आदित्यनाथ : योगी की हट्टी योगी ?

प्रवीण बर्दापूरकर  

त्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला सात महिने उरलेले असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु असलेल्या शीत युद्धानं  निर्णायक वळण घेतलेलं आहे . योगी आदित्यनाथ जर असेच अडून बसले तर मोदींची  चांगलीच पंचाईत होणार आहे . देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकणारा नेता सध्या तरी दृष्टीपथात नाही , पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी मोदी यांना दिलेलं आव्हान किती टिकतं हे पाहाणं  उत्सुकतेचं आहे .

येणारी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक  २०२४च्या लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाची    आहे . उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ८० जागा असून २०१४च्या निवडणुकीत भाजपने त्यापैकी ७१ जागा जिंकल्या होत्या . २०१९च्या निवडणुकीत हा आकडा ६२ वर घसरला . उत्तरप्रदेशात सध्या परिस्थिती भाजपाला २०१४ सारखी अनुकूल नाही . कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फार मोठा फटका उत्तरप्रदेशला बसला आहे . दुसऱ्या लाटेतील देशातील सर्वाधिक बळी उत्तरप्रदेशातले आहेत . गंगेच्या पात्रातून वाहणारी  कोरोना बळींची असंख्य शवं , हा केवळ उत्तरप्रदेश किंवा देशच नाहीतर आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय झालेला होता ; त्यात भारताची पुरेशी बदनामी झालेली आहे . दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन हाही उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत भाजपासाठी   एक अडचणीचा प्रमुख मुद्दा असेल .

हे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरु  असलं तरी त्यात उत्तरप्रदेशातील  शेतकरी सहभागी झालेले आहेत . या आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारच्या अख्यत्यारित असल्या तरी त्या संदर्भात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री म्हणून ‘गाव जले हनुमान  हनुमान बाहर’ या वृत्तीने वागल्याचा राग उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांच्या मनात आहे . यापूर्वी कधी कायदा आणि सुव्यस्थेच्या आघाडीवर उत्तरप्रदेश राज्य  कधीही शांत राहिलेलं नाही . या राज्यात सामाजिक शांतता ढळेल अशा  घटना सतत कुठे ना कुठे सुरु असतात . याशिवाय नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर समाजवादी पार्टीनं मजबूत आघाडी मिळवली आहे . अशा अनेक आव्हानांना येत्या निवडणुकीत तोंड द्यावं लागणार असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एखाद्या हट्टी योग्यासारखे वागत आहेत . थेट केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात योगी यांनी घेतलेली आक्रमक  भूमिका राजकीय वर्तुळासह परिवारालाही चक्रावून टाकणारी आहे .

योगी यांच्या हट्टी भूमिकेमुळे उत्तरप्रदेशात प्रमाण शब्द नरेंद्र मोदी-अमित शहा जोडगोळीचा , परिवाराचा का योगी आदित्यनाथ यांचा अशी परिस्थिती सध्या तरी आहे .  परिवाराच्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून उभे राहात असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी तूर्तास तरी भासवलं आहे , हे खरं  की खोटं , हे लवकरच दिसेल पण, त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या भाजपत ऑल वेल नाही असा संदेश गेलेला आहे . त्यामुळे बहुधा   संघ परिवारातील अनेकांनी उत्तरप्रदेशात धाव घेऊन  योगी यांच्याशी चर्चा   केलेली आहे . या चर्चेनंतरच उत्तरप्रदेशात अरविंदकुमार शर्मा प्रकरण भाजपात घडलं .

अरविंदकुमार शर्मा हे माजी सनदी अधिकारी आहेत . नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या खास मर्जीतील नोकरशहांची जी टीम होती त्यात एक अरविंदकुमार शर्मा होते . पुढे मोदी त्यांना दिल्लीत घेऊन गेले .  उत्तरप्रदेशातील सरकार आणि प्रशासनाला ‘वळण’ लागावं शिवाय उत्तरप्रदेशातील प्रशासन पुरेसं कार्यक्षम व्हावं यासाठी अरविंदकुमार शर्मा यांना निवडणुकीच्या तयारीचा एक भाग  म्हणून उत्तरप्रदेशात  उपमुख्यमंत्रीपद द्यावं ,असा प्रस्ताव नरेंद्र मोदी आणि अमित शहा या  दुकलीनं दिला असल्याचं सांगण्यात येतं . त्यासाठी मोदी-दुकलीनं नवी दिल्लीत योगी आदित्यनाथ यांच्याशी प्रदीर्घ काळ सल्ला मसलतही केली . सनदी सेवेचा राजीनामा देऊन अरविंद कुमार लखनौला डेरेदाखल झाले पण , त्यांच्या पदरात उपमुख्यमंत्रीपद नव्हे तर पक्षाच्या प्रदेश शाखेचं उपाध्यक्षपद योगी आदित्यनाथ यांनी सोपवलं . अरविंदकुमार शर्मा यांना पाठवण्यामागे   सरकार आणि प्रशासनावर अप्रत्यक्षपणे मोदी-शाह दुकलीचा अंमल थेट निर्माण करणं आहे आणि त्यातून आपल्याला शह दिला जाणार आहे हे ओळखून योगी आदित्यनाथ यांनी या राजकीय चढाओढीत या दुकलीचं  वर्चस्व तूर्तास तरी अमान्य केलं आहे .

कडव्या आणि हिंस्त्र हिंदुत्ववादाचा ( आणि नरेन्द्र मोदी यांच्यासाठी पर्याय ) योगी आदित्यनाथ आहे अशी कुजबूज मोहीम परिवारात कधीचीच सुरु झालेली आहे . ५ जून १९७२ ला जन्मलेले आदित्यनाथ नाथ पंथीय आहेत . कट्टर हिंदुत्वावादी अशी त्यांची प्रतिमा आहे आणि त्याच प्रतिमेच्या आधारे मुख्यमंत्री होण्याआधी १९९८ पासून सलग पाच वेळा लोकसभेवर विजयी झालेले आहेत .  योगी आदित्यनाथ गोरखपूरच्या  गोरखनाथ मठाचे  महंत असून हिंदू युवा वाहिनी या कडव्या संघटनेमागे त्यांचीच प्रेरणा आहे . गेल्या विधानसभा निवडणुकी भाजपन बंपर यश ( म्हणजे विधानसभेच्या ४०३ पैकी ३१२ जागा ) मिळवल्यावर  परिवाराकडून अचानकपणे मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ यांच नाव समोर आलं आणि इतर सर्वांना मागे टाकत आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपद पटकावलंही .तेव्हापासूनच योगी विरुद्ध मोदी असं  शीतयुद्ध सुरु आहे.

आदित्यनाथ यांचा कारभार नोकरशाही केंद्रित आणि कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा आहे . उत्तरप्रदेश राज्याचे सरकार म्हणजे ‘सबकुछ योगी’ अशी परिस्थिती आहे . सरकारी कामकाज करत असतानाही भगवी वस्त्र घालणारा योगी असं कौतुक हिंदुत्ववाद्यांना आहे मात्र , योगी यांच्या कारभारावर पक्षाचे विधानसभेतले २००वर सदस्य नाराज असल्याचा मोदी समर्थकांचा दावा आहे . कारण गेल्या निवडणुकीतील विजय अमित शाह यांची प्रदीर्घ काल राबवलेली रणनीती आणि मोदी यांचा करिष्मा यामुळेच  मिळालेला आहे अशी त्यांची पक्की धारणा आहे आणि शीत युद्धामागे हाही एक मुद्दा आहे . शिवाय जतिन प्रसाद यांना भाजपात ओढून आणि नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारत झुकतं माप देऊन नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे , असं  मोदी समर्थकांचं म्हणणं आहे . म्हणूनच येणारी विधानसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नावावरच  लढवली जावी अशी मोदी-शहा-नड्डा यांची इच्छा आहे

नरेंद्र मोदी गुजरातचे असले तरी २०१४ आणि १९ या दोन्ही लोकसभा  निवडणुकात ते उत्तरप्रदेशातून विजयी झालेले आहेत . गेल्या दोन्हीही  लोकसभा आणि २०१४ नंतर देशात झालेल्या सर्व विधानसभा निवडणुका नरेन्द्र मोदी यांच्या नावावरच लढवल्या गेल्या आणि त्या सर्व निवडणुकांचे सूत्रधार अमित शहा होते . मात्र , निवडणुकीच्या राजकारणात  मोदी-शहा यांच्या वर्चस्वाला प्रथमच आव्हान देण्याचा प्रयत्न एखाद्या विरोधी पक्ष नेत्याकडून नव्हे तर भाजपाच्याच  योगी आदित्यनाथ यांच्याकडून होत आहे हे उल्लेखनीय आहे .

मोदी-योगी तणाव कसा निवळतो यावरच उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचे भवितव्य अवलंबून आहे . पश्चिम बंगाल गमावल्यावर भाजपसाठी उत्तरप्रदेश  हे अत्यंत महत्वाचे  राज्य आहे आणि या राज्यात जर सपाटून  मार पडला तर लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो याची जाणीव भाजपला आहे . सध्याच्या घटकेला समाजवादी पार्टी विधानसभा निवडणुकीत लढत देईल अशी स्थिती आहे . तरी समाजवादी  पार्टी , बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळे लढणार असल्याने यशाची भाजपला आशा वाटत असतानाच मोदी-योगी शीत युद्ध टिपेला पोहोचले आहे . मात्र सध्याच्या घटकेला तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हट्टी योग्यासारखे वागत आहेत आणि हीच भाजपसमोरची  मोठी डोकेदुखी ठरलेली आहे .  त्यांचा हट्ट मोदी-शहा हे दुक्कल कसा मोडून काढते हे पाहाणं उत्सुकतेचं आहे .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous articleअविस्मरणीय लेह- लडाख सहल
Next articleनिकोला टेस्ला… जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.