फुगविला जात असला तरी त्याला एक साधी टाचणी लावल्यास तो तात्काळ फुटतो हा बहुमूल्य संदेश त्यांनी इथल्या बहुजनांना दिला आहे. या निर्भयतेच्या संदेशाने आज मानवमुक्तीच्या लढाईतल्या तळातल्या माणसालाही प्रचंड आत्मविश्वास आणि मनोधैर्य प्राप्त झाले आहे. अजस्त्र-अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध संघटितरित्या लढले पाहिजे हे जरी खरे असले तरी अनेकदा ते शक्य होत नाही. अशा स्थितीत या सिस्टिमशी एकेकट्यानेसुद्धा दोन हात कसे करावेत याचा विलक्षण वस्तुपाठच आहंनी घालून दिला आहे. ज्ञानाला विवेकाची जोड देऊन दमदार वाटचाल कशी करावी याचा आदर्श म्हणजे आ. ह. साळुंखे! आ. ह. साळुंखे म्हणजे सम्यक क्रांतीसाठी आयुष्य वाहिलेला धगधगता ज्ञान-अंगार! वाईटाला भस्मसात करू पाहणारा आणि चांगल्याची निकोप नवनिर्मिती करणारा! न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मित्रता यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी अहोरात्र धडपडणारा! हा अंगार केवळ अंगार नाही. त्याला चंद्रासारखी शीतल, हळुवार, हळवी आणि मनस्वीही बाजू आहे. किंबहुना, हीच त्याची मुख्य आणि उपजत बाजू आहे. समाजमनाच्या कणाकणात सुखी आयुष्याच्या आकांक्षेचे, विवेकाचे, विज्ञाननिष्ठेचे, आनंदाचे चांदणे शिंपडणारी!

महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात अनेक पुरोगामी चळवळी आणि त्या अनुषंगाने विचारमंथन होत आलेले आहे. परंतु या सर्व विषयांमध्ये अनेकदा गोंधळाची स्थिती अनुभवास येते. सर्वात मोठी संदिग्धता धार्मिक-सांस्कृतिक बाबतीत आहे. “काय नाकारायचे” याची भरपूर चर्चा गेल्या पन्नाससाठ वर्षात झाली. मात्र “काय स्वीकारायचे, कोणत्या दिशेने जायचे” याची निर्णायक चर्चा टाळण्याकडेच बहुतेक विचारवंतांचा आणि डाव्या चळवळींचा कल राहिला! त्यातून समाजाला “जैसे थे” अवस्थेत ठेवणारी “सबगोलंकारी परिभाषा” अस्तित्त्वात आली. अशा संभ्रमित अवकाशात आ. ह. साळुंखे यांनी नेमकी, निश्चित आणि ठोस भूमिका घेतली. हेही चांगले आणि तेही चांगले, अशी अजातशत्रूवादी तकलादू भाषा न वापरता आणि काठावरून केवळ गंमत बघत न बसता ते प्रत्यक्ष रणांगणात उतरले. ज्यांना खरोखरच खोट्याचा नि:पात करायचा असतो आणि खर्‍याचा विजय साकार करायचा असतो त्यांना तटस्थ किंवा भोंगळ राहून चालत नसते. सत्याला भिडावेच लागते. म्हणूनच संत तुकारामांच्या कथित वैकुंठगमनामागची वस्तुस्थिती त्यांनी साधार दाखवून दिली. त्यावरही वाद झाले. परंतु ही सगळी वादांची वादळे त्यांनी समर्थपणे झेलली, पेलली आणि यशस्वीरित्या परतविलीही. युुक्तिवादात कुणालाही हार जात नसल्यामुळे मग त्यांना जातीयवादी वगैरे ठरवून बदनाम करण्याचाही प्रयत्न झाला. जे प्रत्यक्ष काही करू पाहतात त्यांच्या वाट्याला हे सारे शिव्याशाप अगदी रीतसर येेतातच! ज्यांना काहीच करायचे नसते त्यांना स्वान्तसुखाय “व्यापक” ठरण्याची सोय उपलब्ध असते! आहंनी हाच सोयीस्करवाद नाकारला आणि शोषकांशी भंपक समन्वय करण्याऐवजी प्रामाणिक योद्ध्याचा पवित्रा घेऊन शोषितांच्या स्वत्त्वाची “लंबी लडाई” जारी ठेवली. व्यासंग हा केवळ व्यासंगासाठी करायचा नसतो, त्यातून समाजपरिवर्तनाच्या दिशा प्रकाशित करायच्या असतात, याची प्रचिती आहंच्या कुठल्याही पुस्तकाच्या कुठल्याही पानावर आल्याशिवाय राहत नाही. काळजात आमुलाग्र परिवर्तनाचा उत्कट ध्यास सतत झिरपत असल्याशिवाय असा धीरोदात्त ध्येयवाद जन्माला येऊ शकत नाही.

समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी वर्तमानात हिंमतीने उभे राहताना भूतकाळातील उज्ज्वल परंपरांना विसरून चालणार नाही, किंबहुना त्यातच मानवजातीच्या सुखी-संपन्न भविष्याची प्रेरणाकेंद्रे आहेत, याचे यथार्थ भान आहंना आहे. म्हणूनच गौतम बुद्धाला भारतीय मातीतला सर्वोत्तम भूमिपुत्र संबोधून त्याच्या मूल्यप्रणालीला पर्याय नाही, असे नि:संदिग्ध सूचन त्यांनी केले. बळी, शंकर, प्रल्हाद, विरोचन, चार्वाक, कपिल हा बुद्धापूर्वीचा आणि बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रोहिदास, कबीर हा बुद्धानंतरचा देदीप्यमान वारसा उरात धारण करून बुद्धाकडे गेले पाहिजे, या सर्वांचा विवेकवाद हाच मानवजातीचा मार्गदाता आणि तारणहार आहे, ही त्यांची भूमिका आज परिवर्तनवाद्यांना दिशादिग्दर्शन करते आहे.

आहंइतका अंतर्बाह्य प्रगल्भ, नम्र, ऋजू, निरागस, दृढनिश्चयी, सरळमार्गी आणि प्रसन्न विचारवंत सहसा सापडणार नाही. जीवनावर आणि जीवनात आलेल्या सर्व माणसांवर सारखेच प्रेम करणारा, वेगवेगळ्या छटा असणार्‍या समविचारींना सांभाळून घेत त्यांना परस्परसन्मुख करणारा, वैचारिक विरोधकांनाही सहृदयतेने समजावून सांगणारा, त्यांच्या मांडणीची उभीआडवी चिरफाड करताना एकही अविवेकी शब्द न उच्चारणारा, वर्तनात पांडित्यपूर्ण अहंकाराचा लवलेशही नसणारा, लेखन-वक्तृत्त्वादी अभिव्यक्तीत अनुचित भाषेचा वापर होणार नाही याची कुशल काळजी घेणारा आणि तरीही आपल्या विचारांवर, भूमिकांवर, जीवननिष्ठांवर ठाम असणारा अन्य तत्त्ववेत्ता शोधावा लागेल. त्यांच्यासारखा उक्ती आणि कृती यात तफावत नसणारा प्रज्ञावंत विरळाच असतो. बुद्धत्त्वाच्या फार फार जवळ गेलेले ते आधुनिक काळातले बोधिसत्त्वच आहेत जणू! “कशा माणसांचा समाज घडवायचा आहे” असा प्रश्न कुणी विचारला तर त्याला “आहंसारख्या माणसांचा” हे उत्तर अगदी चपखल ठरेल! त्यांनी आयुुष्यभर मांडलेल्या विचारांच्या प्रशांत महासागरामध्ये मला सायलेंट क्रांतीची महाकाय गाज ऐकायला येते. डॉ. तारा भवाळकरांनी एकदा “शांतपणे उत्पात घडवणारा माणूस” असे त्यांचे वर्णन केले होते. सर्व प्रकारच्या विषमतांचा निरास करून समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा यासाठी अंतरीच्या उमाळ्याने झटणारा हा ‘उत्पातकर्ता’ आता वयाच्या ७८ व्या वर्षांत प्रवेश करतो आहे. त्यानिमित्ताने त्यांना सदिच्छा देताना, त्यांच्या महनीय जीवनकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आणि नवोनवोन्मेषाने आणखी चिंतन, लेखन, संशोधन करण्यासाठी त्यांना निरोगी शतायुष्य चिंतताना हात आपोआपच जोडले जातात आणि मन आदरभावनेने ओसंडून वाहू लागते.

(संदीप सारंग लेखक , पत्रकार आहेत.)

@ 9969864685

Dr A H Salunkhe Documentary-समोरील लिंकवर क्लिक करा-https://bit.ly/350W6OV-

 

Previous articleमान लो तो हार है… ठान लो तो जीत है!
Next articleउकळ चाटून दुष्काळ हटतो का?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.