अडवाणी नावाची महाशोकांतिका…

-प्रवीण बर्दापूरकर

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आठवड्यातले सर्वाधिक चर्चेतले चेहरे आहेत राष्ट्रीय पातळीवर लालकृष्ण अडवाणी आणि राज्याच्या पातळीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे . नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यापासून लालकृष्ण अडवाणी यांचा हळूहळू नियोजनबद्ध अस्त केला जातोय अशी भूमिका घेत मी सलग लिहितो आहे ; अर्थातच अडवाणी भक्तांना ते मान्य नाही . नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा लालकृष्ण अडवणी आता राष्ट्रपती होणार असा युक्तीवाद लालकृष्ण अडवाणी भक्तांनी सुरू केला होता . मात्र ते त्यांचं सांकेतिक समाधान आहे अशी माझी ठाम धारणा होती कारण , हे सगळं एका दिवसात घडलेलं नाहीये ; त्यामागे एक नियोजनबद्ध खेळी आहे हे स्पष्ट दिसत होतं ; एक पत्रकार म्हणून मी ते अनुभवत होतो . पद्मविभूषण हा देशाचा क्रमांक दोनचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाल्यावर आता लालकृष्ण अडवाणी कधीही या देशाचे राष्ट्रपती होणार नाहीत , असं मत मांडलं तेव्हाही भक्त माझ्यावर खवळले होते . पण , त्यांना मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी ही जोडी काय आणि किती मोजून पावलं उचलते आहे हे कळत नव्हतं , असं माझं म्हणणं होतं . 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असतांना भाजपचे ज्येष्ठ नेते , शोकाकूल लालकृष्ण अडवाणी यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं या मजकूरसोबत दिलेलं एक छायाचित्र इंटरनेटवर बघितलं तेव्हा लिहिलेल्या मजकुरात ( नेमकी तारीख सांगायची तर , ३१ ऑगस्ट २०१८ पुनरुक्ती होत असूनही तो मजकूर देतोय ) मी म्हटलं होतं- “एकेकाळी पक्षाचे सर्वेसर्वा ते भावी पंतप्रधान ते अडगळीत गेलेले आणि आता पूर्णपणे एकाकी पडलेले लालकृष्ण अडवाणी , हा प्रवास त्या अश्रूंतून डोळ्यासमोर झळकला .  जाणीव-नेणीवेच्या पल्याड गेलेले असले तरी ,वाजपेयी यांचा असलेला आधार तुटल्याचं दु:ख व्यक्त करणारे ते अडवाणी यांचे अश्रू होते . वाजपेयी राजकारणाच्या पडद्यावरुन गायब होऊन जवळ जवळ दशक उलटलं . अडवाणीही तसे अडगळीत होते . नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर भाजपातला वाजपेयी-अडवाणी युगाचा अस्त झालेलाच होता . वाजपेयी यांच्या निधनानं अडवाणी यांच्या वाट्याला आलेलं एकाकीपण टिपणार्‍या त्या छायाचित्राला दादच दयायला हवी . दहा हजार शब्द जे सांगू शकत नाही ते एक छायाचित्र जास्त प्रभावीपणे व्यक्त करु शकतं , असं जे म्हणतात त्याचा साक्षात प्रत्यय देणारं हे अडवाणी यांचं छायाचित्र आहे . सर्वोच्च पदाची सत्ताकांक्षा फलद्रूप न झाल्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन समकालिन राजकारणावर वास्तववादी कादंबरी लिहिली गेली तर ती एक अत्यंत कसदार शोकात्म ललित कृती होईल ; शरद पवार , नारायण राणे ,मायावती , मुलायमसिंह असे काही त्या कादंब-यांचे नायक असू शकतील . लालकृष्ण अडवाणी यांच्यावरची कादंबरी मात्र महाशोकांतिका असेल आणि लालकृष्ण अडवाणी महानायक ठरतील !

लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या भाजप या राजकीय पक्षाचा एकांगी हिंदुत्ववाद ,राजकारणाची ( अनेकदा हिंसक झालेली व त्याची देशाला फार मोठी किंमत मोजावी लागलेली ) शैली आणि धर्मांधता प्रस्तुत भाष्यकाराला पूर्णपणे अमान्य असली तरी त्यांचं राजकीय कर्तृत्व उंच , व्यापक , राष्ट्रीय पातळीवरचं ; महत्वाचं म्हणजे वैयक्तिक तसंच सार्वजनिक पातळीवर स्वच्छ चारित्र्याचं आहे ; ( हवाला प्रकरणात त्यांचं नाव आलं पण , पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जात त्यांनी निर्दोषत्व सिध्द केलं ) . त्यांची अव्यभिचारी पक्षनिष्ठा आणि अविश्रांत राजकीय तपस्या तब्बल साडेसातपेक्षा जास्त दशकांची आहे . आता पाकिस्तानात असलेल्या कराचीत ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेले लालकृष्ण अडवाणी त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर झालेल्या फाळणीच्या भळभळत्या जखमां घेऊन भारतात आले आणि इथल्या समाज जीवनाचं एक कट्टर व अभिन्न अंग झाले . ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले ते १९४२ पासून ; तेव्हापासून ते राजकीय आणि सार्वजनिक जीवनात आजवर सक्रीय आहेत . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पूर्ण वेळ प्रचारक होते . नंतर त्यांना जनसंघात पाठवण्यात आलं . जनसंघ ते जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे आणि तो प्रचंड खाचखळग्यांचा तसंच अनेक नैराश्यपूर्ण घटनांचाही असला तरी कधी खचल्याची जी पुसटशीही रेषा त्यांच्या करड्या चेहेऱ्यावर उमटलेली दिसली नाही आणि आता दिसले ते अश्रू…

भारतीय राजकारणातली वाजपेयी-अडवाणी ही जोडी आजवरची सर्वात यशस्वी आणि त्यांच्यातली दोस्ती सुमारे ६५ वर्षांची ; इतकं वय असणारी जोडी भारतीय राजकारणात आजवर झालेली नाही . लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी हा पक्ष शून्यातून राष्ट्रीय पातळीवर उभा केला , देशभर पक्षाची पाळंमुळं रुजविली . पक्षाचा चेहेरा व वाणी उदारमतवादी अटलबिहारी वाजपेयी तर कठोर श्रम व कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा लालकृष्ण अडवाणी यांचा ; अशी कायम विभागणी राहिली . कामाची ती जबाबदारी लालकृष्ण अडवाणी यांनी नेहेमीच कोणतीही कुरकुर न करता स्वीकारली . विचारी पण ठाम , जहाल पण संयमी ,शांत व धोरणी आक्रमकता असं गुणवैशिष्ट्य असणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे . राजकीय लाभासाठी राम जन्मभूमी आंदोलनाचा भडका अडवाणी यांनीच उडवला ( आणि समाज दुभंग करणाऱ्या धर्मांध राजकारणाला देशात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली . म्हणूनच जातीय आणि धार्मिक समीकरणांचा ‘सांगोपांग’ विचार करुन राजकारण करणाऱ्या देशातील मायावती ,मुलायमसिंह , ओवेसी अशा अनेकांचे अडवाणी हे ‘गुरु’ शोभतात . ) त्यासाठी अडवाणी देशात वणवण फिरले . प्रमोद महाजन यांचं सारथ्य आणि लालकृष्ण अडवाणी यांची यात्रा हे समीकरणच एकेकाळी देशाच्या राजकारणात रूढ झालं होतं .

देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत लालकृष्ण अडवाणी पोहोचले . ते जेव्हा उपपंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी थकलेले होते ; स्वाभाविकच लालकृष्ण अडवाणी हेच केंद्रीय सरकारचे सर्वेसर्वा होते . माझं म्हणणं अनेकांना रुचणार नाही पण , नमूद करतोच; ‘प्रथम देश आणि मग पक्ष’ अशी भूमिका घेत म्हणजे , काही वेळा रा. स्व. संघाचा अजेंडा बाजूला ठेऊन ; पंतप्रधान वाजपेयी आणि उपपंतप्रधान अडवाणी यांनी केंद्र सरकार चालवतांना पंडित जवाहरलाल नेहेरु यांनी आखून ठेवलेली परराष्ट्र धोरणांची चाकोरी बदलली नाही , देशाच्या सेक्युलर भूमिकेला तडा न जाऊ देण्याचा प्रयत्न केला आणि संघ धुरिणांची इच्छा डावलून पाकिस्तानशी असलेले संबध अधिक सुरळीत व सौहार्दाचे होण्यासाठी प्रयत्न केले . म्हणूनच त्या दोघांची जनमानसातली प्रतिमा उजळली . २००४ पाठोपाठ २००९च्या लोकसभा निवडणुका भाजपने अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या पणभाजपचं स्वबळावरचं किंवा एनडीएचं सरकार स्थापन होण्याइतकं बहुमत मिळालं नाही ; उलट कॉंग्रेस सभागृहातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला ; केंद्रात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार सलग दोन वेळा  सत्तारूढ झालं . तेव्हाच संघाच्या दृष्टीकोनातून लालकृष्ण अडवाणी यांची किंमत शंभर टक्के उतरलेली होती !

इथे एक बाब ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ‘परिवारात जसजसे सर्वशक्तिमान होत गेले तस-तसं लालकृष्ण अडवाणी यांचं पक्षातलं स्थान डळमळीत होत गेलं . आधी लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद काढून सुषमा स्वराज यांच्याकडे दिलं गेलं ; मग ( अडवाणी यांची ईच्छा नसतांना ) रा. स्व. संघाचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ नितीन गडकरी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं ; नंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना समोर आणलं गेलं ; अशी ही लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान न होऊ देण्याची ‘परिवाराकडून खेळली गेलेली एक नियोजनबध्द प्रदीर्घ खेळी होती ; राष्ट्रपतीपद त्यांना मिळणारच नव्हतं . भारतीय राजकारणाच्या पटावर सध्या तरी लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखा इतकी मोठी इनिंग्ज खेळलेला , अविश्रांत कठोर श्रम घेतलेला , अनुभवी नेता दुसरा कोणीही नाही . मात्र त्यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा फलद्रूप झालीच नाही…ज्या राम मंदिरासाठी त्यांनी इतका हिंसक संघर्ष केला तो ‘राम’ लालकृष्ण अडवाणी यांना पावलाच नाही . तब्बल ९१ उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला या खेळी समजल्या कशा नाहीत ; कुठे थांबावं हे त्यांना कळलं कसं नाही ? खरं तर , या खेळी समजूनही जर महत्वाकांक्षा जाणीवपूर्वक तेवतच ठेवली गेली असेल तर , ही महाशोकांतिका ओढावून घेण्यास लालकृष्ण अडवाणी हेही तितकेच जबाबदार आहेत ; असा निष्कर्ष काढला तर तो अवाजवी ठरणार नाही . २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर अडगळीच्या खोलीत ढकलले गेलेले अडवाणी आता वाजपेयी यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले आहेत…” आता तर लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या गांधी नगर या लोकसभा मतदार संघातून उमेदवारीच नाकारण्यात आलेली आहे किंवा भक्तांच्या भाषेत सांगायचं तर , वयाच्या ९२ व्या वर्षी आता त्यांची निवडणूक लढण्याची सर्व इच्छा संपली आहे ! पण याचा अर्थ पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा बाळगलेली एक प्रदीर्घ राजकीय लढाई अडवाणी अंतिमत:  हरलेले आहेत ; एका राजकीय शोकांतिकेचा नायक म्हणून त्यांचं नाव नोंदवलं जाईल . अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेच्या प्रसंगी अडवाणी यांच्या डोळ्यात आलेले , महाशोकांत नायकाचेही हताश्रू होते… 

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच मुरली मनोहर जोशी , कलराज मिश्र , ( निवडणूक लढवणार नाही असं चाणाक्षपणे आधीच जाहीर करणार्‍या )  सुषमा स्वराज यांनाही वगळण्यात आलेलं आहे . भारतीय जनता पक्षात वाजपेयी-अडवाणी युगाचा पूर्ण अस्त झाला असून यापुढे या पक्षावर मोदी-शहा शैली आणि वृत्तीची पकड राहणार हाही याचा आणखी एक अर्थ आहे !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

919822055799
Previous articleतुम्हाला आईच्या योनीतून जन्मच नाही मिळणार
Next articleनेहरूंचा विवाह
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.