शिंदेंच्या शिवसेनेची व्हॅलिडिटी

-ज्ञानेश महाराव

(संपादक, साप्ताहिक ‘चित्रलेखा’)

———————————————–

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला; त्या घटनेला आता अडीच महिने होतील. त्यांच्या जागी महाराष्ट्राचा कारभार सांभाळायची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली; त्यालाही आता दोन महिन्यांचा काळ लोटला. सत्तेवर आलेले ‘शिंदे सरकार’ वैध आहे की अवैध याचा जो काही निवाडा व्हायचा तेव्हा होईल! त्या कायदेशीर पेचाबाबत वेळोवेळी या स्तंभात लिहिले आहे. त्या मुद्यांची आणि घटनाक्रमांची पुनरुक्ती न करता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हे सरकार किती दिवसांसाठी आहे; या प्रश्नाबरोबरच एकनाथ शिंदे या व्यक्तिमत्त्वाची वैधता (व्हॅलिडिटी) किती दिवसांसाठी आहे, असा सवाल गांभीर्याने चर्चिला जात आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. ती कारणे कधी न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान पुढे येतात, तर कधी ‘भाजप’च्या गोटातून किंवा शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदार- खासदारांच्या गोटातून पुढे येतात. चर्चेत असणार्या काही कारणांचा ऊहापोह करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या स्थानाचे आत्ताचे वास्तव काय आहे, ते समजून घेऊ.

शिंदे स्वत: राज्याच्या शक्तिशाली सत्तास्थानावर आहेत. पण ते त्या स्थानावरून आपली शक्ती वापरू शकतात का; हा मोठा प्रश्न नाही. ते मुख्यमंत्री असले तरी ‘खरे मुख्यमंत्री’ हे त्यांचे सहकारी असणारे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, हे स्पष्ट दिसते आहे. आता त्यांच्या राजकीय स्थानाबद्दल बोलू. त्यांनी जून महिन्यात बंंड केले. त्या दिवसांपासून ते म्हणत आहेत की ”आमचीच ‘शिवसेना’ खरी आहे!” हा दावा करताना पक्षप्रमुख पद, शिवसेना भवन, मातोश्री, दै. सामना आणि सा. मार्मिक, ठाकरे हे आडनाव; या सहा गोष्टी वगळता ‘शिवसेना’चे म्हणून जे जे आहे त्यावर दावा ठोकत आहेत. म्हणजे मुख्यमंत्रीपद घेतले, विधिमंडळ पक्ष ताब्यात घेतला, संसदेतला पक्ष घेतला, संघटनेतील काही पदाधिकारी घेतले आणि संपूर्ण ‘शिवसेना’ या पक्षावर निवडणूक आयोगाकडे दावा केला. ‘शिवसेना’ची वार्षिक ऊर्जा असणारा ‘दसरा मेळावा’ आणि त्यासाठी ‘शिवाजी पार्क’ या मैदानावरही हक्क सांगितला आहे. यामुळे राजकारणातील आणि संघटनेतील त्यांचे स्थान ‘तेलगु देसम्’ पक्षात बंड केलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्यासारखेच झालेय की काय, असे भासविले जात आहे. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, ते हळूहळू समोर येत आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाची, प्रतिमेची वैधता (व्हॅलिडिटी) किती, हा प्रश्न चर्चेचा विषय झालाय.

याबाबत त्याचे विवेचन महत्त्वाचे आहे किंवा ते आवश्यक आहे. त्यांची ‘रिक्षावाला मुख्यमंत्री’ झाला, ही सुरुवातीची प्रतिमा काही दिवसही टिकू शकली नाही. कारण रिक्षावाला ज्या परिस्थितीत आणि पद्धतीने मुख्यमंत्री झाला, हा पहिल्या दिवसापासून वादाचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे, हे बंड करण्यापूर्वी ७ वर्षे ते मंत्री होते. तेव्हा त्यांचे वर्णन ‘रिक्षावाला मंत्री झाला,’ असे झाले नव्हते. भाजीवाला, रिक्षावाला, पानपट्टीवाला, नर्स, वॉचमन, टॅक्सी ड्रायव्हर, मास्तर, प्रिन्सिपॉल, पिठाची चक्कीवाले यांना ‘शिवसेना’ने नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करणे हे काही विशेष नाहीच. कारण ती त्या संघटनेची ओळख आहे. ”मुख्यमंत्री झाल्यावर करतो, बघतो किंवा ‘अ’प्रमाणे कार्यवाही करा,” असा अर्जावरचा शेरा मी बंद करणार आणि फोनवरच आदेश देणार, असे काहीतरी सांगणारे शिंदे यांचे ‘व्हिडिओ’ पुढे आले. पण त्यावर प्रचंड टीका झाल्यावर आणि असे फोनवरचे आदेश अधिकारी मंडळी फाट्यावर मारत असल्याने तोही एक ‘ड्रामा’ ठरला! आणि एकनाथ शिंदे ‘नायक’ सिनेमातील अनिल कपूर होता होता राहिले. प्रशासनावर मांड ठोकणाऱ्याला जन्मतःच मुडदूस झाल्याचे चित्र अधिकाऱ्यांपुढे आले.

‘आमचीच खरी शिवसेना’ असे सांगणाऱ्या शिंदे यांनी ‘येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही २०० जागा जिंकू, असे जाहीर केले. या ‘२०० जागा भाजपसहित’ असे त्यांना म्हणायचे असावे. पण समजा, जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील आणि शिंदे यांचा गट ‘भाजप’सोबत निवडणुकीला सामोरा जाईल; तेव्हा ते ‘आमचीच खरी शिवसेना’ म्हणतात त्या पक्षाला ‘भाजप’ विधानसभेच्या १३५ जागा सोडणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर जसजशा निवडणुका येतील, तेव्हा ‘नाही, नाही आणि नाही,’ असेच येणार आहे. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तिथेच ‘भाजप’ने बैठकांचे सत्र सुरू केलेय.

मुंबई महापालिकेची निवडणूक लढताना त्यांच्या खऱ्या शिवसेनेला युतीत निम्म्या जागा मिळणार आहेत का? या प्रश्नाचे उत्तरही ‘नाही’ असेच आहे. कारण, ‘शिंदे गट’ आणि ‘मनसे’ यांनी युती करावी, असा बूट निघाला आहे. शिंदे गट जर ‘मनसे’बरोबर गेला तर बाळासाहेबांना क्लेश देणारी ‘शिवसेना’ खरी कशी? त्यामुळे शिंदे यांची वैधता किती काळाची आणि कोणत्या दर्जाची, असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.

येत्या पंधरवड्यात त्यांच्या ‘खऱ्या शिवसेना’चा अर्थात ‘शिंदे गट, भाजप आणि मनसे’ यांचा एकत्रित ‘दसरा मेळावा’ होण्याची शक्यता आहे. त्याला सत्ता असल्याने गर्दी पुरेपूर असेल. प्रोटोकॉल नुसार, मुख्यमंत्री शेवटी बोलतील. पण ते ‘प्रतिशिवसेनाप्रमुख’च्या भूमिकेत असणाऱ्या राज ठाकरे यांना रुचतील आणि पटतील का? अर्थातच राज ठाकरे हे असे व्यक्तिमत्त्व आहे की त्यांना जे पटेल आणि रुचेल तेच ते बोलतात, करतात. ‘शिवसेना’ फुटली याचा ते जरूर लाभ घेतील. पण म्हणून ते मुख्यमंत्रीपदी कोण आहे आणि उपमुख्यमंत्रीपदी कोण आहे, ह्याकडे दुर्लक्ष करून ‘ठाकरे’ नावाच्या स्वतंत्र आयडेंटिटीचे विघटन होऊ देतील, असे वाटत नाही. मग शिंदे यांची उपुक्ततता काय, असा प्रश्न विद्यमान परिस्थितीत पडतो.

त्याचे उत्तर ‘भाजप’ने अगोदरच धुंडाळून ठेवले आहे. त्यांना ‘शिवसेना’ कमजोर करायची होती. तसा प्रयत्न त्यांनी सत्तेच्या समीकरणात करून दाखविला आहे. वरवर संघटनाही कमजोर केलीय. पण ते करून त्यांना साध्याकडे जायचे आहे. म्हणजे काहीही करून देशाची सत्ता परत मिळवायची आहे. ‘भाजप’ला केंद्रात सत्ता देण्यात गेल्यावेळी महाराष्ट्र राज्याचा वाटा मोठ्ठा होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘भाजप-शिवसेना युती’चे ४२ खासदार निवडून आले होते. त्यात ‘भाजप’चे २३ खासदार होते. तोच आकडा २०२४ मध्ये गाठणे शक्य नसले तरी जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. शिंदे गटात राज्यातले बारा खासदार आहेत. त्यांना पुन्हा निवडून आणणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांना आज शिंदे महत्त्वाचे आहेत. त्यासाठी राज ठाकरेही महत्त्वाचे आहेत. ‘शिंदे-फडणवीस सरकार’च्या वैधतेचा सुप्रीम कोर्टात निकाल काय लागतो, ते लवकरच कळेल. तोपर्यंत ‘भाजप’ला शिंदे हवे आहेत. मुंबई महापालिका मिळविण्याच्या प्रयत्नातही शिंदे ‘भाजप’ला हवेत.

शिवसेनेला रस्त्यावरच्या लढाईत व्यग्र ठेवून उद्धव ठाकरे यांचा शक्तिपात करण्यासाठीही ‘भाजप’ला शिंदे हवेत. ‘शिवसेना’चे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठविण्यासाठीही ‘भाजप’ला शिंदे हवेत. थोडक्यात, ‘भाजप’ला शिंदे त्यांच्या कथित खऱ्या शिवसेनेसोबत दीर्घ काळासाठी उपयोगाचे नाहीत; हे ‘रा. स्व. संघ-भाजप’च्या ‘थिंक टँक’ला माहीत आहेत. त्यांना शिंदेंचा उपयोग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करून घ्यायचा आहे. मध्यंतरी शिंदे गटाशिवायसुद्धा आम्ही ‘अपक्ष आणि भाजप’ असे सरकार बनवू शकतो, असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला होता. त्यावरून शिंदे यांची ‘व्हॅलिडिटी’ किती, या प्रश्नाचे उत्तर मिळते.

केवळ एक आमदार असणाऱ्या राज ठाकरे यांच्या घरी ‘भाजप’ नेत्यांच्या वाढत्या येरझारा शिंदेंच्या ‘व्हॅलिडिटी’च्या शंकेवर शिक्कामोर्तब करते. उजव्या विचारसरणीच्या सत्तेत असणाऱ्या ज्यांनी ज्यांनी बंड केले, त्या शंकरसिंह वाघेला, कल्याणसिंह, येडीयुरप्पा, उमा भारती यांचे पुढे काय झाले, ते आठवा. त्यांना त्याच प्रवाहात समाविष्ट व्हावे लागले किंवा केशुभाई पटेल व्हावे लागले. शिंदे यांचे काय होणार, हे सुप्रीम कोर्ट ठरवेलच! पण आजच्या घडीला एकनाथ शिंदे यांचा ‘संघ-भाजप’ला काय उपयोग आहे आणि भावी काळात त्यांचे काय स्थान आहे, हे स्पष्ट झाले आहे. हे शिंदे व त्यांच्या ४० आमदारांच्या लक्षात येईल तेव्हा येईल! तोपर्यंत चालू द्या दहीहंडी, अख्खे दहा दिवस गणपती दर्शन, प्रभादेवीसारखे राडे, बंडाचे उदात्तीकरण करणारी भाषणे! या सगळ्यात जर उद्धव ठाकरे यांना दिवसेंदिवस लोकांची सहानुभूती वाढत चालली तर शिंदे यांच्या ‘व्हॅलिडिटी’ची मर्यादा अगदी अलीकडेही येऊ शकते.

Comments are closed.