गेल्या महिनाभरात काँग्रेसला या पाच राज्यातील निवडणुकांत झालेल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करण्यासही अजून वेळ मिळाला नाही . गेल्या सुमारे अडीच वर्षापासून काँग्रेस पक्ष न-नायक अवस्थेत आहे . पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर पक्षातले ज्येष्ठ २३ नेते आणि शीर्ष नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी , प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्यातील धुसफूस पूर्वी होती तशीच पुढे चालू आहे . ना सोनिया गांधी पक्षाचं नेतृत्व सोडायला तयार आहेत ना या २३ नेत्यांपैकी कुणीतरी ठामपणे पुढं येऊन पक्षाचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे , अशी ही बेबंदशाही आहे . महाराष्ट्रातले पक्षाची आमदार दिल्लीत ठाण मांडून हंगामी अध्यक्षांची भेट मागतात आणि ती मिळण्यासातही त्यांना बारा दिवस वाट पहावी लागते , हे पक्षात किती शैथिल्य आहे याचंच लक्षण मानायला हवं . पक्षात आपल्या विरोधात असंतोष असेल(च) तर श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी बाजूला होण्याचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवायला हवं . असं धाडस न दाखवून आणि हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा केवळ आव आणून श्रीमती सोनिया गांधी फार मोठी चूक करीत आहेत . त्याचे परिणाम काँग्रेसला आणखी भोगावेच लागतील . पक्षाचं कवच नसेल तर भाजप सरकार आपल्यावर कांही कारवाई करेल अशी तर धास्ती सोनिया गांधी यांना वाटत नाहीये ना , अशी कुजबूज मोहीम आता सुरु झाली आहे ते त्यामुळेच .
अगदी खरयं आप पक्ष स्वतःच काम त्या ताकदीने करून दाखवतयं…..कॉंग्रेसला पूर्वीसारख नेतृत्व राहीलेल नाही…