करोना महामारी: एक आव्हान

-सुजला वाटवे

गेल्या चार महिन्यांपासून कोविद-१९ विषाणूच्या शिरकावामुळे करोनाच साथीचं भयाण संकट सध्या सगळ्या जगापुढे ठाकलेलं आहे. सगळे देश आपापल्या परीने त्याच्याशी लढताहेत. चीनमध्ये ह्या विषाणूची लागण होऊन करोनाची साथ अमेरिका, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया अशा प्रगत देशांमध्ये पसरली. भौगोलिक विस्ताराबरोबर तिच्या वाढत्या प्रमाणाने जग स्तिमित झाले, गोंधळले. कोणत्या प्रकाराने ह्या महामारीला निदान रोखता यावे यासाठी सामाजिक अंतर किंवा विलगीकरण (Social Distancing), लॉकडाऊन  सारखे निर्णय घेण्यात आले. काही देशांनी हे पाऊल पटकन उचलले, तर काहीना फार उशीर झाला. कोणते निर्णय बरोबर कोणते चुकीचे असे ठरविणे सध्या तरी कठीण दिसते.

करोनासारख्या जागतिक रोगराई पूर्वी कधी आल्या आहेत का? त्यांची सुरुवात कशी झाली आणि त्या नियंत्रणात कशा आल्या? ह्या साथींचा हल्ला मानवाने कसा झेलला, कसा थोपवला आणि कसा प्रतिकार केला, हे पाहणे मोठे रंजक आहे.

 स्थानिक पातळीवरच्या साथी

सुमारे ५००० वर्षापूर्वी चीन मधील ‘हमीन मंघा’ या पुरातत्व शास्त्रज्ञांनी शोधलेल्या ठिकाणी साथीच्या रोगाने सर्व गाव गिळंकृत केलेले आढळले.  ख्रिस्तपूर्व ४३० च्या सुमारास अथेन्समध्ये टायफोईड, एबोला यांच्या साथी, रोममध्ये सुरु झालेले प्लेग (पाचवे शतक) आणि त्यांचे महामारीत झालेले रूपांतर, सोळाव्या शतकातील  मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये ‘कोकोलीत्झ्ली’, फिलाडेल्फियामध्ये पिवळा ताप, एकोणिसाव्या शतकातील युरोप मधील देवीची साथ असे उल्लेख दिसतात. भारतात विसाव्या शतकात डांग्या खोकला, मलेरिया, देवी, क्षय, कुष्ठरोग, अशा काही साथी स्थानिक पातळीवर (Epidemic) येऊन गेल्या. परंतु हे मर्यादित प्रांतांमध्ये किंवा देशांमध्ये झाल्यामुळे सबंध जगाला त्याची खूप झळ पोहोचली नाही. मात्र प्लेग, पटकी, फ्लू सारख्या काही साथी जगभर पसरल्या. म्हणून त्यांना महामारी (Pandemic) म्हटलं आहे.

जागतिक महामारींचा आढावा

महामारी जेव्हा एका ठिकाणी उद्भवते आणि देशोदेशी पसरत जाऊन जवजवळ पूर्ण जग व्यापते, लोकांचे बळी घेते तेंव्हा सर्व व्यवस्था कोसळतात. या सगळ्या मध्ये माणूस आतून बाहेरून उन्मळून जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) इसवीसन सुरु झाल्यानंतर होऊन गेलेल्या सर्वाधिक मोठ्या दहा जैविक आपत्ती (Biological  Pandemics) नोंदवलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने प्लेग, पटकी (cholera), फ्लू, यांच्या साथींचा समावेश आहे. ह्यांची यादी अशी आहे.

Antonine Plague (165-180), Plague of Justinian (541-542), The Black Death (1346-1353),  Third Cholera Pandemic (1852–1860), Flu Pandemic (1889-1890), Sixth Cholera Pandemic (1910-1911), Flu Pandemic (1918 onwards), Asian Flu (1956-1958), Flu Pandemic (1968), HIV/ AIDS Pandemic (2005-2012).

अनेक रोगराई या ख्रिस्तपूर्व काळापासून ग्रीक, रोमन, इंग्लंड, आणि एकूण युरोप येथून पसरल्याची नोंद सापडते. त्यामुळे त्यावरील उपचारांच्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांच्या इतिहासात दिसतो. भारतीय, चीनी, बौद्ध प्रयत्नांचा उल्लेख १७ व्या शतकानंतरच आढळतो. पौर्वात्य देशांमध्ये शरीर शास्त्रावर पुष्कळसा अभ्यास हा विशिष्ट जीवनशैली अनुसरणे, शरीर सशक्त करणे, रोग प्रतिकारशक्ती वाढविणे, मानसिक स्वास्थ्य जोपासणे, शरीरातील दूषित भागावर शस्त्रक्रिया करणे, यावर झालेला आहे. अशी रोगराई पसरल्याचे उल्लेख साधारणपणे १८ व्या शतकापासून सापडतात. भारतात मोठ्या प्रमाणात पटकीची साथ येऊन गेल्याचे उल्लेख १८१७ पासून सापडतात. भारत आणि चीन दोनही ठिकाणी बुबोनिक प्लेगची महामारी १८५५ ते १८९७ या काळात दिसते. चीनमध्ये मन्च्युरिअन प्लेगचा उल्लेख १८९४ पासून दिसतो.

ह्या सर्व साथींच्या रोगांमध्ये एक बाब लक्षात येते म्हणजे या आपत्ती अनेक शतकांनी एकदम समोर पुढे ठाकतात. खर तर त्या एकदम उपस्थित झाल्यासारख्या वाटतात तरी त्या सूप्त स्वरूपात ठिकठिकाणी अधून मधून डोके वर काढीत राहतात. आणि एका क्षणी काही प्रकारच्या जंतूंना वाढायला ‘अनुकूल’ परिस्थिती – म्हणजे वाहक आणि पर्यावरण- मिळाली की एखादी साथ प्रचंड झपाट्याने एका ठिकाणाहून किंवा देशातून दुसऱ्या, त्यातून पुढच्या, पुढच्या देशांमध्ये, जमिनीवरून, पाण्यातून, हवेतून – रोगजंतुंमार्फत अनेक मार्गांनी प्रवास करून गुणाकार श्रेणीने पसरत राहते..

महामारीची कारणे

जगातली पहिली महामारी इसवी सन १६८ ते १८० प्लेगच्या संकटाने झाली. ही साथीनं पसरणारी रोगराई अन्तोनिअन प्लेग किंवा ‘प्लेग ऑफ गालन’ म्हणून ओळखली जाते. पूर्व दिशेच्या मोहिमांवरून परतणाऱ्या रोमन साम्राज्याच्या सैन्यामध्ये काही लक्षणे दिसली. बुबोनिक प्लेग, ब्लाक डेथ अशी अनेक वेगवेगळी लक्षणे असलेले प्लेगचे प्रकार आठव्या शतकापर्यंत पुढे सुरु राहिले. भीती, अज्ञान, तर्कशुद्धतेचा अभाव, अंधश्रद्धा, यांचा पगडा मानवी मनावर होता. त्याने सारासार विचार करण्याची बुद्धी जणू झाकोळून टाकली होती.

हा रोग कशामुळे होत आहे ह्याचा अंदाजच कोणाला लागत नव्हता. या रोगाविषयी त्यावेळच्या श्रद्धांवर आधारित काही वदंता होत्या. ल्युसिअसने मेलेल्या माणसाचे थडगे उघडले म्हणून देवाचा कोप झाला. एका रोमन सैनिकाने देवळातली सोन्याची छोटी पेटी उघडली आणि त्यातून प्लेगची सुटका होऊन तो सगळ्यांना त्रास देऊ लागला. दोन्हींमधून देवाचा कोप असे ‘कारण’ पुढे आले. माणसांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून देवाने ही साथ आणली आहे, अनैतिकता बोकाळल्यामुळे हा शाप मिळालेला आहे असेही समज बायबलच्या विधानांच्या आधारे करून दिले जात होते. अविचाराने बरेच लोक दैवी उपायांकडे आणि जादूकडे वळले. काही संधीसाधूंमुळे तर अंधश्रद्धा, चमत्कार, सर्पदेवता जादूटोणा याला ऊत आला.

या सर्व महामारींमध्ये माणसांच्या मनावर काय परिणाम होत होते? साथ सुरु झाल्यावर आपल्याला किंवा कुटुंबियांना आता कुठल्याही क्षणी हा रोग होऊ शकतो आणि त्यात मृत्यू अटळ आहे या भीतीगंडाने माणसे पछाडली गेली. आजार झालेला नसतानाही आपल्याला रोगाची लागण झाली आहे असं अनेकांना वाटे. देवाला शरण जाणे, कर्मकांड, मांत्रिक यावर विश्वास ठेवला जाऊ लागला.  चिंता-रोग, भीतीचे झटके, ‘अंगात संचार’ (देव किंवा भूत), हे प्रकार सुरु झाले. त्यानुसार अशा व्यक्तीला काही वेळा प्रचंड प्रतिष्ठा मिळे तर काही वेळा त्यांच्यावर दुष्ट आत्मा (evil spirit), पिशाच्च समजून  सामूहिक अत्याचारही  होत.

पर्यावरणीय कारणे

या सर्व गोंधळात वैद्यकीय क्षेत्रातील लोक आपली सूक्ष्म निरीक्षणे लिहून ठेवत होते. काही निरीक्षणे कागदांवर, तर काही भिंतींवर चित्ररूपाने रंगत होती. त्यावेळच्या साहित्यातही याची वर्णने येत होती. खर तर अनेक ग्रीक तत्वज्ञ आणि गणितज्ञ सॉक्रेटीस, प्लेटो, आरिसटॉटल, पायथागोरस यांनी ख्रिस्तपूर्व काळातच खगोलशास्त्राचा अत्यंत तर्कशुद्ध पाया गणित आणि भूमितीच्या सहाय्याने मांडला होता. ग्रह गोलांमधली अंतरे ठरविण्या इतके त्यांचे तर्कशास्त्र प्रगत होते. विशिष्ट निरोगी जीवनशैली असण्याची आवश्यकताही त्यांनी सांगितल्याचे उल्लेख आहेत. ‘आपली जीवनशैली बदलूया’, ‘अनेक लोकांनी वापरलेल्याच रस्त्यांवरून चालू नका’, ‘देवाची चिन्ह असलेल्या वस्तू अंगावर घालण्याची गरज नाही’, असे संदेश विचारवंतांनी प्रसृत केलेले होते. पण आजूबाजूच्या चाललेल्या घटनांमधला संबंध लावून रोगामागच्या कारणांचे तर्काधिष्ठित अंदाज बांधणे कोणालाही जमले नाही.

प्लेग ऑफ जस्तिनिअन ही दुसरी महामारी उसळली ती पूर्व रोम आणि सभोवतालच्या मेडीतरेनियन समुद्रापासचे देश यामध्ये. लिहून ठेवलेल्या घटनांवरून, त्यावेळी अमर्यादित उंदीर झाले होते आणि या उंदरांमुळे दुष्काळ पडला होता. उंदरांपासून धान्याचा आणि रोगापासून लोकांचा बचाव करता येत नव्हता. सर्व कृषी आणि व्यापार व्यवस्था कोलमडली.  दुष्काळ, संसर्ग, उपासमार, अशा अनेक संकटांची त्यात भर पडली. मात्र उंदरांचा आणि प्लेगचा संबंध त्यावेळी कोणाच्याही लक्षात आलेला दिसत नाही. तो नंतर लक्षात आणून दिलेला दिसतो.

मानवी जबाबदाऱ्या

याचवेळी एक संयत आणि आध्यात्मिक दृष्टीकोन तत्वज्ञानातून पुढे येत होता. स्वतःमध्ये बदल घडविण्याची जबाबदारी माणसावर केंद्रित झाली. ‘तटस्थता’, ‘आत्मचिंतन’, ‘ध्यान धारणा’ यातून मनाची ताकद वाढविणे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारणे, रोग-प्रतिबंधक शक्ती वाढविणे, असे प्रयत्न होऊ लागले.

यावेळी ख्रिश्चन नर्सेसनी केलेली रुग्णसेवा उल्लेखनीय होती. त्यांच्या निरीक्षणानुसार या आजारातून बऱ्या झालेल्या लोकांना प्लेग पुढे कधी शिवला नाही. त्यामुळे पुढच्या रुग्णांना मदत करण्यासाठी हे बरे झालेले लोक पुढे आले. या रोगातून बाहेर पडता येतं आणि एक रोगप्रतिबंधक ताकद शरीरात तयार होते असा विश्वास त्यातून नक्कीच मिळाला.

इ.स.१३४७ मध्ये भोवतालच्या अशुद्धतेमुळे प्लेगची साथ आली असावी असे गृहीत धरून ‘अशुद्ध हवेमुळे होणारा आजार’ अशी त्याची नोंद झाली. आजारी लोकांना बाजूला ठेवले तर रोगराई पसरणे कमी होते हेही लक्षात आले. ज्यांना संसर्ग झालेला नाही त्यांनी घरातच राहावे, बाहेर पडू नये अशी व्यवस्था म्हणजेच विलगीकरणाची (quarantine) पद्धत ठरवली गेली. इ.स. १३७७ मध्ये ‘विलगीकरण’ ही कल्पना जाणीवपूर्वक आणि नियोजनपूर्वक पाळली गेली. हा विलगीकरणाचा काळ ठरवताना आधी ३० दिवस, मग ४० दिवस, असा होता. ही कायम स्वरूपी उपयुक्त ठरत नाही हेही लक्षात आले. अनेक वैद्य, डॉक्टर्स, तत्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ यामागची कोडी उलगडू शकले नाहीत.

रोगांच्या उत्पत्तीबद्दलचे उत्क्रांत विचारप्रवाह

अजूनही रोगांमागची शास्त्रीय कारणे न समजू शकल्यामुळे भीतीमुळे अनेक मानसिक लक्षणे दिसत. भयगंड, मानसिक प्रगती खुंटणे, अतिरेकी अवाजवी चिंता, अनिवार्य आणि पुनःपुन्हा येणारे तेच तेच विचार आणि अनिवार्य वर्तन, उन्मनी अवस्था, ही अनेकांमध्ये दिसत होती. रोगांबद्दल असलेल्या अर्धवट माहितीमुळे त्यात भरच पडत होती. असुरक्षितता, दुष्काळ, आर्थिक मंदी, यातून ही अस्थिरता अधिकच वाढत होती.

रोगांमागील कारणांचा शोध घेणे सतत चालू होते. कित्येक शतकांच्या मध्यंतरानंतर अखेर अठराव्या शतकात प्राणीशास्त्रज्ञांनी, जीवजंतूशास्त्रज्ञांनी, सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञांनी, उत्क्रांतीवाद्यानी जेंव्हा या रोगांचा पाठपुरावा केला तेंव्हा साथ फैलावणाऱ्या जंतूंच अस्तित्व लक्षात आल. एकपेशीय वनस्पती, बुरशी, जीवाणू, विषाणू, यांचे अस्तित्व, त्यांची जीवनपद्धती समजू लागली. हे चारही जंतू सजीवांच्या आधाराने जगतात आणि त्यांच्यावर कब्जाही करतात. कधी ते सजीवांना पोषक असतात तर कधी मारक ठरतात हे या शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिद्ध केलं. सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने त्यांचे निरीक्षण करणेही शक्य झालं.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारा रेबीज हा आजार पुढे आला. रेबीजमुळे मेलेल्या प्राण्यापासून त्यातले जीवजंतू दुसऱ्या प्राण्यांमध्ये टोचून विशिष्ट पद्धतीने प्रतिबंधक अशी लस बनविता येते, असे संशोधन झाले, आणि १८८५ मध्ये पहिल्या रुग्णावर उपचार केला गेला. इ.स. १८८२ मध्ये क्षयाची लस तयार झाली आणि सरकारी स्तरावर सर्व बालकांना जन्मल्याबरोबर ती लस देण्याची सोय झाली. इ.स. १९२८ मध्ये फ्लेमिंग या स्कॉटिश शास्त्रज्ञानी पेनिसिलीनचा शोध लावला आणि प्रतिजैविक औषध तयार झाले. याशिवाय पुष्कळच औषधे बाजारात आली. असे म्हणून जरा निश्वास सोडेपर्यंत इ.स. १८१७ पासून पुढच्या रोगाच्या – पटकीच्या साथीने थैमान घातले.

भारतात १८१७ ला पटकीची साथ आली तशीच अनेक देशात ही साथ पसरली. हे उद्रेक अधून मधून १९०२ पर्यंत चालूच राहिले. पूर्वीच्या औषधांना ही साथ अर्थातच दाद देत नव्हती. काही ठिकाणीच ती भराभर फैलावते याचं कारण काही जीवजंतू असले पाहिजेत आणि त्यांचा भोवतालच्या पर्यावरणाशी काही संबंध असला पाहिजे अशा अंदाजाने निरीक्षणे केली गेली. शिकागो, स्पेन, ब्राझील, व्हेनेझुएला, ट्युनिसिया,  येथे पटकीचा उद्रेक अशुद्ध पाण्याच्या आजूबाजूला पसरला. लंडन मध्ये १८६६ मध्ये पूर्व भागातली सांडपाण्याची व्यवस्था पूर्ण होत होती तेंव्हा पटकीचा फेरा आला. याच सुमारास दक्षिण वेल्स मध्ये कालव्याच्या दूषित पाण्यामुळे लोक पटकीला बळी पडले. इ.स. १८६७ च्या सुमारास इटली, अल्जिरीया, उत्तर अमेरिका, आणि मिसिसिपी नदीवरील अनेक बंदरांच्या ठिकाणी पसरलेल्या साथीमध्ये या सर्व ठिकाणची सांडपाण्याची व्यवस्था बिघडलेली होती. साथींच्या रोगांवर काम करणाऱ्या जॉन स्नो या ब्रिटीश डॉक्टरने दूषित पाण्यामुळे हा रोग होतो असे साथीचे निदान नक्की केले. त्यामुळे पटकीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेणे शक्य झाले. नवीन औषधे निघाली आणि पुन्हा एकदा साथींना आळा बसला.

विसावे शतक

यानंतर साथ सुरु झाली ती इन्फ़्लुएनझा किंवा फ्लूची. ही मात्र पुढे ती वेगवेगळ्या विषाणू आणि त्यांच्या उपप्रकारांमुळे चालूच राहिली. यामध्ये AIDS, Avian Flu, SARS, MERS, Ebola, Zika ह्याचे जंतू तर मानव आणि प्राणी यांच्यामधल्या जटील परस्पर संसर्गातून अधिक संसर्गजन्य झालेले दिसतात. रुग्णांना बाजूला ठेवणे, सामाजिक विलगीकरण करणे आणि निर्जंतुकीकरण अशाच औषधेतर पद्धती या वेळा प्रथम अंमलात आणाव्या लागल्या.

इ.स. १९१८ पासून या प्रकारच्या विषाणूंमुळे जगाची सुमारे एक तृतीयांश संख्या बाधित झाली होती. अनेक निरोगी आणि सशक्त लोकांचाही यात समावेश असल्याने लोकांची काळजी वाढली. यासाठी वरवर दिसणारी निरीक्षणे, गणिती अभ्यास पुरेसे नाहीत हे लक्षात आले. अत्यंत सखोल अभ्यास करण्यासाठी या रोगाने मृत्यू पावलेल्या लोकांच्या शरीरातले विषाणूंचे नमुने मिळवण्याची गरज होती हे हुल्तिनसारख्या सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञानी जाणले. पदरचे पैसे घालून, १९१८ साली मृत्यू पावलेल्या रुग्णांची पुरलेली प्रेते उकरण्यासाठी १९५१ साली स्वतः खणण्याचे आणि त्यांच्या फुफ्फुसांचे नमुने गोठविलेल्या स्थितीत आणण्याचे कसब पणाला लावून त्याने संशोधनाला मोठा हातभार लावला. वॉशिंग्तनच्या Armed Forces Institute of Pathology ने हे नमुने घेऊन विषाणूचा जनुकीय आराखडा समजून घेण्याचे अवघड काम पूर्ण केले. उत्क्रांतीचा टप्प्यांवर हे विषाणू जसजसे बदलत जातील, अनेक लशी आणि औषधांवर मात करतील तसतसे माणसांनाही ही नवनवी आव्हाने घ्यावी लागतील. आताचेही आव्हान आहे पूर्वीपेक्षा अधिक तयारीने हल्ला करणाऱ्या कोविद-१९ विषाणूचे!

महामारीशी झुंजणारे वीर:

आत्तापर्यंत शास्त्रपूर्व समजापासून शास्त्रीय विचारांचे फक्त विवरण केले आहे. या काळात माणसांच्या मनोवस्था कशा कायम राहिल्या आणि कोणत्या बदलत गेल्या हे पाहणे एक स्वतंत्र विषय ठरेल. जीवाची प्रचंड भीती, कुटुंबियांची काळजी आणि लोकांचा कळवळा या सगळ्याचे मिश्रण मानसिकतेत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीला धावून जाणे, हे ‘माणूसपण’ जसे दिसले तसेच या काळात स्वतःची चलती साधून घेणारे संधीसाधूही आढळले.

या परस्परविरोधी वातावरणाला धीराने तोंड देणाऱ्या, जीवाची भीती बाजूला ठेऊन, स्वतःच्या मुलाबाळांना घरी ठेऊन रुग्णांना अथकपणे सेवा देणाऱ्या, अज्ञानी लोकांचे स्वतःवर होणारे हल्ले पचवून जीवाची भीती बाजूला ठेऊन काम करणाऱ्या कोविद-वीरांमुळेच आजपर्यंतच्या समस्यांना सामोरे जाता आले आहे हे शाश्वत सत्य आहे. या लढ्यासाठी रुग्णांना स्वस्थता देण्यासाठी नवनवीन, सुलभ, स्वस्त अशी शास्त्रीय उपकरणं बनविण्याचे आव्हान वैद्यकीय आणि वैद्यकेतर लोकांनी पेलले. सामाजिक अंतर आणि विलगीकरण पाळण्यासाठी खडतर त्रास सहन करणाऱ्या लोकांना राहणे, खाणे, सुरक्षितता देण्यासाठी अनेक समाजसेवक अहोरात्र झटत आहेत.  कायद्याचे पालन करण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा नाही नाही ते आघात झेलत आहेत. सर्वांपर्यंत योग्य सूचना आणि बातम्या पोहोचविण्यासाठी अनेक माध्यमे कार्यरत आहेत. लोकांना दिलासा मिळावा यासाठी अनेक मानसतज्ज्ञांचे अविरत काम चालू आहे. आपण सर्व ह्या सेवांना कृतज्ञतापूर्वक दाद देवू या, आणि जमेल तसे योगदान या यज्ञात करूया !

 (लेखिका पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्थेत मानसतज्ञ आहेत)

Previous articleरतन खत्री ‘मटका किंग’ कसे झालेत?
Next articleआठवणी मटक्याच्या …रतन खत्रीच्या!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.