‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’: अंतर्मुख करायला लावणारे पुस्तक

-डावकिनाचा रिच्या

…………………………

‘ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार है

हद-ए-निगाह तक जहाँ गुबार ही गुबार है’

(ही कोणती जागा आहे मित्रांनो, ही कोणती दुनिया आहे

जिथंपर्यंत नजर जाईल, धुळीचेच लोट दिसत आहे)

‘उमराव जान’ चित्रपटामधील गीतात शहरयार यांनी लिहिलेल्या वरील ओळी नंदा खरे यांचं नवं पुस्तक “बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन” वाचून झाल्यावर आठवतात. अर्थशास्त्रावरील एखाद्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी शायरीचा वापर तुम्हाला आश्चर्यजनक वाटला असेल परंतु पुस्तक वाचून बाजूला ठेवल्यावर मनातून आलेली ही उस्फूर्त प्रतिक्रिया. अर्थशास्त्रात पीएचडी केलेल्या अस्मादिकांना अनेक नव्या बाबी, नवे दृष्टिकोन या पुस्तकातून समजले.. आपणासी जे “भावे”.. ते इतरांना सांगावे या उक्तीप्रमाणे या पुस्तकाचा परिचय करून देण्यावाचून राहावले नाही.

पिढी दरपिढी जीवनाची मूल्यं बदलत जातात आणि अर्थव्यवस्थेची मूल्यं हरवत जातात. या मूल्यहीन होत चाललेल्या अर्थव्यवहारांवर नंदा खरे सरांनी केलेलं हे मुक्तचिंतन. अतिशय महत्त्वाचा हा विषय मनोविकास प्रकाशनाने अतिशय सुंदर पुस्तकाच्या स्वरुपात आपल्यासमोर आणला आहे. वाचकांशी गप्पा मारल्याप्रमाणे अतिशय सोप्या भाषेत आणि नेहमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन खरे सर हा अवघड विषय अतिशय सोपा करून सांगतात. आणि आपण रोज आसपास अनुभवत असलेल्या बाजारव्यवस्थेचे अनपेक्षित पैलू आपल्याला दिसू लागतात.

नंदा खरे

“शेतीचा शोध हा मानवाचा आजपर्यंतचा सर्वात घातक शोध आहे” अशी खरे सर मांडणी करतात आणि अंतर्मुख व्हायला होतं. उत्क्रांतीचे गोडवे गाणाऱ्या अस्मादिकांसाठी मानवाने शेती सुरू करणे हा आजवर गौरवाचा काळ होता, आज त्याच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन समजला. शेतीतून जन्माला आली मालकी ही संकल्पना.. आणि ज्यातून पुढं जन्माला आला मोबदला. तोवर मानव हा केवळ अन्न संकलक होता, नंतर तो अन्नउत्पादक झाला, आणि भांडवलशाही जन्माला आली.

“सर्व माणसे समान आहेत” हे तत्त्व भांडवलवाद आणि साम्यवाद या दोन्ही परस्परविरोधी विचारधारा मानतात. मात्र त्या दोन्हीमधील फरक स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांच्या अंगाने पाहिला तर लक्षात येते. स्वातंत्र्य हे मूल्य वाढीस घालताना भांडवलवादाचं समतेकडे दुर्लक्ष झालेलं असतं. वेगवेगळ्या इजमचे सामर्थ्य आणि मर्यादा खरे सर त्यांच्या नेहमीच्या परखड शैलीत मांडतात. अर्थव्यवस्था ही एक रंगभूमी असून त्याचा नायक असलेला ” मानव” हा केंद्रस्थानी असलेलं कथानक लिहलं जावं, मूठभर तुच्छतावादी संपूर्ण मानवतेचं भविष्य कसं निर्धारित करणार? हा प्रश्न ते उपस्थित करतात.

औद्योगिकरण झालं आणि पैसा वाचवणं हेच मूल्य सर्वात महत्त्वाचं बनलं. हातावर पोट असलेले देशोधडीस लागले, पर्यावरणाचा नाश झाला, मात्र भांडवलशाही आपल्याच मस्तीत होती, अनिर्बंध स्वात्तंत्र असलेल्या तिला कशाचीच पर्वा नव्हती. तिला सोयीचे तत्वज्ञान देखील मांडलं जात होतं.. व्यक्ती नेहमी स्वस्त पर्याय निवडतात असं ॲडम स्मिथ मांडतो. मात्र काही गोष्टींना पर्याय नसतो. अर्थशास्त्र हे रुपये आणि पैसे यांचं शास्त्र नाही, ते माणसांचं शास्त्र आहे. त्यामागे भावना आणि नैतिकमूल्य असलं पाहिजे आणि या मूल्यांना पर्याय नसतो. अशावेळी “समता हे मूल्य स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे” हे डॉ. आंबेडकरांचे म्हणणं पटतं.

जागतिक मंदीचं विश्लेषण वाचताना लक्षात येतं की तेजी असो किंवा मंदी, अर्थव्यवस्था ही मूठभर प्रस्थापितांच्या कल्याणासाठी राबत आहे, यज्ञामध्ये हत्ती घोडे नाही, दुबळ्या बकऱ्याचा बळी जात असतो याची आठवण होते. गंमत म्हणजे बकऱ्याची आई आणि हत्ती घोडे या दोन्ही घटकांनी “हे असेच होणार” हे गृहीत धरलेले असते. लॉर्ड केन्स याचे कल्याणकारी अर्थशास्त्र आणि कार्ल मार्क्स यांचा सहसंबंध जाणून घेत असतानाच त्यांचे अनुयायी असलेले रघुराम राजन यांसारखे अर्थतज्ञ सत्ताधाऱ्यांना का डोईजड होतात याचेदेखील आकलन होते.

एकाच उद्योगातील सर्व भांडवलदार एकत्र येऊन कार्टेल तयार करतात, आणि आपल्या ग्राहक आणि पुरवठादार यांच्यासोबतच्या किंमती निर्धारित करतात. अर्थातच स्वतःच्या फायद्यासाठी. उद्योजक म्हणून कार्यरत असताना आपणदेखील अश्या कार्टेलचा भाग कसा झालो होतो याची कबुली देऊन खरे सर त्यांच्याबाबत घडलेला गमतीशीर अनुभव सांगतात. खरं तर संपूर्ण पुस्तकामध्ये चुरचुरीत प्रसंग, संवाद, काही वेबसिरीज/सिनेमांमधील संदर्भ, गाणी, दोहे, शायरी यांची रेलचेल असल्यामुळे पुस्तक वाचताना विषय कुठंच जड होत नाही.

मूल्यहीन होत चाललेल्या अर्थव्यवहारांमुळे श्रीमंत आणि गरीब यातील दरी अधिक तीव्र होत जाऊन त्यात मध्यमवर्गीयांचे ध्रुवीकरण होणार. लुप्त होत जाणारा मध्यमवर्ग जर सशक्त झाला नाही तर मानवता हे मूल्य धूसर होत जाणार आणि निर्माण होणार अप्रत्यक्ष गुलामगिरी जन्माला घालणारे वेगळे जग, जिथं यंत्रवत जीवन सुरू असेल. जिथं मूठभर श्रीमंत रोबोटच्या दिमतीला असणार आहेत शेकडो, हजारो गरीब रोबोटस.. एका वर्गाला मोकळेपणाने जगता येणार नाही आणि एका वर्गाला जगणे म्हणजे काय हे समजलेलं नसणार.. अंतर्मुख करायला लावणारे हे पुस्तक आपल्या संग्रही असले पाहिजे. मनोविकासच्या वेबसाईटवर हे पुस्तकं सवलतीच्या दरात उपलब्ध आहेच, याशिवाय www.vaachan.com वर देखील मिळून जाईल.

बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन.

लेखक नंदा खरे

मनोविकास प्रकाशन

[email protected]

(लेखक वेगवेगळे शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध याबाबत अतिशय वेगळ्या शैलीत लेखन करतात . ‘डावकिनाचा रिच्या ‘ या नावाने फेसबुकवरील त्यांच्या लेखनाचे हजारो चाहते आहेत .’ज्ञानाचा प्रवाहो चालिला…’हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Previous articleजगण्याची जिगर…   
Next articleनरेंद्र लांजेवार : बुलढाण्याचा सांस्कृतिक दूत…   
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.