भारतीयत्वाचा जयजयकार व्हावा!

-किशोर देशपांडे

गोष्ट अतिप्राचीन काळातील आहे. ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका यांना एक मुलगी झाली – तिचे नाव शकुंतला. या शकुंतलेचा सांभाळ कण्व मुनींनी त्यांच्या आश्रमात केला. अनेक वर्षांनी हस्तिनापूरचा राजा दुष्यंत तिथे शिकारीसाठी आला. दुष्यंत आणि शकुंतला एकमेकांच्या प्रेमात पडले. कण्व मुनी त्यावेळी आश्रमात नसल्यामुळे, दुष्यंत राजाने निघताना शकुंतलेस असे वचन दिले की – “मी तुझ्याशी विवाह करण्यासाठी पुन्हा येईन”; पण ते वचन तो विसरला. इकडे शकुंतलेस एक मुलगा झाला – त्याचे नाव भरत. तो बालपणापासूनच शूर व पराक्रमी होता. सिंहाचा जबडा उघडून त्याचे दात मोजण्याचे साहस भरताच्या अंगी होते. मध्यंतरी राज्य दुष्यंत ते वचन विसरला आणि कालांतराने त्याला दिलेल्या वचनाचे स्मरण झाले. मग तो भरताला व शकुंतलेला सन्मानाने हस्तिनापुरास घेऊन गेला. त्याच्या मृत्युपश्चात भरत हा राजा झाला आणि त्याने मोठा राज्यविस्तार करून ‘चक्रवर्ती’ पद मिळविले. भरताने आपल्या राज्याचा वारसा मात्र स्वतःच्या नाकर्त्या पुत्रांना न देता, त्याच्या नात्या-गोत्यात नसलेल्या दुसऱ्याच एका सक्षम व्यक्तीच्या हाती सोपविला. त्या भरताच्या नावावरूनच उत्तरेस हिमालय व तिन्ही बाजूंना समुद्र असलेल्या आपल्या भूप्रदेशास ‘भारतवर्ष’ किंवा ‘भारत’ असे नाव प्राप्त झाले. अर्थात नेमक्या कोणत्या ‘भरत’ राजामुळे या भूमीस ‘भारत’ असे म्हटल्या जाते, याबाबत मतभेद आहेतच. परंतु ‘भरत’ नावाच्या एका प्राचीन राजामुळे आपल्या देशाचे नाव ‘भारत’ असे पडले, हे सर्वांनाच मान्य आहे. शिवाय ‘भारतात राहणारे ते भारतीय’ असे आपण मानतोच.

हिमालयाच्या वरील भागातून उगम पावत लडाख, पंजाब व सिंधमार्गे अरबी समुद्राला मिळणाऱ्या सिंधू नदीच्या खोऱ्यात, अगदी प्राचीन काळापासून सुसंस्कृत अशी नागरी संस्कृती नांदत होती. सिंधू नदीच्या पश्चिमेकडील पर्शिया, अरबस्तान व ग्रीस इत्यादी प्रदेशांसोबत येथून जलमार्गे व्यापार चालत असे. पर्शियन भाषेत येता-येता ‘स’ चा ‘ह’ झाला आणि पर्शियन लोकं हे ‘सिंधू’ नदीला ‘हिंदू’ म्हणू लागले. तसेच अरब लोकंदेखील सिंधू नदीच्या पूर्वेकडील भागास ‘अल-हिंद’ किंवा ‘हिंद’ असे म्हणायचे. ग्रीसमध्ये पोहोचेपर्यंत सिंधूचे हिंदू आणि हिंदूचे ‘इंडस’ असे रूपांतर होऊन युरोपीय लोकं हे आपल्या देशाला ‘इंडिया’ असे म्हणू लागले, हा इतिहासदेखील सर्वमान्य आहेच. शिवाय आपल्या संविधानाने या देशाची ‘भारत’ व ‘इंडिया’ अशी दोन्ही नावे स्वीकारली आहेत.

गतसाली विरोधी पक्षीयांनी त्यांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण केल्यामुळे, त्या नावावर बरेच विचारमंथन झाले आणि ‘इंडिया’ हा शब्द परकीय असल्यामुळे देशाचा उल्लेख फक्त ‘भारत’ या नावानेच करावा, असा विचार समोर आला. भारत सरकारला सुद्धा ही कल्पना आवडली. नंतर ‘जी-२०’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची जी शिखर परिषद भारतात झाली, त्यावेळी शासकीय दस्तऐवज व पोस्टर्समध्ये देखील आवर्जून ‘भारत’ असाच उल्लेख इंग्रजी भाषेतही करण्यात आला. मग भारतीय जनता पक्षाच्या सर्व स्तरांतील नेते व कार्यकर्ते हे ‘भारत’ आणि ‘भारतीय’ असेच शब्द वापरू लागले व त्यातून भारतीयत्वाचा जयजयकार वाढत गेला.वर नमूद केल्याप्रमाणे ‘सिंधूपासून हिंदू’ असे रूपांतर होत-होत पुढे आपल्या देशाचे नाव हे परकीयांनी ‘इंडिया’ असे जे केले, ते जोखड झुगारून देणे तुलनेने सोपे होते; परंतु परकीयांनीच दिलेल्या ‘हिंदू’ या नावाचे काय करावे? हिंदू हे नाव जसे भारतात राहणाऱ्या लोकांना उद्देशून घेतले जाते, तसेच ते येथील प्रमुख धर्माला उद्देशून देखील घेतल्या जाते. मात्र आपल्या धर्मास ‘हिंदू’ हे नाव आपण दिले नाही, हे तर उघडच आहे!

प्राचीन काळापासून आपल्या देशात स्थिर, सुदृढ व टिकाऊ अशी समाजरचना निर्माण होण्यासाठी अनेकानेक प्रयोग झाले आणि समाज-व्यवस्थेचे व राज्यकारभाराचे नियम बांधून देण्यात आले. त्यानुसार समाजाची विभागणी ही विभिन्न जातींमध्ये करून, जातींचे व्यवसाय हे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक समाजघटकाने व व्यक्तीने पाळावयाची कर्तव्ये देखील आखून देण्यात आली. तसेच आर्थिक अथवा राजकीय यशप्राप्तीसाठी यज्ञयाग, तप व पूजाविधी यांचे नियमही निश्चित करण्यात आले. मोक्षप्राप्तीसाठी मात्र अधिक लवचिक स्वरूपाचे ध्यान, कर्म, भक्ती, ज्ञान इत्यादी प्रकारचे अनेक योगमार्ग सुचविल्या गेले. अशा या सर्व विधी-विधानांच्या, नियमांच्या, मर्यादांच्या व मार्गांच्या एकत्रित गाठोड्यास ‘सनातन धर्म’ (हिंदू नव्हे) असे नाव आपल्या पूर्वजांनी दिले होते. वेद-पुराणांमध्ये किंवा रामायण-महाभारतात देखील ‘हिंदू’ असा शब्द धर्मासाठी वापरलेला नव्हता. सनातन धर्मातील वर्ण नि जाती व्यवस्थेच्या कठोर चौकटीविरुद्ध आणि नियमांविरुद्ध, प्राचीन काळापासूनच वेळोवेळी विद्रोह देखील होत गेले. बौद्ध व जैन हे धर्म आणि लिंगायत व महानुभाव यांसारखे पंथ हे अशा विद्रोहातूनच जन्मले नि विस्तारले. शिवाय सनातन धर्मात देखील असंख्य देवीदेवतांची पूजा-अर्चना होत राहिली; तसेच भिन्न-भिन्न दैवतांच्या भक्तांमध्ये कलह आणि समन्वय सुद्धा होत राहिले. देशात अनेकानेक स्वतंत्र व सार्वभौम राज्ये निर्माण होऊन, ते आपापसांत युद्ध आणि तह करत राहिले. मात्र हे सर्व लोकं स्वतःला भारतीयच समजत होते; म्हणजेच ‘भारतीयत्व’ हे त्या सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवत होते.

बाहेरील देशांमधून अनेक भिन्नधर्मीय लोकं हे या भूमीत कधी व्यापार-उदिमासाठी, तर कधी धर्म व राज्यविस्ताराच्या लोभाने आक्रमण करीत येत राहिले आणि त्यातले बहुसंख्य लोक हे येथेच स्थिरावले. त्यांच्या साम-दाम-दंड-भेद अशा धोरणामुळे अनेक भारतीयांनी इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला. मोहम्मद पैगंबराच्या हयातीतच गुजरात, केरळ व तामिळनाडू येथे भारतातील पहिल्या मशिदी बांधल्या गेल्या. याचाच अर्थ सुमारे तेराशे-चौदाशे वर्षांपासून भारतात इस्लामचे अस्तित्व आहे. केरळमध्ये तर सुमारे पावणेदोन हजार वर्षांपूर्वीच – म्हणजे इ.स. ५२ मध्येच भारतातले पहिले चर्च स्थापन झाले. याचा अर्थ काही-ना-काही प्रमाणात ख्रिश्चन लोकं हे तेव्हापासूनच येथे वस्ती करून आहेत. शिवाय पारशी आणि ज्यू यांनादेखील भारतभूमीचा आश्रय घेऊन अनेक शतके लोटली. आता हे सर्व मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी व ज्यूधर्मीय स्वतःला ‘हिंदू’ म्हणवून घेत नाहीत. तसेच बौद्ध, जैन, शीख व लिंगायत यांचा समावेश जरी हिंदू कौटुंबिक कायद्यांनुसार ‘हिंदू’ या व्याख्येत केला असला, तरी ते स्वतःला खरंच हिंदू समजतात का याबाबत संभ्रमच आहे. शिवाय अनेक आदिवासी जमाती देखील स्वतःला हिंदू समजत नाहीत. परंतु वरील सर्व मंडळी स्वतःला ‘भारतीय’ नक्कीच म्हणवतात. सध्या अशा सर्वांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी २० ते २५ टक्के असावी; म्हणजे हिंदुत्वाच्या समीकरणातून किमान वीस ते पंचवीस टक्के भारतीय नागरिक तरी निश्चितच वगळले जातात.

मुळात भारतीय जनसंघाचे व भारतीय जनता पक्षाचे नामकरण करणाऱ्या संस्थापकांना सुद्धा सर्वसमावेशकताच अभिप्रेत असणार; कारण आपल्या पक्षाचे नाव त्यांनी ‘हिंदू जनसंघ’ वा ‘हिंदू जनता पक्ष’ असे ठेवले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नावसुद्धा ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ असे नाही. मंदिरांचे विध्वंस, फाळणीच्या वेळी झालेले भयंकर हत्याकांड, नंतरचा आंतरराष्ट्रीय इस्लामी दहशतवाद यामुळे दुखावलेल्या नि भयभीत झालेल्या हिंदू अस्मितेला खंबीर करणे कदाचित आवश्यक असेलही; आणि नेमके तेच करून भा.ज.प. व मोदींनी सत्ता संपादन केली – हिंदुत्वाचा नारा देत. परंतु आता संतुलन साधल्या गेले आहे आणि हिंदुत्वाचा अधिक आक्रमकतेने पुरस्कार करण्याची व तोच अजेंडा पुढे रेटण्याची गरज आज नाहीशी झाली आहे. बेरोजगारी व गरिबीचे उच्चाटन, शिक्षण व आरोग्य क्षेत्रांतील गुणवत्ता वाढवून खार्चिकता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नित्यनव्या तंत्रज्ञानाचा सम्यक व कल्याणकारी उपयोग करणे यांसारख्या विषयांना आता प्राधान्य मिळाले पाहिजे.

म्हणूनच दहा वर्षांपूर्वी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी “हिंदुओ का साथ – हिंदुओ का विकास” अशी घोषणा न करता, “सबका साथ – सबका विकास” अशी घोषणा केली असावी. नुकतेच ३१ मार्चला मेरठच्या जाहीर सभेतील भाषणात बोलताना देखील “माझा भारत हेच माझे कुटुंब आहे” आणि “२०२४ सालची लोकसभा निवडणूक ही केवळ सरकार स्थापन करण्यासाठी नाही, तर ‘विकसित भारत’ बनविण्यासाठी आहे” असेही मोदी म्हणाले. २०४७ साली स्वातंत्र्याचे शतक साजरे करताना सर्वार्थाने विकसित भारत बघावयाचा असेल, तर हिंदुत्वापेक्षा ‘भारतीयत्वाचा’ जयजयकार सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित संस्था व संघटनांनी करत राहणे गरजेचे आहे.

(लेखक नामवंत विधीज्ञ आहेत)
9881574954

Previous articleअमरावती जिल्ह्याचा इतिहास, राजकारण, समाजकारण आणि इतरही खूप काही…
Next articleनवनीत राणा जात प्रमाणपत्र : ‘सर्वोच्च’ न्याय!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.