–किशोर देशपांडे
अर्धी सत्तरी गाठता गाठता ढेकर आणि जांभई एकत्र देत स्वतःला विचारले, अजून काय आणि किती बाकी आहे? म्हणाला, ” डॉक्टरला नाहीतर ज्योतिष्याला विचार. ते तरी नक्की सांगू शकतील का? माझं म्हणणं इतकच की बसू नकोस, लेटू नकोस अन मागे तर फिरूच नकोस.
चालत रहा पुढेपुढेच अंधाराकडून उजेडाकडे . जे अर्धवट अंधारातल्या अर्धवट उजेडात रमतात , ते ढकलले जातात प्रकाशाकडेच, इच्छेविरुद्ध . सरावले असतात त्यांचे डोळे, मंद प्रकाशाला, उदबत्तीच्या, निरांजनीच्या, समईच्या, कंदिलाच्या, फारतर मशालींच्या. वाढता प्रकाश सोसवत नाही त्यांना. प्रखरता जाणवते मुलांच्या उर्मट वागणुकीत, स्त्रियांच्या घराबाहेर राहण्यात, आरक्षणाच्या
आक्रोशात. हतबुद्ध होऊन ते मागे फिरू पाहतात, प्रखर उजेडापुढे काळोखच असणार, या भयाने. शोधू लागतात संभाव्य काळोखाचे शत्रू, शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासात. बदला घ्या म्हणतात,त्या शत्रूंच्या वारसांचा.
हसू नकोस. तूही तसाच आहेस थोडाथोडा, फार उजेड सहन न होणारा.
मागे जाऊ इच्छिणारे जे आहेत, त्यांना थांबवण्याची कुवत, धमक तुझ्यात नाही. जे धडपडत आहेत थांबवण्यासाठी, तेही थांबूनच तर नसावे? त्यांनाही कदाचित जाणवत असेल मिट्ट काळोख, अगदी कालच असलेल्या उजेडानंतर. तू असाही आहेस, थोडाथोडा.
जरा उपलब्ध प्रकाशाकडेच नीट बघ. सृष्टीची एकूण वाटचाल बघ. आहे ना प्रवास अंधारातून उजेडाकडेच! चालत रहा, सराव करत रहा वाढत्या प्रकाशाचा. थकवा असेल तर रेंगत, सरपटत, रांगत, लंगडत, धडपडत, कण्हत, हसत चालत रहा, डोळे आणि पाय ज्या दिशेने आहेत त्याच समोरच्या वाटेने.
प्रत्येकाला असतेच ओढ प्रकाशाची. जे मागे मागे जात आहेत किंवा जे थबकले आहेत, तेही कधी ना कधी सरावतीलच वाढत्या उजेडाला, पुन्हा पुन्हा चालत रहा, सराव करत रहा वाढत्या प्रकाशाचा. थकवा असेल तर रेंगत, सरपटत, रांगत, लंगडत, धडपडत, कण्हत, हसत चालत रहा, डोळे आणि पाय ज्या दिशेने आहेत त्याच समोरच्या वाटेने.
प्रत्येकाला असतेच ओढ प्रकाशाची. जे मागे मागे जात आहेत किंवा जे थबकले आहेत, तेही कधी ना कधी सरावतीलच वाढत्या उजेडाला, पुन्हा पुन्हा ढकलले गेल्यावर. त्यांची चिंता तुला नको. फक्त प्रकाशाची वाट सोडू नकोस, आतल्या अंधाराला कवटाळू नकोस.
(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत)
9881574954