कदम कदम बढाये जा…

– मधुकर भावे

श्री. राहुल गांधी यांच्या पदयात्रेसाठी १३ आणि १४ नोव्हेंबरला नांदेड, हिंगोली येथे गेलो होतो. सोबत ५ पत्रकार मित्र होते. १० वर्षांपूर्वी जर ही यात्रा झाली असती तर संपूर्ण यात्रा चाललो असतो. ८३ व्या वर्षी निसर्गाची बरीच बंधने आहेत. झपझप चालण्यात अडचण आहे… ५० वर्षे असाच झपझप चालत होतो. आज ते अवघड आहे. पण, यात्रेमध्ये पोहोचावे, राहुल गांधी यांना भेटावे, यासाठी मन उत्सुक होते. मुंबईत होतो पण, मनाने यात्रेसोबतच होतो. सुदैवाने नाना पटोले यांचा फोन आला. त्यांनीच ही भेट आयोजित करून दिली. येणारी वृत्ते अशी होती की, यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि गर्दी… राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीसुद्धा खूप चालावे लागणार होते. ते सर्व पत्करून जायचे ठरवले. इच्छाशक्ती असेल तर शारिरीक अडचणी आपोआप दूर होतात. तसेच झाले. एका प्रचंड उत्साहात हा सगळा जनसागर पाहता आला. ही यात्रा आता राहुल गांधी यांची राहिली नाही नाही. ती जनतेने अंगावर घेतलेली आहे. नुसती अंगावर घेतली नाही तर पूर्ण समरस होवून लाखोंची जनता यात्रेत चालते आहे.  नुसती चालत नाही तर, प्रत्येकाच्या मनात उजाडणारी सकाळ दिवाळीच वाटते. रस्त्या-रस्त्यावर काढलेल्या रांगोळ्या… हिंगोलीजवळच्या एका शेतात ५० फूट लांब आणि ३० फूट रुंद असे राहुल गांधी यांचे भव्य चित्र रांगोळीमधून साकारले होते. रस्त्या-रस्त्यांवर लागलेले होर्डींग्ज, कट्आउटस वातावरण निर्मिती असे काही भारावून टाकणारे होते. ही यात्रा लोकांच्या सहभागाची झाली. हिंगोलीत गेल्यावर पहिल्यांदा जाणवले की, आज आमचा राजीव सातव हवा होता… चटका लावून गेलाय. राहुल गांधी राजीव सातव यांच्या समाधीवर गेल्यावर क्षणभर गदगद होवून गेले होते. राजीव माझा मानसपुत्रच होता. कळमनुरीला राजीवच्या मातोश्रींनाही भेटलो. किती आघात सहन करून आज त्या शांतपणे नातवाकडे बघून जीवन जगत आहेत.

हिंगोलीपासून वाशिमकडे पदयात्रा निघाल्यानंतर रस्त्याच्या एका कोपऱ्यावर ५० ‘वासुदेव’ पारंपरिक वेषात राहुलजींच्या स्वागताला उभे होते. त्यांच्या नेहमीच्या गीतांऐवजी राहुल नावाचे गीत तयार करून ते गात होते. बाजुला एक व्हीडीओ पडद्यावर हिरव्या गार शेतातल्या मधून जाणाऱ्या रस्त्यावर एक ‘काँरवा’ दाखवण्यात आला होता… “­नफरत छोडो…. भारत जोडो”  हे गीत त्यातून साकार होत होते. हे सगळे ऐकत असताना आणि डोळे भरून पहात असताना सेवादलाच्या स्वयंसेवकांची १०० जणांची एक तुकडी संचलन करत समोर धडकली. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा स्वच्छ झब्बा… पायजमा… अाणि संचलन प्रमुखाच्या हातात ३० फुटांचा काँग्रेसचा ध्वज… हे सेवादलाचे सैनिक गाणं गात होते…. ‘कदम… कदम बढाए जा… ’ वातावरणात एक गांभीर्य होते. प्रचंड उत्साह होता. गेल्या आठ वर्षांतील या देशातील भय वाऱ्यावर पार उडून गेले हाेते.  या पदयात्रेची सगळ्यात मोठी उपलब्धी, हे भय नाहीसे होणे, हीच आहे.  राहुल गांधी यांच्या पदयात्रेने हे भय पूर्ण नाहीसे केले आहे. १९४२ च्या चळवळीतील भारत पाहता आला नव्हता… कारण तेव्हा मी २-३ वर्षांचा होतो.  पण, त्यासंबंधी वाचलेले, त्यावेळची पाहिलेली छायाचित्रे जणू आज जिवंत होवून पुढे सरकत होती. अंगावर रोमांच येत होते. १९४२ च्या चळवळीत तरुण का नव्हतो…. थोडा उशीरा का जन्माला आलो, याचीही खंत वाटून गेली…

श्री. नाना पटोले यांनी सांगितले होते की, राहुलजींची आणि तुमची भेट करून देतो. सकाळी ९ वाजता कँम्प २ वर आम्ही पोहोचलो. माझ्यासोबत श्री. सुरेश भटेवरा, श्री. विनायक एकबोटे, श्री. श्रीकांत बेणी, श्री. बाळ कुलकर्णी होते. एका छान मंडपात पदयातत्रींची न्याहरी चालू होती. पण, मन अस्वस्थ होते. एवढ्या लांब येवून भेट होणार की नाही? कारण एक निरोप असा आला की, ‘आजची दुपारची ठरलेली वेळ जमण्यात अडचण आहे’. सकाळच्या वेळची पदयात्रा संपवून राहुल गांधी आणि त्यांचा ताफा कॅम्प क्रमांक १ वर आला.  त्यानंतर नाना पटोले थेट वाशीमच्या पुढच्या यात्रेच्या व्यवस्थेकरिता वाशीमला गेले. त्यांनी तसे मला सांगितले . ‘२ वाजेपर्यंत येतो म्हणाले’.

श्री. बाळासाहेब थोरात वाशीमकडे आधीच पुढे गेले होते. सगळे  नियोजन अतिशय आखीव- रेखीव होते.  पण, एक मन सांगत होते की…. दुपारची पदयात्रा ३ वाजता सुरू होते.  सकाळी ६ ते १० आणि संध्याकाळची पदयात्रा ३ ते ७… कन्याकुमारीपासून ही वेळ कटाक्षाने पाळली गेली आहे. नाना २ वाजता वाशीमहून परत येणार… त्या एक तासात हे सगळे कसे जमणार? काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे कॅम्प नं. २ मध्ये येवून भेटीची वेळ ठरवण्याचा प्रयत्न करत होते. पण, खात्री देता येत नव्हती.  ते दोन तास फार अस्वस्थ वाटले. मी एकटा नव्हतो. ५-६ जणांना घेवून आलो होतो. २:१५ ला नानांचा फोन आला… त्यांनी सांगितले की, वेळ बदलली आहे… ३.०० वाजता यात्रा सुरू झाल्यानंतर ५:३० वाजता चहाकरिता राहुलजी जिथं थांबतील तिथे भेट होईल…. कुठे थांबतील… ती जागा सांगायला कुणीच तयार नाही… मग सांगण्यात आले की, ते ऐनवेळी सांगितले जाईल. मग सूचना केली गेली की, तुम्ही सर्व गाडीने पुढे निघा… पाठीमागून यात्रा येईल. मग, पदयात्रेच्या ताफ्यातील एक गाडी अतुल लोंढे घेवून आले. हिंगोली- वाशीम रस्त्याच्या मधोमध ‘कलगाव’ नावाचे एक खेडे आहे… घरं कुठेच नव्हती. पण वाटेत २०० मीटरवर एक शेत होते. तिथे एक छोटं घर होते. तुषार अशोक पोळ यांचे ते घर. त्यांच्या घरी कोणीच नव्हते. त्यांनी घर रिकामे करून दिले होते. नामदेव सोळंके या तरुणाने बसण्यासाठी व्यवस्था करून दिली. राहुलजींच्या चहाची व्यवस्था तिथे होती.  २ तासांनी यात्रा तेथे पोहोचली तेव्हा सूर्य जवळपास मावळतीला आला होता. अंधार पुढे सरकत होता.  रस्त्यावरून शेतात खाली उतरून राहुल गांधी, नाना पटोले झपझप खाली उतरत आले. त्यांच्यासोबत विश्वजीत कदम, प्रज्ञाा सातव, प्रणिती शिंदे हे आमदार होते. पण आम्हा ६ जणांना गच्चीवर नेताना स्वत: राहुल गांधी पुढे होते. पाठीमागून नाना आणि मग आम्ही सर्वजण. १० मिनीटांची भेट ठरली होती… सर्वांचा परिचय करून घेतल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. दिवसभर जवळपास २० किलोमीटर चालल्याचा कोणताही ताण राहुल यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

तीन- चार मुद्यांची चांगली चर्चा झाली. त्यांचा पहिला मुद्दा असा हाेता की, ‘मी जे काही बोलतोय… ते पदयात्रेतील लोकं त्यांची दु:ख मला जी सांगत आहेत…  महागाईने संसाराची अडचण कशी केली आहे… रोजगार कसे गेले आहेत…. शेती कशी परवडत नाही… अशी अनेक गाऱ्हाणी आणि व्यथा ऐकतोय… आणि तेच पुढच्या भेटीत सगळ्यांना सांगतोय…’

त्यांनी विचारले, ‘तुमची निरीक्षणे काय आहेत…’

चर्चेला सुरुवात केली. पहिले निरीक्षण असे नोंदवले की, गेल्या आठ वर्षांतील लोकांच्या मनातील भय तुमच्या पदयात्रेने आज पूर्णपणे दूर झाले आहे.  लोक हिमत्तीने बोलू लागले आहेत. महागाईविरुद्ध बोलत आहेत… बेकारीविरुद्ध बोलत आहेत… त्यांची दु:ख सांगत आहेत. दुसरा मोठा फरक असा आहे की, तुमच्या यात्रेला सुरुवातीला वृत्तपत्रांनी दुर्लक्षित केले तरी देशातील सामान्य माणसांनी उचलून धरले आणि हातातील मोबाईल वृत्तपत्रे बनली. दहा पानांच्या वृत्तपत्रांपेक्षा ५X३ चा मोबाईल प्रभावी वृत्तपत्र ठरला आणि या आधुनिक सामाजिक व्यवस्थेने वृत्तपत्रांना पराभूत केले.  वृत्तपत्रे दखल घेतात की नाही, वाहिन्या दखल घेतात की नाही, याची चर्चाच बंद झाली. जनतेने या यात्रेला उचलून धरले. खुद्द राहुल गांधी यांनाही हा फरक जाणवलेला आहे. महाराष्ट्रात यात्रा आल्यानंतरचा उल्लेख करताना ते सहज सांगून गेले की, ‘काँग्रेसच्या सर्व मुख्य आंदोलनांची सुरुवात महाराष्ट्रातूनच झालेली आहे’. मग ते ‘चले जाव’ आंदोलन असो….किंवा अन्य आंदोलने… आणि ती सर्व आंदोलने लोकांनीच उचलून धरली होती.’ तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे काँग्रेसपासून दूर गेलेला तरुण मोठ्या प्रमाणात पुन्हा राहुल गांधी यांच्यामागे दिसत आहे.  हे परिवर्तन फार मोठे आहे. ‘भारत जोडो’चे टी शर्ट घालून हा तरुण यात्रेत ३०-३० किलोमीटर चालत आहे.  राहुल गांधी यांच्याशी चर्चा होताना मध्येच सचिव जवळ आले आणि म्हणाले की, ‘जरा लवकर निघावे लागेल…’ त्यांनी त्यांना शांतपणे सांगितले की, ‘मला अजून काही वेळ लागेल….’

चर्चेमध्ये आणखीन एक मुद्दा असा आला की, ‘कन्याकुमारी ते काश्मीर ही आपली पदयात्रा संपल्यानंतर हे वातावरण टिकवण्याकरिता काय करता येईल? मी सूचना केली की, ‘दक्षिण- उत्तर यात्रा पूर्ण झाल्यावर म्हणजे कन्याकुमारी ते कश्मीर… मग, ‘कांडला ते कटक’ ही यात्रा गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश थोडासा छत्तीसगढचा भाग आणि ओरिसा… त्या त्या प्रांताच्या काँग्रेस अध्यक्षांनी झेंडा खांद्यावर घेवून पदयात्रा काढावी. पदयात्रेचा नेता कोण आहे, हे लोक पाहणार नाहीत… ;आपल्या प्रश्नावर कोणीतरी रस्त्यावर उतरून बोलते आहे,’ याचीच लोकं वाट बघत आहेत… राहुल गांधी यांच्या पदयात्रेने निर्माण केलेले वातावरण टिकवावे लागेल.’ राहुल यांची पदयात्रा हा एक ‘इव्हेंट’ नाही. सामान्य लोकांच्या भावनेशी पदयात्रा जोडली गेलेली आहे. हा परिणाम टिकवून घुसळण करावी लागेल. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर या पदयात्रेनंतर अधिक मोठी जबाबदारी आलेली आहे. या पदयात्रेत सपाटून चालल्यानंतर राहुल गांधी  यांचा उत्साहीही तेवढाच आहे.  चेहऱ्याचरील तेजही तेवढेच आहे. त्यांचे वजन थोड कमी झाले आहे.  पण, त्यांच्यासोबत चालणाऱ्यांचे वजन बरेच कमी झाले आहे. एका अर्थी ते चांगलेच आहे . सगळेच नेते जमिनीवर येतील तर काँग्रेसला त्याची मदतच होईल. या यात्रेने एक गोष्ट सिद्ध झाली. प्रत्येक गावात काँग्रेस आहे, काँग्रेसचा विचार आहे.  काँग्रेसचा झेंडा आहे. आंदोलन करायला लोकं तयार आहेत… कोणीतरी त्यांच्यापर्यंत पोहाचायला हवे होते. खुद्द राहुल गांधी पोहोचले. त्यांची प्रगल्भता सिद्ध झाली. ‘पप्पू’ म्हणून केलेली हेटाळणी आणि टीका पचवून ते रस्त्यावर उतरलेत…  आणि आज लाखो लोक त्यांच्या मागे आहेत. ज्यांनी टीका केली होती, ते उघडे पडले. आता हे सगळे वातावरण टिकवणे ही काँग्रेस कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.

१० मिनीटांकरिता ही भेट ठरली होती. प्रत्यक्षात जवळपास अर्धा तास त्या संध्याकाळी खूप चांगली चर्चा झाली. सूर्य मावळून गेला होता. अंधार दाटला होता… त्या छोट्या घरात दिव्याची व्यवस्थाही नव्हती. त्याच अंधारातून वाट काढत राहुल गांधी निघाले हाेते. जणू नियती त्यांना सांगत होती, ‘या घरातच अंधार नाही तर… संपूर्ण देशात आज अंधाराचीच  स्थिती आहे.  या अंधारातूनच तुला वाट काढावी लागणार आहे…’‘चर्चा होत असताना फोटो नकोत’, असे राहुलजींनी सांगितले… चर्चा झाल्यानंतर मात्र ते म्हणाले, ‘चलो, फोटो निकालेंगे’ आमच्या जवळच्या मोबाईलवर फोटो काढू दिले गेले नाहीत.त्यांचे सचिव अलंकार यांना त्यांनी फोटो काढायला सांगितले. मी त्यांना माझी दोन पुस्तके भेट दिली. पहिले पुस्तक ‘महाराष्ट्र -६०’ ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि नंतरच्या ६० वर्षांची बांधणी उलगडून दाखवलेली आहे. दुसरे पुस्तक दिले ते लोकमतचे संस्थापक-संपादक श्री. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मी संपादन केलेला… ‘बाबूजी’ याच नावाचा गौरवग्रंथ. हा गौरवग्रंथ मुद्दाम दिला. राहुलजींच्या आजी म्हणजे इंदिरा गांधी यांच्या १९७७-८० च्या लढाईत जवाहरलाल दर्डा आणि ‘लोकमत’ने ठाम भूमिका घेवून इंदिराजींच्या सोबत राहिले. श्री. वसंतराव नाईक जीवाभावाचे मित्र असताना, राजकीयदृष्ट्या त्यांच्यापासून दूर होण्याची भूमिका  घेवून इंदिराजींच्या पक्षात राहण्याची भूमिका बाबूजींनी घेतली. पवनार येथे विनोबा भावे यांना भेटायला इंदिराजी गेल्या तेव्हा आजच्या पदयात्रेसारखेच हजारो लोक इंदिराजींच्या स्वागताला रस्त्यावर होते.  ही पदयात्रा बाबूजींच्या  निश्चयी भूमिकेमुळेच ‘लोकमत’ने लोकांपर्यंत पोहोचवली होती. एक ठाम भूमिका घेवून बाबूजी शेवटपर्यंत उभे राहिले.  इंदिराजींसाठी आमदारकीचा राजीनामा देवून  ते तुरुंगातही गेले. भूमिकेवर ठाम राहण्याच्या त्यांच्या या निर्धारामागे राष्ट्रीय बाण्याने वृत्तपत्र चालवण्याचा बापूजी अणे यांना त्यांनी दिलेला शब्द होते. ‘एकटा राहिलो तरी चालेल… काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेवून लढत राहीन’, ही त्यांची भूमिका होती. त्या सगळ्या लढ्याचा साक्षीदार मला होता आले . तो सगळा इतिहास या गौरवग्रंथात आहे.  आज त्याच भूमिकेची गरज आहे. लोकमतकडू तीच अपेक्षा आहे.  काँग्रेसजवळ सत्ता होती तेव्हा खूप लोकं आपोआप काँग्रेसभोवती जमा झाले होते. नेत्याची, कार्यकर्त्याची आणि भूमिकेवर वृत्तपत्र चालवणाऱ्यांची अशाच वेळी कसाेटी असते. या कसोटीला जागण्याचा हा काळ आहे. बाबूजी त्यावेळी त्या काळाला धरून घट्ट उभे राहिले. आज ते हवे होते. येत्या २५ नोव्हेंबरला त्यांची २५ वी पुण्यतिथी आहे. हेच वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्षही आहे. त्यामुळे आज त्यांची प्रकर्षाने आठवण होत आहे.

आजच्या सगळ्याच वृत्तपत्रांनी या पदयात्रेला दुर्लक्षित केले असले तरी वृत्तपत्रांचा प्रभाव झुगारून देवून जनतेने पदयात्रेला डोक्यावर घेतले. हे या पदयात्रेचे खरे यश आहे. माझ्यासाेबत असलेल्या पत्रकारांमध्ये श्री सुरेश भटेवरा यांनी लिहिलेले ‘नेहरू-गांधी पर्व’ हे पुस्तकही राहुलजी यांना श्री भटेवरा यांनी भेट दिले. अपेक्षेपेक्षा राहुल गांधी यांची भेट खूप छान झाली. या भेटीचे सगळे श्रेय श्री. नाना पटोले यांना आहे.  आता पदयात्रा संपल्यावर २ दिवसांनी राहुलजी मध्यप्रदेशात पाऊल ठेवतील. त्यानंतर महाराष्ट्रात घुसळण करत राहण्याचे काम नाना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आहे.

ही यात्रा चालू असताना लहानपणी शाळेत म्हटलेले गीत गुणगुणत होतो…

 ‘कदम कदम बढाए जा… 

खुशी के गीत गाए जा…

ये जिंदगी है कौम की

तुम कौम पे लुटाये जा….’

या यात्रेत दोन दिवस येता आले, यामुळे मनस्वी समाधान आहे. प्रवास आणि चालणे अवघड होईल, या करणाने घरात बसून राहिलो असतो तर अधिक त्रास झाला असता. प्रत्यक्ष जागेवर जावून यात्रा पाहिल्याने राहुल गांधी यांच्याबरोबरच लोकांचा निर्धार किती प्रचंड आहे, हेही प्रत्यक्ष पाहता आले.  देशातील अंधार दूर होईल, त्याची काहीशी प्रचिती या पदयात्रेने येत आहे . परिणाम टिकवण्याची जबाबदारी आणि स्पष्ट बोलण्याची भूमिका लोकशाहीवादी असणाऱ्या सर्वांनाच घ्यावी लागेल.  पदयात्रेहून येताना मनात एक निर्धार केला, पदयात्रेच्या समारोपाला श्रीनगरला निश्चित जायचे.

(लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)

9869239977

Previous articleमितवाssss
Next articleगोष्टी सांगण्याचं कौशल्य
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.