-अविनाश दुधे
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर सतत एकाच प्रवासाच्या Reels दिसत होत्या—पाताळपाणी–कालाकुंड हेरिटेज ट्रेनच्या!
हिरव्यागार डोंगरांच्या कुशीतून हळूहळू पुढे सरकणारी छोटीशी रेल्वे… धबधब्यांच्या जवळून जाणारी… कधी बोगद्यात अदृश्य होणारी… तर कधी खोल दरीवरच्या पुलावरून अलगद पुढे जाणारी…
या Reels पाहताना मन मात्र आजच्या काळात नव्हते.
ते थेट मागे गेले होते—१९९९ आणि २००१ मध्ये!
साप्ताहिक ‘चित्रलेखा’ च्या रिपोर्टिंगच्या निमित्ताने त्या काळात अकोला–इंदूर या मीटरगेज रेल्वे मार्गाने दोनदा प्रवास केला होता. मेळघाट आणि पुढे विंध्याचलाच्या पर्वतरांगांतून धावणाऱ्या त्या रेल्वेचा देखणेपणा तेव्हाच मनात खोलवर ठसला होता.
ती छोटीशी मीटरगेज गाडी, खिडकीबाहेर सतत बदलणारे डोंगर-दऱ्यांचे दृश्य, जंगलातून जाणारी पटरी, एखाद्या पुलावरून खाली डोकावणारी नदी आणि वळणावळणाने पुढे सरकणारा तो रेल्वेमार्ग…
तो प्रवास केवळ प्रवास नव्हता.
तो निसर्गाशी साधलेला एक संवाद होता.
नंतर काळ बदलला.
मीटरगेजचा तो ऐतिहासिक रेल्वेमार्ग बंद झाला. पटरी बदलली. गाड्या बदलल्या. आणि त्या मार्गाशी जोडलेल्या अनेक आठवणी इतिहासाच्या कप्प्यात जाऊन बसल्या.
मनात एक हळहळ कायम राहिली—
आता पुन्हा या मार्गावरून रेल्वे धावताना पाहायला कधीच मिळणार नाही
मात्र पाताळपाणी–कालाकुंड एवढ्याच छोट्या भागावर पावसाळ्यात हेरिटेज ट्रेन धावते, हे समजले आणि तेव्हापासून हा प्रवास करण्याची एक वेगळीच ओढ लागली.
ही ९.५ किलोमीटरची मीटरगेज पटरी अवघड डोंगराळ भूभागामुळे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाली नाही आणि भारतीय रेल्वेने तिचे ऐतिहासिक व निसर्गरम्य महत्त्व लक्षात घेऊन ती हेरिटेज ट्रेनसाठी जपली. २०१८ मध्ये या मार्गावर हेरिटेज ट्रेन सुरू झाली.
पण यंदा या प्रवासाची सुरुवातही काही सोपी नव्हती!
दरवर्षी जुलैपासून सुरू होणारी ही ट्रेन यंदा २० ऑगस्टपर्यंत सुरूच झाली नव्हती. अखेर २० ऑगस्टनंतर बुकिंग सुरू झाले.
पण बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अवघ्या अर्ध्या तासात सप्टेंबरअखेरपर्यंतची तिकिटे संपली!
निराशा झाली.
कसेबसे Waiting मिळाले.
पण हा प्रवास करायचाच होता.
तिकीट Waiting असतानाही इंदूर, महू गाठले.
माझ्या निसर्गयात्रांमध्ये जेव्हा जेव्हा एखादी अडचण उभी राहते, तेव्हा माझे जवळचे अधिकारी, पत्रकार मित्र—ज्यांना मी प्रेमाने ‘अल्लाउद्दीनचा दिवा’ म्हणतो—यावेळीही कामी आले.
त्यांनी आपल्या प्रभावाचा उपयोग करून येण्या-जाण्याचे तिकीट कन्फर्म करून दिले.
११ सप्टेंबर… पहाटे पाच वाजता!
पहाटे पाचलाच उठलो.
इंदूर अजून झोपेतच होते.
मेमू ट्रेनने महू गाठले आणि तिथून ऑटोने पाताळपाणी.
आणि काही वेळातच ते छोटेसे पाताळपाणी स्टेशन दिसले.
प्लॅटफॉर्मवर हेरिटेज एक्स्प्रेस उभी होती.
ती पाहताक्षणी मन अक्षरशः मोहरून गेले.
ज्या जुन्या मीटरगेज रेल्वेच्या आठवणी मनात घेऊन इतकी वर्षे फिरत होतो, त्याच जगाचा एक तुकडा आज माझ्यासमोर जिवंत उभा होता!
काही मिनिटांतच सहा डब्यांची ती ट्रेन प्रवाशांनी भरून गेली.
घड्याळाचे काटे अकराकडे सरकले.
शिट्टी झाली.
चाके हलली.
आणि मग…
इतिहास पुन्हा धावू लागला!
ही केवळ ट्रेन नव्हती… इतिहास धावत होता!
या रेल्वेमार्गाची कहाणी जवळपास दीडशे वर्षांची आहे.
इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी १८७० मध्ये आपल्या राजधानीला खंडव्याशी जोडण्यासाठी रेल्वे उभारण्याचा पुढाकार घेतला. खंडवा हे त्या काळच्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या मुख्य मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन होते.
योजलेला मार्ग खंडवा–सनावद–नर्मदा ओलांडून चोरल खोऱ्यातून विंध्याच्या उतारावर चढत महूकडे आणि पुढे इंदूरकडे जाणारा होता. होळकरांनी रेल्वे बांधकामासाठी मोठी आर्थिक मदत आणि जमीन देण्याची तयारी दाखवली होती.
१८७४ मध्ये खंडवा–सनावद विभाग सुरू झाला आणि पुढे नर्मदा ओलांडत हा मार्ग महू–इंदूरपर्यंत पोहोचला. १८८१–८२ मध्ये होळकर रेल्वेचा राजपूताना-माळवा रेल्वेशी संबंध आला आणि पुढे या मीटरगेज जाळ्याची व्याप्ती खूप मोठी झाली.
म्हणजे आज आपण ज्या पाताळपाणी–कालाकुंडच्या छोट्याशा पटरीवर दोन-तीन तासांचा निसर्गप्रवास करतो, ती कधीकाळी अकोला–खंडवा–पाताळपाणी–कालाकुं
माझ्यासाठी या इतिहासाची गंमत आणखी वेगळी होती.
कारण १९९९ आणि २००१ मध्ये मी याच जुन्या रेल्वे जगाचा प्रवासी होतो.
आणि आज पुन्हा त्याच इतिहासाच्या एका जिवंत तुकड्यावर बसलो होतो.
या घाटाची खरी कसोटी!
पाताळपाणी–कालाकुंडचा हा मार्ग फक्त देखणा नाही; तो अभियांत्रिकीच्या दृष्टीनेही थक्क करणारा आहे.
विंध्याचलाच्या या घाटात चढ अत्यंत तीव्र आहे. काही भागात gradient तब्बल १:४० पर्यंत जातो. त्यामुळे जुन्या काळी रेल्वेगाडीला घाट चढताना अतिरिक्त ‘बँकर’ इंजिनची मदत घ्यावी लागत असे.
डोंगर कापून तयार केलेली वळणे…
खोल दऱ्यांवरील पूल…
दगडी बांधकाम…
बोगदे…
आणि त्या सगळ्यातून जाणारी अरुंद मीटरगेज पटरी!
१५५ वर्षांपूर्वी अभियंत्यांनी या निसर्गाशी केलेली झुंज कल्पनेत आणली तरी अंगावर काटा येतो.
जुन्या काळच्या या घाटप्रवासाबाबत मशालींच्या उजेडाच्या काही कथा सांगितल्या जातात.
घनदाट जंगल…
डोंगराच्या कुशीतला अंधार…
वाफेच्या इंजिनाचा आवाज…
आणि बोगद्याच्या काळोखात डोकावणारा एखादा लुकलुकता दिवा!
त्या काळच्या रेल्वेप्रवासाचा रोमांच किती वेगळा असेल!
पाताळपाणी मागे पडले… आणि निसर्गाचा पडदा उघडला!
गाडी पुढे सरकली.
डोंगर जवळ येऊ लागले.
हिरवाई अधिक गडद होत गेली.
पावसाने धुऊन निघालेल्या दगडांना काळसर झळाळी आली होती.
आणि अचानक…
धबधबा!
दरीच्या कड्यावरून पाण्याचा शुभ्र पडदा खाली कोसळत होता.
पाताळपाणीचा धबधबा चोरल नदीच्या परिसरातील या घाटाला जणू निसर्गाने दिलेली भव्य प्रस्तावना आहे.
गाडी पुढे जात होती आणि निसर्ग दर काही मिनिटांनी नवा चेहरा दाखवत होता.
कधी डोंगर.
कधी दरी.
कधी धबधबा.
कधी हिरव्या झाडीतून डोकावणारा चोरलचा प्रवाह.
आणि मग अचानक—
बोगदा!
क्षणात बाहेरचा प्रकाश नाहीसा.
डब्यात अंधार.
चाकांचा आवाज मोठा.
काही क्षणांचा काळोख.
आणि पुन्हा—
समोर हिरवाईचा उजेड!
या छोट्याशा घाटमार्गावर चार बोगदे आहेत. जुन्या रेल्वे बांधकामाचा हा भाग आजही या मार्गाच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतो.
या मार्गावर खोल दऱ्या, उंच embankments, बोगदे, पूल आणि नैसर्गिक झरे अशी निसर्ग आणि अभियांत्रिकीची विलक्षण सांगड आहे.
आणि सगळ्यात गंमत म्हणजे ट्रेनचा वेग!
सरासरी वेग साधारण ५ ते १० किलोमीटर प्रतितास.
रेल्वे एवढी हळू धावते की सभोवतालचा निसर्ग टिपायला पुरेसा वेळ मिळतो.
धबधबा पाहता येतो.
दरीत डोकावता येते.
डोंगराच्या कपारीत दडलेला झरा टिपता येतो.
आणि फोटो काढून होईपर्यंत ट्रेन पुढच्या दृश्यापर्यंत पोहोचलेली असते!
कालाकुंड… नावातच गोडवा!
आणि मग हळूहळू कालाकुंड जवळ येऊ लागले.
छोटेसे स्टेशन.
भोवती हिरवे डोंगर.
पावसाने ओलावलेली माती.
दूरवर पसरलेली शांतता.
शहराच्या गोंगाटापासून दूर असलेले हे स्टेशन पाहताना मनाला एक वेगळाच निवांतपणा जाणवतो.
आणि मग आठवण होते—
कलाकंदाची!
कालाकुंडला गेल्यावर कलाकंद न खाता परतणे म्हणजे जणू या प्रवासाचे एक पान वाचून पुढे जाण्यासारखे!
दूध आणि खव्याचा तो मऊसर, दाणेदार गोडवा…
एका हातात कलाकंद…
आणि दुसऱ्या बाजूला डोंगरांवरून ओघळणारा पाऊस!
निसर्ग आणि चव यांची अशी जोडी दुसरी कुठे मिळणार?
… त्याच मार्गाने परतीचा प्रवास!
काल पाताळपाणी ते कालाकुंड प्रवास केला.
आज कालाकुंड ते पाताळपाणी या ऐतिहासिक पटरीवरून परतीचा प्रवास केला.
दृश्य तेच.
डोंगर तेच.
धबधबे तेच.
बोगदे तेच.
पूल तेच.
चोरल नदी तीच
पण अनुभव मात्र वेगळा.
कारण निसर्ग कधीच तसाच राहत नाही.
काल पुढे जाताना जे दृश्य मागे पडले होते, ते आज समोरून येत होते.
काल ज्या बोगद्यात शिरलो होतो, आज त्यातून बाहेर पडताना समोर उघडणारी हिरवाई आणखीच मोहक वाटत होती.
काल ज्या धबधब्याला एका बाजूने पाहिले, आज त्याच्याकडे परतीच्या प्रवासात दुसऱ्या दिशेने पाहिले.
एकच पटरी.
पण दोन वेगळे अनुभव!…
चोरल नदीत एक तास!
रेल्वेच्या खिडकीतून काल ज्या चोरल नदीला पाहिले होते, आज सकाळी तिच्याच पाण्यात उतरायचे ठरवले.
आणि मग काय!
एक तास मनसोक्त चोरलच्या पाण्यात डुंबलो.
डोंगरांच्या कुशीतून वाहणारे थंडगार पाणी अंगावर घेताना कालच्या रेल्वेप्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
काही प्रवास डोळ्यांनी पाहायचे असतात.
हा अवघा काही किलोमीटरचा प्रवास.
पण त्यात जवळपास दीडशे वर्षांचा इतिहास सामावलेला.
होळकरांची दूरदृष्टी.
ब्रिटिशकालीन रेल्वे अभियांत्रिकी.
विंध्य पर्वतांचा घाट.
तीव्र चढ.
बोगदे.
पूल.
धबधबे.
चोरल.
कालाकुंडचा कलाकंद.
आणि या सगळ्याला जोडणारी…
हळूहळू पुढे सरकणारी एक छोटीशी हेरिटेज ट्रेन!
माझ्यासाठी मात्र हा प्रवास यापेक्षाही मोठा होता.
तो १९९९ मध्ये परत जाणारा प्रवास होता.
तो २००१ च्या ‘चित्रलेखा’ च्या रिपोर्टिंगच्या आठवणी जागवणारा प्रवास होता.
तो अकोला–खंडवा–पाताळपाणी–कालाकुं
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—
तो बंद झालेल्या एका रेल्वेच्या आठवणींना पुन्हा धावताना पाहण्याचा प्रवास होता.
8888744796
………………………………………….
अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.














