एका संजीवनी (गूढ )बेटावरचा एक दिवस!

-युवराज पाटील

तुम्हाला कोणी विचारलं, मेडशिंगी वृक्ष माहिती आहे काय? पांढरा कांचन, शंकपुष्पी, कवट, शमी, लाजाळू, काळी टाकळी, रक्त चंदन ( ‘पुष्पा’ चित्रपटामुळे ‘रक्त चंदन’ कळले असेल ), मासरोहिणी, धावडा, चारोळी, गुंज ( ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्याला माहित असेल ), पांढरा पांगरा, लाल पांगरा, मालन्नागोनी…  उत्तर असेल अर्थात नाही… या सगळ्या महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मीळ वनस्पती आहेत.  अशा २०० च्या वर वनस्पतीच्या बीज त्याच्या औषधी वैशिष्टयासह माहिती असलेला अवघ्या ३० वर्षाचा वक माझा नवा मित्र आहे. होय! यापूर्वी मी त्याचे नाव सांगितलं आहे… शिवशंकर चापोले – होय!  तोच या जगातला अत्यंत दुर्मीळ माणूस…!!

हिरवाई वाढविण्यासाठी जिवाचं रान करणारा एक देवराई दत्तक घेऊन वाढविणारा व्यक्ती सुपर्ण जगताप, अत्यंत हरहुन्नरी पत्रकार दीपरत्न निलंगेकर, पत्रकार अभय मिरजकर , पत्रकार पंकज जयस्वाल, इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे, आमच्या ग्रुपचे सहकारी माजी सैनिक आणि या गावचे तलाठी शंकर लांडगे आणि मी … आम्हा सर्वांना शिवशंकर दाखवत होता, हा बघा पांढरा पांगरा, हा कुठ दिसत नाही… तो अत्यंत दुर्मीळ आहे… यात भरपूर औषधी गुण आहेत. ही सूळ बाभळ ही फक्त याच डोंगरावर दिसेल. अख्खे तीन तास सगळ्या वनस्पती तो दाखवत होता आणि आम्ही आ sss वासून ऐकत होतो… हा डोंगर आहे वडवळ गावाच्या जवळ… याला संजीवन बेट म्हणून ओळखतात… फक्त मराठवाड्यातून नव्हे ते कर्नाटक, आंध्र, तेलंगना या राज्यातून पारंपारिक वैद्य येथे येतात. उत्तरायण सुरु झालेल्या पहिल्या पाच दिवसात ते येतात.  असं हे सगळं ऐकत त्या डोंगरावर आम्ही फिरत होतो… सगळीकडे कपमार्क दिसत होते.. माझी उत्कंठा वाढली. येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कप मार्क आहेत म्हणजे मानवी वसाहती असाव्यात म्हणून थोडं बारकाईने पाहिले तर मुळवे ( दगडी बेसमेंट ) दिसले. यावरून प्राचीन काळी इथं रसशाळा असावी याची खात्री पटली. इथून जवळ असलेल्या नऊ कुंडाच्या झरीत प्राचीन गुरुकुल होतं.यामुळे या संजीवन बेटाचे पाळेमुळे अत्यंत प्राचीन असल्याचे लक्षात आले.

पुढे एक ठिकाण आलं, सगळे थांबलो. एक गोल रिंगण दिसलं. शिवशंकर म्हणाला, हेच ते ठिकाण, लोखंडाला चुंबक फिरवावं तसं इथं माणूस गरगरा फिरतो. आपोआप. अरे बापरे होय का… असं म्हणता म्हणता आमच्यातल्या एका व्यक्तीने कपडे काढले. बनियन आणि पॅन्टवर त्या जागेवर दक्षिण – उत्तर झोपला. शिवशंकरने सांगितले.. फक्त एक ते दोन लोळ्या तुम्ही स्वतः होऊन घ्या.. पुढे काय होतंय ते बघा. पहिली लोळी झाली दुसरी लोळी झाली. तिसऱ्या लोळीला तो भान विसरला मग चौथी लोळी, पाचवी लोळी. मग त्याचे रोलर झाले. पूर्ण शुद्ध हरवून ती व्यक्ती फिरायला लागली. दोन चक्कर झाल्यावर त्याला अडवलं. काही सेकंद त्याला कळलं नाही आपल्याला काय झालं… मग आम्ही दुसऱ्या व्यक्तीवर प्रयोग केला.  त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तिसरा व्यक्ती त्याच्यावर परिणाम झाला. त्याचे फुल्ल रोलर झाले. मला राहवलं नाही मी पण प्रयोग करून पाहिला माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. ,पाचवी व्यक्ती आली त्यावर परिणाम झाला. मी सगळ्यांचे ब्लड ग्रुप विचारले. जे रोलरसारखे फिरले त्यातील एकाचे ओ पॉझिटिव्ह होते. एकाचे ए पॉझिटिव्ह होते.  ज्या तिघांचे झाले नाही त्यांचा ब्लड ग्रुप चक्क बी पॉझिटिव्ह होता. त्यात मी पण होतो… मी एक दगड मागवला. जिथे व्यक्ती फिरते त्या भागावर मारला. त्यावेळी लक्षात आले खाली पोकळी आहे.  पोकळी गोलाकार दिसली. गेली वर्षानुवर्षे लोकं इथं लोळतात अंधश्रद्धा ठेवून… उत्तर बाजूला एक दगड त्याला शेंदूर लावून ठेवला आहे. तिथे चुंबकीय क्षेत्र आहे हे निश्चित पण ठराविक रक्त गटाच्या लोकांनाच का रोलर सारखं फिरवत आहे. हा यक्ष प्रश्न आहे… भूगर्भशास्त्रातल्या तज्ञ व्यक्तीला या जागेवर आणून अभ्यासावं लागणार आहे… त्यातून यातील सत्य बाहेर येईल….!!

दुसरा एक अंदाज आहे… तो पण शोधण्याचा प्रयत्न केला दक्षिण बाजूने उत्तरेकडे एक गुहा आहे… ती डोंगर उतरून जो रस्ता अत्यंत खडतर आहे तिथे द्वार आहे. मी, शिवशंकर आणि दुसरे दोन सवंगडी घेऊन त्यात उतरलो. अगदी बरंच अंतर मोबाईल बॅटरी लावून सरपटत गेलो.  त्यावेळी कळले की ही गुहा प्रचंड लांब असून जिथे रोलर सारखं माणूस फिरतो तिथे जाऊन ती थांबत असावी. पण काही अंतरावर ती माती पडून अत्यंत निमुळती झाली आहे… म्हणजे पुढे माणूस जाऊ शकत नाही… आज पर्यंत याला अनेकांनी गूढ म्हटलं पण माझ्या दृष्टीने इथं मोठं विज्ञान दडलं आहे. अशा गोष्टी वेळीच शोधून काढल्या तर लोकांच्या अंधश्रद्धा संपून विज्ञानावर श्रद्धा वाढेल… हे सगळं डोक्यात ठेवून आम्ही अत्यंत दुर्मीळ वनस्पती त्याचे वैशिष्टे बघत, डोंगर पालथा घालत होतो… गावच्या उपसरपंचानी वरच डोंगरावर एक मंदिर आहे तिथे जेवू घातले.

अत्यंत रुचकर जेवण जेवून डोंगर उतरत होतो.आम्हाला शिवशंकरने  ” आपमारी ” नावाच्या वनस्पतीचा पाला खायला दिला. यांनी सांगितले तुमच्या रक्तातील अधिक झालेली साखर काढून टाकण्यासाठी या वनस्पतीच्या पाल्याचा वापर होतो. कोणताही साईड इफेक्ट होत नाही… मात्र पुढले काही तास तुमच्या जिभेला कसलीच चव राहणार नाही. आम्ही तो पाला खायला.पुढच्या २० मिनिटांनी आम्हाला लेमन गोळी दिली. तोंडात टाकली तर ती गोड लागणे सोडा कुठलीच  चव नव्हती.. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जशी जिभेची चव जात होती तसंच अगदी… म्हटलं होईल थोडा वेळाने  नॉर्मल. गावात थांबलो.लोकांशी गप्पा मारल्या मंदिर बघितलं. यात दोनेक तास गेले. मग निघालो. तिथून एक अर्धा तासाच्या अंतराने लातूर,- नांदेड रोडवर रसवंतीच्या ठिकाणी थांबलो.  रस प्यायला. पण त्याला पण चव नाही. मग मात्र आम्ही हादरलो.. एवढा वेळ कशी काय चव जाऊ शकते?आमच्या ग्रुपमध्ये एक डॉक्टर होते. ते पण म्हणाले, यार हे काय झालं? असं म्हणत लातूरला पोहचलो… रात्री जेवताना मात्र चव आली आणि जीव भांड्यात पडला… पण संजीवन बेट मात्र आता संशोधनाच्या दृष्टीने खुणावते आहे. हे संजीवनी बेट अनेक चमत्कारीक वनस्पतीने भरलेलं आणि बहरलेलं आहे. महाराष्ट्रातले अत्यंत महत्वाचे संशोधन केंद्र येथे होऊ शकते.  या भागात आलात तर येथे नक्की जा. मात्र माहित नसताना  कोणताही पाला खाऊ नका.

(लेखक लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत)

8888164834

Previous articleसूर्य गिळणारी मी: प्रामाणिक आणि पारदर्शी आत्मकथन
Next article‘फाजल’ सुलभाताई !
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here