स्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…

-प्रवीण बर्दापूरकर

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री , (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक धडाडीचे नेते धनंजय मुंडे सध्या एका मोठ्या वादात सापडले आहेत . धनंजय मुंडे आज ना उद्या कोणत्या तरी वादात सापडणार याचा अंदाज कधीचाच आलेला होता आणि त्याप्रमाणे हे जे घडलंय किंवा घडवून आणलं गेलंय म्हणून त्याचं कांहीच आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही . ‘घडवून आणलं गेलंय’ असं म्हणण्याचं कारण , हे एक राजकीय षडयंत्र आहे , असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील एक ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील  म्हटलं आहे . आता , जयंत पाटील यांच्यासारख्या एका जबाबदार नेत्यानं म्हटलं म्हटलं म्हणजे त्यात कांही तरी तथ्य असू शकतं मात्र , अलीकडच्या दोन-अडीच दशकात कोणत्याही राजकीय नेत्यावर क्षुल्लक किंवा पूर्ण चौकशीअंती अगदी साधार जरी कारवाई झाली तरी त्यामागे राजकीय कांही तरी आहे असं म्हणायची फॅशन आलेली आहे , हे विसरता येणार नाही .

‘अशा’ ( म्हणजे विवाहबाह्य लैंगिक संबंध ) रितीने वादग्रस्त ठरलेले धनंजय मुंडे हे कांही देशाच्या राजकारणातील पहिले नेते नाहीत . गेल्या सव्वाचार दशकांच्या पत्रकारितेत ‘अशा’ वादात सापडलेले आणि ‘असे’ उद्योग मनसोक्तपणे करुनही कोणत्याच वादात न सापडलेले अनेक नेते महाराष्ट्रातही पाहण्यात आलेले आहेत . ही सर्वपक्षीय आणि राष्ट्रीय लागण आहे . किस्से नव्हे तर ( किस्से सांगोवांगी असतात म्हणून ! ) अशा अनेक हकिकती आणि आठवणी, राजकीय वृत्तसंकलन केलेल्या माझ्या पिढीच्या अनेक पत्रकारांच्या पोतडीत आहेत . पण , शिष्टाचार , संकेत आणि सभ्यपणा म्हणून ‘अशा’ आठवणी आणि हकिकतींची ती पोतडी कधीच सार्वजनिक पातळीवर उघडायची नसते याचं भान आम्हा सर्वांना आहे .

धनंजय मुंडे प्रकरणात काय खरं आणि काय खोटं , याचा तपास आता पोलिस करणार आहेत आणि त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार करणार आहेत . त्यामुळे त्या संदर्भात सध्या तरी कोणतीही टिपणी किंवा अटकळबाजी करण्यात कांहीही मतलब नाही कारण , राजकारणात घडलेल्या ‘अशा’ कोणत्याही प्रकरणाचा शेवट ( अखेर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नारायण दत्त तिवारी यांचा अपवाद वगळता ) किमान कडक कारवाईने झाला किंवा त्या नेत्याच्या राजकीय कारकीर्दीवर ‘अशा’ प्रकरणाचा काही परिणाम झाला , असं काही आजवर घडल्याचं आठवत नाही . उलट ‘अशा’ प्रकरणात अडकलेले कांही नेते आपल्याही राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि किमान अर्ध्या डझनावर तरी नेते ‘चीफ मिनिस्टर इन वेटिंग…’ होते , हे विसरता येणार नाही . त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणाचा कांही तरी ‘लॉजिकल’ शेवट होईल , अशी आशा बाळगणं भाबडेपणाचं ठरेल .

आपण हे लक्षात घेतलंच पाहिजे की , हे ‘असं’ केवळ राजकारणातच आणि केवळ पुरुषांकडूनच  घडतंय हे समजणं हा शुद्ध भाबडेपणा ठरेल . ‘वैवाहिक जीवनात सुख आहे आणि व्यभिचारी जगण्यात आनंद आहे’ , अशी धारणा असणारे असंख्य पुरुष आणि कांही स्त्रिया केवळ राजकारणातच आहेत असं नाही तर , समाजाच्या सर्वच क्षेत्रात आहेत ( चित्रपट सृष्टीतल्या आशा अनेक घटना कायम चर्चेत असतात आणि  आमची पत्रकारिताही त्याला अपवाद नाही ! ) मात्र ते मान्य करण्याचं धाडस आपल्यात नाही . यातल्या केवळ मोठ्या पदावरच्या स्त्री किंवा/आणि पुरुषाच्या ‘अशा’ संबंधांचा बोभाटा कांही काळ तरी जास्त होतो . ‘अशा’ संबंधांच्या संदर्भात समाजात होते ती केवळ कुजबुज किंवा माध्यमांतून त्या संदर्भात प्रकाशित/प्रक्षेपित होतं ते केवळ गॉसिप . ‘अशी’ ९९ टक्के प्रकरणे अशा कुजबूज किंवा/आणि गॉसिपच्या पातळीवर जन्म घेतात आणि त्याच पातळीवर विझुनही जातात कारण , आपल्या समाजात नैतिक आणि अनैतिकच्या वाटा फारच निसरड्या आहेत आणि या वाटांवरुन चालण्यात पुरुष जास्त ‘पटाईत’ असतात ; त्या तुलनेत ‘पटाईत’ स्त्रियांचं प्रमाण फारच कमी आहे . या वाटांवरुन चालणारे अनेक पुरुष आणि मोजक्या का असे ना स्त्रिया , मला चांगल्या ठाऊक आहेत . बहुसंख्य घटनात ‘ती’ त्या दोघांची गरज असते , कधी आकर्षण , कधी मजबूरी तर कधी तो एक सरळ-सरळ व्यवहार असतो ; आपण मात्र त्याला नैतिकता आणि अनैतिकतेची लेबल्स लावण्याचा प्रयत्न करतो कारण , त्या संदर्भात उघड चर्चा करणं किंवा त्या संबंधांचा खुलेपणान स्वीकार करणं ही आपली संस्कृती नाही , असा कथित संस्कार आपल्यावर झालेला असतो .

केवळ स्त्रीचे लैंगिक शोषण होण्याच्याही घटना खूप घडतात हेही खरं आहे पण , वर म्हटल्याप्रमाणे ती स्त्री , तिचं कुटुंब , पोलिस आणि समाज अशा सर्वच पातळ्यांवर अशा प्रकरणांचा ‘लॉजिकल’शेवट घडवून किंवा करवून आणणं फारच कठीण असतं . शिवाय स्त्रिया या संदर्भात तातडीनं पुढ येत नाहीत कारण त्यात त्यांची असह्य आगतिकता  असते  हे लक्षात न घेता , ‘इतका उशीर का लावला म्हणजे ती तशीच असणार’ अशी मुक्ताफळं उधळण्यात समाजाला धन्यता वाटते.

‘अशा’ घटनात प्रलोभन हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याला बळी पडण्याचं जास्त प्रमाण स्त्रियांचं आहे , ही वस्तुस्थिती आहे . ‘लिव्ह इन’ नावाचा सापळा  , स्वतंत्र घरं , मोठ्या प्रमाणात धन , मूल जर झालं तर त्याला नाव म्हणजे अधिकृत दर्जा आणि नाव न दिलं तर आणखी धन अशी प्रलोभनाची व्यापकता आहे . या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि दोस्तयार  निशिकांत भालेराव याची एक पोस्ट अशी-“आमच्या मराठवाड्यात हे  फार कॉमन आहे . चुकीचे आहेच . २५ वर्षांपूर्वी मी शेगाव पाथर्डी भागात  कोल्हाटी समाजाच्या काही महिलांवर स्टोरी करण्यासाठी काही महिला कार्यकर्त्या समवेत मेळाव्याला गेलो होतो . दोन तीन भगिनीच्या घरी चहा पिण्यास गेलो तेव्हा त्या काळातील आमच्या भागातील बहुतेक पुढार्‍यांचे फोटो दिवाणखान्यात पाहून मला फारच आशर्य वाटले . पण , काही जणींनी तिथे खेळणाऱ्या मुलांकडे पाहून चक्क सांगितले हा यांचा त्यो त्येंचा वैगेरे . मी फार अस्वस्थ होतो त्या प्रकाराने . आज पाथर्डी-शेगाव ऐवजी बॉलिवूड असते एव्हढेच काय ते ! सार्वजनिक जीवनात असल्यावर हे प्रकार नकोच. प्रश्न खाजगी नाही असू शकत .” निशिकांतच्या या अनुभवाला पुष्टी देणार्‍या राजकीय नेते , प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अनेक हकिकती सांगता येतील .

स्त्रीला वश करण्यात मर्दानगी आणि त्या कथित मर्दानगीची भुरळ पडणार्‍या स्त्रिया  असं , हे दुष्टचक्र आहे . ‘मी अमुक तमुक म्हणजे दोन-तीन स्त्रिया भोगण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्ही कोणत्याही स्त्रीला कधी वार्‍यावर सोडलेलं नाही ‘ , अशा केवळ फुशारक्या मारणारेच नाही तर , त्याप्रमाणे वागणारे आपल्या अवती-भवती  किती आहेत याचा शोध आपल्यापैकी किती जणांनी आजवर घेतला आहे ? असा शोध घेतला ; आपण अशा नैतिकतेच्या कोणत्या पातळीवर आहे हे निश्चित केलं ( कारण कोणत्या ना कोणत्या पातळीवर अध:पतन ही एक मूलभूत क्रिया आहे ) आणि महत्वाचं म्हणजे एकदा व्यक्तिगत व सार्वजनिक नैतिकतेची निश्चित व्याख्या केली की नंतरच त्या संदर्भात खुलेपणानं चर्चा करता येऊ शकेल .

माझं व्यक्तिगत मतही इथे नोंदवायला हवं- कोणतेही अन्य हेतू मनाशी न बाळगता परस्पर संमतीने  होणार्‍या स्त्री-पुरुष लैंगिक संबंधाना हरकत घ्यावीशी मला तरी वाटत नाही मात्र, असं फार कमी वेळा घडत असल्याचा अनुभव आहे . शिवाय अधिकृतपणे वैवाहिक बंधन संपुष्टात न आणता विवाहित स्त्री किंवा पुरुषानं ‘लिव्ह इन’च्या नावाखाली घातलेला धुडगूस असणार्‍या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ आहे , त्याबद्दल तो छळ करणार्‍या शिक्षा झालीच पाहिजे , असंही मला ठामपणे वाटतं .

( रेखाचित्र – विवेक रानडे )

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

Previous articleग्रेसफुल…अनकन्व्हेन्शनल-सुश्मिता सेन
Next articleकेवळ प्रेम पुरेसं आहे…?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.