काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य  ठरवणारी पदयात्रा…  

-प्रवीण बर्दापूरकर    

काँग्रेस पक्षाच्या नवीन (आणि गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या असलेल्या) अध्यक्षाच्या निवडणुकींच्या हालचालींनी  वेध घेतलेला असतांना हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेला पंधरवडा उलटलेला आहे . उल्लेखनीय बाब म्हणजे , या पंधरा दिवसांत तरी कष्टकरी-कामकरी , सर्वसामान्य आणि विशेषत: युवकांमध्ये या यात्रेविषयी मोठं आकर्षण निर्माण झालेलं दिसत आहे . या यात्रेमुळे राहुल गांधी यांचं नेतृत्व जसं एक वेगळा आयाम धारण करेल का तसंच शैथिल्य पांघरुण निष्क्रिय झालेल्या काँग्रेस पक्षातही धुगधुगी निर्माण होईल किंवा नाही हे समजण्यासाठी वेळ  जाऊ द्यावा लागेल . थोडक्यात काय तर ही पदयात्रा काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं भवितव्य ठरवणारी आहे .

पत्रकारितेच्या गेल्या साडेचार दशकाच्या काळातल्या अशा अनेक यात्रा राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं आठवल्या . १९७७ साली पत्रकारितेत आल्यावर लगेच जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांची गाजलेली भारत यात्रा आठवते . तेव्हा मी चिपळूणच्या ‘सागर’ या दैनिकात उमेदवारी करत होतो . तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि आम्हा पिढीचे आदर्श असलेले मधु दंडवते यांच्यामुळे या पदयात्रेत एक दिवस सहभागी होता आलं    होतं . त्यानंतर महाराष्ट्रात गाजलेली शेतकरी दिंडी होती आणि ती शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निघाली होती ; त्याबद्दल कविवर्य ना . धों . महानोर दररोजच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मधे पहिल्या पानावर एक टिपण लिहीत असत. नंतर दि. बा. पाटील यांची जळगाव ते नागपूर पदयात्रा आठवते आणि या यात्रेत विचारवंत भा. ल. भोळे यांच्या समवेत पाच-सहा किलोमीटर झपाझपा चालल्यावर कशी दमछाक झाली होती , हेही स्मरतं . भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांची राम मंदिरासाठीची आणि त्यामुळे समाजात टोकाची  नफरत पसरवणारी रथयात्राही चांगली आठवते . सत्तेत आल्यावरही लालकृष्ण अडवाणी यांनी एक रथयात्रा काढली होती.  त्या यात्रेच्या काळात औरंगाबादला असताना रात्री उशिरा अडवाणी यांची प्रकृती किंचित बिघडली तेव्हा हृदयरोग तज्ज्ञ  डॉ. सतीश रोपळेकर यांना झोपेतून उठवून आणून ईसीजी काढला , उपचार केले गेले होते  . यासंबंधीची दिलेली एक्सक्युझिव्ह बातमी आठवते आणि त्यामुळे पत्रकारांना वाटलेली असूया व तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना वाटलेला विस्मयही पक्का आठवतो . ( त्या रात्री लालकृष्ण अडवाणी यांचा मुक्काम सुभेदारी विश्रामगृहात होता आणि ‘लोकसत्ता’चा विशेष  प्रतिनिधी म्हणून नुकतीच औरंगाबादला बदली झालेल्या माझाही डेरा त्याच परिसरात होता . त्यामुळे ही बातमी मला अगदी सहजच मिळालेली होती . ) अलीकडच्या दोन-अडीच दशकात शिवसेनेचे दिवाकरराव रावते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जितक्या पदयात्रा काढल्या तितक्या महाराष्ट्रात कोणत्याच राजकीय नेत्यांनी काढलेल्या नाहीत . दिवसभरात राहुल गांधी २२ ते २३ किलोमीटर चालतात . दिवाकरराव मात्र ३० किलोमीटर चालत . १८-२० पेक्षा जास्त किलोमीटर दिवसभरात चालणं मुळीच सोपं नाही . शरीरातल्या प्रत्येक अंग-अंगाचा आणि कसा कस लागतो हे एक दिवस दोन तास चालल्यावर दिवाकरराव रावते यांच्यासोबत चालताना अनुभवलं आहे . अशा पदयात्रा करणाऱ्यांच्या वेशभूषा  किंवा पादत्राणांवरुन चर्चा करणं किंवा ट्रोल करणं फार सोप्प आहे . प्रत्यक्षात हे आव्हान किती खडतर असतं ते केवळ ट्रोल करणाऱ्यांना कधीच समजू शकणार नाही .

मुख्य विषय राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आहे . वर उल्लेख केलेल्या सर्व यात्रा किंवा पदयात्रा पक्ष किमान सुस्थितीत असतांना काढण्यात आलेल्या होत्या . राहुल गांधी मात्र काँग्रेस पक्ष निपचित पडल्यागत झालेला असताना ही भारत जोडो यात्रा काढत आहेत . शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  त्यांच्या  भारतीय जनता पक्ष , देशाच्या लोकशाही समोर एकपक्षीयत्वाचं आव्हान उभं करण्याच्या प्रयत्नात असतांना व त्यामुळे आपली लोकशाही बहुमताकडून बहुसंख्यांकवादाकडे ढकलली जात असतांना , राहुल गांधी यांची पदयात्रा निघाली आहे . एकप्रकारे भारतीय लोकशाहीसमोर असलेलं एकपक्षीयत्वाचं संभाव्य संकट दूर करण्याचा राहुल गांधी यांचा हा प्रयत्न म्हणूनही या भारत जोडो यात्रेकडे पाहायला हवं  .

वर उल्लेख केलेल्या ज्या यात्रा किंवा पदयात्रा निघाल्या , तेव्हा त्या काढणाऱ्या त्या नेत्यांच्या नेतृत्वाला  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान देणारं त्यांच्या पक्षात कुणी नव्हतं . काँग्रेस पक्षात मात्र सर्व काही ‘ऑल वेल’ मुळीच नाही . ‘जी २३’  ( खरं तर , त्यातले दोघे आता गळाले आहेत ! ) गटानं राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावलेलं आहे . याचं कारण , गेल्या दोन लोकसभा निवडणुकात काँग्रेसला सभागृहातलं विरोधी पक्षनेतेपद मिळवता येण्याइतक्याही किमान जागा मिळवता आलेल्या नाही . राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवलेलया २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ४५ च्या उंबरठ्यावर अडकून पडला आहे . राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल शंका उपस्थित करत आधी ज्योतिरादित्य शिदे , कपिल सिब्बल मग गुलाम नबी आझाद , योगानंद शास्त्री हे नेते बाहेर पडले आहेत . गोवा विधानसभेतले काँग्रेस पक्षाचे ११ सदस्य तर ही यात्रा सुरु झाल्यावर काँग्रेसच्या वस्त्राचा त्याग करुन ‘दिगंबर’ झालेले  आहेत . जी २३ गटाचे बहुसंख्य नेते या पदयात्रेपासून लांबच आहेत . आणखी एक मुद्दा म्हणजे भाजप आणि काँग्रेसेतर अन्य विरोधी पक्षही या यात्रेपासून केवळ फटकूनच आहेत  असं नव्हे तर नितीशकुमार , शरद पवार यांच्यासारखे नेते ( न मिळणाऱ्या देशाच्या पंतप्रधानपदासाठी ) वेगळी मोट बांधण्याच्या तयारीत आहेत .  शिवाय हिंदुत्ववाद्याच्या घनघोर आणि अनेकदा अश्लाघ्यकडे झुकणाऱ्य टीकास्त्राचे राहुल गांधी लक्ष्य ठरलेले आहेत .  अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही भारत जोडो यात्रा निघालेली आहे .

या यात्रेतून काय साध्य होईल आणि काय नाही , याचा लेखाजोखा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसेलच . १२ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशातून पाच महिने चालणारया या ३५७० किलोमीटरच्या यात्रेमुळे जर खरंच निपचित पडलेल्या काँग्रेस पक्षात काही चैतन्य सळाळलं आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० च्या आसपास जागा मिळाल्या तरी ही यात्रा यशस्वी झाली असं मानता येईल . शिवाय मुद्दा राहुल गांधी यांच्यातील नेतृत्वाच्या क्षमतेचा आहे त्याबद्दल विरोधी पक्षांकडूनच नव्हे तर स्वपक्षीयांकडूनही टीकेचे वार त्यांना अजूनही सहन करावे लागत आहे . त्यातील एक वार त्यांना देशाच्या खऱ्याखुऱ्या जगण्याची स्थिती ( ground reality ) न समजण्याचा आहे.  या यात्रेमुळे राहुल गांधी यांना जमिनीवरचा जिता-जागता भारत आणि त्यांची संवेदना कळण्यास निश्चितच मदत होणार आहे . त्यातून त्यांचं असलेलं नेतृत्व अधिकाधिक उजळत जाणार आहे आणि जर नेतृत्व गुण त्यांच्या आता नसतील तर त्यांना पैलू पडणार आहेत , हे नक्की  . राहुल गांधी यांनी आजवर केलेल्या कांही राजकीय चुकांचं परिमार्जन ही यात्रा करेल का हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे . दुसरं म्हणजे , काँग्रेसला जर येत्या लोकसभा निवडणुकीत शंभरच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त जागी विजय संपादन करता आला तर राहुल गांधी यांना असणारा पक्षांतर्गंत विरोध पूर्णपणे संपुष्टात येईल आणि पक्षाच्या अध्यक्षपदी कुणीही विराजमान असलं तरी राहुल गांधी हेच पक्षाचे एकमेव निर्णायक नेते ठरतील . मात्र , असं घडलं नाही तर २०२४ची लोकसभा निवडणूक हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या अस्ताचा प्रारंभ असेल.

गेल्या सात-आठ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरुद्ध बेडरपणे आवाज उठवणारे राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत . त्यांच्या पक्षातल्यासकट भाजपेतर बहुसंख्य नेत्यांनी ( सोयीस्कर ) मौन बाळगलेलं असतांना राहुल गांधी मात्र देशभर फिरले . आता तर त्यांच्या पदयात्रेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळतोय शिवाय ज्या पद्धतीनं लोकांशी राहुल गांधी संवाद साधत आहेत तेही फारच सकारात्मक आहे . त्यांची लोकांशी संवाद साधण्याची शैली मृदु आहे आणि म्हणूनच आश्चर्यस्तंभित करणारी आहे . भेटायला आलेल्या मुलीच्या पायातल्या सँडल्सचे सुटलेले बकल लावून देणारे आणि कळकटलेल्या वेषातल्या साध्या माणसाशी संवाद साधणारे असे राजकारणी दुर्मीळ आहेत  एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्यंत अश्लाघ्यपणे  ट्रोल होऊनही राहुल गांधी यांनी त्यांच्या या संवादाच्या दिनचर्येत बदल केलेला नाही हेही महत्त्वाचं आहे . देशाच्या सत्ताधारी पक्षाचा सर्वोच्च नेता जनतेत जात नाही , सर्वसामान्य लोकांशी तर सोडाच पत्रकारांशीही संवाद साधण्यास कचरत असल्याचं चित्र असताना राहुल गांधी मात्र जनतेत जातात , त्यांच्याशी संवाद साधतात , त्यांच्यासोबत पायी चालतात , त्यांची सुखदु:ख जाणून घेतात , त्यांच्याशी समरस होण्याचा प्रयत्न करतात , या सर्वांतून उद्याचा एक सक्षम नेता या पदयात्रेतून तयार होण्याची लक्षणं  आहेत .  तसं जर खरंच घडलं तर , तेही या भारत जोडो यात्रेचं एक मोठं यश असेल .

राहुल गांधी व्यक्ती व राजकारणी म्हणून आवडो अथवा न आवडो , त्यांच्यात नेतृत्वाची क्षमता आहे किंवा नाही याबद्दल दुमत असो वा नसो , भारताच्या एकपक्षीय राजवटीकडे सुरु असलेलया वाटचालीकडे  आणि बहुमताकडून  बहुसंख्यांकवादाकडे झुकू पाहणाऱ्या लोकशाहीच्या रक्षणासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत हे महत्त्वाचं आणि सकारात्मक आहे . त्यातून त्यांचं नेतृत्व उजळून निघणं किंवा न निघणं  आणि काँग्रेस पक्षाला चैतन्य प्राप्त होतं किंवा नाही , हे सिद्ध होण्यासाठी काळ जाऊ द्यावा लागेल .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleशिंदेंच्या शिवसेनेची व्हॅलिडिटी
Next articleएक विश्व श्रीमंत, करोडो बेरोजगार !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.