यात कुठे आला जातीयवाद ?

-विजय चोरमारे

‘मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. जेवढे मराठी चॅनल्स आहेत त्यातील मालिकांमध्ये ब्राह्मण नसलेली अभिनेत्री मुख्य भूमिकेत काम करते आहे ते शोधून पाहण्याचा प्रयत्न करा. या लोकांना जाधव, सोनावणे, टेंभुर्णी, मडके सापडत नाहीत का?’ दिग्दर्शक सुजय डहाके याचे हे वक्तव्य समोर आले आणि मनोरंजन क्षेत्रातच नव्हे, तर एकूण समाजमाध्यमांवर, प्रसारमाध्यमांतून चर्चा सुरू झाली. सुजय डहाकेच्या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठी अन्य काही कलाकार मैदानात उतरले आणि त्यांनी सुजय डहाकेचा समाचार घ्यायला सुरुवात केली. ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनीही सुजय डहाकेंनी विधान मागे घेतले नाही, तर आम्ही त्यांच्या चित्रपटांबाबत योग्य ती भूमिका घेऊ असा इशारा दिला. एकूण दोन दिवस माहोल गरम आहे. सुजय डहाकेला जातीयवादी ठरवून त्याची योग्यता काढली जात आहे. मराठी मालिकांमधील काही ब्राह्मणेतर अभिनेत्रींची उदाहरणे देऊन सुजय डहाकेचा दावा खोटा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत. खरेतर सुजय डहाकेच्या विधानावर एवढा गहजब करण्याचे काहीच कारण नव्हते. सुजय डहाकेने सध्याच्या मनोरंजन विश्वातील वस्तुस्थितीकडे निर्देश केला होता. आणि अशा वस्तुस्थितीचा निर्देश करणे जातीयवाद ठरत नाही. सुजय डहाकेने कोणत्याही अभिनेत्रीसंदर्भात अवमानकारक विधान केलेले नाही किंवा कुणाचा अधिक्षेप होईल असेही त्याच्या बोलण्यात काही नाही. तरीसुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्याचे ‘लिंचिंग’ सुरू आहे. त्यातून एका वेगळ्याच जातीयवादाचे दर्शन घडते आहे. आपल्या जातीच्या हितसंबंधांना धक्का लागल्यावर मिरची लागते, ही यातली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. ब्राह्मण अभिनेत्री आहेत, तर त्या त्यांच्या कर्तृत्वामुळे तिथे आहेत आणि त्या आपली योग्यता सिद्ध करीत आहेत, हे अशावेळी ठासून सांगितले असते तर ते अधिक उचित ठरले असते. परंतु ते न सांगता भलतेच फाटे फोडले जात आहेत. खरेतर सुजय डहाकेने जो मुद्दा उपस्थित केला आहे, तो मनोरंजन क्षेत्रातील सामाजिक स्थितीच्या अभ्यासाचा मुद्दा आहे. त्याचे नीट तपशीलवार विवेचन करायला पाहिजे. दुर्दैवाने सुजयने तसे काही न करता शेरेबाजीसारखे विधान केले. ( या लेखाच्या शेवटी समाजमाध्यमातून मिळालेली एक यादी जोडत आहे, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येऊ शकेल.) त्यामुळे मग त्याच्या विधानातला सामाजिक आशय मागे पडला आणि त्याला जातीचे लेबल लागले, जातीयवादी ठरवले गेले. असा जातीयवादाचा शिक्का मारणे सर्वात सोपे असते, कारण तसे लेबल लावले की समोरचा माणूस निम्मा गारद होऊन बचावात्मक पवित्र्यात जातो. सुजय डहाकेच्या विधानाच्या अनुषंगाने परिस्थितीचे नीट आकलन करून घेतले आणि त्यात तथ्य आढळले तर आजच्या काळातही वेगवेगळ्या समाजघटकांतील मुली मनोरंजन क्षेत्रात का येत नाहीत, याची कारणे शोधता येऊ शकतील. साहित्याच्या क्षेत्रातली परिस्थिती फारशी वेगळी नाही. काही वर्षांपूर्वी मी ‘प्रहार’मध्ये असताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किती ब्राह्मणेतर लेखकांची निवड झाली, याची तपशीलवार माहिती घेऊन त्यासंदर्भातील लेख लिहिला होता. तो प्रसिद्ध झाल्यावर काही ज्येष्ठ संपादकीय सहकाऱ्यांनी हे जातीयवादी लिखाण असल्याचा तक्रारीचा सूर लावला. आता १८८५ पासून १९८५ पर्यंतच्या शंभर वर्षांत झालेल्या ५९ साहित्य संमेलनांपैकी फक्त चार वेळा ब्राह्मणेतर अध्यक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे. ती मांडणे हा जातीयवाद कसा काय ठरतो? नंतरच्या पंधरा वर्षांत तीन ब्राह्मणेतर अध्यक्ष झाले. आणि गेल्या वीस वर्षांत अकरा ब्राह्मणेतर अध्यक्ष झाले. ही वस्तुस्थिती आहे. ती नजरेखाली घातल्यावर साहित्य क्षेत्रातील सामाजिक स्थितीचे दर्शन घडते. परंतु अशी मांडणी करणेसुद्धा अनेकांना जातीयवाद वाटतो. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, तेव्हा महाराष्ट्रातून प्रचंड विरोध झाला. राजमाता जिजाऊंचे चारित्र्यहनन करणारे लेखन त्यांनी केले असल्याचा बहुजन समाजाचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यास विरोध होता. मात्र, पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना विरोध होतोय, असा आरोप करून विरोध करणारांना जातीयवादी ठरवले जाऊ लागले. त्याआधी ब्राह्मण समाजातील अनेक कर्तृत्ववानांना पुरस्कार दिले तेव्हा कुणी विरोध केला नव्हता, याकडे दुर्लक्ष करून मराठा आणि बहुजनांना जातीयवादी ठरवले गेले, जे आजही केले जाते.

आता राजकारणाचे उदाहरण घेऊ. महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठ्यांचे वर्चस्व आहे, असे कुणी ब्राह्मणाने किंवा दलिताने म्हटले म्हणून त्यांना जातीयवादी कसे म्हणणार? राजकारणावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे ही वस्तुस्थिती आहे. जे सामाजिक वास्तव आहे, ते मांडण्यात काही गैर नसते. ते शेरेबाजीच्या, हेटाळणीच्या स्वरुपातले नसावे. तुच्छतादर्शक नसावे. राजकारणावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे, त्याचप्रमाणे दूरदर्शन मालिकांमध्ये ब्राह्मण मुलींचे प्राबल्य आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उगाच साप साप म्हणत भुई थोपटून आपल्या मनातील जातीच्या सापाला फुत्कार टाकायला लावू नये!

आता पुढील यादी पाहा (संदर्भ : Acyme Rajeune यांची फेसबुक पोस्ट)

१.अवंतिका – मृणाल कुलकर्णी २.आभाळमाया – सुकन्या कुलकर्णी – मोने ३.अधुरी एक कहाणी- किशोरी गोडबोले ४.अवघाचि हा संसार – अमृता सुभाष ५.अस्मिता – मयुरी वाघ ६.असे हे कन्यादान – मधुरा देशपांडे ७.असंभव – उर्मिला कानेटकर ८.अजूनही चांदरात आहे – नेहा गद्रे ९.अग्गंबाई सासुबाई – निवेदिता जोशी सराफ १०.उंच माझा झोका – स्पृहा जोशी ११.एका लग्नाची दुसरी गोष्ट – मुक्ता बर्वे १२.एका लग्नाची तिसरी गोष्ट – स्पृहा जोशी १३.कळत नकळत – रुजूता देशमुख १४. कुलवधू – पूर्वा गोखले, सई रानडे १५.कुंकू – मृन्मयी देशपांडे १६.काहे दिया परदेस – सायली संजीव १७.का रे दुरावा – सुरुची आडारकर १८.गुंतता र्हदय हे – मृणाल कुलकर्णी १९.जय मल्हार – सुरभी हांडे, ईशा केसकर २०.जागो मोहन प्यारे – श्रृती मराठे २१.जुळून येती रेशीमगाठी – प्राजक्ता माळी २२.तुझ्यात जीव रंगला – अक्षया देवधर २३.तुला पाहते रे – गायत्री दातार २४.तुझं माझं ब्रेकअप – केतकी चितळे २५.दिल दोस्ती दुनियादारी – सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, पूजा ठोम्बरे २६.नांदा सौख्यभरे – रुतुजा बागवे २७.भाग्यलक्ष्मी – नेहा पेंडसे २८.मला सासू हवी – आसावरी जोशी २९.माझा होशील का – गौतमी देशपांडे ३०.माझ्या नवऱ्याची बायको – अनिता दाते केळकर ३१.माझिया प्रियाला प्रीत… मृणाल दुसानीस ३२.राधा ही बावरी – श्रृती मराठे ३३.या सुखांनो या – ऐश्वर्या नारकर ३४.लज्जा – गिरीजा ओक गोडबोले ३५.वादळवाट- आदिती सारंगधर ३६.शुभंकरोति – प्रिया बापट ३७.शेजारी शेजारी – शिवानी रांगोळे ३८.होणार सून मी या घरची – तेजश्री प्रधान …………………………………………………………………….

३८ पैकी पाच आडनावं बिगर ब्राम्हणी आहेत.ती अशी – माळी, बागवे, देशमुख, रांगोळे, ढेंबरे (अमृता सुभाष यांचं आडनावं जे त्या लावत नाहीत.) उर्वरित नावांमध्ये बहुतांश ब्राम्हण आणि काही सीकेपी नि सारस्वत आहेत.)

१.अवंतिका – संदीप कुलकर्णी २.आभाळमाया – मनोज जोशी, संजय मोने ३.अधुरी एक कहाणी- स्वप्नील जोशी ४.अवघाचि हा संसार – प्रसाद ओक ५.अस्मिता – पियुष रानडे ६.असे हे कन्यादान – प्रसाद जवादे ७.असंभव – उमेश कामत ८.अजूनही चांदरात आहे – नकुल घाणेकर ९.अग्गंबाई सासुबाई – डॉ. गिरीश ओक १०.उंच माझा झोका – विक्रम गायकवाड ११.एका लग्नाची दुसरी गोष्ट – स्वप्नील जोशी १२.एका लग्नाची तिसरी गोष्ट – उमेश कामत १३.कळत नकळत – अनिकेत विश्वासराव, सुबोध भावे, सुनील बर्वे १४. कुलवधू – सुबोध भावे १५.कुंकू – सुनील बर्वे १६.काहे दिया परदेस – रिषी सक्सेना १७.का रे दुरावा – सुयश टिळक १८.गुंतता र्हदय हे – संदीप कुलकर्णी १९.जय मल्हार – देवदत्त नागे २०.जागो मोहन प्यारे – अतुल परचुरे २१.जुळून येती रेशीमगाठी – ललित प्रभाकर २२.तुझ्यात जीव रंगला – हार्दिक जोशी २३.तुला पाहते रे – सुबोध भावे २४.तुझं माझं ब्रेकअप – सायंकित कामत २५.दिल दोस्ती दुनियादारी – सुव्रत जोशी, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर २६.नांदा सौख्यभरे – चिन्मय उद्गीरकर २७.भाग्यलक्ष्मी – (नाव कळू शकलं नाही) २८.मला सासू हवी – आनंद अभ्यंकर (अपघाती मृत्यूनंतर रिप्लेसमेंट – राजन भिसे) २९.माझा होशील का – विराजस कुलकर्णी ३०.माझ्या नवऱ्याची बायको – अभिजीत खांडकेकर, अद्वैत दादरकर ३१.माझिया प्रियाला प्रीत कळेना – अभिजीत खांडकेकर ३२.राधा ही बावरी – सौरभ गोखले ३३.या सुखांनो या – विक्रम गोखले, राजन भिसे, अभिजीत केळकर ३४.लज्जा – लोकेश गुप्ते ३५.वादळवाट- अरुण नलावडे, लोकेश गुप्ते, उमेश कामत, प्रसाद ओक ३६.शुभंकरोति – उमेश कामत ३७.शेजारी शेजारी – आनंद इंगळे, वैभव मांगले ३८.होणार सून मी या घरची – शशांक केतकर

या ५१ नायकांपैकी इंगळे, मांगले, नलावडे, गायकवाड, भिसे, उद्गगीरकर, नागे, जवादे ८ नावं ब्राम्हणेतर कलाकारांची आहेत, म्हणजे १५ टक्के. त्यातही गायकवाड आणि इंगळे ही दोनच नावं दलित असण्याची शक्यता आहे (बहुधा नसावेत, ही दोन्ही आडनावं मराठा जातीतही येतात) समजा ही दोन नावं दलित असतील, झी मराठीवरील मालिकांत नायक म्हणून दलित नटांचा सहभाग ३ टक्के इतका आहे.

हेही वाचा-वाद-प्रतिवाद :मनोरंजन क्षेत्रात मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच का दिसतात?-http://bit.ly/39rYxLy

(लेखक महाराष्ट्र टाइम्सचे सहायक संपादक आहेत)
91 95949 99456
Previous articleॲरिस्टॉटलचे विज्ञान
Next articleबाई असणं हा एक प्रिविलेज आहे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.