१९ जून हा ‘महाकवी कालिदास दिन’ होऊन गेला. विदर्भातील रामटेक म्हणजेच रामगिरी हे आता सर्वमान्य झाले आहे. त्या अर्थानेदेखील कालिदास आपल्याला जवळचा वाटतो. कालिदासाच्या अलौकिक काव्यप्रतिभेचे स्मरण ‘मेघदूत’ या खंडकाव्याच्या मराठीतील निवडक अनुवादाच्या निमित्ताने करण्याचा हा छोटासा प्रयत्न…
||१||
संस्कृत भाषेमध्ये ‘मेघदूत’ सारखे विरहकाव्य लिहून अजरामर झालेला महाकवी म्हणजे कालिदास ! बंगाल, ओडिसा, मध्यप्रदेश व काश्मीर या चारही प्रांतातील लोक कालिदासाचे वास्तव्य आपल्याच प्रदेशातील असल्याचे ठणकावून सांगतात. संस्कृत भाषेला नि संस्कृत विद्येला बहुमान मिळणाऱ्या काळात तसेच भारतातील वैभवशाली, समृद्धीच्या काळात कालिदास होऊन गेल्याचे इतिहासकार व साहित्यिक नमूद करतात. ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेल्या परंतु बुद्धीने यथातथा असलेल्या कालिदासाला पुढे कालीदेवीच्या उपासनेमुळे कवित्व नि विद्धत्व प्राप्त झाल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. भावकवी, महाकवी व नाटककार असलेल्या कालिदासाची काव्यसंपदा म्हणजे मानवी प्रतिभेचा अद्भुत चमत्कार होय.
‘रघुवंश’ आणि ‘कुमारसंभव’ ही दोन महाकाव्ये (यांपैकी दुसरे कालिदासाने अर्धवटच सोडले असून त्याच्या नवव्या सर्गापासून पुढचा भाग कालिदासकृत नाही, असे समजतात.) ‘मेघदूत’ आणि ‘ऋतुसंहार’ ही दोन लघुकाव्ये- खंडकाव्ये आणि ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’ आणि ‘अभिज्ञान शाकुन्तल’ नावाची तीन नाटके एवढे सात ग्रंथ कालिदासाच्या नावे असल्याचे एकमत संस्कृताभ्यासकांमध्ये आहे. याशिवाय ‘अम्बास्तव’, ‘कल्याणस्तव’, ‘कालिस्तोत्र’, ‘काव्यनाटकालंकार’, ‘नलोदय’, ‘नवरत्नमाला’, ‘वृन्दावन काव्य’, ‘वैद्यमनोरमा’सारखे कितीतरी ग्रंथ कालिदासाच्या नावे आहेत. परंतु त्यांमध्ये ‘मेघदूत’कार कालिदास की वेगळा कालिदास याबाबत मात्र एकमत नाही.
कालिदासाच्या काव्यातील प्रतिभा व्यासंगाच्या वैभवाने समृद्ध झालेली दिसते. आपल्या सहज नि नैसर्गिक प्रतिभेला काटेकोर कोंदणात सजवून कालिदासाने अजोड काव्यसंपदा निर्माण केली. अलंकारशास्त्र, तत्त्वज्ञान, कामशास्त्र, वैद्यकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पुराण, महाकाव्य ‘रामायण’ व ‘महाभारत’ या आर्षकाव्याच्या शाखोपशाखांचा तर अभ्यास कालिदासाचा होताच, त्याचबरोबर निरनिराळी स्थळं, प्रदेश, तेथील राजसभा, लोकरीती, निरनिराळे मानवी स्वभावविशेष, मनोविज्ञान यांबाबतही त्याचे निरीक्षण अत्यंत सूक्ष्म होते. याशिवाय संगीत, शिल्प, चित्र यांसारखा ललिकलांचेही प्रत्यक्ष ज्ञान त्याने मिळविलेले असावे. याचा प्रत्यय त्याच्या काव्यातील वर्णनातून येत राहतो. विविध विद्या, शास्त्रे नि कला यांचा व्यासंग नि प्रत्यक्ष ज्ञान यांच्या तेजाने लखलखीत असलेली कालिदासाची प्रतिभा आजही रसिकांना मोहिनी घालते आहे.
कालिदासाचे ‘मेघदूत’ हे खण्डकाव्य मूळ संस्कृत भाषेत असून त्यात १२० श्लोक समाविष्ट आहेत. हे काव्य ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ अशा दोन भागात विभागले असून ‘पूर्वमेघा’त ६५ तर ‘उत्तरमेघा’त ५५ श्लोक समाविष्ट आहेत. एखाद्या कुशल चित्रकाराने आपल्या फटकाऱ्यांनी ज्याप्रमाणे एखादी रम्य कलाकृती निर्माण करावी, त्याप्रमाणे कालिदासाने ‘मेघदूता’तील प्रत्येक श्लोकात मोजक्या शब्दांमधून जणू एक एक मनोहारी चित्रच काढले आहे, असा भास होतो. त्यातील उपमा, उत्प्रेक्षा, अर्थान्तरन्यास, श्लेष इत्यादी अलंकारांनी ‘मेघदूता’चे अर्थरूपी सौंदर्य अधिकच खुलले आहे. संस्कृत भाषेतच ‘मेघदूता’ची अनेक अनुकरणे झाली आहेत. तसेच मराठी, बंगाली, तामीळ, तेलगू, मल्याळम इ. भारतीय भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेत. उर्दूतही ‘मेघदूत’ आहे. शिवाय फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, रशियन, इंग्रजी इत्यादी परकीय भाषांमध्येसुद्धा
मेघदूता’चे अनुवाद झाले असून ते उल्लेखनीय नि लोकप्रिय ठरले आहेत. ‘मेघदूत’ हे खंडकाव्य म्हणजे कालिदासाच्या अनुपम प्रतिभेचा विलास होय.
‘तस्मिन्त्रद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढातील काळेकभिन्न ढग पाहून विरहाने पोळलेल्या यक्षाला एक काव्यमय कल्पना सुचते. मेघालाच सजीव सखा मानून आपलं विरहाकुल मन त्याच्याजवळ तो मोकळं करतो. आपल्या प्रिय पत्नीचीही अशीच अवस्था झाली असेल, असे जाणून त्या मेघामार्फत आपल्या पत्नीला प्रणयसंदेश पाठवितो.
‘मेघदूत’ खंडकाव्यातून मेघाद्वारा प्रणयसंदेश पाठविण्याची अलौकिक कल्पनाच अतिशय अभिनव आहे. हे खंडकाव्य अलौकिकच आहे. त्यावर जवळजवळ पन्नासच्या वर टीका लिहिल्या गेल्यात.
||२||
कालिदासाच्या ‘मेघदूता’ची मराठी रसिक मनालाही विलक्षण भूरळ पडली. ‘मेघदूता’च्या विलोभनीयतेचे उत्कट दर्शन मराठीतून घडविण्यासाठी अवघ्या शे-दिडशे वर्षात साधारणतः २० पद्य अनुवाद रूपे झाली आहेत. १८६५ साली कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी ‘मेघदूतनामक काव्य’ या नावाने पहिला अनुवाद केला. नंतर ल. ग. लेले यांचे ‘मेघदूतकाव्याचे समवृत्त मराठी भाषांतर’ (१९०१), भा. शं. देवस्थळी यांचे ‘यक्षसन्देश’ (१९०१), बा. ल. अंतरकर यांचे ‘मेघदूतच्छाया’ (१९०५), गं. गो. दामले यांचे ‘मेघाचे अलकेस प्रयाण’ (१९०६), शां. आ. सबनीस यांचे ‘महाराष्ट्र मेघदूत’ (१९३८), चिं. द्वा. देशमुख यांचे ‘मेघदूत’ (१९४४), रा. चिं. श्रीखंडे यांचे ‘सुश्लोक मेघ’ (१९५०), ग. रा. हवलदार यांचे ‘मेघदूत’ (१९५०), द. वि. पंडित यांचे ‘मेघदूत’ (१९५४), ग.नी. कात्रे यांचे ‘मेघदूत’ (१९५५), कुसुमाग्रज यांचे ‘मेघदूत’ (१९५६), द. वें. केतकर यांचे ‘मेघदूतत्रिविक्रम’ (१९५६), रा. प. सबनीस यांचे ‘मेघदूत’ (१९५८), ना. ग. गोरे यांचे ‘मेघदूत’ (१९६४), शं. गो. जोशी यांचे ‘मुक्तामाला’ (१९६९), वसंत पटवर्धन यांचे ‘मेघदूत’ (१९७१), बा. भ. बोरकर यांचे ‘मेघदूत’ (१९८०), वसंत बापट यांचे ‘मेघहृदय’ (१९८७) आणि शान्ता शेळके यांचे ‘मेघदूत’ (१९९४) असे अनुवाद मराठी मध्ये झालेले आहेत. या ‘मेघदूता’च्या केलेल्या अनुवादांपैकी कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर आणि शान्ता शेळके या तिघांनी केलेल्या अनुवादांविषयी काही आकलन याठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
॥३॥
‘मेघदूता’तील नायक यक्ष हा कुबेराचा सेवक असून अलका नगरीत राहणारा असतो. स्वामी सेवेत कर्तव्यच्युत झाल्याकारणाने यक्षाच्या वाट्याला एक वर्षाची हद्दपारीची शिक्षा भोगणे येते. अशा वेळी शिक्षेतील आठ महिने निघून जातात. मात्र उरलेले चार महिने कंठणे यक्षाला असह्य होते. प्रिय पत्नीच्या वियोगाने तो अत्यंत व्याकुळ होतो. अशा वेळी पत्नीपर्यंत आपला संदेश पाठविण्यासाठी वर्षाऋतुचे
आगमन होताच भरून आलेल्या मेघाला दूत म्हणून तो बघतो. पत्नीविरहाच्या असह्य व्याकूळपणात मेघाचे अचेतनपण त्याला जाणवत नाही. मेघाला आपला मित्र मानून, त्याचे चेतनपण गृहीत धरून आपल्या मनाची कासावीस अवस्था, आतुरता प्रिय पत्नीला कळवण्यासाठी यक्ष मेघाला विनवितो.
‘मेघदूता’च्या पुढील वर्णनात विरहाने व पत्नीच्या काळजीपोटी यक्षाच्या झालेल्या कृश अवस्थेचे वर्णन आले आहे. अलका नगरीच्या प्रवासादरम्यान मेघाने निर्सगातील चैतन्याला, सौंदर्याला अनुभवत जावं, याविषयी यक्ष मेघाला अनेक उदाहरणं देतो. अलका नगरीचा मार्ग सांगताना मालक्षेत्र, आम्रकूट पर्वत, विंध्य पर्वताच्या पायथ्याशी खडकांनी विभागलेली नर्मदानदी, उज्जयिनी नगरी, गंभीरा नदी, देवगिरी पर्वत व त्यावरील कार्तिकेयाचे देवालय, चर्मण्वती (चंबळ) नदी, दशपूर (हल्लीचे मंदसोर), ब्रह्मावर्त देश, कुरुक्षेत्र, सरस्वती व गंगा या नद्या व शेवटी हिमालय आणि त्यावर वसलेली अलका नगरी इत्यादी स्थळांचे मनोरम वर्णन पूर्वार्धात तो करतो. यक्षाच्या भौगोलिक ज्ञानाचे व रसिकवृत्तीचे सुंदर दर्शन येथे घडते. पत्नीविषयी यक्षाचं आत्यांतिक प्रेम आणि पत्नीवरील त्याचा विश्वास आणि श्रद्धा यांचे सुरेख वर्णन ‘मेघदूता’त येते.
कालिदासाच्या काव्यातील रमणीय वर्णनपरता, शृंगाररसाविष्काराची हातोटी नि मन्दाक्रांता वृत्तात केलेली रचना वाचकांना थक्क करते. या काव्यात सर्वत्र विप्रलंभ शृंगाराचे साम्राज्य दृष्टीस पडते. यातूनच कालिदासाच्या समृद्ध प्रतिभेचा प्रत्यय येतो.
||४||
कुसुमाग्रजांनी केलेला ‘मेघदूता’चा अनुवाद १९५६ मध्ये प्रकाशित झाला. ‘मेघदूता’तील अप्रतिम सौंदर्याला मराठीतून आणण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. कुसुमाग्रज स्वतः एक प्रतिभासंपन्न कवी आहेत. कालिदासासारख्या श्रेष्ठ, अलौकिक प्रतिभासंपन्न कवीच्या ‘मेघदूत’ या कलाकृतीचा कुसुमाग्रजांनी मराठीमध्ये केलेला अनुवाद हा मूळ कलाकृतीच्या अधिक जवळ जाणारा आहे. त्यांनी ‘मेघदूता’तील ‘पूर्वमेघ’ व ‘उत्तरमेघ’ या भागांमधील प्रत्येक श्लोक मूळ संस्कृतमध्ये दिला असून त्याच्याच खाली त्या श्लोकाचा मराठी अनुवाद दिला आहे. कुसुमाग्रज ‘मेघदूता’ विषयी म्हणतात, “एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी ‘मेघदूत’ या काव्याचीच निवड करीन… रसिकांच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे, एक वेगळे भावविश्व त्याच्या सभोवार विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचे सामर्थ्य ‘मेघदूता’त जितके आहे तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे…” या भारावलेपणातून ‘मेघदूता’चे अतिशय तरल प्रकटन त्यांनी मराठीत केले. ‘मेघदूता’बाबत आपली भावना त्यांनी नितळ शब्दांत मांडली आहे. ‘मेघदूता’चे आशयसौंदर्य अधिक परिणामकारकपणे मराठीतून व्यक्त व्हावे, यासाठी कुसुमाग्रज अधिक आग्रही असल्याचे जाणवते. म्हणून ज्या ठिकाणी मूळ संस्कृत शब्द अधिक परिणामकारक आहेत, त्यांचा तसाच वापर त्यांनी अनुवादामध्ये केला आहे. कुसुमाग्रजांनी शब्दांवर व संदर्भावर भर न देता त्यांतून व्यक्त होणाऱ्या काव्यावर आपले लक्ष केंद्रित केले. निसर्गवर्णन, शृंगारप्रधानता, उपमा-अलंकारांचे उपयोजन, रसवत्तेचा प्रत्यय देणारे पदलालित्य इत्यादी अनेक वैशिष्ट्यांनी कुसुमाग्रजांचे ‘मेघदूत’ परिपूर्ण आहे. २८ व्या श्लोकांतील श्रृंगाररसाचे त्यांनी केलेले लालित्यपूर्ण आविष्करण अधिक तरल जाणवते.
किलबिलते खगमाला लहरींवरती-वा मेखला,
जलावर्त वा दावित नाभी, अस्थिरता पावलां
निर्विंध्या ती, लुब्ध तुझ्यावर रसास्वाद घे तिचा
विभ्रमचेष्टा प्रणय सांगती रमणीहृदयांतला !
( ‘मेघदूत’, कुसुमाग्रज,पृ.क्र.१८)
कालिदासाने निसर्गघटकांना, सृष्टीतील चैतन्याला दिलेले मानवी रूप आणि दिलेल्या मानवी भावभावना यांचे प्रत्ययकारी चित्रण कुसुमाग्रज तितक्याच उत्कटपणे मराठीत करतात. २६ व्या श्लोकात मेघाला उद्देशून यक्ष म्हणतो,
रम्य जुईचे पुढें ताटवे राननदीच्या तिरीं
भिजतिल कलिका शिंपडतां तूं नाजुक पहिल्या सरी;
कर्णफुलें सुकलेली, टिपती गाल, अशा माळिणी
छायारूपें मुखास्वाद घे त्यांचा तूं क्षणभरी.
(‘मेघदूत’, कुसुमाग्रज पृ. क्र. १७)
कुसुमाग्रजांनी माणूस आणि निसर्ग यांच्यातील तादात्म्यपणाला विविध अर्थछटांनी शब्दरूप दिले आहे. कालिदासाने रेखाटलेली भावविवश, हळवी मनोवस्था, तसेच त्याची सौंदर्यमय रसिकवृत्ती तितक्याच समर्थपणे कुसुमाग्रजांनी देखील रेखाटली आहे. ‘उत्तरमेघा’तील विसाव्या क्रमांकाचा श्लोक हा कालिदासाच्या प्रतिभेचा कळस गाठणारा मानला जातो. (‘तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्ठी…’) या श्लोकाचा कुसुमाग्रजानी केलेला अनुवाद तितक्याच उंचीवर जाणारा आहे. कालिदासाने आपल्या प्रिय पत्नीची विरहाकूल अवस्था ज्या उत्कटपणे रंगविली आहे, त्याच उत्कटपणे कुसुमाग्रजांनी आपल्या शब्दांतून त्या भावावस्थेचा हुबेहुब प्रत्यय दिला आहे.
वसन जुनें वा नेसुनि वीणा मांडीवर घेउनी करिते
गीताक्षरांत माझ्या नांवाची गुंफणी,
परि तारेवर ओघळतें जल नेत्रांतिल सारखें
पुन्हापुन्हा तें पुसतां विसरे तानांची मांडणी !
(‘मेघदूत’, कुसुमाग्रज पृ. क्र.५०)
उत्तर भागात यक्षाने आपल्या पत्नीची व आपली विरहावस्था ज्या कारुण्योत्पादक रीतीने वर्णिली आहे, तितक्याच कारुण्याने कुसुमाग्रजांनी आपल्या काव्यातून ही भावना रेखाटली आहे. कुसुमाग्रजांनी ‘मेघदूता’च्या केलेल्या अनुवादाविषयी डॉ. अरुणा रारावीकर म्हणतात, “कुसुमाग्रजांच्या शैलीचे लालित्य, कोमलकान्त पदावली, सुंदर संस्कृत शब्दांची योजना, कालिदासाच्या शैलीचे स्मरण करून देणारे अनुप्रास व शब्दवैभव, शैलीचे अल्पाक्षररमणीयत्व, ते प्रकट करणारे अर्थातरन्यास, शृंगाररसाचा रमणीय आविष्कार, कल्पकता, कौशल्य, रचनासौंदर्य, अलंकारांचे सुरेख रूपांतर, भाषेतील नादमाधुर्य इत्यादी गुणांमुळे कुसुमाग्रजांचे जे कवित्व अनुवादातून प्रकट झाले आहे, त्यामुळे कालिदासासारख्याच दुसऱ्या एका थोर कवीची ही एक स्वतंत्र रचनाच आहे. भाषांतरित कृती स्वतंत्र कृती वाटणे हे तिच्या यशाचे गमक आहे.” (‘मेघदूताचे मराठी अनुवाद’, पृ.क्र. १७०-१७१.) कुसुमाग्रजांच्या ‘मेघदूता’च्या अनुवादाचे महत्त्व यातून अधोरेखित होते.
बा. भ. बोरकर यांनी केलेला ‘मेघदूता’चा अनुवाद १९८० मध्ये प्रकाशित झाला असला तरी त्याचे लेखन मात्र त्यांनी २० वर्षांआधीच केले होते. कालिदासाच्या ‘मेघदूता’ने भारावून गेलेल्या बोरकरांनी ‘मेघदूता’ला मराठी रूप देण्याचा निजदिनी ध्यास घेतला. यातूनच त्यांचे ‘मेघदूत’ साकार झाले. ‘मेघदूता’चा अनुवाद हा केवळ शब्दानुवाद, भावानुवाद किंवा रसानुवाद यांपुरता मर्यादित न राहता तो मूळ ‘मेघदूता’चा
अस्सल मराठी अवतार झाला पाहिजे, असा आग्रह बा. भ. बोरकरांनी धरला होता. यातूनच संस्कृत ‘मेघदूता’चा मराठी समवृत्त, सयमक, समश्लोकी अनुवाद अत्यंत प्रासादिक शैलीतून पुढे आला. यामध्ये मन्दाक्रांता या स्वाभाविक छंदाचा वापर बोरकरांनी केला आहे.
तप्तांचि तूं कणव जलदा! प्रीतिसंदेश नेई
स्वामीक्रोधें सखिविलग मी पोळतों येथ पाही
यक्षेशाच्या नगर अलके जा जिथें हर्म्यकेंद्रे
बाह्योद्यानीं हर उजळुनी क्षालितो भालचंद्रें
(‘मेघदूत’, बा. भ. बोरकर पृष्ठ क्र. २७)
संतप्तांचा, व्यथितांचा निवारा असणाऱ्या मेघाला अलका नगरीमध्ये जाऊन आपला निरोप प्रिय सखीला पोहोचवण्याची विनंती यक्ष करतो. त्यावेळी तिच्या घराबाहेर असणारे उद्यान, महाल, वाडे हे शंभूशीर्षावरील चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले असल्याचे सांगतो. ‘मेघदूता’च्या अनुवादाच्या निमित्ताने यक्षाच्या आणि यक्षपत्नीच्या विरहव्यथेशी एकरूप होऊन स्वतःची शृंगारभावना परिशुध्द करून घेतल्याची भावना बोरकरांनी व्यक्त केली असून अतिशय तरल शब्दात हा अनुवाद केला आहे. संस्कृत तसेच मराठी भाषिक सौंदर्य, नादमाधुर्यता, प्रसंगवर्णनपरता आणि ओघवती प्रासादिक शैली यांचा प्रत्यय त्यांच्या अनुवादातून येतो. ९ व्या श्लोकात यक्ष मेघदूताला म्हणतो,
संथें पंथे स्ववश पवनासंगतीं चालताना
वामांगानें घुमतिल तुझ्या चातकानंद ताना
गर्भाधानस्मृति उमलुनी व्योमलेखा बलाका
स्वांगें बंधो रचितिल तुला कंठरेखा सुरेखा
(‘मेघदूत’, बा. भ. बोरकर पृष्ठ क्र. २८)
अशा तरल प्रत्ययकारीकतेतून बोरकरांचा अनुवाद घडतो. कालिदासाचे काव्यगुणवैभव आणि अलौकिक प्रतिभाविलास यांच्या संस्पर्शानें बोरकर भारावून जातात. कालिदासाच्या संस्कृतिसमृद्ध मनाशी तादात्म्य पावण्याच्या साधनेत ते रमतात आणि रामगिरीपासून अलकेपर्यंतचा मेघाबरोबरचा प्रवास करीत कालिदासाने घडवलेले भारताचे सृष्टीसौंदर्य आणि संस्कृतिसौंदर्य याचा चित्रमय आस्वाद वाचकांना मराठीतून देतात. कालिदासाच्या भावनांशी तादाम्य पावताना ‘बनुनि तुझे हृदय दुजें’ असे म्हणत बोरकरांनी कालिदासाशी आपले एकरूप व्यक्त केले आहे. बोरकरांनी आपल्या ‘मेघदूता’च्या अनुवादात संस्कृत श्लोकांचा अंतर्भाव केला नसून केवळ मराठीतच आपला अनुवाद दिला आहे, जो साहित्यिकदृष्टा अतिशय सरस ठरला आहे. मात्र तत्सम शब्दांचा अतिवापर आकलन सुलभतेला कुठे कुठे जड जाणवतो.
कुसुमाग्रज आणि बा.भ. बोरकर यांच्या प्रमाणेच शान्ता शेळके यांनीही ‘मेघदूत’ या नावानेच १९८४ मध्ये ‘मेघदूता’चा अनुवाद केला. ‘मेघदूता’च्या आकर्षणातून शान्ताबाई अनुवादाकडे वळल्या. आपल्या अनुवादाद्वारा वाचकांना कालिदासाचे मूळ संस्कृत ‘मेघदूत’ वाचण्याची इच्छा उत्पन्न व्हावी, एवढ्या एका अपेक्षेने आपण अनुवाद केला असल्याचे त्या नमुद करतात. त्यांनी ‘पूर्वमेघ’ व ‘उत्तरमेघ’ अशा दोन्ही भागात पहिल्यांदा कालिदासाचा संस्कृत श्लोक व लगेच त्याचा मराठी अनुवाद दिला आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही भाषांमधून ‘मेघदूता’चा आस्वाद घेणे सोयीचे ठरते.
शान्ता शेळके यांनी ‘मेघदूता’चा अनुवाद सरळ, साध्या ‘पादाकुलका’ सारख्या प्रवाही छंदात केला आहे. तो करताना मूळच्या आशयाला, रसवत्तेला हानी पोहचू नये, यासाठी त्यांनी स्वतःचे अधिक काही घालण्याचे टाळले. मूळातील कालिदासाच्या ‘मेघदूता’ मधील सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ इ. चे साधे सरळ निवेदन त्यांनी आपल्या अनुवादात केले आहे. शान्ता शेळके यांनी केलेल्या अनुवादातील आकलन सुलभता वाचकांना मूळ ‘मेघदूत’ वाचण्यास प्रवृत्त करणारी ठरली आहे. त्यांची वर्णनपरता अधिक सदृश्य जाणवते. १९ व्या श्लोकात यक्ष मेघाला प्रवासाविषयी सांगताना म्हणतो,
काळ्या देहांवर हत्तींच्या शुभ्र रेखिली जणुं कीं नक्षी !
(‘मेघदूत’, शान्ता शेळके, पृष्ठ क्र. २१)
‘मेघदूत’ या काव्याच्या आधारे शांताबाईनी कालिदासाप्रमाणेच प्रत्ययकारी निसर्गवर्णने आणि वेधक स्थलचित्रणे रंगविली आहेत. यक्षाची विरहवस्था नि त्याने कल्पिलेली आपल्या पत्नीची विरहवस्था अत्यंत उत्कटपणे व्यक्त होते. शिवाय यक्षाचे प्रणयातुर भाव व्यक्त होताना अत्यंत विशुध्द प्रेमाची प्रतीती शान्ताबाईंच्या शब्दातून येत राहते.
जगे कसा तरि कुशल तुझें तो तुला पुसतसे व्याकुळ भावें
वियोगकाळीं अबल सखीला याहुन दुसरें काय पुसावें?
(‘मेघदूत’, शान्ता शेळके, पृष्ठ क्र. १११)
शान्ता शेळके यांच्या अनुवादातून मेघदूतातील साधी-सरळ निवेदन पद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, रसपूर्णता अधिक सहजपणे मराठी वाचकांसमोर येते.
घना, लाडकी माझी तेव्हां निद्रासुख जरि असेल सेवित
करी प्रतीक्षा प्रहर तीन तूं, विसर सख्या, रे, अपुलें गर्जित
मीलनसुख ती असेल सेवित स्वप्नभेट तरि माझी होतां
गळामिठिचें स्वप्न भंगुनी सैल न व्हाव्या तिच्या भुजलता !
(‘मेघदूत’, शान्ता शेळके, पृष्ठ क्र. १०६)
यक्षपत्नीच्या वर्णनात कालिदासाने आदर्श गृहिणीचे सुंदर चित्र चितारले आहे. शिवाय ती विविधकलानिपुण, सहृद्य व प्रेमळ अशी पतिव्रता असल्याचे रेखिले आहे. अशा विरहिणीचे वर्णन शान्ताबाईंनी देखील तितक्याच कौशल्याने आणि हळूवारपणे केले आहे.
आशातुर सोत्कंठ निरखिते पवनसुतातें जशी जानकी
भरल्या हृदयें तशीच तुजला पाहिल माझी सखी लाडकी
वचनें तव ती ऐकत राहिल आणुन श्रवर्णी प्राण आपुला
प्रियेभेटीहुन उणा कितीसा प्रियकुशलाचा श्रवणसोहळा!
(‘मेघदूत’, शान्ता शेळके, पृष्ठ क्र. ११०)
कालिदासाने यक्षाचे पत्नीप्रेम, पत्नीनिष्ठा व तिच्या आठवणी जितक्या तन्मयतेने वर्णिल्या आहेत तितक्याच तन्मयतेने आणि तादात्म्याने शान्ताबाईंनी त्या वर्णित केल्या आहेत. शिवाय संपूर्ण काव्यात विविध उत्प्रेक्षा आणि उपमांनी भारून असलेले स्त्रीतत्त्व शान्ताबाईंनी सरलतेने अनुवादित केले आहे. उत्तरमेघातील कालिदासाने केलेले अलका नगरीचे वर्णन हे तत्कालीन सांस्कृतिकतेचे, मानवी नात्याचे व निसर्गाचे विलक्षण मानोहारी व उत्कट वर्णन असून त्याचाच प्रत्यय शान्ताबाईंनी आपल्या अनुवादातून वाचकांना दिला आहे. कालिदासाच्या ‘मेघदूता’तील आशयाला धक्का न लावता त्यांनी केलेला हा अनुवाद अत्यंत आस्वाद्य असा आहे.
कालिदासांच्या ‘मेघदूता’ची मराठी मनाला पडलेली मोहिनी विविध अनुवादाच्या रूपातून आविष्कृत होत आली आहे. ‘मेघदूता’मधील भावनांचा प्रांजळपणा, अभिव्यक्तीतील सहजता व सर्वसुलभ वाटणारी रूपके आणि उपमा वाचकांना आकृष्ठ करत जातात. ‘मेघदूत’ हे काव्य सौंदर्य आणि प्रेम, मिलन आणि विरह या भावनांनी ओथंबलेले असून त्यातील एक-एक कल्पनाविलासावर काव्यमर्मज्ञ चकित होत जातात. ‘मेघदूता’तील निर्जिव पात्र ही सजीव व संवेदनांनी परिपूर्ण भासतात. कालिदासाने ‘मेघदूता’तून अभिव्यक्त केलेली भावनांची सुक्ष्मता आणि विचारांमधील वैविध्यता आपल्या अनुवादात आणण्याची किमया कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर आणि शान्ता शेळके या तिन्ही कवींनी लिलया साध्य केली आहे, असे म्हणावेसे वाटते. या अनुवादाच्या निमित्ताने मराठी भाषेतील शब्दसिद्धी, शब्दबंध आणि शब्दश्रीमंतींचे वैभवही अनुभवास येते. या तिघांचेही अनुवाद या दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण जाणवतात. आजही ‘मेघदूता’तील नित्यनूतनता ही लेखक, वाचक, रसिक आणि अभ्यासकांना आवाहन करते. या कलाकृतीचे आकर्षण इतक्या काळानंतरही कायम आहे. यातूनच कालिदासाचे परिणतप्रज्ञत्व व प्रतिभाशालित्व तर सिद्ध होतेच पण मराठीत मेघानुवाद करणाऱ्या कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर आणि शान्ता शेळके यांचेही कवित्व श्रेष्ठ सिद्ध होते.