पत्रकारितेवर घोंगावणारं खरं संकट

 -प्रवीण बर्दापूरकर

सध्या पत्रकार राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझा ही प्रकाश वृत्त वाहिनी माध्यमात चर्चेत आहे . समकालीन मराठी माध्यमात जे पत्रकार चांगल्या बातम्या देतात , त्यात राहुल आघाडीवर आहे . त्याच्या कांही बातम्या त्याच्यातल्या संवेदनशील माणूस , उत्सूक  व जागरुक पत्रकारितेचा परिचय करुन देणाऱ्या असतात तर कांही कोणतीही शहानिशा करता दिलेल्या असतात . शिवाय त्याची भाषाही अन्य सर्वच प्रकाश वृत्त वाहिन्यांवरील पत्रकारांप्रमाणे अचूक नसते आणि अन्य बहुसंख्य पत्रकारांप्रमाणे झालेली चूक दुरुस्त न करण्याचा दुर्गुण त्याच्यातही आहे . राहुलची माझी कांही प्रत्यक्ष ओळख नाही , तरी आम्ही फोनवर अधूनमधून बोलतो . अलिकडे ४ एप्रिलला त्याचा फोन आला . माझं एक पुस्तक वाचून त्याला माझी आठवण झाली . पुस्तकावर बोलणं झाल्यावर नेहेमीच्या संवयीनं मी त्याला म्हणालो ,’तू व्यापक समज असलेला पत्रकार असला तरी फार फास्ट जातोयेस , खूप चूक शब्द योजना असते तुझी’ . हे ऐकल्यावर कोणत्या चुका झाल्या हे त्यानं नम्रपणे विचारलं मी ते सांगितलं आणि आमचं बोलणं संपलं . नंतर त्याची ती वादग्रस्त बातमी   आली , मोठा इव्हेंट मुंबईत बांद्रा परिसरात घडला , राहुलचं अटक नाट्य घडलं . त्यावर अनेकजण व्यक्त झाले , कांहीनी भडास काढली , कांहीनी पाठिंबा दिला . राहुल हिरो झाला त्याची असूया कांहीनी व्यक्त केली .  माझं अनुमान असं आहे- माध्यमांना एक इशारा सरकारला द्यायचा होता . गुन्हा दाखल करुन आणि ती सर्व कलमे जामीनपात्र असूनही अटक करुन तो  दिला गेला आहे . आता आरोपपत्र दाखल करतांना पुरेसा पुरावा सापडला नसल्याचं मान्य करुन राहुलला दोषमुक्त केलं जाईल म्हणजे  कायदेशीर भाषेत १६९व्या कलमांतर्गत त्याला बी समरी केलं जाईल . राहुल चुकला की नाही याची चर्चा खूप झाली , त्यात मी पडत नाही . बातमी देण्याची कांगलघाई नडली असली तरी , राहुलला माझा पाठिंबा आहे . कठीण प्रसंगी आपल्या बिरादरीतल्या सहकाऱ्यासोबत उभं राहण्याची गरज असते अशी माझी  भूमिका आहे  .

दि. भा. घुमरे , निशिकांत जोशी , माधवराव गडकरी , सुरेश द्वादशीवार , कुमार केतकर यांच्यासारख्या धुरंदर संपादकांच्या हाताखाली  काम करण्याची संधी मला मिळाली . अशा प्रसंगी या संपादकांनी त्यांच्या सहकाऱ्याच्या पाठिशी , तो चूक असो वा नसो ठाम उभं राहण्याची भूमिका घेतली . हीच परंपरा मी मुख्य वार्ताहर असतांना मग निवासी संपादक आणिपुढे संपादक झाल्यावर घेतली पण , त्याबाबत माझ्या तेव्हाच्या सहकाऱ्यांनीच बोलणं उचित ठरेल . इथं आणखी एक आवर्जून नोंदवायला हव- ‘लोकसत्ता’ता सहकारी असल्यापासून  राजीव  खांडेकर हा माझा  लाडका पत्रकार आहे . प्रकाश वृत्त वाहिन्यांवरील माझा सर्वाधिक वावर एबीपी माझा वरच राहिलेला आहे ; आता तो वावर मी पूर्ण बंद केला आहे तरी आजही दिवसातून दोन वेळा ठळक बातम्या ऐकण्यासाठी मराठीत  प्राधान्य एबीपी माझालाच असतं .

राहुल कुलकर्णी  प्रकरणात एबीपी माझाचा संपादक राजीव खांडेकर फारच गुळमुळीत वागला असं माझं ठाम मत झालंय  . ‘एबीपी माझातील माझा सहकारी ( प्रतिनिधी नव्हे ) राहुल कुलकर्णी याच्या सोबत संपादक म्हणून मी , माझे सर्व सहकारी आणि व्यवस्थापन ठामपणे उभे आहोत . त्यानं कांहीही चूक केलेलं नाही अशी आमची धारणा आहे आणि त्यावर न्याय व्यवस्था शिक्कामोर्तब करेल याची खात्री आम्हाला आहे’, एवढंच राजीव खांडेकर यानं सांगायला हवं होतं . मोठ्ठ स्पष्टीकरणात्मक निवेदन करण्याची गरज मुळीच नव्हती . ते स्पष्टीकरण देण्याची संधी त्यानं राहुल कुलकर्णीला आणि ते स्पष्टीकारण योग्य आहे किंवा नाही याचा निर्णय न्यायालयावर सोपवायला हवा होता . भूमिका मांडणं आणि स्पष्टीकरण देणं यातील भेद राजीव खांडेकर याला समजलाय , असं त्याच्या निवेदनातून जाणवलं नाही  . सर्वच मराठी प्रकाश वृत्त वाहिन्यावरील बहुसंख्यांना तशी भाषक जाण कमीच आहे . त्यांना आदेश आणि निर्देश , निलंबन आणि बडतर्फी , याचिका न्यायालयात सादर  ( submit ) होणं आणि ती न्यायालयानं दाखल ( admit ) करुन घेणं , सरकार आणि प्रशासन , अटक ( arrest ) आणि शरण ( surrender ) ,  कारण अज्ञात असणं आणि अस्पष्ट असणं , हकिकत आणि किस्सा , यातील फरक समजत नाही ….परवा तर एबीपी माझानं चक्क  ‘दांपत्य विवाहबद्ध’ असा षटकार ठोकला ! अशी अनेक उदाहरणं  देता येतील . तसंच या संदर्भात राजीव खांडेकर याचं झालं !  मित्र व हितचिंतकांना कोणत्याही स्पष्टीकरणाची अशा प्रसंगी गरज नसते आणि विरोधक व टीकाकार त्यावर विश्वास ठेवत नाहीत हे राजीवनं लक्षात घेतलं नाही . हे विश्वास न ठेवणं ज्येष्ठ पत्रकार मित्रवर्य निखील वागळे आणि अनेकांच्या प्रतिक्रियातून ते पुरेसं समोर आलंच ! ( इलेक्ट्रॉनिक्स  माध्यमात पुरेसं यश न मिळाल्यानं निखील वागळे याला आलेलं उदात्त नैराश्य आपण विशाल अंत:करणानं समजून घ्यायला हवं . ) पण , ते असो कारण  मुख्य  मुद्दा वेगळाच आहे . .

राहुल कुलकर्णी प्रकरणात ज्या प्रतिक्रिया  व्यक्त झाल्या त्यात माध्यमांच्या विश्वासाहर्तेचा मुद्दा अनेकांनी उपस्थित केलेला आहे . त्यासाठी वापरलेली गेलेली भाषा ‘भडवा ते राजकारण्यांचा चमचा’ अशा व्यापक स्वरुपाची आहे कांहीनी तर चक्क शिवीगाळही केलेली आहे . यातील भाषेचा मुद्दा बाजूला ठेऊ आणि विश्वासाहर्तेचा मुद्दा समजावून घेऊ यात . हा मुद्दा गेली सुमारे तीन दशके जास्तच चर्चेत आहे कारण माध्यमांचे व्यवस्थापन म्हणजे मालक राजकीय व्यवस्था , त्यात सत्ताधाऱ्यांना झुकतं माप आणि मार्केटला शरण आहेत . या शरणागत व्यवस्थापनाचे , बहुसंख्य संपादक आणि त्यांचे बहुसंख्य सहकारी हुजरे झालेले आहेत . माध्यमे जनहितासाठी , जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी नसून राजकीय व्यवस्था आणि मार्केटचे गोडवे गाण्यासाठी किंवा त्यांच्या तालावर नाचण्यासाठी आहेत असा समज त्यातून पसरला आहे . कोरोनामुळे तर मुद्रित माध्यमांची अवस्था अतिश कठीण झालेली आहे . लहान आणि मध्यम वृत्तपत्रांचे त पेकाटच मोडले आहे . लाख्खो रुपये किंमतीचे भूखंड राजकीय व्यवस्थेच्या मदतीने बळकावणाऱ्या बड्या माध्यमांच्या सरकार शरण व्यवस्थापनाची सर्वोच्च संघटना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक सहाय्यासाठी कटोरा घेऊन केंद्र सरकारच्या दारी गेलेली आहे . सर्वसामान्य कुटुंबाने मोलकरीण कामावर आली नाही तिचे महिन्याचे पैसे द्यावे आणि उद्योगांनी कामगारांचे पगार करावे , अशा बातम्या प्रकाशित/प्रक्षेपित करणाऱ्या या बहुतेक माध्यमां समूहांनी प्रत्यक्षात मात्र अनेक पत्रकारांना नोकरीवरुन तडकाफडकी  काढलं आहे , अनेकांच्या वेतनात १५ ते ४० टक्के कपात जाहीर केली आहे . गेल्या दहा-बारा दिवसात नांदेड ते मुंबई आणि रत्नागिरी ते नागपूर अशा विविध भागातून ‘आमची नोकरी गेली आहे किंवा पगारात कपात झालेली आहे’ , असे किमान ३०/३२ पत्रकारांचे फोन आले . आत्ता राहुल कुलकर्णी चुकला की बरोबर या चर्चेपेक्षा अशा संकटाच्या समयी पत्रकार गमावत असलेल्या  रोजीरोटीचा विचार जास्त महत्वाचा आहे ; त्यासाठी पत्रकारांची एकता आणि मजबूत संघटन हवं आहे .

विश्वासाहर्तेचा मुद्दा संपादकांच्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पत्रकारांच्या सुमार आणि बाजारु वृत्तीचा आहे . पत्रकारितेचे परंपरागत निकष आणि मूल्य खुंटीवर  टांगून व्यवस्थापन म्हणजे मालकाला हवं तसं प्रकाशन/प्रक्षेपणाचं धोरण ठरवणं म्हणजे पत्रकारिता झाली आहे . त्यामुळे माध्यमांत बहुसंख्येनं सुमारांची मांदियाळी जमलेली असून पत्रकारितेचा तोल गेला आहे . पूर्वी संपादक अग्रलेख लिहित आता त्यांच्याकडून हवे तसे अग्रलेख लिहून घेतले जातात . पूर्ण लांबीचा अग्रलेख लिहिण्याची क्षमता असणारे संपादक फारच कमी उरले आहेत . अग्रलेख परखड मतप्रदर्शन राहिलेले नसून ‘कथन’ झालेले आहेत . अग्रलेख परत घेण्याचा विक्रमी नीचांक आपल्याच मराठी पत्रकारितेत घडला आहे , इतकं हे अवमूल्यन घनगर्द आहे . व्यवस्थापन म्हणजे मालकाला , न विचारता लिहिलेला अग्रलेख ( त्या संपादकाला न विचारता ) मध्यरात्री काढून टाकण्याचा आणि त्याजागी दुसराच मजकूर टाकण्याची एक ( किस्सा नव्हे तर ) हकिकत मला अवगत आहे   ( कारण समाविष्ट केला गेलेला मजकूर माझ्या सदराचा होता !) . बहुसंख्य संपादक कुणा न कुणा राजकारण्याचे प्रवक्ते असल्यासारखे लेखन आणि भाषणं करतांना दिसतात . संपादक नावाच्या संस्थेच्या अवमूल्यनानं इतका निम्न तळ गाठला असल्याचा अनुभव गेल्या चार दशकात कधीच आलेला नव्हता . अशा परिस्थितीत ही संपादक मंडळी मूल्यानिष्ठतेचे आदर्श त्यांच्या सहकाऱ्यांना देतील कसे आणि निर्भीड पत्रकार निर्माण होतील कसे , हा खरा कळीचा मुद्दा आहे .

विधिमंडळ, संसद, केंद्र व राज्य सरकारांच्या कामकाजाच्या सीमारेषा , परराष्ट्र धोरण , न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रियेविषयी सुतराम माहिती नाही , अशाबहुसंख्यांची  मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक ( समाज माध्यमांतही ) सध्या चलती आहे . त्यांच्यात भाषा , साहित्य , संस्कृती , संचित याविषयी मुलभूत आणि प्रचारकी झापडबंदपणा आहे . माध्यमांचा ‘मिशन टू प्रोफेशन टू बिझिनेस’ हा झालेला प्रवास हाही धोक्यात आलेल्या विश्वासार्हतेच्या मुळाशी आहे  .

तोल (journalastic balance) ढळलेल्या ( कांही प्रमाणात ) मुद्रित माध्यमे आणि प्रकाश वृत्त वाहिन्या  दिवसेदिवस हेकेखोर होत चालल्या आहेत ; ते  म्हणतील तेच खरं अशी हट्टी भूमिका घेतली जाऊ लागली आहे . वाहिन्या तर  पत्रकारिता करण्याऐवजी ‘ट्रायल’च्या भूमिकेत आल्या आहेत ; कोण दोषी आहे आणि नाही याचा फैसला प्रकाश वृत्त वाहिन्यां करु लागल्या आहेत . लागलेली आग विझतही नाही तोच आगीचे कारण ‘अजूनही अस्पष्ट’ असा निर्वाळा प्रकाश वृत्त वाहिन्यांच देऊ लागल्या आहेत . गुन्हा दाखल करुन प्राथमिक तपास पूर्ण नाही तोच ‘आरोपी मोकाट’ अशी हाकाटी पिटण्यात प्रकाश वृत्त वाहिन्यां स्वत:ला धन्य मानू लागल्या आहेत . खुलासा आणि गौप्यस्फोट यातील फरक न समजण्याइतकी पातळी घसरलेली आहे . खासदार उपलब्ध झाले नाहीत म्हणून ( स्पर्धेच्या अतिरेकातून ) त्यांच्या श्वानाची मुलाखत (!) सदृश्य दृश्ये दाखवण्याइतका किंवा ‘कोंबडा बोलतो’ असा मूल्यहीन कडेलोट विशेषत: प्रकाशवृत्त वाहिन्यांचा झालेला आहे .

आणखी एक म्हणजे ,  ‘मला माहिती आहे तेवढंच अस्तित्वात/उपलब्ध आहे आणि मला जे माहिती नाही ते जगातच अस्तित्वात/उपलब्ध नाही’, अशी तुच्छतावादी वृत्ती असणारांची संख्या मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत फोफावली आहे . या अशा अनेक कारणांमुळे पत्रकारिता करणाऱ्या सर्वच माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे ; राहुल कुलकर्णी चुकला की नाही याचा फैसला न्यायालयाला करु द्या . माध्यमांना भेलकांडवून टाकणाऱ्या , गर्तेत कोसळवणाऱ्या आणि पत्रकारांना बेकार करणाऱ्या या संकटांचा विचार प्राधान्यानं व्हायला हवा  .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत ) 

9822055799

Previous articleप्रश्न ABP चा नाही; ‘माझा’ आहे !
Next articleएक होता ‘आईनस्टाइन’ !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.