-मधुकर भावे
बुधवारी श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची ‘पत्रकार परिषद’ झाली. खरं म्हणजे त्याला ‘पत्रकार परिषद’ म्हणता येणार नाही. श्री. फडणवीस साहेब यांनी निवेदन केले आणि शुद्धलेखन लिहून घेतल्यासारखे, पत्रकारांनी ते निवेदन लिहून घेतले. लगेच फडणवीससाहेब उठले आणि निघून गेले. पत्रकारांना आमंत्रण गेले होते ते ’पत्रकार परिषद’ होणार म्हणून. पत्रकार परिषदेत नेत्याचे निवेदनझाल्यावर प्रश्न विचारले जातात. कालच्या पत्रकार परिषदेत एकही प्रश्न विचारला गेला नाही. फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या भाजपा पराभवाची जबाबदारी घेतली. त्याअगोदर त्यांच्या पक्षाची बैठक झाली होती. त्या बैठकीला मुंबई भाजपा अध्यक्ष श्री.आशिष शेलारसाहेब हजर होते. निवडणूक पक्षाने लढवली होती. त्यामुळे पराभवाची जबाबदारी महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.बावनकुळे साहेब आणि मुंबईचे अध्यक्ष श्री.शेलार साहेब यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी होती.
जर कॉंग्रेसचा असा दारुण पराभव झाला असता तर, याच बावनकुळे आणि शेलार यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष, यांचे राजीनामे मािगतले असते. पण हे दोघेही चिडीचूप होते. फडणवीस साहेबांनी पराभवाची जबाबदारी घेतली. ‘उपमुख्यमंत्रीपदातून माझी मुक्तता करा’, अशी पक्षश्रेष्ठींना विनंती करीत असल्याचे सांगितले याचा अर्थ पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिली तरच ते उपमुख्यमंत्रीपद सोडणार पण ती परवानगी येण्यापूर्वीच पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर करुन टाकले की,’फडणवीससाहेबांमध्ये हनुमानाचा अंश आहे म्हणून त्यांनी सरकारातही राहावे आणि पक्षातही काम करावे, महाराष्ट्र पिंजून काढावा…’ या लोकसभा निवडणुकीत फडणवीससाहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढलाच होता. त्यांनीच सांगितले होते की, ‘सगळ्यात जास्त सभा मीच घेतल्या’. त्यांनी पिंजून काढलेल्या महाराष्ट्राचे काय झाले हे दिसले. आता, त्यांनी नेत्यांवर आपले भविष्य सोपवले आहे. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ ही धून सध्या तरी बंद आहे.
पक्षाचा पराभव झाला म्हणून फडणवीस खरोखर गंभीर असते तर त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारल्यावर राजीनाम्याची परवानी मागणी करण्याचे कारण नव्हते. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपपवून द्यायचा पण तसे झालेले नाही. फक्त हवा तयार केली. आता हे पक्क आहे की, मोदी आणि शाह यांचे महाराष्ट्र भाजपमधील आणि सरकारमधील एकच विश्वस्त आहेत ते फडणवीससाहेब. त्यांच्याखेरीज, एवढाविश्वास ठेवावा असा माणूस महाराष्ट्रात कोणीही नाही. त्यामुळे राजीनाम्याची परवानगी मिळणे शक्य नाही. फडणवीसांना त्याची खात्री असेल. त्यामुळे कालच्या पत्रकार परिषदेचा खटाटोप ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ या थाटाच आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यापूर्वी ‘फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि मी उपमुख्यमंत्री होतील असे शिंदे साहेबांनाही वाटत होते. त्यांनी तसे बोलूनही दाखवले. त्यावेळी फडणवीस म्हणाले मी पक्षाध्यक्ष होतो, सत्तेत राहत नाही. ५ मिनीटात अमित शाह यांचा फोन आला आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. राजभवनवरचे हे नाट्य सगळ्यांनी पाहिले सगळ्यांना आठवतसुद्धा असेल. त्यामुळे फडणवीसांना सरकारातून बाहेर पडायला परवानगी मिळणे जवळजवळ अशक्य आहे, हे फडणवीसांनाही माहीत असेल. त्यामुळे कथानक ज्याप्रमाणे लिहिले होते. त्याप्रमाणे पत्रकार परिषद झाली. आता पुन्हा ते बोलायला मोकळे आहेत ‘पक्षश्रेष्ठी परवानगी देत नाहीत…’ त्यामुळे बावनकुळेंचाही जीव भांड्यात पडला असेल. कारण २०१९ साली बावनकुळे यांचे विधानसभेचे तिकीट फडणवीसांनीच कापले होते.विनोद तावडे यांचेतिकीटही फडणवीसांनीच कापले होते. मग तडजोड म्हणून बावनकुळेंना अध्यक्ष केले, असे हे सगळे नाटक होते.
फडणवीस यांचा कालचा आवेश असा होता की… मी सत्ता सोडतो, पक्षाध्यक्ष होतो. महाराष्ट्रभर फिरतो आणि भाजपाचे सरकार आणून दाखवतो. जणू यापूर्वी ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष नव्हतेच, मुख्यमंत्री नव्हतेच, २०१४ ते २०१९ तेच मुख्यमंत्री होते ना. २०१४ साली भाजपाचे १२२ आमदार होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच वर्षानंतरच्या िनवडणुकीत १२२ वरुन भाजप आमदारांची संख्या १०५ वर आली. १७ आमदार घटले. आता सत्ता सोडून नुसते अध्यक्ष म्हणून फडणवीस फिरू लागले तर, आणखीन ५० घटतील. कारण महाराष्ट्रातील आजचं घाणेरडे राजकारण, त्यांच्याच पुढाकाराखाली झालेले आहे. पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. या घाणेरड्या वातावरणाची जबाबदारी कोण स्वीकारणार? हे वातावरण कोणामुळे झाले? कोणत्या फाेडाफोडीेने झाले, त्याला जबाबदार कोण? फडणवीस जेव्हा पक्षाध्यक्ष म्हणून फिरतील तेव्हा त्यांना या प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील.शिवाय आता मोदी आणि शाह यांना विधानसभा निवडणुकीत प्रचाराला आणण्याची भाजपाची मानसिकता असेल असे काही वाटत नाही. कारण हे दोन्ही नेतेजिथे -जिथे प्रचाराला गेले, तिथे लोकसभेचे भाजप व महायुतीचे उमेदवार पडले, त्यामुळे आता ‘मोदी शाह यांची सभा आम्हाला नको’, असे भाजपाचे उमेदवार सांगतील. आणि जिथे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत ते उमेदवार ‘मोदीसाहेबांची सभा झाली तर मला मदत होईल’ असेच म्हणतील. या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अनेक गंमती केल्या. तर आता आपण वाट बघूया फडणवीस राजीनामा कधी देतात. आणि हो… कोणीतरी काल म्हटलं… ‘सौ चुहै खाके िबल्ली चली हज…. ‘ हे फडणवीसांना थोडसं लागू पडेलही. पण फडणवीसांना भाजप पराभवाचा एवढा पश्चाताप झाला असेल तर पश्चातापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते, असे काही ऐिकवात नाही.
![](https://mediawatch.info/wp-content/uploads/2024/06/bhave.jpg)