संजय वानखडे: सार्वजनिक जीवनातल्या आदर्शाचा नवीन अध्याय

-अविनाश दुधे

डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचे दोनदा अध्यक्ष राहिलेले संजय वानखडे यांचा आज २० सप्टेंबरला सहावा स्मृतिदिन . त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा

………………………………………………….

काही माणसं खूप काळ आपल्या सोबत असतात. पण शेवटपर्यंत ते आपल्याला सर्वार्थाने कळतच नाही . दोष त्यांचा नसतो. आपल्या आकलनाचा असतो. अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचे दोनदा अध्यक्ष राहिलेल्या संजय वानखडे यांच्याबाबत असेच झाले.हा  माणूस किती ‘उंच’ आणि ‘खोल’ होता, हे अनेकांना शेवटपर्यंत कळलंच नाही . अगदी २४ तास त्यांच्यासोबत राहणाऱ्या त्याच्या जिवलगांनाही नाही. संजय वानखडे या माणसाने अगदी शेवटपर्यंत आपल्यात काय दडले आहे, हे जगासमोर येऊच दिले नाही. ते गेल्यानंतर हळहळणाऱ्या हजारो माणसांच्या गर्दीने पहिल्यांदा त्यांची ‘श्रीमंती’ जगासमोर आणली.

   विदर्भातील एक मोठी बँक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचा अध्यक्ष ही संजय वानखडेंची लौकिक ओळख . प्रत्यक्षात त्यांना ओळखणारी माणसं, कोणत्याही अर्थाने बँकेचा अध्यक्ष वा नेता म्हणून त्याला ओळखत नव्हते . अमरावतीच्या सामाजिक , राजकीय , सहकार, क्रीडा , बँकिंग , शिक्षण , समाजसेवा अशा क्षेत्रात सर्वत्र संचार असलेल्या या माणसाची ओळख शेवटपर्यंत ‘माणसं जोडणारा कार्यकर्ता’ अशीच होती .अकृत्रिम जिव्हाळा आणि प्रेमाने शेकडो माणसं बांधून ठेवणारा अवलिया हीच संजय वानखडेंची खरी ओळख होती . हाती घेतलेल्या कामात १०० टक्के झोकून देणारा , ते काम पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करणारा , एकेक माणूस मुंगीच्या चिकाटीने जोडणारे संजय वानखडेच अमरावतीकरांच्या स्मरणात आहे.

  अतिशय निगर्वी ,कमालीचा विनम्र, विलक्षण संकोची असणारा हा माणूस प्रत्येकासोबत सौजन्यानेच वागायचा. ही वागणूकच त्यांची खासियत होती .लहानथोर कोणीही असो ते सारख्याच आदराने वागणारं . वयाने मोठ्या असणाऱ्यांना वाकून नमस्कार करणार…अगदी १६ वर्षाच्या मुलालाही ‘भाऊ’ संबोधनाशिवाय बोलणार नाही. दादा , भाऊ, अण्णा , साहेब , ताई , वहिनी असेच यांचे प्रत्येकासोबतचे कौटुंबिक बंध. बँकेचा अध्यक्ष झाल्यावरही त्यांच्या या वागण्यात काहीच फरक नव्हता. बरं हा साधेपणा, विनयता मुद्दामहून पांघरलेलं सोंग होतं, असं अजिबात नव्हतं. व्यक्तिमत्वाचा अंगभूत भाग असावा इतकं साधेपण त्यांना सहज चिपकलेलं होतं. त्यामुळेच आमचे विजय विल्हेकर त्यांना ‘डेबुबाबा’ असे संबोधायचे. ‘आम्ही सारे’ तील आमच्या सहकाऱ्यांना दीर्घकाळ त्यांचा सहवास लाभला. त्यांच्या आठवणींमध्ये कुठल्या लौकिक मानापमानासाठी संजय वानखडे रुसले आहेत,अडून बसले आहेत अशी एकही आठवण नाही .

  बँकेचा अध्यक्ष, पाच आकडी पगार असणारा अध्यापक, तालेवार घराण्यात जन्म. राजकीय , सामजिक , शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसोबत उठबस . पण याने त्याचे कधीही भांडवल केले नाही. या माणसाला कुठल्याच गोष्टीचा अभिमान नव्हता. कुठेही झोपणार , समोर येईल ते कुठलीही कुरबुर न करता खाणार, कशानेही प्रवास करणार. बँकेची गाडी केवळ बँकेच्या कामासाठी वापरणार. बाकी आपल्या जुन्या मोटार सायकलने फिरण्यात त्यांना कधीही लाज वाटत नव्हती. बँकेचा अध्यक्ष असतानाही ‘आम्ही सारे’ची  व्याख्यान व इतर कार्यक्रमांच्या पत्रिका हे घरोघरी जावून पोहचविणार. सोबतचा माणूस लाजयाचा, पण यांना त्याचे काहीही नसे. पदांवर असलेल्या माणसाने सार्वजनिक जीवनात कसे वागावे याचा मापदंड त्यांनी घालून दिला आहे. कुठल्याही गोष्टीचे श्रेय घेण्याची धडपड त्यांनी कधीही केली नाही. चिमूटभरही गुणवत्ता नसलेली माणसं आपल्या सुमारपणाचे प्रदर्शन करत सर्वत्र मिरवतांना आपण सभोवताली पाहतो यांनी मात्र गुणवत्तेचं भरभक्कम भांडवलं असतानाही पडद्याआडची भूमिका वठविणे पसंत केले.  कुठल्याही कार्यक्रमात कार्यकर्त्याच्या भूमिकेतच ते अधिक रमत असे . अनेक विषयांची सखोल माहिती असतानाही प्रत्येक ठिकाणी स्टेज आणि माईकपासून ते ठरवून दूर राहायचे. त्यामुळे त्याचं मोठेपण झगमगाटी दुनियेला कळणे शक्यच नव्हते .

त्यांच्या या साधेपणामुळेच त्यांना कायमच गृहीतच धरलं गेलं. या माणसाचा जनसंपर्क हा विस्मय आणि कौतुकाचा विषय होता. याचं वर्तुळ खूप म्हणजे खूपच मोठं होतं. अंबापेठ क्रीडा मंडळ , पंजाबराव बँक , शिवाजी शिक्षण संस्था , आम्ही सारे फाऊंडेशन आणि आणखीही खूप काही . यातील एका वर्तुळाला माहीत असणारा संजय वानखडे दुसऱ्याला माहीत नसायचा . अंबापेठ क्रीडा मंडळाला त्याच्यातील कुशल खेळाडू तेवढाच माहीत . बँकिंग क्षेत्रातील मंडळी केवळ त्याची शिस्त आणि प्रामाणिकपणा याच्याशी परिचित . राजकीय क्षेत्रातील जगदीश गुप्ता , संजय खोडके , विलास इंगोले , मिलिंद चिमोटे या मंडळींना चिकाटीने, मेहनतीने काम करणारा ‘संजू’ एवढंच माहीत. ‘आम्ही सारे’ च्या कार्यकर्त्यांना त्यांचा व्यापक संपर्क, भरपूर वाचन, मेहनत, साधेपणा याचं कौतुक . पण बाकी क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वाशी, तेही अनभिज्ञच .

संजय वानखडेंची आपल्यातील अष्टपैलुत्व कायम लपवून ठेवलं .  राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल , राज्यस्तरावर बॉस्केटबॉल, खो-खो खेळलेला हा खेळाडू, क्रिकेटही तेवढंच उत्तम खेळायचा . प्रत्येक खेळाचे नियम व तांत्रिक माहितीही सखोल . डॉ. रवींद्र कोल्हे दरवर्षी मेळघाटच्या दुर्गम भागात आदिवासींसाठी व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करतात. एप्रिलच्या रणरणत्या उन्हात कितीही महत्वाचं काम असो, संजय वानखडे त्या स्पर्धेसाठी नेट,  व्हॉलीबॉल आणि इतर साहित्य घेवून पोहचणार म्हणजे पोहचणार. अनेकदा फोन लागायचे नाही, पण कोल्हे पती-पत्नींना संजुभाऊ येणार म्हणजे येणार ही खात्री असायची. कमिटमेंट आणि मैत्रीला  या माणसाच्या आयुष्यात सर्वाधिक महत्व होतं. व्हॉलीबॉलसोब  फुटबॉलचंही त्यांना प्रचंड वेड . वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा सुरु झाली की याला ‘फुटबॉल फिव्हर’ चढायचा . गेल्या वर्ल्ड कपदरम्यान पहिल्यांदा त्यांनी घरी टीव्ही घेतला. त्यांनी आयुष्यात केलेली ही पहिली ‘चैन’.  वर्ल्ड कप संपला आणि तो टीव्ही पुन्हा अडगळीत पडला. बँकिंग क्षेत्रातील त्यांचं ज्ञानही कुठल्याही अर्थतज्ञाला चकित करणारं होतं . सहकारातले बारकावे त्यांच्याइतके फारच कमी लोकांना माहीत . विविध खटल्यांच्या निमित्ताने कोर्टाच्या अनेक वाऱ्या केल्या असल्याने  त्या व्यवसायातील माहितीही थक्क करणारीच . ‘मी रजेचा अर्ज सुद्धा वकिलाच्या सल्ल्याने लिहितो’, असे ते गमतीत सांगत.

त्याचं वाचनप्रेम हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे . घरी, बाहेर, प्रवासात पुस्तकं कायम त्याच्या सोबतीला असायची . अनेकदा पहाटेपर्यंत वाचन केल्यानंतर पोटावर पुस्तक ठेवलेल्या अवस्थेत ते झोपी जायचे. दोन –तीन तास झोप घेतली की  सकाळी ७ च्या ठोक्याला कॉलेजला शिकवायला ते पळायचे. तिथे कधीही एक मिनिट उशीर नाही. .शिकविण्याचं आपलं काम चोखपणे करणार . त्यांची वाचनाची रेंजही प्रचंड. . इतिहासापासून मानसशास्त्रापर्यंत, तत्वज्ञानापासून अर्थकारणापर्यंत . मराठा राजवटींचा इतिहासापासून मुस्लीम मानसिकतेपर्यंत आणि अगदी अल्बर्ट एलीसच्या विवेकवादी मानसोपचार पद्धतीपर्यंत .  हे वाचन ते स्वतःत जिरवायचे. मात्र इथेही तेच . हे वाचन , त्यातून मिळालेलं ज्ञान ते  कधीही मिरवायचे नाहीत. ‘आम्ही सारे’ त अनेकदा सखोल वैचारिक चर्चा होत , पण ते क्वचितच आपलं मत व्यक्त करायचे . फारच आग्रह झाला तर दोन –चार वाक्यातून आपली खोली जाणवून द्यायचेत. ‘भूमिका न घेणे ही सुद्धा भूमिकाच असते’, हे त्यांचे वाक्य माझ्या कायम स्मरणात राहिलं आहे.

   संजय वानखडेंच्या व्यक्तित्वाचे असे खूप सारे माहीत नसलेले पैलू आहेत . त्याच्या व्यक्तित्वातील एक वैशिट्य फारच कमी लोकांना माहीत होते . त्याची ओळख सर्वांना सौजन्यमूर्ती अशीच होती. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातला धुमसणारा अंगार ज्याला कळला त्यालाच संजय वानखडे थोडाफार समजत होता . हा माणूस कोणाच्या भानगडीत कधीच डोकं खुपसायचा नाही , पण कारण नसताना त्यांना कोणी डीवचलं , त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का दिला की मात्र शेंडीला गाठ पाडल्याप्रमाणे ते मनाशी गाठ बांधून हिशेब चुकते करायच्या मागे लागायचे . एकदा ठरलं की  समोरची माणसं किती ताकदवर आहेत़़ वगैरे विचार ते नाही करायचे . मुंगीच्या चिकाटीने पण आतून ज्वालामुखीसारखा उसळून ते संघर्षाच्या तयारीला लागायचे  . त्यांच्यातील त्या उफाळत्या ज्वालामुखीचा वरुन काहीच पता लागायचा नाही . पृष्ठभागावर सारं काही शांत असायचं . मात्र त्याचे परिणाम समोर आलेत की संजय  वानखडेंची  ‘धग’ कळायची . पंजाबराव बँकेत दोनवेळा त्याने आपल्यातील हा सुप्त अंगार दाखवून दिला . ज्या बँकेत सुरुवातीच्या काळात नोकरी केली , तेथील सत्ताधाऱ्यांनी खोटे आळ लावून न्यायालयीन खटल्यांचं झेंगट लावल्यानंतर त्यांनी ज्या  चिकाटीने , संघर्षाने प्रस्थापितांना उलथावून लावले तो एक इतिहास आहे . त्यासाठी त्यांनी तेव्हा जी अफाट मेहनत घेतली होती, तो निव्वळ कौतुकाचाच नाही अभ्यासाचाही विषय आहे . ‘रक्त आटविणे’ वगैरे जे शब्दप्रयोग केले जातात ते संजय  वानखडेंसारख्या माणसांच्या मेहनतीवरूनच रूढ झाले असावेत .

पहिल्या निवडणुकीत ज्या सहकाऱ्यांना  सोबत घेऊन प्रस्थापितांना झोपविलं होतं तेच सहकारी सत्तारुढ होताच तडजोडीची भाषा करतात़ हेकेखोरपणाचा आरोप करुन त्यांनाच निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारतात, हे पाहून संजय वानखडेंनी चार वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा  आरपारच्या लढाईचा निर्णय घेतला होता़. त्यांच्यासारखी माणसं जेवढी लोभस आणि विनम्र असतात तेवढेच बिथरले की ते सारं काही उलथून टाकतात. हे त्याच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांना  पहिल्या निवडणुकीत सोबत असूनही कळलं नव्हतं,  ही आश्चर्याचीच गोष्ट होती . संजय वानखडे हे अव्यवहारी आहेत, खूपच काटेकोर आहेत, असा आरोप करुन सत्तेत मशगूल असलेल्यांना वानखडेंचं धुमसणं काय उलथापालथ करु शकते, हे लक्षातच आलं नाही़.  अफाट जिद्द, परिश्रम आणि चिकाटी़ या भांडवलाच्या जोरावर त्यांनी २०१० सारखीच २०१५ ची लढाई लढली . यशाचा जुना फॉर्मुला त्यांना माहीत होताच़. जुने सहकारी सत्तेत मशगूल असतानाच त्यांनी तब्बल १५-२० हजार नवीन सदस्य नोंदविले़.  निवडणूक हा केवळ शह-काटशह आणि पैशाचा खेळ नसतो, तर एकेक माणूस आपलंस करण्यालाही यात सर्वाधिक महत्व असतं, हे त्यांच्याएवढं कोणालाच माहीत नव्हतं.

  २० हजारापेक्षा जास्त सदस्यांना हा माणूस व्यकितश: जाऊन भेटून आला़ होता. नमस्कार करुन त्यांचे आशिर्वाद घेऊन आला़ होता. अनेकांकडे तर ते दोनदा, तीनदा गेलेत.   मेहनत करावी तर किती करावी़? सहा महिने बिनपगारी सुट्टी घेऊन वणवण पायाला भिंगरी लावल्यासारखं वेडपिसं होऊन ते फिरले होते   सकाळी ६ ते रात्री कितीही़.  त्याचा तब्येतीवर गंभीर परिणाम झाला.  एक दिवस प्रचारादरम्यान  प्रचंड थकवा व पोटात काही नसल्याने चक्कर येऊन ते मोटरसायकलवरुन खाली पडले. मेंदूत ब्लड क्लॉट निघाला़.  काही तास पॅरलिटीक होऊन दृष्टी, वाचा जाते की काय, अशी स्थिती होती़. डॉक्टर म्हणाले, मरणाच्या तावडीतून थोडक्यात वाचले. काही मिनिटं उशीर झाला असता तर खेळ खलास होता. जवळची सारी माणसं धास्तावली़ होती. जबरदस्तीने त्यांना कसंतरी १५-२० दिवस झोपविलं. पण ते  कसला मानतात? कशीबशी विश्रांती घेऊन ते पुन्हा भिडले पुन्हा वणवण फिरले.  एकेक गाव, शहर, मतदार पिंजून काढले.  एवढं सारे काही केल्यावर तेव्हा ते जिंकले नसते तरच नवल होतं! संजय वानखडे नावाच्या माणसाने २०१० नंतर २०१५ मध्येही  पुन्हा एकदा आपल्यातील ‘मटेरियल’ जगाला दाखवून दिलं होतं.

  लागोपाठ दुसऱ्यांदा दैदिप्यमान यश मिळाल्यानंतर संजय वानखडे  शांत नव्हते.  त्यांना  वेध लागले होते ते पंजाबराव बँकेला राज्यातील अव्वल बँक बनवायचे . त्यादृष्टीने वाटचालही सुरु झाली होती . पुन्हा एकदा १८-१८ तास काम सुरु झालं. सगळ काही ठीक असताना, भरारी घेण्याची तयारी असताना कोणी कल्पनाही करणारं नाही असं आक्रीत घडलं .एका कर्जदाराने बँकेच्या केलेल्या फसवणुकीसाठी स्वतःला जबाबदार धरत त्यांनी स्वतःची जीवनयात्रा नाहक संपविली . ज्या संजय  वानखडेंच्या प्रामाणिकपणावर त्यांच्या विरोधकांनाही शंका नव्हती . ते स्वतःलाच माफ करू इच्छित नव्हते.  आयुष्यभर जपलेली उच्च नैतिक मूल्य त्यांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा मौल्यवान होती . मूल्य , नैतिकता या गोष्टी केवळ पुस्तकात उरल्या असताना हे जग सोडतानाही संजय वानखडे सार्वजनिक जीवनातल्या आदर्शाचा एक नवीन अध्याय लिहून गेलेत .

(छायाचित्रे – प्रा. श्याम मानव, मुकेश चौधरी व हर्षल रेवणे यांच्या सौजन्याने)

(लेखक ‘आम्ही सारे’ फाऊंडेशनचे अध्यक्ष व ‘मीडिया वॉच’ वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796

Previous articleमाझा मराठवाडा
Next articleप्रेरणेचा प्रवास – प्रश्नातून पुढच्या प्रश्नाकडे हवा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.