राजस्थानातल्या फसलेल्या बंडानंतर…  

-प्रवीण बर्दापूरकर

|| एक ||

राजकारणात दोन अधिक दोन म्हणजे चार असतंच असं नाही , दिल्या-घेतल्या वचनांची शपथ पाळली जातेच असं तर मुळीच नाही आणि ते वचन पाळलं गेलंच तर प्रत्यक्षात  उतरण्यासाठी लागणारा कालावधी कितीही प्रदीर्घ असू शकतो . काँग्रेसच्या राजस्थानातील सरकार आणि पक्षात गेल्या सुमारे दीड महिन्यापासून सुरु असलेलं वादळ थंडावण्याकडे या दृष्टीकोनातून बघत असतांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हा संघर्ष उफाळून येण्याआधीच का शांत केला नाही आणि ज्योतीरादित्य शिंदे यांच्याबाबतही अशीच भूमिका का घेतली नाही हा प्रश्न उरतोच .

माघार घेतल्यामुळे सचिन पायलट यांचं बंड फसलेलं आहे आणि अशोक गेहलोत यांचं मुख्यमंत्रीपद सध्या शाबूत राहणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत .  विधानसभेत  विश्वास ठराव संमत झाल्यानं आता पुढचे सहा  महिने तरी गेहलोत मुख्यमंत्रीपदी राहतील असं दिसतं आहे . ‘कोणत्याही पदापेक्षा सन्मान जास्त महत्वाचा आहे’ , असं सचिन पायलट यांनी म्हणण्याचा संकेत , त्यांना आता पक्षात आणि सरकारात लगेच कोणतंही पद मिळण्याची शक्यता कमी आहे असा समजायला हवा पण , त्यांना यापुढे कधीच कांहीच मिळणार नाही असा अर्थ राजकारणात नसतो . ठोस असं कोणतं तरी आश्वासन मिळाल्याशिवाय बंडाचं उपसलेलं हत्यार राजकारणात कधीच मागे घेतलं जात नसतं . त्यामुळे आज नाही पण , भविष्यात सचिन पायलट यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं आश्वासन पक्षश्रेष्ठी म्हणजे , राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिलेलं असणार , असा त्याचा अर्थ असू  शकतो . अर्थात वर म्हटल्या प्रमाणे राजकारणात प्रत्येक दिल्या-घेतल्या वचनाची शपथ पाळली जातेच असं नाही . अशा राजकीय आणाभाका म्हणा की आश्वासनाचं काय होतं , हे आपल्या नारायण राणे यांना विचारा म्हणजे , मग स्वप्नभंगाच्या करुण सुरावटी सहज ऐकायला मिळतील .

सचिन पायलट यांचं बंड फसलं याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं आणि जे की मध्यप्रदेशात ज्योतीरादित्य शिंदे यांच्याकडे होतं . इथेही पुन्हा कळीचा मुद्दा म्हणजे मध्यप्रदेशात कमलनाथ यांचं सरकार तसंही काठावर होतं तर राजस्थानात मात्र अशोक गेहलोत सरकारकडे म्हणजे काँग्रेसकडे भाजपपेक्षा सुमारे ३०नं संख्याबळ जास्त होतं . दुसरा मुद्दा म्हणजे , ज्योतीरादित्य शिंदे यांचा कल सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाकडे होता. मात्र ते स्वत: मुख्यमंत्रीपदासाठी नव्हे तर संसदेत जाण्यासाठी आग्रही होते . इकडे सचिन पायलट यांना मात्र थेट मुख्यमंत्री होण्याची घाई झालेली होती . समर्थक आमदार जरी भाजपचं सरकार असलेल्या हरियानात सुरक्षित बंदिस्त असले आणि भाजपकडे जाण्याचा कल सचिन पायलट यांनी कधीच उघड केलेला नव्हता . आणखी एक मुद्दा म्हणजे , संख्याबळाच्या आधारावर सचिन पायलट यांचं बंडाचं हत्यार बोथट ठरत आहे , हे लक्षात येताच भारतीय जनता पक्षानं राज्यपालांचा वापर करुन अशोक गेहलोत यांची अडवणूक केली खरी पण , सचिन पायलट यांच्या बंडात फार मोठ्या प्रमाणात ‘गुंतवणूक’ करणं टाळलं हेही तेवढंच खरं . थोडक्यात काय तर , आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नाही हे लक्षात घेऊन पायलट यांचा गट आणि भाजप मिळून काँग्रेसशी सरळ कुस्ती करण्याऐवजी दंड थोपटून नुसतीच खडाखडी करत होते की काय , अशी शंका घ्यायलाही जागा निश्चितच आहे .

|| दोन ||

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सचिन पायलट यांचं मन वळवण्यासाठी जो पुढाकार घेतला त्यमुळे पक्षातील तरुण नेतृत्वाला नक्कीच दिलासा मिळाला असणार . ही तत्परता जर राहुल गांधी यांनी याआधीच दाखवली असती तर वेळोवेळी पक्षात तरुण नेतृत्वाची जुन्या नेत्यांकडून झालेली कोंडी नक्कीच टाळता आली असती आणि अनेक विकेट पडल्या नसत्या . जे काँग्रेस नेते अलीकडच्या कांही वर्षात काँग्रेस सोडून गेले त्यांच्या पाठिशी जर राहुल गांधी असेच उभे राहिले असते तर पक्षाचं आजचं चित्र जरा वेगळं दिसलं असतं . बंडखोरी केल्याशिवाय किंवा बंडखोरी केल्यावरही पक्षातील नेत्यांना भेटायचंच नाही , हा शिरस्ता आता राहुल गांधी मोडायला हवा , त्यात काँग्रेसचंच हित आहे . राहुल गांधी यांना पक्षबाह्य आव्हान भारतीय जनता पक्षाचं असलं तरी काँग्रेस पक्षावर कब्जा करुन बसलेल्या धूर्त नेत्यांचं आव्हानही तितकंच  किंबहुना त्यापेक्षा किंचित मोठं आहे . ते मोडून काढण्यासाठी तरुणांची फळी मजबूत केल्याशिवाय राहुल गांधी यांच्या समोर दुसरा कोणताही पर्याय नाही ; त्याशिवाय पक्षावर त्यांची पूर्ण पकड बसणार नाही . या संदर्भात झालेल्या या आधीच्या सर्व लिटमस  टेस्टमधे राहुल गांधी नापास झाले होते म्हणा की , त्यांनी कच खाल्ली होती म्हणा . पक्षात पूर्ण कोंडी झालेल्या सचिन पायलट यांच्या संदर्भात राजस्थानच्या परीक्षेत मात्र राहुल गांधी दुसर्‍यांदा बसून का होईना उत्तीर्ण झाले आहेत , हे काँग्रेस पक्षासाठी चांगलं लक्षण समजायला हवं .

भाजपनं सरकार पाडण्याचा कुटील डाव रचला , घोडे बाजार मांडला , असे कांगावे करणं आता काँग्रेसनं सोडून द्यायला हवं . या देशावर पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु ते मनमोहनसिंग असा सत्तेचा आणि सुमारे सहा दशकांचा व्यापक पट काँग्रेसचा होता . याच काळात देशाचा चौफेर विकास झाला . विकासाच्या गतीबद्दल काही हरकती असू शकतील पण , आज देश जसा दिसतो आहे त्याचं श्रेय काँग्रेसच्या सरकारांचं आणि त्याचा नेतृत्व करणार्‍या नेत्यांचं आहे ,  यात तीळमात्र शंका नाही . काळाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत देश कांहीसा मागे पडला होता पण , पी . व्ही . नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात तोही अनुशेष आपल्या देशानं भरुन काढण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे ; अजूनही ते काम सुरुच आहे . काँग्रेसच्या काळात देशाची कोणत्याही क्षेत्रात प्रगती झालेली नाही हा भाजप आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांचा दावा फुसका आहे , हे देशातील शेंबड्या मुलालाही चांगलं ठाऊक आहे .

मात्र , याच काळात आणि त्यातही विशेषत: इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळपासून या देशातील संसदीय लोकशाही आणि राजकारणाचा पोत  बिघडवण्यासही काँग्रेसच जबाबदार आहे , हे विसरता येणार नाही . राज्यातील आमदार फोडणं , सरकार पाडणं , घोडे बाजार सुरु करणं , पक्षांतरासाठी सत्तेतील पदांची आमिषं दाखवणं , विरोधकांची मुस्कटदाबी करणं , सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणीबाणी लादणं अशा एक ना अनेक केवळ अनिष्टच नव्हे तर कुप्रथा या देशात काँग्रेसच्याच राजवटीत सुरु झाल्या आहेत . बहुमत नसताना तर सोडाच निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणूनही  निवडून न आलेल्या काँग्रेसच्या सुखाडिया यांना सत्तरीच्या दशकात  सत्तेचा अनिर्बंध वापर करुन मुख्यमंत्रीपदी बसवण्यापासून हे प्रकार काँग्रेसने सुरु केले . जनता पक्षाचे भजनलाल यांच्या नेतृत्वाखालील पूर्ण सरकारच आपल्या पक्षात काँग्रेसनं कसं सहभागी करुन घेतलं होतं हे पाहिलेली या देशातील पिढी अजून हयात   आहे .

आपल्या महाराष्ट्रात हे असे कमी प्रकार घडले नाहीत . अन्य पक्षातील असंख्य नेते काँग्रेस पक्षात ओढण्यात आले . कोणत्या तरी पदाच्या आशेनं पण , बंडखोरीच्या नावाखाली  काँग्रेसमध्ये येऊन ‘पावन’ झालेले अनेक नेते पत्रकारीतेतल्या माझ्या पिढीने पाहिले आहेत . छगन भुजबळ ते नारायण राणे असा तो अलिकडचा घटनाक्रम आहे . नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभी एका पक्षाचे डझनावर आमदार फोडून त्यांना काँग्रेसपक्षात कोणत्या ‘अटी आणि शर्ती’वर प्रवेश देण्यात आला याच्या खमंग बातम्या माझ्या पिढीतल्या पत्रकारांनी दिल्या आहेत आणि त्या ‘अटी-शर्तीं’चा काँग्रेस किंवा त्या आमदारांनी कधीही इन्कार केलेला नाही . शिवसेनेत आणि विरोधी पक्ष नेते असतांना नारायण राणे यांनी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील  सरकार पाडण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न  विस्मरणात गेलेले नाहीत पण , काँग्रेसचं सरकार पाडण्याचे प्रयत्न करणार्‍या त्याच नारायण राणे यांना  ( मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊन ) फोडून त्याच विलासराव  देशमुख यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद देणारी काँग्रेसचं होती ;  भाजपचे तत्कालीन असंतुष्ट नेते गोपीनाथ मुंडे यांना मध्यरात्री काँग्रेसश्रेष्ठींच्या भेटी(?)साठी नेणारे पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री होते याचा विसर फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपवर करणार्‍या काँग्रेस नेत्यांना पडला आहे .

सांगायचं तात्पर्य हे की या देशाला निवडणुका जिंकण्याचे साम-दाम-दंड-भेदाचे ‘तंत्र’ शिकवणारा , राजकारणाच्या या अभद्र खेळींची ओळख करुन देणारा , देशाच्या राजकारणाला त्या वाटेवर चालण्याची संवय लावणारा आणि मुस्कटदाबीचे प्रयोग शिकवणारा पक्ष काँग्रेसचं आहे . ‘यालाच राजकारण म्हणतात’ , ‘राजकारण म्हटलं की हे चालणारच’, अशी ( निर्लज्ज ) समर्थनं त्यावेळी काँग्रेस नेते करत असत . आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्याच सर्व खेळी काँग्रेसवर उलटवत आहे .

यात फरक एवढाच की , देशाच्या राजकारणाची पातळी घसरवण्याच्या बाबतीत काँग्रेस जर निर्लज्ज असेल तर भारतीय जनता पक्ष आणि तो पक्ष शतनिर्लज्ज आहे . काँग्रेस पक्ष जर या बाबतीत उघडा असेल तर भाजप नागडा आहे असंच म्हणावं लागेल . ‘पार्टी वुइथ डिफरन्स’ अशी स्वत:ची प्रतिमा असण्याचा दावा करणारा भाजपच्या कार्यशैलीत झालेला हा बदल अध:पतनाचा कळस आहे आणि त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता काँग्रेसमध्ये उरलेली नाही इतका या पक्षाचा संकोच झालेला आहे . त्यामुळे काँग्रेसने आता या ‘ब्लेम गेम’मधे न पडता , गळे न काढता पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करुन भाजपला सक्षम पर्याय म्हणून स्वत:ला उभं करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यातच त्या पक्षाचं  हितही आहे . सचिन पायलट यांना चुचकारुन , भाजपत जाण्यास  ( तूर्तास तरी ) रोखून काँग्रेसनं चांगली सुरुवात केलेली आहे , हाही राजस्थानातल्या फसलेल्या बंडाचा आणखी एक अर्थ आहे .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

 

Previous articleडरना जरुरी है!
Next articleकुर्ग: भारताचे  स्कॉटलंड
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.