बापू , आम्ही करंटे आहोत !

प्रिय बापू,
काल शनिवारी तुमच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशाने आदराने तुमचं स्मरण केलं. Gandhi6तुम्ही गेल्यापासून देशाच्या कानाकोप-यात़़. दिल्लीच्या राजघाटापासून अगदी अंदमान-निकोबारमधल्या दुर्गम बेटांवरसुद्धा २ आॅक्टोबर व ३० जानेवारी या दोन दिवशी तुम्हाला अभिवादन केलं जातं. असं कौतुकाने सांगितलं जातं की, या देशात असं शहर नाही, गाव नाही; जिथे तुमच्या नावाचा चौक वा पुतळा नाही़. तुमच्या स्मृतिदिनी अशा सा-या पुतळ्यांना, प्रतिमांना आम्ही वंदन करतो . पण, बापू, तुमचं हे कौतुक येथेच संपतं. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे नावाच्या मानवी जनावराने तुमचं भौतिक अस्तित्व संपविल्यापासून आम्ही तुम्हाला पुतळा व प्रतिमेत बंदिस्त करून टाकलं, ते कायमचं! त्या दिवसापासून आम्ही तुमची तत्त्वंसुद्धा तुमच्या प्रतिमेसारखीच खुंटीला टांगून ठेवली आहे . तसंही बापू, या देशाला मोठ्या माणसांना प्रतिमेत बंदिस्त करून त्याला देवत्त्व बहाल करण्याची सवय आहे . त्याला देव केलं की, आम्ही तर साधी माणसं आहोत, आम्हाला त्यांच्यासारखं वागणं कसं जमणार, असं समर्थन करण्याची सोय आम्ही करून घेतो़. बापू, तुम्हाला तर प्रतिमेत बंदिस्त करून ठेवण्याची आमची खूपच गरज होती़. कारण तुमचं कुठलंच तत्त्व आमच्या सोयीचं नाही़. तुम्ही सत्याचा आग्रह धरा, असं सांगता . तुम्ही सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करायला सांगता़. तुम्ही आवश्यक तेवढाच पैशाचा संचय करा, असंही सांगता. चारित्र्य जोपासण्याचा आग्रह करता . संयम बाळगण्याचा उपदेश करता . सत्ता ही सर्वोच्च नाही़ तिच्यापासूर दूर रहा, असं काहीबाही सांगता . बापू , यातील एकही गोष्ट आमच्या सोयीची नाही़. तुम्ही आयुष्यभर तुमच्या आतील आवाजासोबत प्रामाणिक राहिले़ आम्ही आम्हाला जेव्हापासून समजायला लागलं, तेव्हापासून तो आवाज दाबण्यातच धन्यता मानणारे आहोत .
बापू, तुम्ही गेल्यानंतर तुमचा विचार या देशात रूजणार नाही, याची आपल्या राज्यकर्त्यांसह आम्ही सर्वांनीच काळजी घेतली . त्यामुळेच तुम्ही सगळीकडेच आहात पण कुठेच नाही, अशी स्थिती आहे . विडंबना बघा़ या देशातील प्रत्येक राजकीय पक्ष व सामाजिक संस्था – संघटनांचे पदाधिकारी सार्वजनिक जीवनात तुमच्या नावाचा महिमा गात असतात. मात्र, प्रत्यक्षात तुम्ही कोणालाच नको आहे . समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी, संघवाले, काँग्रेसवाले़.. . सारेच तुमच्या विचारांना मोडित काढायला निघाले आहेत . समाजवादी वरवर तुमच्याबद्दल प्रेम दाखवितात़ प्रत्यक्षात तुमच्या विचारांची पोथी वाचण्याशिवाय ठोस त्यांनी काही केलं नाही़ . अंगावर खादीचा कुर्ता चढवून ढोंगीपणे वागण्यात त्यांच्यापैकी अनेकांनी आयुष्य घालविलं. साम्यवादांना तुम्ही कधी चाललाच नाही़. त्यांची सारी श्रद्धास्थानं रशिया, चीनमध्ये असल्याने तुमचं मोठेपण ते मान्य करतील, याची शक्यताच नाही़. आंबेडकरवाद्यांनाही तुमच्याबद्दल आक्षेच आहेच . पुणे करारामुळे बाबासाहेबांना माघार घ्यावी लागली हे शल्य अद्याप त्यांना विसरता येत नाही़. संघवाल्यांना तर तुमची कायम अ‍ॅलर्जी राहिली आहे . या देशात ज्या काही समस्या आहेत, त्याला गांधी नावाचा खलपुरूष जबाबदार आहे, असंच ते मानतात . यामुळेच त्यांनी कायम तुमची हेटाळणी करण्यातच धन्यता मानली आहे . जग तुम्हाला मानते म्हटल्यानंतर संघाच्या सकाळच्या प्रार्थनेत नाईलाजाने त्यांनी तुमच्या नावाचा समावेश केला . पण त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचा द्वेष कायम आहे़ (गमतीची गोष्ट अशी बापू, त्यांचा कट्टर स्वयंसेवक पंंतप्रधानपदावर पोहोचल्यानंतर त्यांना कार्यालयात सर्वप्रथम तुमचीच प्रतिमा ठेवावी लागली . हेडगेवार, गोळवलकरांना जागा देण्याची हिंमत ते करु शकले नाहीत़) काँग्रेसवाल्यांबद्दल काय सांगायचं… तुमच्या नावाचा सर्वाधिक फायदा त्यांनी करून घेतला . मात्र तुमच्या तत्त्वांचा सर्वात मोठा पराभव कोणी केला असेल तर तो त्यांनीच केला़. डोक्यावर गांधी टोपी चढवून तुमच्या सा-या विचारांची ऐसीतैशी करून वर गांधी बाप्पा की जय म्हणण्याचा निर्ल्लज्यपणा त्यांनाच साधू शकतो .
तसंही बापू, कोणाकोणाला दोष द्यायचा? अनेकदा असं वाटतं की, या देशाला तुम्ही कळलेच नाही़. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या आमच्या पिढीसमोर खरा गांधी कोणी मांडलाच नाही़’ ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ असच आम्हाला शिकविण्यात आलं . आमच्यापुढे पराभूत, थकलेला गांधीच मांडण्यात आला . बापू, प्रामाणिकपणे तुम्हाला समजून घेतल्यानंतर लक्षात येतं, तुम्ही कधीच थकले नव्हता़. पराभूत झाले नव्हता . आफ्रिकेतील तुमच्या संघर्षापासून चंपारण, दांडी, असहकार, करो या मरो आंदोलनापर्यंत आणि अगदी शेवटी नौखालीच्या दिवसापर्यंतच तुमचं आयुष्य तपासलं, तर ठिकठिकाणी संघर्षच दिसून येतो . गांधी हताश होऊन बसले आहेत, असं कुठेही दिसत नाही़. मात्र, आमच्या पिढीसमोर काठी टेकवत जाणारा, आधार घेऊनच चालणारा हतबल गांधीच मांडण्यात आला . बापू, वाईट याचं वाटतं की, तुमचा मोहनलाल करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा प्रवास आम्ही समजूनच घेतला नाही . एका अगदी सामान्य माणसाचा महात्मा कसा होतो, हे या देशाने समजून घेतलं असतं, तर स्वातंत्र्यानंतरचा इतिहास काही वेगळा राहिला असता . खर सांगायच ना बापू, भारताबाहेरील जगाला तुम्ही जेवढे कळले ना, तेवढे आम्हाला नाही समजले़. आम्हाला तुम्हाला समजून घेण्यासाठी तो रिचर्ड अ‍ॅटनबरो नावाचा परदेशी माणूसच कामी आला . तुमच्यावर परदेशी माणसांनी किती भरभरून लिहलंय . तुम्ही असामान्य आहात, अद्वितीय आहात, हे त्यांनी केव्हाच ओळखलं होतं. जगाला तुमचं मोठेपण समजणार नाही, हे सुद्धा त्यांच्यापैकी काहींच्या तेव्हाच लक्षात आलं होतं. उगाचच नाही़. आईन्स्टाईन म्हणून गेला की, गांधी नावाचा हाडामासाचा माणूस या जगात होऊन गेला, यावर भविष्यात कोणी विश्वास ठेवणार नाही़.
बापू, आम्ही खरच करंटे आहोत़ जग आम्हाला महात्मा गांधीचा देश म्हणून ओळखतो, पण आम्ही तुमच्या विचारांशी, त्या विचाराच्या ताकदीशी अपरिचित . जगातील अनेक माणसं तुमच्या वाटेवर चालून इतिहास घडवितात, तेव्हा आम्हाला तुमच्या विचारांची ताकद कळते, खरं तर जगात तिथे कुठे असमानता, मानवता, हुकुमशाहीविरूद्ध लढा सुरू असतो, जिथे कुठे माणसाला माणसासारखी वागणूक मिळत नाही, तिथे तुम्हाला समोर ठेवूनच लढा लढला जातो . मार्टिन ल्यूथर किंग असो वा नेल्सन मंडेला़ तुमच्या मार्गाने जाऊनच त्यांनी इतिहासाच्या पानात आपल नाव कोरलंय . सर्वशक्तीमान अमेरिकेचा अध्यक्ष बराक ओबामा जेव्हा सांगतोय की, गांधी हे माझ प्रेरणास्थान आहे, तेव्हा ते केवळ पोकळ शब्द नसतात़. त्याला समृद्ध करून गेलेली ती अनुभूती असते़. बापू, जगात कुठेही मोठी समस्या निर्माण झाली की, शेवटी तुमचाच विचार मार्ग दाखवितो, हे आता अनेकदा सिद्ध झालं आहे . बापू, हा देश तुमच्या विचारांसोबत वेळोवेळी कृतघ्र झाला असला, आम्ही सर्वांनी तुमच्या तत्त्वांना दडपण्याचा प्रयत्न केला, तरी तुमचा विचार शाश्वत आहे . तो कधीच संपू शकत नाही, हे आता उशिरा का होईना आम्हाला पटायला लागलं आहे. सत्य, अहिंसा ही तुमची मूल्यं कुठल्याही काळात तेवढीच महत्त्वाची आहेत, हे सुद्धा लक्षात यायला लागलं आहे . तुमच्या विचारांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे, हे सुद्धा समजत आहे . बापू, उशीर खूप झाला आहे़ पण . . . तुमच्या मार्गावर चालत राहिल्यास़़. ‘नई सुबह आयेंगी़.’, हा विश्वास आता निश्चितपणे निर्माण झाला आहे .

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)
8888744796
www.avinashdudhe.com

Previous articleसावरकर पुन्हा वादात!
Next articleदेशाचा मूड नक्कीच बदलतो आहे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.