शिवसेना संपवणे हे भाजपचे अंतिम ध्येय ?

– विनोद शिरसाठ  

आता 4 जुलै रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा ठराव मांडला जाण्याची प्रतिक्षा आहे. अगदीच अनपेक्षित काही घडले नाही तर विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडला जाईल आणि तो ठरावही मंजूर होईल. तिथे प्रश्न निर्माण होईल तो एवढाच की, ‘शिवसेनेबरोबर असलेल्या 16 आमदारांनाच अपात्र ठरवा’ असा दावा शिंदेगट नव्या अध्यक्षांना करील का? तसे झालेच तर ते प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि दरम्यान 11 जुलै आलेला असेल तेव्हा शिंदे गटातील 16 आमदारांना, विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या नोटिशीवरही निर्णय दिला जाईल. न्यायालयाकडून तेव्हा जो काही निर्णय येईल, त्यानुसार शिंदे सरकार पुढे चालू राहील किंवा राष्ट्रपती राजवट किंवा विधानसभा बरखास्त अशा तीन शक्यता आहेत. सत्तांतर नाट्याचा तिसरा अंक तिथे संपेल अशी शक्यता आहे. प्रस्तुत लेख असलेला अंक दि. 2 जुलै रोजी छापायला जात आहे, त्यामुळे पुढचे काही भाकीत करण्यापेक्षा ‘भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री तर फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय का घेतला असावा’, याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न इष्ट ठरेल !

तो अनपेक्षित व धक्कादायक निर्णय झाल्यावर आणि त्या दोघांचा शपथविधी आटोपल्यावर झालेल्या चर्चेत ठळकपणे बोलले- लिहिले गेले असे दोन मुद्दे म्हणजे, फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षेला आवर घालण्याचा निर्णय भाजपने विशेषतः केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला असावा; किंवा ब्राह्मण मुख्यमंत्री नको असे भाजपला वाटले असावे. त्या दोन्ही मुद्यांमध्ये तथ्य असावे, पण किंचितच! कारण देवेंद्र फडणवीस हे जर साक्षात नरेंद्र मोदी यांची पसंती असेल तर तशी हिंमत अमित शहा दाखवू शकणार नाहीत आणि राजकीय फायद्यासाठी आता ब्राह्मण मुख्यमंत्री नको असेल तर भाजपमधील एखाद्या ब्राह्मणेतर नेत्याला त्यांनी मुख्यमंत्री केले असते.

मग दुसरी मोठी शक्यता अशी वाटते की, मुळात 38 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडलेला गट सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जुलैच्या निकालानुसार वैध ठरणार आहे का, याबाबत भाजपश्रेष्ठींना शंका असावी. आणि वैध ठरला तरी तो संपूर्ण गट भाजपमध्ये सामील होईलच असे नाही, आणि स्वतंत्र राहिला तर त्यातील दोनतृतीयांश आमदार पुढील काही महिन्यांत फुटण्याची शक्यता उरतेच. कारण या 38 मध्ये किती लोक प्रलोभन वा भीती दाखवून किंवा फसवून आणले आहेत, याची खात्री कोणालाच नाही आणि ते सर्व स्वखुशीने आले असले तरी नंतर त्यातील काहींचे मतपरिवर्तन होणारच नाही असे नाही. शिवाय काठावरचे बहुमत असलेले हे सरकार सांभाळायचे तर काही अपक्ष आमदारांची मनधरणी या ना त्या प्रकारे करीत राहावे लागणार; म्हणजे अशा खात्री नसलेल्या सरकारचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे ठेवण्यात पुन्हा एकदा मोठी नाचक्की ओढवण्याची शक्यता जास्त आहे.

तिसरे कारण असे असू शकते की, 2019 मध्ये कटकारस्थान करून पहाटेचा शपथविधी घडवून आणलेले देवेंद्र-अजित पवार सरकार 80 तासांत गायब झाले होते. ती नाचक्की इतकी अभूतपूर्व होती की, त्यानंतरची काही महिने भाजप व संघ परिवारातील अनेक लहान-थोरांना तोंड लपवण्याची वेळ आली होती. त्या अनुभवानंतर आता शिवसेनेत बंड घडवून आणण्यासाठी व त्यांना बळ देण्यासाठी सर्व काही भाजपने केले असले तरी अगदी शेवटपर्यंत ‘आमचा त्या बंडाशी संबंध नाही’ असेच भाजपवाले सांगत होते; पण जनता इतकी जास्त अडाणी नसल्याने ‘उघड गुपित’ म्हणूनच त्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे भाजपच्या बाजूला सर्वसामान्य जनतेची सहानुभूती फारशी वळली नाही. शिवाय, उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी यांच्याविषयी जनतेच्या मनात मोठी नाराजी अद्याप तयार झालेली नव्हती. आणि कोरोना संकटातून देश नुकताच कुठे बाहेर पडलाय, राज्य सरकारला आता कुठे पूर्ण ताकदीने काम करायला वाव आहे, म्हणजेच कोणत्याच प्रकारच्या सत्तांतराला जनमत सध्या अनुकूल नाही. त्यातच भर म्हणजे, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या बाबतीत जवळपास एका अडेलतट्टू विरोधी पक्षाचीच भूमिका सुरुवातीपासून ठेवली आहे. आणि भाजपची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा ‘न भय न लज्जा’ अशीही होऊ घातली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणूनही, भाजपचा मुख्यमंत्री आता करणे म्हणजे आजचे हित व उद्याचे नुकसान असे ठरण्याची शक्यता जास्त वाटली असावी.

चौथे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या यापूर्वीच्या कोणत्याच गटाला स्वतंत्रपणे वाटचाल करता आलेली नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे या तिघांना स्थान राहिले; पण त्यांच्या सोबत गेलेल्यांचे नामोनिशाण उरले नाही. याचे कारण मुळात शिवसेनेची रचनाच तशी आहे. मावळे, सरदार आणि राजा हाच सेनापती (हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्यावर पुढे कधी तरी). त्यामुळे एकनाथ शिंदे टिकून राहतील, त्यांचा गट राहणार नाही, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. अशा परिस्थितीत काही काळ का होईना एकनाथ शिंदेंना अधिक मोठे दाखवले पाहिजे, त्यांच्या हातून शिवसेना आणखी कमजोर केली पाहिजे, असा विचार भाजपश्रेष्ठींनी केला असावा. तसे करायचे असेल तर राज्य सरकार चालवण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे, मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यातून काढून घेणे. शिवाय, शिवसेनेचा विधिमंडळ गट फुटला तरी संसदीय गट अद्याप फुटलेला नाही. सध्या लोकसभेत शिवसेनेचे 19 सदस्य आहेत, ( संख्याबळानुसार आज शिवसेना लोकसभेतील सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरतो आहे.) तिथेही फूट वैध ठरवायची असेल तर तब्बल 13 खासदार फुटण्यास तयार असले पाहिजेत. ती फूट घडवून आणायची असेल तर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद उपयुक्त ठरू शकेल. अर्थातच, त्या खासदारांमध्येही अपवाद वगळता कोणीही स्वतंत्रपणे वाटचाल करू शकत नाही. म्हणजे ते सर्वही आज ना उद्या भाजपमध्ये सामील करून घेता येतील.

अर्थातच त्या सर्वांना भाजपमध्ये आता सामावून घेणे आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठोस आश्वासन देणे हे जरा कठीणच आहे. मात्र पुढील दोन-अडीच वर्षे शिंदे गट आमदार व खासदारांसह स्वतंत्र पक्ष म्हणून राहू शकला तर शिवसेना खूपच कमजोर होईल आणि शिंदेगट आज ना उद्या विरघळून जाणारच आहे, असा भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाचा डाव असावा. त्याचे कारण महाराष्ट्रात भाजपला जो काही जनाधार आहे, त्यातील मोठा अवकाश (स्पेस) शिवसेनेने व्यापलेला आहे ( हिंदुत्ववाद व राष्ट्रवाद या नावाखाली). त्यामुळे जोपर्यंत सेनेची स्पेस तळाला आणली जात नाही, तोपर्यंत भाजपला स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणता येणार नाही, आली तरी फार काळ टिकवता येणार नाही, असा तो आडाखा असावा. म्हणजे शिवसेना संपवणे हेच भाजपसाठी महाराष्ट्रापुरते अंतिम उद्दिष्ट असू शकते. या राज्यात केवळ द्विध्रुवीय राजकीय स्पर्धा ठेवायची असेल तर ठाकरे बंधूंना निष्प्रभ करणे हा एककलमी कार्यक्रम भाजपसाठी असला पाहिजे, असा विचार मोदी-शहा या जोडगोळीने केला असावा. अन्यथा त्यांना धूर्त, मुरब्बी वा कपटी कसे म्हणता येईल? त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना खाली खेचण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावले, या तर्काला फार थोडा अर्थ आहे. भाजपच्या व्यापक रणनीतीचा हा भाग आहे.

(लेखक साप्ताहिक ‘साधना’ चे संपादक आहेत)

9850257724

Previous articleमेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी…
Next articleठोंब्या विठोबा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.