नितीशकुमारांची चाल तिरकी ?

प्रवीण बर्दापूरकर

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ची धामधूम सुरु असतांनाच इकडे बिहारमध्ये सत्तापालट झाला. भाजपसोबत ( अपेक्षित ) घटस्फोट घेऊन नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत पुन्हा एकदा घरोबा केलेला आहे . वरवर पाहता भाजपची साथ सोडून नितीशकुमार राष्ट्रीय जनता दलासोबत गेले असं वाटत असलं तरी , काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’च्या नेमक्या सुरु होण्याच्या काळातच हे घडलेलं असल्यानं नितीशकुमार तिरकी चाल तर खेळलेले नाहीत ना , असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे . ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्तानं काँग्रेस पक्षाला संजीवनी प्राप्त करुन देणं आणि नरेंद्र मोदी व भाजप विरुद्ध देशाच्या तळागाळात जनमत संघटित करणं हे जरी हेतू आहेत तरी राहुल गांधी यांचं नेतृत्व देशाच्या तळागाळापर्यंत पंतप्रधान म्हणून रुजलं जावं हाही एक सुप्त हेतू असणं अतिशय स्वाभाविक आहे आणि नितीशकुमार यांच्या संदर्भात शंका निर्माण करण्यासाठी नेमका हाच हेतू शंकेला वाव देणारा आहे . कारण भाजप आणि काँग्रेसेत्तर विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून पंतप्रधानपदाचा तिसरा पर्याय उभा करण्याच्या हालचाली नितीशकुमार यांनी सुरु केल्या आहेत . कोणत्याही निवडणुका हाकेच्या अंतरावर आल्या की, विदर्भातील अनेकांना स्वतंत्र विदर्भाची उचकी लागते , तसं नितीशकुमार यांचं झालेलं आहे . एक निवडणुकीआड पंतप्रधानपदाचे पर्यायी उमेदवार म्हणून नितीशकुमार यांचं नाव पुढे येतं म्हणा किंवा नितीशकुमार यांच्या कच्छपी लागलेली माध्यमे ते पुढे आणतात म्हणा पण , हे सातत्यानं घडत आलेलं आहे हे मात्र खरं .

भाजपच्या विरोधात उभं राहण्याबाबत , १९८५साली सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून आलेल्या आणि  बाहत्तर वर्षीय नितीशकुमार यांची नियत साफ नाही , असंच गेल्या अडीच दशकांचा त्यांचा प्रवास सांगतो . २००१ पासून आतापर्यंत जवळजवळ पंधरा वर्षे ते भारतीय जनतासोबत घरोबा करुन होते . १९९८ ते २००४ पर्यंत तर ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते . या काळात रस्ते वाहतूक , कृषी आणि रेल्वे यासारखी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहेत . नंतरही २०१३ पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावरच बिहारचं मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांनी सांभाळलं . २०१४च्या निवडणुकांआधी जेव्हा एनडीए नव्हे तर भाजपनं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव निश्चित केलं तेव्हा नितीशकुमारांच्या वाट्याला घोर निराशा आली . तेव्हाची कारणं स्पष्ट होती – अटलबिहारी वाजपेयी अंथरुणाला खिळलेले होते . लालकृष्ण अडवाणी यांना जाणीवपूर्वक बाजूला टाकण्यात आलेलं होतं , अशा वेळी एनडीएचा सर्वसंमतीचा आणि तडजोडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नितीशकुमार यांचं नाव पुढे येईल अशा अटकळी देशाच्या राजकीय वर्तुळात बांधल्या जात होत्या . ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नाही असं जे म्हणतात त्याप्रमाणे कुठे ना कुठे काहीतरी खुट्ट वाजल्याचा आवाज होत नाही तोपर्यंत त्याची बातमी होत नाही . पंतप्रधानपदाचं हे खुट्ट नितीशकुमार यांच्याच गोटातून वाजवलं गेलं होतं हे स्पष्टच आहे . ( या काळात प्रस्तुत पत्रकार दिल्लीत राजकीय संपादक  म्हणून कार्यरत होता , म्हणूनच ही माहिती . )

नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होताच नितीशकुमार यांचा अर्थातच स्वप्नभंग झाला आणि भाजप हा धर्मांध पक्ष असल्याचा साक्षात्कार नितीशकुमार यांना झाला . त्यावेळी नितीशकुमार यांनी केवळ भाजपचीच साथ सोडली नाही तर एनडीएतूनही ते बाहेर पडले ; त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत युती करुन बिहारचं मुख्यमंत्रीपद मात्र स्वत:कडे राखण्यात यश मिळवलं . २०१७ मध्ये पुन्हा एकदा भाजप हा आपला मित्र पक्ष असल्याचा दैवी (?) साक्षात्कार नितीशकुमार यांना झाला आणि ते नरेंद्र मोदीच पंतप्रधान असूनही पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी झाले . बिहारमध्ये नितीशकुमार यांनी एव्हाना चांगल्यापैकी जम बसवलेला होता आणि त्यांना सोबत घेतल्याशिवाय राज्यात सरकार स्थापन करता येणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली होती . मात्र या स्थितीला अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवानला समोर करुन भाजपनं नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दलाला चांगलचं बॅकफूटवर नेलं . निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं मुख्यमंत्रीपद दिलं तरी नितीशकुमार खुश नव्हते आणि त्याचा परिणाम अखेर गेल्या महिन्यात बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तापालट होण्यात झालेला  आहे . राष्ट्रीय जनता दल भ्रष्ट असल्याचा आरोप करुन २०१७ साली युती मोडणाऱ्या नितीशकुमार यांनी त्याच राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केलं आहे आणि ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आताही नितीशकुमार यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेले आहेत . हा असा उफराटा प्रवास नितीशकुमार यांनी तत्त्व म्हणून सात्विक वृत्तीनं तर नक्कीच केलेला नाही .

नितीशकुमार यांचा राजकीय इतिहास ‘भाजपानुकूल’ समाजवाद्यांना तंतोतंत शोभणारा आहे . शिवाय भाजपसोबत जो काही तळ्यात-मळ्यातला खेळ सत्तेसाठी नितीशकुमार खेळले आहेत तो खेळ ‘आयाराम गयाराम’ संस्कृतीचे भारतीय राजकारणातले महामेरु भजनलाल यांनाही लाजवणारा आहे . थोडक्यात देशातल्या विद्यमान राजकारणात सत्तेसाठी संधीसाधूपणा करणारे नितीशकुमार हे ‘विश्वगुरु’ आहेत . असाच खेळ त्यांनी त्यांच्याच पक्षाचे शरद यादव यांच्यासोबत मांडला होता . लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबतही सत्तेसाठी कोलांट उड्या मारणारे नितीशकुमारच आहेत . नैतिकतेचा आव आणून जीतन मांझी यांना काही काळ मुख्यमंत्रीपदावर बसवणारे आणि हे मांझी डोईजड होत आहेत हे लक्षात आल्यावर त्यांना उचलून फेकणारेही नितीशकुमारच आहेत . जॉर्ज फर्नाडिस यांच्यासोबत समता पार्टी स्थापन करणारे आणि नंतर त्याच जॉर्ज फर्नाडिस यांना धोबीपछाड देणारे नितीशकुमार आहेत . नितीशकुमार यांची प्रत्येक चाल दीर्घकाळ भाजपसोबत राहून इतर पक्षांना टांग मारण्याची म्हणजेच भाजपचा फायदा करुन घेणारी आहे हे लक्षात घेतलं की , नितीशकुमार यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाचा तिसरा पर्याय म्हणून समोर आणण्याचा जो खटाटोप सुरु केला आहे तो राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला अपशकुन करण्याची तिरकी चाल तर नाही ना , असा प्रश्न निर्माण होतो .

भाजप विरोधाबाबत आधीचं सोडूनच द्या पण , विशेषत: २०१४ नंतर नितीशकुमार नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात ठामपणे उभे राहिलेले नाहीत उलट सत्तेसाठी दोनदा भाजपच्याच वळचणीलाच राजरोसपणे जावून आलेले आहेत . मात्र याच काळात नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपवर थेट वार करण्याचं धाडस एकट्या राहुल गांधी यांनीच दाखवलेलं आहे . ( या काळात काँग्रेसचेही नेते राहुल गांधी यांच्यासोबत संघटितपणे उभे राहिलेले नव्हते .)  २०१४ नंतर झालेल्या बहुतेक सर्व निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला तरी राहुल गांधी यांची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही . उलट किंचित का होईना वाढलेलीच आहे . हिंस्त्र व धर्मांध हिंदुत्वाची झापड न बांधलेल्या तरुणांमध्ये राहुल गांधी यांची क्रेझ वाढलेली आहे . ‘भारत जोडो यात्रे’तून राहुल गांधी यांची प्रतिमा अधिकाधिक उजळ होत जाणार आहे आणि भाजपेत्तर पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचा दावा भक्कम होत जाणार आहे . राहुल गांधी यांचं नेतृत्व ममता बनर्जी , मायावती , मुलायमसिंग यादव , नितीशकुमार , चंद्राबाबू नायडू या नेत्यांना मान्य होणारं नाही , हे स्पष्टच आहे कारण हे सर्व नेते पंतप्रधानपदाचे इच्छुक आहेत . यापैकी एकही नेता राष्ट्रीय मान्यतेचा नसला तरी देशाचं नेतृत्व भविष्यात राहुल गांधी यांच्याकडे जाऊ नये याबद्दल मात्र या सर्व नेत्यांमध्ये राष्ट्रीय एकमत आहे . देशात काँग्रेस पक्ष आणखी किमान एक लोकसभा निवडणूक होईपर्यंत म्हणजे २०३०पूर्वी  तरी निर्विवादपणे सरकार स्थापन करु शकणार नाही हे खरं असलं तरी , त्या काळात राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांचा एकमेव पर्याय म्हणून मान्यता मिळू नये ही या नेत्यांची इच्छा असणारच त्या सर्वांच्या इच्छांच्या वाटांवर चालण्याची तिरकी चाल नितीशकुमार खेळत आहेत , असं म्हणायला खूप मोठा वाव आहे .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleबेडूक जोडप्याच्या घटस्फोटाची गोष्ट!
Next articleपुरुषवेश्या? होय..  
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.