आरएसएस ही अत्यंत धोकादायक संघटना

– प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आणि आर.एस.एस.ची विचारधारा एकसारखी असल्याचा दावा केला जातो. पण तो धादांत खोटा आहे.

डॉ. बाबासाहेब म्हणतात, ” आर.एस.एस.ही अत्यंत धोकादायक आणि प्रतिक्रियावादी संघटना. तिच्याबरोबर समझोता होऊच शकत नाही.”

डॉ. बाबासाहेब यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आर.एस.एस. तर्फे खोटारडे व्हीडीओ प्रसृत करण्यात आले. त्यातला एक दि.प्रिंट च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला असून तो आता यू.ट्यूबवरही उपलब्ध आहे. ” Ambedkar’s links with RSS & how their ideologies were similar” आर.एस.एस.चे श्री. अरूण आनंद यांच्या या व्हीडीओत ३ दावे करण्यात आलेले आहेत.

दावा क्रमांक १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आर एस.एस.चे कौतुक वाटत असे.

दावा क्रमांक २. १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात बाबासाहेबांनी [ आर.एस.एस. ] जनसंघाबरोबर युती केली होती.

दावा क्रमांक ३. आर.एस.एस.चे नेते आणि प्रमुख प्रचारक श्री दत्तोपंत ठेंगडी यांना बाबासाहेबांनी श्येड्य़ूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी नेमले होते.

हे तिन्हीही दावे धादांत खोटे, संपूर्ण निराधार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करणारे आहेत.
माझ्या विधानांना अस्सल पुरावे काय आहेत ते देतोच पण तत्पूर्वी एक सांगतो श्री अरूण आनंद यांनी केलेल्या या दाव्यांचे लिखित पुरावे सादर करावेत. ते पुरावे सादर करूच शकणार नाहीत, कारण ते खोटे बोलताहेत.

दावा क्रमांक १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आर एस.एस.चे कौतुक वाटत असे.

वस्तुस्थिती- बाबासाहेब संसदेत बोलताना १४ मे १९५१ रोजी आर.एस.एस. बद्दल बोलताना काय म्हणाले ते संसदेच्या दप्तरात उपलब्ध आहे. [ पाहा. संसदेतील चर्चेचे खंड, ११ वा, भाग, २, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृष्ठ ८६८७-९० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड, १५, महाराष्ट्र सरकार, मुंबई, १९९७, पृ. ५६०]
” May I mention the R.S.S. and Akali Dal? Some of them are very Dangerous Associations. “[ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Edited by Vasant Moon, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.560] [Parliament Debates, Vol.11, Part Two, 14 th May 1951,pp.8687-90]

” मी आता आर.एस.एस आणि अकाली दलाचा उल्लेख करतो. ह्या अत्यंत धोकादायक संघटना आहेत.” हे संसदेतल्या अधिकृत भाषणातले उद्गार आहेत बाबासाहेबांचे. हे कौतुक आहे आर.एस.एस.चे?

दावा क्रमांक २. १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात बाबासाहेबांनी [ आर.एस.एस. ] जनसंघाबरोबर युती केली होती.

वस्तुस्थिती- १९५२ सालच्या निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेब काय म्हणतात ते बघा-

” 54. As regards other Political Parties, the Scheduld Caste Federation’s attitude can be easily defined. The Scheduld Caste Federation will not have any alliance with any reactionary Party such as the Hindu Mahasabha or the R.S.S.” [ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.17, Part ONE, Edited by Prof Hari Narke and others, Govt of Maharashtra, Mumbai, 2003, pp.402]

५४. ” इतर राजकीय पक्षांच्या संदर्भात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा निर्णय स्पष्टपणे अधोरेखित करता येईल. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन प्रतिक्रियावादी [विघटनवादी] असलेल्या हिंदु महासभा किंवा आर.एस.एस. बरोबर कदापिही युती करणार नाही.”

आणि आनंद महाशय रेटून खोटं बोलताहेत की बाबासाहेबांनी मध्यप्रदेशात आर.एस.एस. [जनसंघाबरोबर] निवडणुक युती केली होती.

दावा क्रमांक ३. आर.एस.एस.चे नेते आणि प्रमुख प्रचारक श्री दत्तोपंत ठेंगडी यांना बाबासाहेबांनी श्येड्य़ूल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी नेमले होते.

वस्तुस्थिती- शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ह्या पक्षाचे सभासद किंवा पदाधिकारी त्याच व्यक्तीला होता येत होते जी अनुसुचित जातीची सदस्य आहे. जे दत्तोपंत ठेंगडी अनुसुचित जातीचे नव्हतेच त्यांना डॉ. बाबासाहेब सेक्रेटरी कसे नेमतील?

किती सराईतपणे असत्यकथन करणारा खोटारडा इसम आहे हा आर.एस.एस.चा अरूण आनंद! याच्यावर डॉ. बाबसाहेबांची बदनामी केल्याबद्दल बाबासाहेबांच्या कायदेशीर वारसदारांनी खटला भरायला हवा. असा खटला फक्त कायदेशीर वारसदारांनाच भरता येतो.

डॉ. बाबासाहेबांच्या बदनामीबद्दल दि प्रिंटचा निषेध. आर.एस.एस. प्रचारक [सी.इ.ओ] श्री अरूण आनंद यांचा तीव्र धि:क्कार!

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.)

Previous articleहिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती : डॉ. बाबासाहेबांचा इशारा
Next articleअदालतीबाई व रसोलनची चटका लावणारी कहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.