रणजित देशमुखांची पंच्याहत्तरी !

-प्रवीण बर्दापूरकर 

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र कॉंग्रेसचं दोनवेळा अध्यक्षपद भूषवलेले ,  राज्यात प्रदीर्घ काळ मंत्री राहिलेले रणजित देशमुख यांचा मुलगा आशीष देशमुखचा फोन आला . माजी आमदार असलेल्या आशीषनं  सांगितलं ,  ‘बाबा ( म्हणजे रणजित देशमुख  ) येत्या २९ मे रोजी पंचाहत्तरीत प्रवेश करतायेत’ .

मन एकदम भूतकाळात गेलं . रणजित देशमुख आणि माझी पहिली ओळख १९८१ साली झाली . माझी स्मरणशक्ती तर बरोबर असेल तर तेव्हा ते नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते . मुख्य वार्ताहर दिनकरराव देशपांडे यांनी माझी रणजित देशमुख यांच्याशी ओळख करुन दिली . निळ्या गर्द रंगाचा सफारी सूट घातलेले , केस मागे वळवलेले त्यामुळे भालप्रदेश विस्तृत दिसणारे , सोनेरी काड्यांचा मोठ्या फ्रेमचा चष्मा घातलेले आणि अस्सखलित मराठी आणि इंग्रजीत सूचना देणारे रणजित देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर न शोभणारे होते . कारण तोपर्यंत जे जिल्हा परिषद अध्यक्ष बघितले होते त्यांची इंग्रजीवर फारशी तशी हुकमत नव्हती . पुढे कळलं की , रणजित देशमुख हे इंजिनिअर आहेत . रणजित देशमुखांशी मैत्रीचा सुरु झालेला सिलसिला अजून कायम आहे . जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असणारा एक कर्तबगार नेता अशी वाटचाल मी रणजित देशमुखांची बघितली . सत्तेमध्येच असताना एन. के. पी साळवे इन्सिस्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असो का लता मंगेशकर हॉस्पिटल असो किंवा अन्य शैक्षणिक संस्थांचा पसारा असो किंवा सहकार क्षेत्रातील साखर कारखान्याचं त्यांनी उभारलेलं जाळं असो अशी कर्तबगारी गाजवणारे रणजित देशमुख या काळात बघता आले .

आमच्या मैत्रीचं एक गुपित इथे सांगून टाकायला हरकत नाही . रणजित देशमुख हे कट्टर विदर्भवादी आणि मी कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी त्याच्यामुळे आम्हा दोघांची खूप जुंपतही असते . रणजित देशमुखांना कधीही फोन केला की बोलण्याची सुरुवात मी ‘जय महाराष्ट्र’नं करतो आणि ते तिकडून ‘जय विदर्भ’ म्हणून बोलायला सुरुवात करतात . कधी कधी फारच लटका राग असेल तर रणजित देशमुखांनी मला अनेकदा ‘प्रवीण तुम्ही जर विदर्भाचे जावई नसता तर बुकलून काढलं असतं‘ , अशी धमकी दिलेली आहे . आणखी एक गुपित इथे सांगायला हरकत नाही , रणजित देशमुखांना गाणं ऐकण्याचा शौक आहे . ते स्वत: गातातही उत्तम . एका मध्यरात्री पैठण ते औरंगाबाद प्रवास करताना ते स्वत: गाडी चालवत होते . ( त्यांना एकेकाळी ड्रायव्हिंगचाही शौक होता . आता प्रकृती अस्वस्थ्यामुळे जमत नाही . ) पैठण ते औरंगाबाद आमचं घर येईपर्यंत रणजित देशमुख हेमंतकुमारची गाणी गात होते . मला आठवतं आमचा तो प्रवास फार छान झाला होता . हेमंतकुमार यांचं ‘बेकरार कर के हमें यू न जाइये’ हे त्यांचं आवडतं गाणं .

१९९५ ची एक घटना सांगतो . रणजित देशमुख यांच्या स्वभावाची चुणूक त्यात जाणवेल . विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेले होते आणि तेव्हा सावनेर मतदार संघातून निवडणूक लढवणारे रणजित देशमुख यांचा सुनील केदार यांच्याकडून पराभव झालेला होता . पत्रकारितेतला सहकारी धनंजय गोडबोले , प्रकाश देशपांडे , सिद्धार्थ सोनटक्के वगैरे आम्ही ठरवून रणजित देशमुखांकडे पोहोचलो . सिव्हिल लाइन्समधल्या त्यांच्या त्या घरी नेहमीची लगबग नव्हती , तसा सन्नाटाचं होता . एव्हाना रणजित देशमुखांशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते . त्यांची मुलं आशिष आणि अमोल मला काकाच म्हणायचे . आशिष देशमुख तर माझा लाडका पुतण्या आहे .  आम्ही गेलो तर , रणजित देशमुख सोफ्यावर शांतपणे वृत्तपत्र वाचत बसले होते . आम्ही बसलो इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग मी त्यांच्या पराभवाचा विषय काढला . तेव्हा रणजित देशमुख म्हणाले की , ‘निवडणुकीत जय-पराजय चालायचेच . राजकारणात असे चढ-उतार येतच असतात . माझ्यासाठी प्रश्न इतकाच आहे की , मतदार संघात आपण इतकं काम केल्यानंतरही आपला पराभव का झाला या कारणांचा शोध आपण घ्यायला हवा’ . रणजित देशमुख कुठल्या जातकुळीचे राजकारणी आहेत . म्हणजे एखाद्या घटनेकडे किती बारकाईनं बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा वेगळा असतो , कितीही संकट आलं तरी , आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘कुलली’ घेण्याचा त्यांचा हा असा स्वभाव आहे . बरीच चर्चा झाल्यावर उठता उठता रणजित देशमुखांना म्हणालो , ‘पराभवाचही आता सेलिब्रेशन करायला हवं’ .

तेव्हा रणजित देशमुख हसत हसत म्हणाले , ‘बिलकुल . का नाही?’ .

मग मी म्हटलं कधी तर ते म्हणाले , ‘आजच रात्री बसू या’ .

मग त्या दिवशी रात्री आम्ही मित्रांनी रणजित देशमुख यांच्यासोबत त्यांच्या पराभवाचं सेलिब्रेशन केलं . पराभवसुद्धा इतक्या दिलेरपणे घेणारा राजकारणी असा रणजित देशमुखांसारखा विरळाच असतो .

रणजित देशमुखांची एकूण कारकीर्द पंगा घेणं आणि पंगा निभावणे अशा पद्धतीची राहिलेली आहे . एक प्रसंग सांगतो , रणजित देशमुख आणि सुनील शिंदे (आम्ही सोनू बाबा म्हणायचो . ) हे आमदार होते पण , मंत्रिमंडळात नव्हते . तेव्हा या दोघांचं गृह राज्यमंत्री असलेल्या श्रीकांत जिचकारांशी जोरात राजकीय घमासान सुरु होतं . नरखेडच्या कुठल्यातरी प्रश्नावरुन तर सोनू बाबा आणि श्रीकांत जिचकार हमरीतुमरीवर आलेले होते . सोनू बाबा आणि रणजित देशमुख एका गटाचे . त्यामुळे त्या लढाईला श्रीकांत जिचकार विरुद्ध रणजित देशमुख आणि सोनू बाबा असं स्वरुप प्राप्त झालं होतं . एका क्षणी खूप मोठी गडबड झाली आणि नरखेड रस्त्यावर सोनू बाबांच्या समर्थकांकडून जिचकारांच्या गाडीवर दगडफेक झाली. गृह राज्यमंत्र्याच्या गाडीवर दगडफेक होणं आणि त्यातही तो गृह राज्यमंत्री मुख्यमंत्र्याचा लाडका असेल तर त्याचे पडसाद गंभीरपणे उमटणं स्वाभाविक होतं . समर्थकांसह सोनू बाबांनाही अटक झाली . रणजित देशमुखांनी बेल घेण्यास स्पष्ट नकार दिला . ‘मी जामीनासाठी कोणतीही विनंती करणार नाही . कारण आमचं काही चुकलेलं नाहीये’ असं त्यांचं म्हणणं होतं . म्हणून सुनील शिंदेंनी देखील जामीन घ्यायला नकार दिला . दोघांची रवानगी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये झाली .

प्रकरण फार चिघळू देणं मुख्यमंत्र्यासाठी शक्य नव्हतं . असेच सात-आठ दिवस गेले . शरद पवारांना मध्यस्थी घालण्यात आलं . शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री नव्हते . शरद पवार नागपूरला आले आणि त्यांनी रणजित देशमुख आणि सुनील केदार यांना समजावलं आणि अखेर रणजित देशमुख आणि सुनील शिंदे कारागृहाच्या बाहेर आले . याला हट्टीपणा म्हणता येणार नाही . ते आपल्या भूमिकांवर ठाम असणं होतं .  रणजित देशमुख विदर्भातले असे राजकारणी आहेत की , ज्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात गावपातळीवर संपर्क आहे . त्यांचं संघटन कौशल्य वादातीतच आहे . त्यामुळे युवक काँग्रेसमधून सुरुवात करताना त्यांनी आपलं संपूर्ण राज्याचं नेटवर्क करायला सुरुवात केली होती आणि मंत्रिमंडळात आल्यावर त्यांनी हा गुण अधिक जोमानं जोपासला आणि महाराष्ट्रभर त्यांचा संपर्क निर्माण केला . ते सत्तेत नसताना सुद्धा त्यांच्याभोवती लोक जमा होत , हे त्यांचं वैशिष्ट होतं . ते राज्यमंत्री झाले , मंत्री झाले , अनेक खात्यांचं त्यांनी मंत्रिपद भूषवलं . ग्रामीण विकास , कृषी , सिंचन ही खाती शहरीपेक्षा ग्रामीण भागाशी जास्त संपर्क असणारी आहेत आणि ती सांभाळताना जनसंपर्क निर्माण करताना रणजित देशमुखांना लाभ मिळाला .  मंत्री म्हणून काम करतांना रणजित देशमुखांनी प्रादेशिक अभिनिवेश बाळगला नाही आणि स्वतंत्र विदर्भाचा आग्रही सोडला नाही .

 रणजित देशमुखांची प्रशासनावर पकड मजबूत होती . बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर विदर्भातल्या लोकांना खिजगिणतीतही न ठेवण्याचं एकंदरीत प्रशासनाचं धोरण होतं . पण , रणजित देशमुखांनी खमकेपणानं प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ते धोरण मोडून काढलं . विशेषत: सनदी अधिकाऱ्यांना पदाचा जो तोरा असतो .  आपण समोरच्यावर वरचढ होऊ अशा शैलीनं ते वागत असतात पण , रणजित देशमुख यांनी एका बैठकीत एका सनदी अधिकाऱ्यावर असा कणखर आवाज काढला की , प्रशासनात त्यांच्या नावाचा दराराच निर्माण झाला . विदर्भाच्या किंवा त्यांच्या खात्याच्या प्रश्नाच्या फाइली घेऊन ते मंत्रालयात वेगवेगळ्या दालनात फिरत असत . त्यांना त्याच्यात कधीच कमीपणा वाटत नसे . एखादं काम करवून घेण्याची जी हातोटी एखाद्या प्रशासकाला लागते ती त्यांच्यामध्ये होती . नागपूरचं आजचं जे काही स्वरुप बदलेलं आहे, त्याचं स्वाभाविक श्रेय निश्चितच नितीन गडकरी यांचं आहे  पण , रणजित देशमुखांच्या मनामध्येही ज्या काही विकासाच्या कल्पना होत्या त्यात नागपूरचा विकास हाही एक मुद्दा होता आणि नागपूरच्या या बदललेल्या स्वरुपाची अगदी रस्त्याच्या विस्तारीकरणापासून ते महाराज बागेचं मोठं झू करणे किंवा फूड पार्क , गारमेंट पार्क या सर्व योजनांची पूर्वआखणी रणजित देशमुखांच्या काळामध्ये होती .

रणजित देशमुख पुढे प्रदेशाचे अध्यक्ष झाले . त्यांनी खूप छान काम केलं . १९९८ ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्र काँग्रेसचा सुवर्णकाळ म्हणावी लागेल ; तेव्हा काँग्रेसला राज्यात 3७ जागा मिळाल्या होत्या . .  त्यानंतर तसं यश महाराष्ट्रात काँग्रेसला कधीच लाभलं नाही . त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी रणजित देशमुख जालन्याला आले तेव्हा लोकसत्ताचा विशेष प्रतिनिधी म्हणून मी काम करत होतो . त्यांचा निरोप मिळाला . रात्री ते जालन्याहून आल्यानंतर पुढे त्यांना पैठणला अनिल पटेल यांच्याकडे जेवायला जायचं होतं . या दरम्यान रणजित देशमुख यांना कळलं की , ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी कवठेकर यांना औरंगाबादच्या परिवर्तन या संस्थेतर्फे देण्यात येणारा बी रघुनाथ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे . रणजित देशमुख राजकारणी पण , त्यांना बी रघुनाथ , अकोल्याचे नारायण कुलकर्णी कवठेकर आणि परिवर्तन ही संस्था आणि त्या पुरस्कारचं मोलही माहिती होतं . रणजित देशमुखांचा मला फोन आला की , ‘तुझा काय कार्यक्रम आहे ?’

‘नारायण कुलकर्णी माझा दोस्त तेव्हा मी त्या कार्यक्रमाला जाईन .  तुम्ही मला तिथूनच पिकअप करा’ असं मी म्हणालो .

तर रणजित देशमुख म्हणाले की , ‘मी जालन्याहून लवकर येतो आणि त्या कार्यक्रमात सहभागी होतो’ . जालन्याची सभा संपवून रणजित देशमुख पाच साडेपाच वाजताच औरंगाबादला थेट माझ्या घरीच आले . आम्ही दोघं जण तिथून संत एकनाथ मंदिरमधल्या बी रघुनाथ पुरस्कार वितरण सोहळ्याला गेलो . श्रोत्यात बसून शांतपणे रणजित देशमुख यांनी त्या कार्यक्रमाचा कवी नारायण कुलकणी कवठेकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतला आणि मग आम्ही रात्री पैठणला गेलो . पैठणला गेल्याच्यानंतर आमच्या गप्पा सुरु असतांनाच त्याचं राजकीय काम सुरु होतं. त्यांचा निवडणुकीचा आवाका कसा होता याचा  इथं एक अनुभव सांगतो . त्यांना असं वाटत होतं की , जालन्याला सोनिया गांधी यांनी प्रचारासाठी यावं . सोनिया गांधींची एक सभा जरी झाली तर जालन्याची जागा निघू शकते . त्यासाठी तेवढ्या रात्री ते सोनियाजींना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते . अखेर कसाबसा सोनिया गांधी यांचे सचिव व्ही . जॉर्ज यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी जॉर्ज यांना ते सगळं सांगितलं . जॉर्जनी सांगितलं की, मी प्रयत्न करतो आणि मॅडमशी सकाळी बोलणं करुन देतो .

आमचं जेवण वगैरे आटोपलं . खाणं आणि खिलवणं हा रणजित देशमुखांचा शौकच होता . आम्ही ते सर्व आटोपून बाहेर आलो . तर अनिल पटेल यांनी  नुकतीच नवीन कार घेतली होती . ती कार बघितल्यावर रणजित देशमुखांना कार चालविण्याची खुमखुमी आली . अतिशय सराईतपणे कार चालवत असलेल्या रणजित देशमुख यांना गाण्याचा मूड आला आणि मग संपूर्ण प्रवासभर आम्ही हेमंतकुमारची गाणी ऐकली.

रणजित देशमुखांचा स्वभाव पंगा घेण्याचा होता . त्यांचा नागपूरच्या राजकरणात उदय झाला तेव्हा बॅरिस्टर वानखेडे , दत्ता मेघे , नरेंद्र तिडके ही मंडळी मात्तबर झालेली होती . त्यात शरद पवारांचे लाडके असलेले बाबासाहेब केदारही होते  . ते सहकार क्षेत्रातले दिग्गज नेते होते . त्यांचं आणि रणजित देशमुखांचं कधी पटायचं नाही . सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना एक वेळ अशी आली नागपूरहून रणजित देशमुख आणि बाबासाहेब केदार दोघंही जण एकाचवेळी राज्यमंत्री झाले आणि दोघांमध्ये खूप जुंपलेली होती . काँग्रेसच्या विरोधी गटातून रणजित देशमुखांना मंत्रिमंडळातून वगळावं अशी मागणी सुरू झाली , दबाव वाढला . अखेर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष आणि पंतप्रधान नरसिंह राव यांना सांगण्यासाठी सुधाकरराव नाईक दिल्लीला गेले .

या सगळ्या हालचालींची आधीच खबर रणजित देशमुखांना लागलेली होती . त्यामुळे त्यांनीही पुरेशी मोर्चेबांधणी केलेली होती . सुधाकरराव नाईकांची आणि त्या शिष्टमंडळातल्या लोकांची जेव्हा पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी भेट झाली तेव्हा यांनी काही मागणी करण्याच्या आतच नरसिंह राव सुधाकरराव नाईकांना म्हणाले की , ‘सुधारकरराव तुम्ही रणजित देशमुखांना कॅबिनेट मंत्री का करत नाही . एवढा कर्तबगार माणूस आहे .’ आणि या लोकांची खूप पंचाईत झाली . तर हे असं पंगा घेण्याचं काम आहे आणि ते निस्तरण्याचं कौशल्यही रणजित देशमुखांमध्ये आहे  . शरद पवार आणि विलासराव देशमुख या दोघांशी त्यांचं नातं असंच , पंगा घेणं आणि निभावणं   असं राहिलं . राजकारणातल्या सुरुवातीच्या दिवसापासूनचं रणजित देशमुख यांची दिल्लीतली मोर्चेबांधणी जबर होती . राजकारणातला त्यांचा प्रवेश संजय गांधी यांचे समर्थक म्हणून झाला आणि दिल्लीत त्यांनी त्यांचे गॉडफादर चांगले तयार करुन ठेवले होते . एन . के . पी साळवे , खुद्द नरसिंहराव अशी ती त्यांच्या राजकीय गॉड फादरची बडी बडी नावं आहेत .

रणजित देशमुखांची वयाची साठी साजरी झाली तेव्हा मी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा नागपूर येथे संपादक होतो . त्या कार्यक्रमात बोलताना मी म्हणालो होतो की , रणजित देशमुख यांच्यामध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे पण , रणजित देशमुख स्वतंत्र विदर्भाच्या भोवतीच घोटाळत राहिले हे त्यांचं फार मोठं अपयश आहे . खूप मोठी क्षमता असूनही स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दयाच्या भोवतीच रणजित देशमुख रेंगाळत राहिले आणि त्यांना मग पुढे फार मोठी झेप घेता आली नाही . अन्यथा एक अतिशय कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असता याबद्दल शंका नाही पण ,  त्या भूमिकेला रणजित देशमुख स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला आयुष्यभर  चिकटून राहिले आणि राज्याचं नेतृत्व मिळण्याची संधी त्यांनी गमावली .

रणजित देशमुखांनी आजपर्यंत ‘तू ही बातमी का छापली ? किंवा माझ्यावर टीका का केली ? किंवा माझ्या विरोधकांना बळ देण्याचं तू एक पत्रकार म्हणून का केलं ?’ अशी विचारणा कधीही केली नाही . मीही आजवर रणजित देशमुखांना एकही काम सांगितलं नाही . निखळ असा मैत्रीचा आमचा प्रवाह आहे . रणजित देशमुख यांच्यासारखा दिलदार राजकारणी मित्र विरळाच हेही मला आवर्जून सांगायला हवंच .

आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात रणजित देशमुखांचा अजून एक ड्रा-बॅक सांगतो , स्वत:ची टिमकी वाजवावी ,  स्वत:चा पीआर करुन घेणं त्यांना जमलं नाही  . सध्याच्या राजकारण्यांच्या ट्रेंडमध्ये इमेज मेकिंग खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यातही ते कमी पडले पण , ते असो कारण असा राजकारणी आणि मित्र अतिशय विरळाच असतो .

घरातली  ती जी जुनी संदुक आपण उघडतो तेव्हा त्या संदुकीत ठेवलेल्या अत्तराचा सुगंध आसमंतात दरवळतो . रणजित देशमुख यांच्याशी असणारी मैत्री ती अशी जुनी , अस्सल आणि आसमंतात दरवळणाऱ्या अत्तरासारखी आहे . अशा या कर्तबगार मित्राला , नेत्याला वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण करत असतांना शुभेच्छा देतो , दीर्घायुरारोग्य चिंततो .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous article‘दिठी’: तू तो माझे… मी तो तुझे…
Next articleगंगा, अमरीन आणि पूजा …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.