महिलांना शक्ती देणारं रावेरीतील सीता मंदिर

(साभार: दैनिक ‘दिव्य मराठी’)

-अविनाश दुधे

जगात प्रभू रामचंद्रांची मंदिरं अनेक ठिकाणी आहेत. परंतु सीतेची अशी स्वतंत्र मंदिरे मात्र अगदी मोजकी आहेत. श्रीलंका, नेपाळबरोबर भारतात बिहारच्या सीतामढ़ीत, मध्यप्रदेशात करीला व हरियाणात कर्नालजवळ सीतेचे मंदिरे आहेत. विदर्भाच्या रावेरीतील सीता मंदिराने मात्र महिलांना शक्ती देणारे केंद्र म्हणून ख्याती मिळविली आहे .
…………………………………………………
अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांशी संबधित अनेक पौराणिक स्थळांच्या इतिहासाला नव्याने उजाळा मिळत आहे. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथील सीता मंदिर यापैकीच एक. महाराष्ट्रातील एकमेव सीता मंदिर अशी ख्याती असलेल्या येथील वनवासी सीता मंदिर परिसरातील माती भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत पाठविण्यात आली आहे. रावेरी येथील सीता मंदिराची कथामोठी विलक्षण आहे. प्रभू रामचंद्राच्या राज्यभिषेकानंतर लोकोपवादामुळे वनवासात जावे लागलेल्या सीतेचे वास्तव्य दंडकारण्याचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावेरी परिसरात होते, अशी या परिसरातील लोकांची श्रद्धा आहे. राळेगाव या तालुका ठिकाणापासून ३ किमी अंतरावर रामगंगा ( रामायणकाळात या नदीला ‘तमसा’ म्हणून ओळखली जायचे , असे सांगितले जाते) नदीच्या किनाऱ्यावर सीतेचे हेमाडपंती मंदिर आहे. तिथे सीतेची पाषाणाची मूर्ती आहे.

रावेरी गावातील वयोवृद्ध मंडळी जी आख्यायिका सांगतात, त्यानुसार, लक्ष्मणाने सीतेला गरोदर अवस्थेत दंडकारण्यात सोडल्यानंतर वाल्मीकी ऋषींच्या आश्रयाने ती येथे राहू लागली . येथेच लव-कुशाचा जन्म झाला. मुलांच्या जन्मानंतर सीतेने गावातील लोकांकडे पसाभर गहू मागितला. मात्र, गावकऱ्यांनी तो देण्यास नकार दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या सीतेने या गावात कधीही गहू पिकणार नाही, असा शाप गावकर्‍यांना दिला. शेकडो वर्ष रावेरी आणि पंचक्रोशीत गहू पिकत नव्हता. २० व्या शतकाच्या प्रारंभी रावेरीवासीयांनी मंदिरातील सीतेच्या मूर्तीला साकडे घालून सीता मंदिरात भेट दिल्याशिवाय आम्ही गव्हाचा एकही दाणा खाणार नाही,असा संकल्प केल्यानंतर येथे गहू पिकायला लागला, असे गावकरी सांगतात. या कथेतील खरेखोटेपणा तपासण्याचा काही मार्ग नाही . मात्र रावेरीतील सीता मंदिर परिसरात अनेक पुरातन अवशेष आहेत, हे खरं.

या मंदिराच्या बाहेरील भागात बांधून ठेवलेल्या अवस्थेतील हनुमंताची ९ फ़ूट उंचीची भव्य मूर्ती आहे. त्याबाबत असे सांगितले जाते की, रामाने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा यज्ञाचा घोडा लव-कुशांनी येथे अडविला. त्या घोड्याबरोबर असलेल्या शत्रुघ्न, लक्ष्मण व हनुमानाचा त्यांनी पराभव केला. या वेळी हनुमंताला त्यांनी रानवेलींनी बांधून ठेवले होते. त्या तशाच अवस्थेतील मूर्ती येथे आहे. मंदिराच्या बाजूचा परिसर हा वाल्मीकी ऋषीचा आश्रम होता, असे सांगितले जाते. याच परिसरात पाच मोठे बुरूज(गढी) व परकोटही पाहावयास मिळतो.

अनेक वर्षांपर्यंत सीता मंदिर आणि परिसर दुर्लक्षित अवस्थेत होता. शेतकरी संघटना ऐन भरात होती, तेव्हा संघटनेचे संस्थापक शरद जोशी राळेगाव परिसरात दौऱ्यावर आले असतांना त्यांना बाळासाहेब देशमुख,शैलजाताई देशपांडे, प्रज्ञा बापट व इतर गावकऱ्यांनी या मंदिराची माहिती दिली. त्या काळात संघटनेने लक्ष्मीमुक्ती कार्यक्रम हाती घेतला होता . घरातील महिलेला सन्मानाचे स्थान मिळायला हवे. घरावर, शेतीवर पुरुषांएवढाच तिचा अधिकार असला पाहिजे,यासाठी संघटना शेतकऱ्यांमध्ये जागृती करत होती. या कार्यक्रमासाठी सीतेच्या मंदिराचा प्रतीक म्हणून उपयोग होऊ शकतो, हे लक्षात येताच १९९४ ला शेतकरी महिला आघाडीने लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाचे येथे आयोजन केले.

एका राजाची भूमिकन्या, रामासारख्या पराक्रमी राजाची पत्नी असलेल्या सीतेला केवळ स्त्री असल्याने अनेक कष्ट आणि यातनांना सामोरे जावे लागले .शेतकरी कुटुंबातील महिलांना अशा दु:खांचा नेहमीच सामना करावा लागतो. त्यामुळे वनवासकाळात सीतेला आधार देणारं रावेरी हे स्त्रियांना आधार देणारं केंद्र व्हायला हवं, परित्यक्त्या महिलांचं रावेरी माहेरघर झालं पाहिजे, अशी भावना शरद जोशींनी त्या कार्यक्रमात बोलून दाखवली.

पुढे नोव्हेंबर २००१ ला शेतकरी महिला आघाडीचे अधिवेशन रावेरीला झाले. त्या अधिवेशनानंतर संघटनेचे हजारो स्त्री- पुरुष वर्धा रेल्वे स्टेशनवर धडकले. तिथे त्यांनी कर्जमुक्ती व कापसाला भाववाढ मिळावी, या मागणीसाठी तीन दिवस रेल्वे व रास्तारोको आंदोलन केले होते. या अधिवेशनात रावेरीच्या सीता मंदीराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प शरद जोशींनी जाहीर केला होता आणि त्यासाठी स्वतःजवळचे दहा लाख रुपये दिले . शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही भरघोस मदत दिली . त्यातून मंदिराचा कायापालट करण्यात आला. मूळ ढाचा कायम ठेवून नुतनीकरण करण्यात आलेल्या मंदिराचे २ ऑक्टोबर २०११ ला शरद जोशीयांच्या उपस्थितीतच लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून रावेरीत सीता मंदिराला भेट देण्यासाठी राज्य आणि देशाच्या विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने येतात. सीता नवमीला येथे भरपूर गर्दी होते. त्यादिवशी येथे ग्रामीण महिला दिन साजरा केला जातो . अनेक महिलांना सन्मानितही केले जाते.

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत.)
8888744796

रावेरीतील सीता मंदिर- सोबतचा व्हिडीओ नक्की पाहा

Previous articleसोमेश्वर यारा, तुम बहोत याद आओगे !
Next articleडोक्यातला अस्पर्श प्रांत…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.